Tuesday, August 25, 2009

अण्णा आजोबा

लहानपणी बरीच वर्षं "घरातला बागुलबुवा" म्हणून अण्णा आजोबांचा वापर होत असे.मोठ्यांना उपद्व्याप होईल अशी कुठलीही गोष्ट करायचा बेत केला की " अण्णा रागवतील" ही सबब सांगून अज्जी आणि मामी आम्हाला कटवत असत. पण अण्णा आजोबांचा अभ्यास करायला मला फार आवडायचे. रोज सकाळी चार वाजता उठून आजोबा वाचन आणि लिखाण करीत असत. "कुसूम" अशी खणखणीत हाक पहाटे चार वाजता आमच्या कानावर पडत असे. मग अज्जी खूप केविलवाण्या आवाजात, "आले हो. हाक मारू नका एवढ्यानी, मुलं झोपलीत"!" असं म्हणायची. 
मग मुलांनी सुद्धा कसं चार वाजता उठलं पाहिजे यावर ते त्याहीपेक्षा जोरात भाषण द्यायचे. पाच-सहा वाजता त्यांची "न्याहरी" असायची. त्यात आदल्या दिवशीची भाकरी, बारीक (अज्जीने उठून चिरलेला) कांदा,  झणझणीत तिखट किंवा ठेचा, दही आणि शेंगदाणे असायचे. सकाळी पाच वाजता असला शेतकरी आहार फक्त अण्णाच घेऊ शकतात. पण का कोण जाणे, त्यांना जेवताना बघून नेहमी मला पण जेवायची इच्छा होत असे. मग पुन्हा त्यांचा अभ्यास सुरू व्हायचा. त्या वेळात अज्जी एखादी डुलकी काढायची की परत तिला समन्स यायचे. अज्जीने आजन्म आजोबांची लेखनिक म्हणून काम केलं. त्यांचा गीतेचा फार मोठा अभ्यास होता. गीता, गीताई, कठोपनिषद, ईशावास्य उपनिषद, पातंजलीची योगसूत्रं या सगळ्यांचा आजोबांनी खूप अभ्यास केला. अज्जी मात्र खाली मान घालून त्यांची प्रत्येक ओळ लिहून द्यायची. आजोबांची "हौस" अज्जीला मात्र सक्तीची होती. 
मग आम्ही उठलो की अचानक अण्णांमधला प्रवचनकार जागा होत असे. आम्हाला पकडून गीता सांगायची त्यांना फार हौस होती. पण अज्जीइतके आम्ही सोशीक नव्हतो. घरातल्या अनेक दारांमधून आम्ही त्यांना चुकवून पळ काढायचो. अज्जी सुद्धा आम्हांला यात मदत करीत असे. ते खोलीत यायच्या आधी, "पळा आता अण्णा येणारेत", अशी दबक्या आवाजात आठवण करून द्यायची. मग लगेच आम्ही पळ काढायचो. पण या सगळ्यांतून कधी कधी पकडले पण जायचो. मग लगेच त्यांचे डोळे चमकायचे. कधी कधी मी पळून जायचे नाही. तसे चमकलेल्या डोळ्यांचे आजोबा अचानक लहान मुलासारखे दिसायचे. त्यांना काहीतरी नवीन गम्मत कळाली आहे असा भाव त्यांच्या चेह-यावर असायचा. तो बघायला मला कधी कधी फार आवडत असे. 
"सई, तुला मी आता गीताईतला एक श्लोक सांगणार बरंका!" म्हणून माझ्या दंडाला धरून मला खुर्चीत बसवत असत.
मग, "इंद्रिये वर्तता स्वैर, राग द्वेष उभे तिथे, वश होवू नये त्याते, ते मार्गातिल चोरची।" अशी सुरवात व्हायची. त्यानंतर रोजच्या आयुष्यातली बरीच उदाहरणे देऊन त्यांचे प्रवचन रंगायचे. कधी कधी मी पेंगू लागायचे. मग "झोपू नकोस. झोप ही सुद्धा इंद्रियांची माया आहे" असं सांगून मला जागं करायचे. 
पण त्यांचं निरूपण ऐकून तासभर झाला नसेल तोवर त्यांच्या खोलीतून "हरामखोर!! चाबकानं फोडीन त्याला!" अशी गर्जना ऐकू येत असे! त्यांचा राग मात्र त्यांच्या गीतेवर मात करून गेला! त्यांचा राग सगळ्या गल्लीभर प्रसिद्ध होता. पलिकडचे परीट, समोरची आऊ, शेजारचे वाटवे या सगळ्यांना त्यांच्या रागाची सवय झाली होती. त्यामुळे मामी बाहेर पडली की, "काय वैनी! आज पारा जरा जास्तच वर गेलता न्हवं!" म्हणून पृच्छा होत असे. मामी पण, "काय सांगू आता! नेहमीचंच झालंय" अशा अर्थाची मान हलवत असे!
पुढे जेव्हा मी स्वत:चं असं वाचन करू लागले तेव्हा ते मला "सत्व, रज आणि तम या प्रवृत्तींचा मानवी मनाशी कसा संबंध आहे" हे शिकवायचे. मग मी दंगा करू लागले की मी तमरसाने कशी भरलेली आहे हे मला पटवून द्यायचे. त्यांना हात पाहून भविष्य सांगता येतं. त्यामुळे मी कधी कधी, "मला दहावीला किती मार्क मिळतील?" असले फालतू प्रश्न विचारायच्या मोहात पडायचे. मग, "भवसागर दुस्तर आहे", किंवा त्याच प्रकारच्या भयानक वाक्यानी सुरवात करून ते भविष्य न सांगताच पुन्हा उपदेश वाहिनी सुरू करायचे! 
त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं असेल तर ते त्यांचं वाचन! रिटायर झाल्यानंतरही शाळा-कॉलेज मधल्या तरूण मुलांसारखं वाचन ते करायचे. त्यांच्या एकाही मुलाला किंवा नातवंडाला त्यांच्यासारखं वाचन जमलं नाही. प्रत्येक पुस्तकात त्यांच्या हस्ताक्षरातल्या छान टिपा असतात. त्यांच्याकडून एखादं पुस्तक घेतलं की त्या पुस्तकाबरोबर अजून खूप पुस्तकांची त्यांच्या टिपांमधून झलक मिळते. त्यांच्या खोलीत त्यांचं "वाचनालय" आहे.त्यांच्या प्रत्येक पुस्तकाला वर्तमानपत्राचे छान कव्हर असते. मग पुस्तक अगदीच जुनं असेल तर त्याला आतमध्ये "दवा-पट्टी" केलेली असते. पुस्तकांची पानं अगदी एखाद्या घायाळ पक्षिणीचे पंख गोंजारावेत तसे ते गोंजारतात. जगात त्यांचं पूर्ण कोपरहित प्रेम जर कुणावर असेल तर ते त्यांच्या पुस्तकांवर आहे!
बाबाबरोबर राजकारणावर चर्चा करता करता त्यांनी कित्येकवेळा त्याच्याशी जोरदार भांडण केले आहे. कुणीतरी आपल्याशी सहमत नाही हे एक कारण त्यांच्या रागासाठी पुरे असायचं. मग समोरचा माणूस आपला खूप मोठा अपमान करत आहे असं त्यांना वाटू लागे. कोल्हापूरच्या घरातली मोठ्या माणसांची भांडणं फार मजेदार असायची. सगळ्या मुलांनी आजोबांचे बाकी कुठलेही गुण घेतले नाहीत पण त्यांची भांडण करण्याची कला मात्र सगळ्यांना मिळाली. प्रत्येकानी ती त्याच्या स्वभावाप्रमाणे बदलली देखील! ताट भिरकावणे हा आमच्या घरातला आवडता निषेध. आजोबांनी इतरवेळी कितीही "अन्न हे पूर्णब्रम्ह" वगैरे  शिकवणी दिली तरी संतापाच्या आवेगात नेहमी त्यांच्या हातून हे पाप घडायचे. मग आम्ही आ वासून त्या रूद्रावताराकडे बघत असू. दुसरा आवडता निषेध म्हणजे वाद टिपेला गेला की भोवळ येणे. हे नेमकं त्या वेळेला कसं घडायचं हे मला आजपर्यंत कळलं नाही.मला फक्त गणिताच्या पेपराच्या आधी चक्कर यायची. आणि त्यावर माझा काहीही ताबा नसायचा. 
 एका प्रसिद्ध (मुडशिंगीकर संप्रदायात) भांडणामध्ये तर कुणीतरी कुणाच्यातरी डोक्यावर पाण्यानी भरलेली घागर रिकामी केली होती म्हणे! खूप वर्षं मला सगळे लोक चिडले की असेच वागतात असं वाटायचं. 
या सगळ्या घडामोडींमध्ये अज्जी मात्र शांतपणे एखाद्या कोप-यात उभी असे. तिला मी कधी रडताना पाहिलं नाही की कधी चिडताना. "सई जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जिचा आपल्याला मन:स्ताप व्हावा", हे एकच वाक्य तिनी मला उपदेशपर दिलं. आजोबांच्या गीतेतील "सुख दु:खे समेकृत्वा लाभालाभौ जयाजयौ" ह्या वाक्याचे मानवी प्रतिबिंब अज्जी झाली. 
पण आजोबांच्या उपदेशांमुळे रोजच्या आयुष्यातील ब-याच अडचणींवर छान मात करता येते. त्यांच्या पुस्तकांमधून वाचलेले बरेच काही सहज जसेच्या तसे जिभेवर येते. आजकाल आजोबा खूप हळवे झाले आहेत. पूर्वी रागानी लकाकणारे त्यांचे डोळे आता सारखे पाणावतात. पण त्यांची ती नाजूक, स्वच्छ, नीट-नेटकी मूर्ती डोळ्यासमोर आली की त्यांच्या अश्रूंच्या पलिकडची विद्वत्ता दिसू लागते!

Monday, August 10, 2009

स्पर्धा

लहानपणी मला स्पर्धा अज्जिबात आवडायची नाही. पुण्यात शाळा सोडून कुठे कुणाशी माझी कधीच तुलना होत नसे. त्यामुळे आपण सगळ्याच बाबतीत "लई भारी" आहोत असा माझा सोयिस्कर गैरसमज होत असे. कोल्हापुरात मात्र चिकू दादा, महेश दादा, अभिजित दादा, स्नेहा, मनिषा आणि गल्लीतली समस्त वानरसेना यांपुढे माझी "शान" म्हणजे अगदीच पुणेरी आळूचं फतफतं असायची. शाळेतल्या केविलवाण्या पी.टी. च्या क्लासमध्ये मला जोरात धावता येत नाही, लंगडी घालता येत नाही, दोरीच्या उड्या मारता येत नाहीत हे कुणाला नीट कळायचे नाही. पण कोल्हापुरात मात्र सगळा दिवस करायला काहीच नाही आणि "बुद्धिजीवी" वगैरे म्हणायची सोय नसल्यावर मला गुमान खेळावे लागे. त्यात नेहमी माझा दणदणीत पराजय होत असे. अज्जीच्या कौतुकामुळे आगीत तेल ओतले जाई आणि सगळी मामे भावंडं कधीकधी माझी कशी जिरते ते बघत असत. अर्थात त्यामुळे माझ्या मनावर विपरीत परिणाम वगैरे बिलकुल झाला नाही. लंगडी घालताना जरी दोन मिनिटांत माझा जीव घशात आला तरी भांडताना मात्र माझी राणी लक्ष्मीबाई होत असे! कधी कधी  गल्लीतली सगळी पोरं "डब्बा ऐसपैस" का असलाच अपभ्रंश असलेला खेळ खेळायची. त्यात नेहमी माझ्यावर राज्य यायचं. म्हणजे कुणी कट कारस्थान न करताच. मला खेळताच यायचं नाही नीट. त्यात नेहमी राज्य आल्याने माझा आत्मविश्वास कमी व्हायचा आणि मग त्यामुळे माझे सगळे बेत फिसकटायचे. मग अगदी चार-पाच वर्षाची असताना मला असा "राज्य" वाला दिवस आला की आईची खूप आठवण यायची. तसं झालं की मी गॅलरीत जाऊन मुळूमुळू रडायचे. 
दुसरी मला अगदी न आवडणारी स्पर्धा म्हणजे "न बोलण्याची". अज्जी नेहमी माझ्यात आणि स्नेहात ही स्पर्धा लावायची. कुणी "बोलू नकोस" असं सांगितलं की मला अजूनच बोलायची इच्छा होत असे. त्यामुळे यातही मी नेहमी हरायचे. "पालक" खायच्या स्पर्धेत मात्र सगळे हरायचे. त्यामुळे मी खूष असायचे. दूध सगळ्ळयात आधी संपवणे हा एक नवीन मनस्ताप असायचा. पुण्यात "दूध" प्यायचे उंच स्टूल होते. त्यावरून मला खाली उतरता यायचे नाही. म्हणून ग्लास संपेपर्यंत मला त्यावर चढवले जाई. पण नंतर माझा धीर बळावला आणि मी तीन तास सलग एकही थेंब दूध न पिता तिथे बसून रहायचे. मग आई-बाबा कंटाळून मला खाली आणायचे व चहा द्यायचे. त्यामुळे दूध न पिण्याची स्पर्धा असती तर मी नक्की जिंकले असते. पण लहानपणी मोठ्या माणसांना आपलं मूल कशात जिंकू शकेल हे कळायला वेळ लागतो बहुतेक. 
का माहित नाही पण मला ज्या गोष्टी नीट यायच्या त्याची कधीच स्पर्धा लागायची नाही. जसं की मी पावसाळ्यात दगडाखालचे गांडुळांचे पुंजके खूप सहज शोधून काढायचे. मला लांबून दगड पाहूनच त्याखाली गांडुळ संकुल असेल की नाही ते सांगता यायचे. पण याचं कुणाला काही विशेष कौतुक नव्हतं. त्या गांडुळांची नंतर मी छान चटणी पण करायचे !
चिखलाची भांडी करायची कला सुद्धा मला अवगत होती. तसेच मला कामवाल्या बाई बरोबर भांडी घासायला पण खूप आवडायचे. पण का कोण जाणे याच्या स्पर्धा कधीच नसायच्या. कैरी खायची स्पर्धा असती तर मी नक्की पहिली आले असते. शेंगदाण्यात गूळ घालून त्याचा लाडू करण्यात पण माझा हात कुणी धरला नसता. पण हे सगळं मोठ्यांना त्यांच्या वयामुळे सुचायचं नाही. 
लोणचं नळाखाली धुवून खायची स्पर्धा असती तर मी त्यात मेडल वगैरे मिळवलं असतं. मी कितीही वेळ आंब्याचं लोणचं खाऊ शकायचे. पाण्याखाली धूवून ते अजुनच छान लागायचं. एकच गोष्ट खूप वेळा ऐकायची स्पर्धा असती तर त्यातही मी जिंकले असते. एकदा कुणीतरी कोकणातल्या पाहुण्यांनी त्यांच्या सतरंजीखाली सकाळी मेलेला साप सापडला ही गोष्ट आईला सांगितली. तेव्हा मी तिथे होते. त्यानंतर मी शंभरवेळा सापाऐवेजी  ससा, उंदीर, माकड, बेडूक असे प्राणी बदलून तीच गोष्ट आईला सांगायला लावली. शेवटी एक दिवस "आता सतरंजीखाली सकाळी मेलेला उंट सापडला" असं सांग, या सूचनेनंतर आईने मला कोपरापासून नमस्कार केला.
पण माझ्या या गुणांना फारसा वाव मिळाला नाही. शाळेत मी सगळ्या वक्तृत्व स्पर्धा जिंकायचे. पण त्याची नंतर सवय झाली. सहा महिन्यांपूर्वी पाच किलोमीटर पळायची शर्यत मी पंचवीस मिनिटांत पूर्ण केली. तेव्हा मला माझ्या सगळ्या सवंगड्यांची आठवण आली. पण आता कुणीच पळत नाही!!