Friday, March 27, 2009

रांगोळी

मामी रोज सकाळी अंगणात रांगोळी घालत असे. हा प्रकार पुण्यात फक्त दिवाळीत दिसायचा. म्हणून मला सकाळी लवकर उठून रांगोळी बघायचा भारी उत्साह असायचा. पहाटे साधारण साडेपाच वाजता अज्जी फुलं गोळा करायला बाहेर पडत असे. तिच्या नाजुक पावलांची चाहूल लागल्यावर मी डोळे चोळत बाहेर येत असे. मग आम्ही दोघी गल्लीच्या दोन्ही कोप-यांपर्येंत चालत फुलं वेचायचो. एकदा सकाळी पारिजातकाचा खूप सुंदर सडा पडला होता घराबाहेर. अामच्या आधी कदाचित कुणी तो पाहिला सुद्धा नसेल. न हलवलेल्या,गवळ्याच्या सायकलिने न चिरडलेल्या सड्याची मजा वेगळीच असते. तसा तो होता! अज्जी त्या सड्याकडे पाहून म्हणाली,"माणिक मोत्यांची पायाशी घालूनी बरसात, बसे संन्यस्थ पारिजात"! पुन्हा एकदा पुण्यात असाच सडा पडला होता. तो पाहून मी ह्या आोळी म्हंटल्या तर अज्जीला केवढा आनंद झाला होता! एवढीशी चिमुरडी आणि पाठांतर बघा!
परत येताना अंगणात मामी चवड्यांवर बसून रांगोळी काढताना दिसायची. मग मी अज्जीचा पदर सोडून मामी जवळ बसायचे!
असं रोजंच काही ठेवणीतली रांगोळी नसायची. कधी घाई असली कि तिची ठरलेली परडी असायची. आणि रंग भरायला वेळ नसला तर नुसतं हळद-कुंकू शिंपडत असे. तरी मला ते सगळंच सुंदर वाटत असे! कधी लाडात येऊन तिच्या रांगोळीत मी पारिजात भरत असे! मामीचा दिवसभर टिकणारा हिटलर-अवतार अजून सुरू झाला नसे म्हणून सकाळचे मामी दर्शन खूप गोड असायचे! 
रांगोळीखाली नेहमी शेणाने सारवलेला चौकोन असायचा. तो बनवायला समोरच्या आऊच्या गोठ्यातून शेण आणावे लागत असे. पहिल्यांदा जेव्हा मामीने "शेण आणा गं"! असा हुकुम ठोकला तेव्हा मला तिचा सात्विक संताप अाला होता! आई अाल्यावर "तुझी वहिनी मला शेण आणायला लावते", असं ठणकवून सांगणार पण होते मी तिला! पण तिने असा हुकुम ठोकल्यावर स्नेहा पटकन बुट्टी घेवून गोठ्यात गेली अाणि छान बागडत शेण घेवून अाली! मग त्यात थोडे पाणी घालून चौकोन छान सारवून दिला! "बुट्टी" ही "टोपलीची" कोल्हापुरातली मामे बहीण!
दोन तीन वेळा मी बरोबर गेले पण माझा हात शेणाच्या गोळ्याच्या दोन इंच वर थांबायचा. तरी स्नेहाला का एवढा आनंद होतो हे पाहण्यासाठी एकदा मनाचा हिय्या करून शेणात हात घातला. त्या दिवशी गोठेवाल्या आऊच्या डोळ्यात माझ्यासाठी तिच्या म्हशींपेक्षा जास्त कौतुक होतं! त्या दिवसापासून शेण सारवण्यावरून माझी व स्नेहाची भांडणं होऊ लागली.
शेण खूप तल्लीन होऊन सारवता येते. त्यामुळे दिलेला चौकोन छान सारवायचा एवढं एकच ध्येय पुरेसं असायचं. मग गल्लीतल्या बायका कौतुकाने "वसुची न्हवं ही? बगा की कशी सारवायलिया! पुन्याची कोन म्हनंल!" असं म्हणायच्या. स्नेहाच्या छोट्याशा नाकावर मग थोडा राग येत असे माझं कौतुक झाल्यामुळे. ती तो नंतर संधी मिळताच व्यक्त करीत असे!
दिवाळीदिवशी अामच्या सगळ्या शेजारणी अाणि भाडेकरूंच्या बायका मामीला रांगोळी काढू लागत. तेव्हा मात्र मामीला आमची मदत म्हणजे लुडबुड वाटत असे. पण आम्ही नेटाने तिथेच बसून राहत असू. 
पूर्ण झाल्यावर मात्र दादा लोकांच्या अॅटम बाॅम्ब पासून तिचे रक्षण करीत असू!
मग एका सुट्टीला मी नेहमीप्रमाणे कोल्हापुरला गेले तर स्नेहा एकदम बदलली होती! अशी एकदमच खूप शांत, लाजाळू अाणि मोठी झाली होती. तिला भातुकली खेळाण्यात पण रस नव्हता! सारखी अापल्या शाळेतल्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारायची! अाणि ज्या खिडकीच्या गजांमधून अाम्ही "कोंडलेली राजकन्या" बनून पळून जायचो त्या गजांमधे ती एकदम मावेनाशीच झाली! 
मी मग जास्त वेळ अज्जीला चिकटायचे. तिला "स्नेहा भातुकली का खेळत नाही?" असं विचारायचे. मग "अता स्नेहा मोठी झाली. एक-दोन वर्षात तू सुद्धा होशील. मग तुम्ही परत एकसारख्या व्हाल!" असं उत्तर मिळायचं. त्यावर कधी रडून तर कधी रुसुन मी झोपून जायचे.
पण एकदा सकाळी मी डोळे चोळत गॅलरीत अाले तर अंगणात मामी ऐवजी स्नेहा सुंदर रांगोळी काढत होती!

Wednesday, March 25, 2009

तेल-वेणी

कोल्हापुरला जाताना नेहमी एक दु:ख आसायचं. स्नेहाचे केस खूप मोठे झाले असणार. आई नेहमी "कोण वेण्यांचा व्याप करणार?" म्हणून माझे केस कापत असे. पण स्नेहाचे केस खूपच सुंदर होते. कुणालाच ते कापावेसे वाटायचे नाहीत. एकदा ती कंटाळून ब्यूटी-पार्लर मध्ये गेली केस कापायला. तर तिथल्या मुलीचे कात्री चालवायचे धाडसच होईना! मग स्नेहानी स्वत:च्या हाताने पहिला "वार" केला आणि तिला कात्री दिली.तर अशा केसाना शह द्यायचा म्हणजे किमानपक्षी लांबी तरी पाहिजे! 
पण कोल्हापुरात मुलींची "वेणी" घालणे हे मामीचे परम-कर्तव्य असायचे!
रोज सकाळी, "स्नेहा ऊठ! नाहितर तडाखा खाशील" अशा झणझणीत धमकीने सुरुवात व्हायची. "तडाखा" हा पुणेरी "धपाट्याचा" कोल्हापुरात राहणारा मामे भाऊ. या धमकीनंतर "वेळेत उठला नाहीत तर मी वेणी घालून देणार नाही", हे असायचं. मला या धमकीने खूप आनंद होत असे.मामी कडून वेणी घालून घेणे म्हणजे स्वत:च्या एकुलत्या एक डोक्याचा नारळ खोवून घेण्यासारखे असायचे! 
"हं बस खाली" असा हुकुम व्हायचा. 
"आई अाधिच सांगते. खसकन फणी फिरवायची नाही"
"मला वेळ नाहिये तुझ्या सुचना ऐकायला. बस म्हंटलं की बसायचं. सईची पण घालायचिये."

मग फणीच्या सगळ्यात बारीक बाजूने "वार" सुरु व्हायचे. तरी नशीब आमचे कायम तेल्या मारुती असायचे. साधारण दहा एक मिनीट नुस्तेच केस विंचरण्यात अाणि स्नेहाचे फुत्कार ऐकण्यात जायचे. त्यानंतर मामी दोन घट्ट वेण्या घालायची. त्यांचा घट्टपणा तपासण्यासाठी वेण्या घालून झाल्यावर त्या अोढून बघायची.हाच सगळा प्रकार माझ्यावरही करण्यात यायचा. त्या वेण्या इतक्या घट्ट असायच्या कि कधी कधी अामच्या भुवया सुद्धा ताणल्या जायच्या बोटाॅक्स दिल्यासारख्या!
आम्ही दिवसभर कितीही दंगा केला तरी दुस-या दिवशी सकाळी सुद्धा वेण्या तशाच असायच्या. 
कधी अज्जी वेणी घालायची. ती मात्र कलाकार होती. तिचे मऊ हात अलगद चालायचे. कधी पाचपेडी तर कधी सातपेडी! कधी दोन वेण्या एकमेकांना कानाशी बांधून झोपाळा तर कधी गोफ. कधी परकर-पोलकं घातलं की खोपा!
मग अशावेळी अज्जी अम्हाला भवानी मंडपात घेऊन जात असे. दोघींच्या वेण्यांमध्ये बकुळीचे गजरे माळत असे. येता येता भेळ पण मिळायची!
वेण्या घालण्याइतकाच न्हाण्याचा कार्यक्रम अवघड असायचा. न्हाणीघरातल्या दगडावर दोघींना एकत्र बसवण्यात येत असे. "हं ..डोळे मिटा!" असा मामी-हुकूम येत असे. मग अाम्ही जिवाच्या अाकांताने डोळे मिटायचो. मग शिकेकाई, रिठे, संत्र्याची साल याचा कढत वस्त्रगाळ अर्क अमच्या डोक्यांवर अोतला जाई. हे तरी सोपं असायचं. नंतर वस्त्रात उरलेलं प्रकरण हाता-पायावर खसाखसा घासण्यात येई! आणि हे कमी म्हणून कि काय शेवटी बटाटे उकडावेत  इतके गरम पाणी डोक्यावर अोतण्यात येई. या सगळ्या प्रकारा आधी जमेल तितके तेल आमच्या शरिरांमध्ये मुरवण्यात येत असे. रविवारची ही महा-अंघोळ अटोपल्यावर मामी टी.व्ही. वर रामायण बघत असे.एवढी संगीत अंघोळ झाल्यावर मी दोन तास डाराडुर झोपत असे. त्यामुळे माझं रामायण कच्चं राहिलं!
पुण्यात माझं अाणि मला सांभाळणा-या विमल मावशीचं मेतकूट होतं. जसं ती तिच्या मुलाला अज्जीनं कापडात गुंडाळून काचेच्या बरणीतून पाठवलेलं लोणचं देते हे मी अाईला सांगायचे नाही तसंच ती मी दिवसभर चिखलात खेळते, गळ्यात झिंजा घेऊन फिरते, रस्त्यातली मांजरं उचलून आणते हे सांगत नसे! मग अाई घरी यायच्या बरोब्बर पंधरा मिनीट आधी माझी वेणी व्हायची. आईची पाच फुटी मूर्ती कोप-यावर दिसली की मी एकदा शेवटची नखं साफ करीत असे. 
त्यामुळे रोज नेमक्या वेळेला जुलमी अधिकाराने घातलेली वेणी मला अजिबात अावडत नसे!
पण सोमवारी सकाळी उशीला जो शिकेकाईचा वास यायचा तो आठवला कि अजुनही उगीच डोळ्यात पाणी वगैरे येतं!
आज माझी कुणी तशी वेणी घालून देणार असेल तर मी एका पायावर तयार आहे!

Sunday, March 15, 2009

सुट्टी सुरू!!

रंगपंचमीनंतर मला कोल्हापुरचे वेध लागायचे. मग वार्षिक परिक्षा झाली कि आई किंवा बाबा मला कोल्हापुरला सोडायला यायचे. आई बरोबर एस्.टी. ने जाणे म्हणजे अवघड परिक्षा असे. कारण कात्रज यायच्या आतच आई आ वासून झोपून जाई. बरं,तिच्या झोपण्यात सुद्धा भारी निग्रह असे. कितीही हलवलं,भुण-भुण केली,चिमटे काढले,तिचे डोळे हाताने उघडायचा प्रयत्न केला तरी ती ठामपणे झोपून राही. मग पहिला अर्धा तास लोकाना तिची दया येत असे. पण नंतरचे पाच तास मात्र माझी कीव येत असे. क-हाडच्या आसपास आई खडबडून जागी होई. मग आपण अजून दीड तास झोपू शकतो या जाणीवेने ती माझ्याशी थोडावेळ बोलायचा प्रयत्न करीत असे. पण एकूण आई बरोबर जाणे आणि एकटे जाणे यात फारसा फरक नसे.
बाबा बरोबर पुणे-कोल्हापूर प्रवास म्हणजे खूप मजा. कारण स्वारगेटवर जरी "बाबा,पाॅप्पिन्स" असं म्हटलं तरी लगेच मिळत असे. 
बस-स्टॅन्ड वर बाबा जगातली सगळी वर्तमानपत्रं विकत घेत असे. मग बसमध्ये चढल्यावर बाबा मला माझ्या तिकिटाचे पैसे काढून देत असे. कंडक्टर कडून तिकीट काढून घेईपर्येंत मी शांत असे. मग एकदा का बस निघाली, की जेमतेम कात्रजपर्येंत माझा गुणी शांतपणा टिके! घाट सुरु होण्याआधी माझा पहिला प्रश्न," बाबा, कोल्हापूर कधी येणार?".
मग वेगवेगळ्या निमित्ताने हाच प्रश्न विचारला जाई.कधी कंटाळून, कधी फक्त संभाषण म्हणून तर कधी सवय म्हणून!
पण बाबा न कंटाळता फलंदाजी करत असे. "अाता कात्रज येणार बरंका सयडम्" (मला लाडाने बाबा सयडम्-खयडम्-डब्बा-डायडम् म्हणत असे!). 
"कात्रज म्हटल्यावर काय आठवतं सांग पाहू?"
"मला न आवडणारं पचपचीत दूध?"
हे उत्तर बहुधा बाबाला अपेक्षित नसावं. त्यामुळे थोडावेळ क्लीन बोल्ड झाल्यासारखा चेहरा करून "अजून काय सांग?" असा प्रश्न विचारी!
"बोगदा"
"बरोब्बर!"
मग प्रत्येक थांब्याचा इतिहास-भुगोल सांगण्यात बराच वेळ निघून जात असे. 
माझा भुगोलातला रस कमी झाला की माझे  इतर प्रश्न सुरु होत. जे बाबाला फारसे अावडत नसत. 
"अापण राजारामपुरीत रिक्षानी जायचं की चालत?"
"स्नेहा घरी असेल? मला बघितल्यावर ती काय म्हणेल?"
"तू परत जायच्या अाधी अापण रंकाळ्यात जाणार ना? अाणि सोळंकीत अाईस्क्रीम?"

मग थोड्यावेळाने बाबा नवीन युक्ती शोधून काढे.
"पुढच्या एक तासात जर एकही प्रश्न विचारला नाहीस तरच साता-यात तुला खाऊ मिळेल."
मग पंधरा मिनीट बळं गप्प बसून माझा सोळाव्या मिंटाला पुन्हा प्रश्न,"झाला एक तास?"
बस मधले  इतर लोक या प्रश्नावर हमखास हसत आणि मी त्यांच्याकडे,"चोमडे कुठले" अशा नजरेने बघून गाल फुगवत असे.

क-हाड अाल्यावर मला "अब कोल्हापूर दूर नही" वाटायला सुरवात होई. टोप नावाचं गाव अालं की अगदीच सुटका झाल्यासारखं वाटू लागे! कोल्हापूर बस-स्टॅन्ड वरचा "येळगुड दूध" असा बोर्ड दिसला की माझी सुट्टी ख-या अर्थाने सुरू होई!
मग रिक्षा राजारामपुरीतल्या अकराव्या गल्लीत शिरली कि माझा चेहरा खुलत असे. कारण पुढचे पूर्ण दोन महिने संपूर्ण दिवस स्नेहा बरोबर खेळण्यात अाणि अज्जीच्या गोष्टी ऐकण्यात जायचे. :)
अाज-काल पुणे-कोल्हापूर प्रवास ड्रायव्हर सहित हाॅन्डा सिटितून करायला मिळतो. आणि नव्या रस्त्यामुळे वेळही कमी लागतो. पण अजुनही एस्.टी च्या "लाल डब्यातून" केलेले प्रवास जास्त जवळचे वाटतात!
त्या बसमधल्या गजांचा लोखंडी वास अाणि टरटरीत रेग्झिनची बाकडी सुट्टी सुरु झाल्याच्या आनंदात विरुन जायची. आणि अाईच्या रोजच्या "भाजी खा.नुस्ता तूप-भात मिळणार नाही." मधून पण सुटका! अज्जी नुस्ता तूप-मीठ-भात लाडाने भरवत असे! आणि कोल्हापूरच्या हवेमुळे कि काय कोण जाणे,भाज्यांमधल्या व्हिटॅमिनची कमी सुट्टीत कधीच जाणवत नसे!



मुरंबा

"अज्जी ऊठ!" 
......
"अज्जी ग..ऊठ ना!"
"मला भूक लागलीये खूप"

भर दुपारच्या टळटळीत उन्हातून धावत अाजीच्या माडीवरच्या गार-गार खोलीत अाम्ही दाखल व्हायचो. अाम्ही म्हणजे मी व माझी मामे बहीण-स्नेहा. तसं स्नेहा हे तिचं बाहेरचं नाव. पण मी तिला बरीच वर्ष दिदी म्हणायचे. आमच्या लहानपणीच्या "चरित्र-मापनात" दिदी बरीच गुणी असे. मी सुद्धा प्रयत्न केले. पण मला कधीच गुणी होता अाले नाही. 
तर अशा उन्हाळयाच्या दुपारी अाजीला झोपेतून उठवून खाऊ मिळवायची जवाबदारी माझी असे. कारण मुलीची मुलगी असल्यामुळे अाणि उन्हाळ्यापुरतीच कोल्हापुरात असल्यामुळे अाजी माझ्यावर रागवत नसे. 

मग अज्जी उठायची.
"काय देऊ?"
"माहित नाही. काय काय अाहे अापल्याकडे?"
"मेथीची भाजी अाणि चपाती खातेस?"

कोल्हापुरात सगळेजण पोळीला "चपाती" म्हणायचे. सुट्टी सुरू झाल्यावर पोळी म्हणायची सवय असायची. त्यामुळे मामा माझी "पुणेरी" म्हणून खूप थट्टा करीत असे. सुट्टी संपल्यावर कधी चुकून शाळेत "चपाती" शब्द तोंडून निघाला तर माझ्या पुणेरी मैत्रिणी फिदी-फिदी हसत. मग मला थोडा वेळ स्वत:ची लाज अाणि नरू मामाचा खूप राग येत असे.

"नको. अजून काय अाहे?"
"अजून काय बरं देऊ? ताक-भात अाणि लिंबाचं लोणचं देऊ?"
"शी! मला नक्को जा ताक. अजून काय अाहे ?"
"मग मामीला अामरस काढून द्यायला सांग"

या शेवटच्या वाक्याचे खूप हेतू असत. मामीची झोपमोड व्हावी हा त्यातील सगळयात सोपा हेतू. पण माझ्या या मागणीला ती कसा प्रतिसाद देते त्यावर तिच्या सूनपणाचे निकष ठरत असत. 

"नको. अजून काय आहे? मुरंबा अाहे?"
"हो अाहे की ग लाडू!"
"मग मला मुरंबा,तूप अाणि पोळी दे."

मग एका छोट्याशा ताटलीत एका बाजूला मुरंबा अाणि त्यावर चमचाभर तूप आणि दुस-या बाजूला अर्धी पोळी घेऊन आम्ही गॅलरीत जायचो. दिदी गुणी असल्यामुळे काय खायचं हे मीच ठरवायचे नेहमी. 
"मुरंबा" हा शब्द मराठीतच व्यक्त करता येतो मनासारखा.म्हणून मराठी ब्लाॅग चा खटाटोप.