Wednesday, August 25, 2010

फोना-फोनी

साधारण बारावं वर्ष ओलांडल्यानंतर आयुष्यात नवीन-नवीन घडामोडी सुरु होतात. त्यातलीच एक म्हणजे 'फोना-फोनी'. फोन माझ्या ’अल्लड बालिका’ अवस्थेतला फार महत्त्वाचा मित्र होता. आणि अर्थातच माझ्या आई-बाबांच्या ’सुजाण पालक’ अवस्थेतला मोठा शत्रू.
"एवढं काय फोनवर बोलायचं असतं जे शाळेत बोलता येत नाही?"
हा प्रश्न एखाद्या बोचर्‍या कॅक्टस सारखा माझ्या कानाच्या आणि फोनच्या मध्ये उगवायचा. आता या प्रश्नाची खरी खरी उत्तरं द्यायची झाली तर मला आई-बाबांना एक अख्खी रात्र जागवून माझ्या शाळेतल्या आयुष्यातले सगळे डावपेच समजावून सांगावे लागले असते. आणि तसं करताना माझ्या मैत्रिणींची बरीच गुपितं त्यांना सांगावी लागली असती. त्यामुळे "मी अभ्यासाचं बोलतीये", हे वाक्य ठरलेलं असायचं. आम्ही शाळेतून सायकलवरून एकत्र घरी यायचो. माझ्या घराच्या फाट्यावरून बर्‍याच जणांना वेगळ्या दिशेला जावं लागायचं. त्यामुळे तिथे एका कोपर्‍यावर आम्ही मैत्रिणी घोळका करून थांबायचो. येणार्‍या-जाणार्‍या सुजाण नागरिकांच्या कुजकट नजरा झेलत आम्हाला आमची शेवटची खलबतं करावी लागायची. पण घरी आल्या आल्या मी लगेच अमेयाला फोन लावायचे, किंवा तिचा तरी यायचा.
मग चहा आणि खारी खात असताना फोन वाजला की बाबा, "नक्की अमेयाचा असणार हा फोन. काय एवढं बोलायचं असतं गं? आत्ताच आलीस नं शाळेतून?" असं म्हणत म्हणत फोनकडे जायचा. आणि खरंच तो फोन अमेयाचा असायचा. मग हातात फोनचा रिसीवर धरून बाबा त्याचे मोठे डोळे गोल-गोल फिरवायचा. आपल्याला कशी एखाद्या गोष्टीची सवय होते: कामवाली बाई वेळेवर न येणे, किंवा एखाद्या मैत्रिणीची नेहमी उशिरा यायची सवय, किंवा आजोबांची मोठ्या आवाजात टी.व्ही नाहीतर रेडियो ऐकण्याची सवय, हे सगळं थोडे दिवसांनी दिसेनासं होतं. तशी माझी फोनवर बोलायची सवय कद्धीच दिसेनाशी झाली नाही. उलट दिवसेंदिवस आई-बाबा अजूनच कडक होऊ लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या फोनच्या बिलांनी भरलेल्या डोक्यात आम्हाला घरी येऊन लगेच फोन का करावे लागत असतील याचा कुठलाही अंदाज यायचा नाही. त्यांना ते अस्वाभाविक वाटायचं.
पण शाळेत पाच जणींच्या गटात दहा प्रकारे मैत्री होऊ शकते हे आम्ही शाळेतच शिकलो होतो. खरं सांगायचं तर गणितातला तो भाग मला कुणाचं कुणाशी भांडण आहे हे आधी माहिती असल्यामुळे फार सोपा गेला होता. पण खर्‍या आयुष्यात काही पाच मुलींचं कसं जमू शकेल ते बाईंच्या गणितांनी सोडवता यायचं नाही. त्यामुळे कुठल्याही दोन मुली कुठल्याही तीन मुलींच्या विरुद्ध असू शकायच्या. आणि कधी कधी एक विरुद्ध चार अशीही वेळ यायची. त्यामुळे या सगळ्या संभाव्यता लक्षात घेता घरी आल्या आल्या तातडीनी फोन करायला लागणं काही विशेष नव्हतं. त्यात इयत्ता वाढेल तशी गणितंदेखील वाढत गेली. हायस्कूलमध्ये गेल्यावर अचानक मोठे गट तुटून छोटे झाले. आणि मग अंतर्गत भांडणांच्या जोडीला आंतरगट भांडणंदेखील उभी राहिली. त्या कोलाहलात अचानक वर्गातील मुलांशी मैत्री झाल्यामुळे तर परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली. अगदी सुरवातीला आम्ही फक्त कोण बरोबर कोण चूक याचे न्यायनिवाडे करायला फोन वापरायचो. मग शेवटी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फोन करून चूक असलेल्या मुलीची कानउघाडणी करायचा बेत रचायचो. पण नंतर मात्र मुला-मुलींच्या मैत्रीबद्दल इतरांचं काय मत आहे यावर आई-बाबांचे बरेच रुपये खर्ची पडले. मग वर्गातल्या सुंदर मुली आणि त्यांच्यासाठी देवदास बनलेली मुलं याचं बघ्यांच्या दृष्टिकोनातून केलेलं विवेचन हा आमचा आवडता खेळ बनला.
मग कुणीतरी विश्वासानी अमेयाकडे सोडलेली मनातली गाठ ती मला विश्वासात घेऊन सांगायची. शाळेपासूनच माझ्याजवळ सगळे गाठी सोडायला यायचे. खरं तर शाळेतल्या या बॉलीवूड सिनेमा युगात माझी कधीच हिरॉईन झाली नाही. पण एकदमच एखादी मैत्रीण मला, "तुला एक गोष्ट सांगू? मी हे अजून कुणालाच सांगितलं नैये..पण.." असं काहीसं अदृश्य पदर हातात खेळवत म्हणू लागली की माझ्या पोटात गोळा यायचा. तसाच एखादा मित्र माझ्या एखाद्या मैत्रिणीवर भाळून कविता वगैरे करू लागायचा. त्यावर अभिप्राय द्यायची जबाबदारीदेखील माझ्यावरच यायची. मग जसे, "सई तो मला असं म्हणाला, मी काय करू?" असे फोन येऊ लागले तसेच मित्रांचे, "सई ती मला असं म्हणाली, याचा मुलींच्या भाषेत अर्थ काय?" असेही फोन येऊ लागले. त्यामुळे मी सायरा बानो झाले नसले तरी तिची घट्ट सलवार घालून सायकल वरून 'खेळायला' जाणारी हुशार मैत्रीण नक्कीच झाले होते. शाळेतल्या एका मुलीवर माझ्या एका मित्राच्या नावानी विनोदी कविता केल्याबद्दल माला मुख्याध्यापिकेच्या समोर उभं करण्यात आलं होतं. त्या कविता वाचून हसू लपवत मला रागावल्या होत्या. आणि त्याच भेटीत असले गुण उधळण्यापेक्षा मी संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा असा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला होता.
पण आमच्या वर्गात अगदी शहाणी, अभ्यासू मुलंदेखील होती. त्यांच्यावर दादागिरी करण्यासाठी आम्ही आमच्या या टगेपणाला 'समाजात वावरायची हुशारी' असं नाव दिलं होतं. आणि त्यावर आमच्या गटात नेहमी जोरदार चर्चा व्हायची. पण खरं सांगायचं झालं तर मला अभ्यासू लोकांबद्दल मनापासून आदर होता. आणि मी स्वत: अभ्यासू नाही याचं मला थोडं दु:ख व्हायचं. पण अमेया लगेच माझ्या या शंकांचं माझ्यावर दरडावून निरसन करायची. आजही कधी कधी "आपण तेव्हा अभ्यास करायला हवा होता" अशा वाक्यावर आम्ही चुकून येतो. पण त्यानंतर लगेच डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसूदेखील येतं. तेव्हाची फोनवर झालेली चर्चा आठवली की आई-बाबांची खरंच दया येते. का म्हणून त्यांचे एवढे पैसे वाया गेले असतील? आणि तेव्हा देवदास आणि मीना कुमारी झालेली मुलं-मुली आज मस्त सौख्यभरे नांदत आहेत.
तरी माझ्या आई-बाबांच्या पिढीला सेलफोनला चिकटलेली मुलं बघावी लागली नाहीत. आणि फेसबुक, स्काईप असले राक्षसही 'आमच्या काळी' नव्हते. आजची पिढी खलबतं करायला स्काईप कॉन्फरन्स करू शकत असेल त्याचा मला जाम हेवा वाटतो. आमच्या वेळी हे असतं तर सगळी भांडणं एका टिचकीत सोडवता आली असती.
परवा रात्री माझ्या फोनचं बिल पाहून अचानक माझे डोळे पांढरे झाले. एवढे फोन आपण कुणाला केले? आणि आता हे बिल भरून काढण्यासाठी किती तास हमाली करावी लागणार हे शोधून काढताना लक्षात आलं की ते सगळे महागडे फोन आईला केले होते. आणि मग बिलाकडे बघून, "एवढं आपण काय बोललो? आणि आईशी एवढं काय बोलायचं असतं?" असा प्रश्न पडला. आणि दुसर्‍या क्षणी आईचं ते कॅक्टससारखं वाक्य आठवलं आणि खूप छान वाटलं. :)

Saturday, August 21, 2010

आमची यशोधन

मी लहान असताना कधीतरी शाळेतल्या एका अगाऊ पोरानी पुण्यातल्या श्रीमंतीचे स्तर समजावून सांगितले होते.
"ज्यांच्या आजोबांनी बंगला बांधलेला असतो ते गर्भश्रीमंत"
"ज्यांचे बाबा बंगला बांधतात ते खूप जास्ती श्रीमंत"
"ज्यांचे बाबा नवी चार चाकी गाडी घेतात ते खूप श्रीमंत"
"ज्यांचे बाबा सेकंड हॅन्ड चार चाकी गाडी घेतात ते नुसते श्रीमंत"

यात शेवटी "ज्यांचे बाबा गाडी, बंगला सगळं एकदम घेतात ते मराठी नसतात" असं टाकायला हवं होतं त्या पोराच्या बाबांनी. पण ही व्याख्या ऐकून माझ्या वर्गातल्या पोरांचं सामान्य ज्ञान माझ्यापेक्षा खूप जास्त आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. आम्ही बरीच वर्षं श्रीमंतीच्या या कुठल्याच श्रेणीत नव्हतो. माझ्या बाबाकडे कायनेटिक होंडा होती. त्यावरून आम्ही तिघं मजेत फिरायचो. लहान असताना मला मध्ये बसवून आई-बाबा लांब फिरायला न्यायचे. त्यात फिरण्याची मजा घेण्यापेक्षा आईचं निम्मं लक्ष माझे बूट पायातून निसटून पडणार तर नाहीत, याकडेच असायचं. ही गैरसोय टाळण्यासाठी मला "बुटाचा ड्रेस" आणण्यात आला. त्याला विजारीखाली चिकटवलेले बूट होते. बाहेर जातान मला कपड्यासहित त्या बुटाच्या सुटात कोंबण्यात यायचं. आणि एवढं बांधून ठेवल्यामुळे मी स्कुटरवर बसल्या बसल्या झोपून जायचे. त्यामुळे मग आईचं सगळं लक्ष मला "झोपू नकोस" असं दरडावण्यात जायचं.
पण त्या दशकात मराठी माणूस श्रीमंत झाल्याचं पहिलं लक्षण म्हणजे सेकंड हॅन्ड गाडी. मग तो होतकरू मराठी माणूस नवी गाडी घ्यायचा. पण पहिली गाडी मात्र नवी नसायची. अर्थात माझ्या मित्राच्या व्याख्येनुसार गर्भश्रीमंत लोक नवी फियाट घ्यायचे.

त्या लाटेवर स्वार होऊन माझ्या आई-बाबांनीसुद्धा सेकंड हॅन्ड चार चाकी घेतली. पण ती नक्की कितव्या हाती पडली होती हे मात्र गुपित होतं. असेना का! पण प्रश्न तोसुद्धा नव्हता. गाडी किती जुनी आहे यापेक्षा एक अत्यंत बोचरी गोष्ट माझ्या लगेच ध्यानात आली. त्या फियाटवर मागे "यशोधन" असं भगव्या रंगात ठसठशीत अक्षरांत लिहिलं होतं. आता गाडीच्या मागच्या काचेवर असं "यशोधन" का लिहावं? मला वाटलं बाबा ते नक्की काढून टाकेल. आहे काय त्यात? एक काच तर बदलायचीये.

पण गाडी कोल्हापुरात घेतली. त्यामुळे ती घरी आणताच ताजी आणि माझ्या माम्या तिची पूजा करायला आल्या. मग मागे ते लिहिलेलं बघून, "शिरीष हे बदलू नकोस बरंका. ज्या अर्थी असं लिहिलंय, त्या अर्थी नक्की या गाडीच्या पूर्वीच्या मालकाला काहीतरी खूप मोठा लाभ झाला असणार या गाडीमुळे",असं माझ्या तरुण होऊ घातलेल्या मनावर नांगर फिरवणारं मत व्यक्त करण्यात आलं. त्यामुळे पुण्याला येईपर्यंत तरी "यशोधन" तसंच राहणार हे नक्की झालं. मला ना असले शकून बिकून अजिबात आवडत नाहीत. एखादं घर पाहून, "या घरात मला अतृप्त आत्म्यांचा वास येतोय", किंवा "या घरात नक्की गुप्तधन असणार" असं म्हणणारे लोक फार अस्वस्थ करतात. कारण मग उगीच आपण चहा पीत असताना तो अतृप्त आत्मा आपल्या बशीतलं बिस्कीट चाटून पळून जातोय असं वाटायला लागतं. असू देत अतृप्त आत्मे. मला सांगू नका.

पण गाडीवर असं नाव लिहिलंय याचा मला सोडून कुणालाच त्रास होत नव्हता. स्नेहा सगळ्यांना, "काकी आमची यशोधन बघायला या ना!" म्हणून आमंत्रण देत सुटली. चिकूदादा आमच्याकडे शिकायला होता. तोही, "आत्या आपण पुण्याला यशोधनमधून जायचं?" असं विचारू लागला. त्यामुळे ते नाव हाणून पडायचा माझा बेत डळमळीत होऊ लागला. चार दिवस कोल्हापुरात वेगवेगळ्या देवांना जाऊन आल्यावर "यशोधन" आमच्यातलीच एक झाली. त्यामुळे बाबाला यशोधन नाव काढून टाक हे सांगणं म्हणजे मी किती दुष्ट आणि शिष्ट आहे याचा पुरावा देण्यासारखं झालं असतं. पुण्याला येईपर्यंत बाबासुद्धा, "आधी आपण यशोधनला सिंहगड दाखवूया", वगैरे बोलू लागला. त्यामुळे आपले आई-बाबा नुसत्या श्रीमंतांपासून खूप श्रीमंत होईपर्यंत काही खरं नाही हे माझ्या लक्षात आलं.

थोडेच दिवसात यशोधनने तिचे गुण दाखवायला सुरुवात केली. सिंहगडच्या चढावरच तिला पहिला घाम फुटला. मग आईनी गडावरचं मडक्यातलं दही खाऊन झाल्यावर प्यायला आणलेलं उकळलेलं पाणी तिला पाजण्यात आलं. मग प्रत्येक नव्या सफरीत यशोधन नवीन नाटक करू लागली. कधी कधी बाबा उत्साहानी मला शाळेत आणायला येतो म्हणाला की माझ्या पोटात गोळा यायचा. एकतर आमची गाडी उठून दिसायची. आणि एवढी यशोधन लिहिलेली गाडी बंद पडलेली बघायला लोकांना फार मौज वाटायची. ती दुसर्‍याची गाडी असती मलाही वाटली असती!

त्यानंतरच्या काही वर्षांत मोडकी गाडी नवरा-बायकोमध्ये तीव्र मतभेद घडवून आणू शकते याचं आमच्या घरात सातत्याने प्रात्यक्षिक होऊ लागलं. खरं तर नुसतं एका गाडीतून आधी न गेलेल्या ठिकाणी जाणं हेदेखील युद्धाचं कारण होऊ शकतं. त्यात माझी आई काही काही विनोदी प्रश्न विचारून त्या भांडणांमध्ये थोडा खुसखुशीतपणा आणायची.
"मागच्या वेळेस ही इमारत डावीकडे होती! आता उजवीकडे कशी आली?" -आई
"महापालिकेचा वेळ जात नव्हता. म्हणून मागच्या आठवड्यात त्यांनी ती उचलून उजवीकडे ठेवली. पेपरमध्ये नाही का वाचलंस?" - बाबा

एकदा मी आणि बाबा पुण्यातल्या कुठल्यातरी अडचणीच्या पेठेतून चाललो होतो तेव्हा एक सायकलवाला मागून येऊन, "काय राव! एवढी चार चाकी गाडी आणि किती हळू चालवताय!" म्हणून पुढे निघून गेला होता. तेव्हा बराच वेळ बाबाला काय झालं हे नीट समजलंच नव्हतं.

बाबाला गाडीत रेडियो लावून त्याबरोबर गायची सवय आहे. यावरून आमच्या गाडीत खूप मतभेद होतात. शेवटी नेहमी बाबा, "घर की मुर्गी दाल बराबर" हा मुहावरा वापरून गाणं बंद करतो.

मी आणि आईनी यशोधन झेंडे करायचं ठरवलं होतं. जिथे जिथे ती बंद पडेल तिथे तिथे यशोधन झेंडा रोवायचा. आमच्या असल्या कल्पना बाबाला फार दु:खी करायच्या. कारण बाबाचं यशोधनवर फार प्रेम होतं. गाडी बंद पडून धक्का मारायची वेळ आली की ज्या भागात गाडी बंद पडली आहे त्या भागाच्या लोकांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करता येतो. पुण्यात गाडी बंद पडली की बाबा बाहेर येऊन काय झालंय हे बघेपर्यंत आजूबाजूला चिक्कार रिकामटेकडे बघे असायचे. पण बाबांनी मदत करायला या अशा अर्थाचे हावभाव केल्याशिवाय कुणीही पुढे यायचं नाही. मदत करतानादेखील त्यांच्या चेहर्‍यावर, "कशाला एवढी गाडीतून फिरायची हौस मग!" असे भाव असायचे.
पण खेडेगावात मात्र गाडी बंद पडली आहे असं लक्षात आल्या आल्या लोक धावून यायचे. आणि आपल्या साथीदारांनाही बोलवायचे. त्यामुळे कधी कधी इतका मोठा धक्का मिळायचा की पहिलं फर्लांग यशोधन धक्क्यावरच चालायची. आणि तिच्या गतीमुळे तिच्यातून उतरलेल्या लोकांना चांगलाच व्यायाम घडायचा. कधी कधी धक्का देणारे लोक आम्हाला त्यांच्या घरात चहाला सुद्धा बोलवायचे. मग बाबा लगेच,

"बघा. गाडी बंद पडल्याची देखील जमेची बाजू आहे. नवीन लोक भेटतात! आपली जर नवी कोरी मारुती (त्या काळी मराठी माणूस मारुतीपलीकडे विचारच करू शकायचा नाही) असती तर आपण या खेड्यातून झुर्र्कन गेलो असतो आणि आपल्याला पाटील दादांना भेटताच आलं नसतं!"
पण आता मात्र मला ही गोष्ट पटते. एका शहरातून दुस-या शहरात झुर्र्कन जाऊच नये.

यथावकाश आम्ही मारुती घेतली. नंतर बदलत्या काळामुळे गाड्यासुद्धा बदलल्या. पण आता गाडी नुसती गाडीच असते. तिला 'यशोधन' असं नाव नसल्यामुळे तिच्याकडे प्रेमानी बघताच येत नाही. आणि कुठेही प्रवासाला जाताना "गाडी बंद पडली तर" हा विचारच होत नाही. यशोधनमुळे गाडी बंद पडली तर काय करायचं याचा खूप सराव झाला होता. त्यामुळे कधी झाडाखाली बसून पुस्तक वाचायचं, कधी जवळच्या कुल्फीवाल्याकडे जाऊन केशर-पिस्ता कुल्फी खायची, कधी गाडी बंद पडल्याचा भावनिक दबाव आणून आईकडून बर्फाचा गोळा उकळायचा, पेरुवाल्या अज्जींची मुलाखत घ्यायची, कुणाच्यातरी शेतात हुरडा खायचा, कासाराकडे बांगड्या भरायच्या, कोकरांशी खेळायचं असले कार्यक्रम करायला वेळच मिळत नाही. :)

आणि गाडी बंद पडल्याच्या या सगळ्या 'जमेच्या बाजू' आता, वेळ वाया घालवायला नको या सदरात येतात. त्यामुळे हल्ली बस उशिरा आली की तेवढा वेळ जास्त पुस्तक वाचायला मिळाल्याचा आनंद होतो. शेवटी सगळा वेळ 'सत्कारणी' लावायची काहीच गरज नसते!