Saturday, March 13, 2010

सुनीताताई

मी दहा वर्षांची असताना सुनीताताई माझ्या आयुष्यात आली. मी दुसरीत असताना आम्ही कोथरूडमध्ये राहायला गेलो. आमच्या पलीकडच्या बिल्डींगमध्ये नरूमामाच्या मॅनेजरचा मुलगा आणि त्याचे काही मित्र राहायला होते. घरात काही खास बेत केला की आई नेहमी मला अजितदादा आणि सुनीलदादासाठी डबा देऊन यायला लावायची. मग एक दिवस अजितदादाचं लग्न ठरलं आणि त्याच्या होणा-या बायकोचा फोटो घेऊन नरूमामा आला. आमचा नरूमामा या बाबतीत नेहमी पुढे असतो. मुलगी बघण्यापर्यंतचे कार्यक्रम त्यांनी त्याच्या मॅनेजर साहेबांसाठी केले. त्या फोटोतून सुनीताताईनी माझ्या आयुष्यात पहिला प्रवेश केला. एका मोठ्याश्या बंगल्याच्या बाहेर, एका गाडीशेजारी, साधा सलवार-कुडता घालून उभी होती त्या फोटोत ती. दाताला नवीन पद्धतीचे कुंपण घातलेली! लग्नाआधी काही दिवस ते कुंपण काढण्यात आलं असावं. माझ्या आयुष्यात दादा लोक बरेच होते. चिकूदादा आमच्याकडेच राहायला होता. अजितदादा, त्याचे मित्र, चिकूदादाचे मित्र, कॉलनीतल्या मैत्रिणींचे मोठे भाऊ असे खूप उमेदवार दादा होते. पण आपल्यापेक्षा चांगली दहा वर्षांनी मोठी, आपल्यासारखेच आई-बाबा असलेली, आपल्याच शाळेत शिकलेली ताई मात्र मला अजून भेटली नव्हती. तशी माझी चुलत बहीण गंधालीताई होती. पण ती पुण्यात नसायची. त्यामुळे आमच्या भेटी नेहमी गट्टी होऊन पुढे जाईतो संपून जायच्या. गंधालीताई लांब नखं वाढवायची. निघताना नेहमी तिला मी, "तुझा नख तुटलं की मला पोष्टानी पाठव" म्हणून सांगून यायचे.
सुनीताताईचं लग्न झालं तेव्हा तिला नुकतं विसावं वर्ष लागलं होतं. घरातल्या सासरच्या माणसांसमोर तिचं (नसलेलं) पाक-कलानैपुण्य दाखवताना तिची जाम तारेवरची कसरत चालली होती. माझ्या आईच्या हे लक्षात आलं असावं. त्यामुळे ती नेहमी सुनीताताईची चौकशी करत असे येता जाता. तसं तिचं घर खालच्या मजल्यावर होतं. त्याला लागून एक छोटी बाग होती. तिच्या पलीकडे आमचं कुंपण होतं. त्यामुळे रोज ऑफिसमधून येताना आईच्या आणि सुनीताताईच्या कुंपणावरून गप्पा रंगायच्या. थोडे दिवसांनी सासरची मंडळी कोल्हापूरला निघून गेली आणि सुनीताताईला रीतसर स्वयंपाक शिकायला उसंत मिळाली. मग काय विचारता? कधी पावभाजी, कधी दहीवडे, कधी पिझ्झा!! आईचं आणि सुनीताताईचं मेतकूट जमलंच पण माझी आणि तिचीही खास मैत्री झाली.

रोज शाळेतून घरी येताना मी कुंपणातून सुनीताताईला हाक मारायचे. ती माझी वाटच बघत असायची.
"सई, इकडे ये आधी. चहा पिऊन जा!".
मग परत माझी वरात तिच्याकडे वळायची. तिच्या घरी जाता यावं म्हणून चिकूनी आणि मी कुंपणाला आमच्या आकाराचं भोक केलं होतं. त्यातून जाता-येता कित्येकवेळा मला तारेनी बोचकारलं जायचं. पण वळसा घालून मोठ्या माणसांसारखं जायला काही मजा वाटायची नाही. आई येईपर्यंत कधी कधी मी सुनीताताईकडेच थांबायचे. ती खूप वेगळी होती. आत्तापर्यंत "लग्न झालं" की बायका आपोआप साड्या नेसायला लागतात, मोठी कुंकवं लावतात, सारख्या रागवू लागतात असं वाटायचं. पण सुनीताताई माझ्यासारखेच पण मोठ्या मुलींच्या मापाचे कपडे घालायची आणि दुपारी घर आवरून फेमिना वाचत बसायची. तिच्याकडे नेहमी छान छान मुलींची मासिकं असायची. पुढे मी पंधरा सोळा वर्षांची झाल्यावर सुनीताताईनी मला पहिलं "मिल्स अँड बून्स" वाचायला दिलं. ते मला आवडलं नाही ही गोष्ट निराळी. :) पण कुठल्याही तारुण्यसुलभ गोष्टीची तिच्याकडे चौकशी करायला मला भय वाटायचं नाही, आणि तिलाही कुणालातरी दीक्षा दिल्याचा बहुमान मिळायचा. माझे कपडे सुनीताताईला आवडावेत असं मला वाटायचं. म्हणजे कदाचित मला ते ज्यांना आवडायला हवेत त्यांनाही आवडतील असं वाटायचं. :) वर्गातल्या एखाद्या मुलाबद्दल मी खूप बोलू लागले की सुनीताताई मला खूप गोड चिडवू लागायची. तिचं चिडवणं वर्गातल्या मैत्रिणींच्या चिडवण्यापेक्षा मला जास्त आवडायचं!
तिनीच मला भुवया कोरण्यात काही "वाईट" नाही हे सांगितलं. आणि पहिल्यांदा भुवया कोरायला मला तिच्या ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेली. माझ्या शाळेच्या निरोप समारंभासाठी सुनीताताईनी तिची साडी मला नेसवून दिली. काय भडक दिसेल, काय सुंदर दिसेल या सगळ्याचे निर्णय मी तिच्यावर सोपवले होते. त्या काळात ती माझ्या मुलीकडून युवतीकडे होणा-या प्रवासातली महत्वाची हमसफर झाली होती. या सगळ्याच्या मध्ये तिला आकाश झाला. जेव्हा तिला बाळ होणार हे कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मग तिचे डोहाळे पुरवायला आई जे काही बनवायची ते मी तत्परतेने न सांडता तिला नेऊन द्यायचे. आकाश झाल्यावर मला अचानक ताईपदावर बढती मिळाली. मग त्याची अंघोळ, त्याचं जेवण, त्याचा दंगा सगळं सांभाळण्यात मी सुनीताताईची मदतनीस झाले. ती भेटून सहा वर्षं झाली नसतील तोवर आमची मैत्री वेगळ्याच पातळीवर जाऊन बसली. अचानक तिच्या टेबलवर बसून अर्धा तास एक कप चहा गार करून पिणारी सई तिच्या मनातल्या शंका, अडचणी, राग या सगळ्याची सोबतीण बनू लागली. कॉलेजमध्ये गेल्यावर सुनीताताई अजूनच जिगरी बनली. मग मैत्रीला सृष्ट रूप आलं. ती मला "दम बिर्याणी", "चिकू शेक", "मेदू वडा" असे पदार्थ करायचे धडे देऊ लागली. मैत्रिणींमध्ये "सुनीताताई" चं काय म्हणणं आहे, यावर आमची भांडणं सुटू लागली.
पुढे मी वीस वर्षांची झाल्यावर आम्ही पुन्हा घर बदललं आणि सुनीताताई देखील दुसरीकडे राहायला गेली. मग भेटीगाठी कमी झाल्या पण ज्या व्हायच्या त्या खूप सुंदर असायच्या. आकाशसुद्धा आमच्याच शाळेत जाऊ लगला. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या सुनीताताईची जागा मी त्याच्या आयुष्यात भरू लागले. :) पण अशा सगळ्या छान छान गोष्टींना सोनेरी पंख नसतात. एक दिवस अचानक सुनीताताईला खूप डोकेदुखी सुरू झाली. सगळ्या तपासण्या झाल्यावर तिला कॅन्सर आहे असं निष्पन्न झालं. त्यानंतर जवळपास सात वर्षं तिची झुंज सुरू होती. दर सहा महिन्यांनी तिचा कॅन्सर शरीरातल्या नवीन भागाकडे त्याचा मोर्चा वळवायचा. मग पुन्हा हॉस्पिटल, नवीन किमोथेरपी, नवीन आहार, नवीन आशा! खूप वेळा खचून ती माझ्या आईला फोन करीत असे. किंवा थोडा हुरूप आला की आई-बाबांशी गप्पा मारायला अजितदादा आणि सुनीताताई दोघे यायचे. माझा वाढदिवस ती कधीच विसरली नाही. मीच कधी कधी त्या दिवशी घरी नसायचे. मग परत आल्यावर मला आणलेली फुलं आणि खाऊ मिळायचा. मी ऑस्ट्रेलियाला येताना तिनी माझ्यासाठी वैष्णवदेवीचा प्रसाद आणला होता. तेव्हा सुद्धा ती आजारीच होती. माझ्या आयुष्यात त्या काळात चाललेल्या जलद घटनांमुळे मला तिच्यासाठी तितकं थांबता आलं नाही. याची खंत नेहमीच वाटत राहील. पण ज्या असंख्य गोष्टी हातातून ओढीच्या अभावामुळे गळून गेल्या त्यात सुनीताताई नक्कीच नव्हती. माझ्या आईचा तिला सतत पाठिंबा असायचा. तिला पुस्तकं देणं, तिच्या आहारात काय बदल करता येईल यावर संशोधन करणं हे सगळं माझ्या आईनी तिच्यासाठी अगदी प्रेमानी केलं. मागच्या वर्षीच्या सुट्टीत मी निघायच्या दोन दिवस आधी सकाळी आई खूप अस्वस्थ वाटली. खूप खोदून विचारल्यावर सुनीताताई पुन्हा हॉस्पिटल मध्ये आहे हे तिनी मला सांगितलं. कॅन्सरचा शेवटचा वार तिच्या डोळ्यावर झाला. शेवटचा प्रयत्न म्हणून तिचा डोळा काढून टाकायचं ठरलं. तशा स्थितीत मी तिला बघायला जाऊ नये म्हणून तिनी आईला मी गेल्यावर यायला सांगितलं होतं. हे कळल्यावर मी आईबरोबर लगेच तिला भेटायला गेले. त्या दिवशीसुद्धा ती नेहमीसारखीच बडबडत होती. त्या वीस मिनिटात सुद्धा आम्ही जिवाभावाच्या गप्पा मारल्या. आपण कदाचित परत भेटणार नाही हे दोघींनाही माहीत असूनही त्या दुष्ट सत्याला आम्ही केरसुणीसारखं कोप-यात बसवून ठेवलं. निघताना तिचा हात हातात घेऊन मी तिला, "ही बघ तुझी आयुष्य रेषा! खूप मोठी आहे गं! नको काळजी करूस", असं सांगितलं होतं. मी इथे आल्यावर अवघ्या वीस दिवसात ती गेली. पण तिचं आयुष्य आमच्या सगळ्यांमध्ये वाटून गेली. आता ते मोठं आयुष्य आम्ही सगळे मिळून जगू. तिच्यासाठी.

11 comments:

  1. सई,
    तुझे लेख नेहमी ह्रुदयस्पर्शी असतात. पण आज डोळ्यातून वाहणारं पाणी थांबवू शकत नाहीये मी.
    शेवटच्या दोन ओळी खूपच धुसर दिसल्या मला. :(.

    ReplyDelete
  2. सई
    आज अश्रू नाही आवरले!

    ReplyDelete
  3. खरच सई.. कधी नव्हे तो आज डोळ्यात पाणी आणलस.
    शेवटच्या ओळीसाठी तुझे खूप कौतुक... मृत्युकड़े इतक्या सकारात्मक पद्धतीने बघता येत, याच उत्तम उदाहरण.
    Keep it up!

    ReplyDelete
  4. khupch senti zhale me hey post vachun.. pan tujhe shevatache vakya khupch ubhari devun gele.. konachya kayamsathi janyacha asa me kadhich vichar kela navhata.. thanks Saee.. kharch..

    ReplyDelete
  5. Hey Medha..
    Thanks for the comments on all my posts. :)
    I am glad you like it. :D
    Ani tuzyakade pan ek Saee ahe he aikun khup sahi watla. :)

    ReplyDelete