Wednesday, September 22, 2010

सुट्टी संपली!

गेलं दीड वर्ष उन्हाळ्याची सुट्टी माझ्या डोक्यातला एक कप्पा झाली आहे. या कप्प्यात मला माहिती नसलेले खूप "धडे" लपले होते. ते माझे मलाच या गोष्टी लिहिताना समजले. या ब्लॉगला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद मला अगदीच अनपेक्षित होता. आधी मला मराठीत नीट लिहिता येईल की नाही याचीच मला खात्री नव्हती. त्यामुळे हळू हळू वाचकांच्या प्रतिक्रियांमधून माझी लेखनशैली कशी आहे, ती लोकांना का आवडते (म्हणजे ज्यांना आवडते त्यांना बरं का!) आणि मुख्य म्हणजे या गोष्टी वाचकांना त्यांच्या अनुभवांचीदेखील आठवण करून देतात, हे मला समजलं. पण सुरुवातीला हे लेख लिहिण्यामागे माझा खास असा काहीच हेतू नव्हता. फक्त माझ्या आजारी आजीला माझ्या लहानपणीच्या गोष्टी ऐकून बरं वाटावं हा एक उद्देश होता.
हा ब्लॉग मी माझ्या देशापासून दूर राहात असताना लिहिला. त्यामुळे तो लिहित असताना, माझ्या आजूबाजूचं जग आणि माझ्या गोष्टींमधलं माझं जग यातला मोठा फरक सतत माझ्या डोळ्यांसमोर तरळत असायचा. आणि या प्रक्रियेमुळे मी काही दिवस नकळत मी विद्यार्थी झाले. या विद्यार्थीदशेतल्या उपविद्यार्थी दशेत माझ्या लबच्या बाहेरच्या जगातली गणितं मी माझ्या या सुट्टीच्या शिदोरीने सोडवायचा प्रयत्न केला. त्यात मुख्यत: मला शहाणं असण्यामधला आणि सुशिक्षित (किंवा उच्चशिक्षित) असण्यामधला फरक लक्षात आला. या दोन गोष्टी नेहमी एकत्र दिसतीलच असं नाही. माझ्या आयुष्यात प्रभावी ठरलेली बरीच शहाणी माणसं उच्चशिक्षित नव्हती, पण आजही प्रत्येक अडचणीच्या, आनंदाच्या क्षणी मला त्यांची आठवण येते. माझ्या दोन आज्या माझ्या बालपणीच्या गोष्टींमधल्या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. आणि दोघींच्याही भिन्न पण प्रभावी शहाणपणाचा मला अजून उलगडा होतो आहे.
तसंच आनंदी बनण्यासाठी खरं तर कुठलीच गुंतवणूक लागत नाही हादेखील माझ्या सुट्टीमधल्या पात्रांचा एक महत्त्वाचा संदेश आहे. त्यामुळे मला अमुक अमुक मिळाल्याने मी खूप आनंदी होईन, असा विचार करण्याची माझी वृत्ती या लेखांमुळे कमी झाली आहे. आणि असा निरुद्देश आनंद, "आनंदी होण्यासाठी" म्हणून आखून ठेवलेल्या त्या ध्येयांकडे जाण्यात खूप उपयोगी पडतो. त्यामुळे हे दीड वर्ष मला खूप काही शिकवून गेलं. हे लेख लिहिण्यासाठी मी माझ्या अभ्यासातून आणि प्रयोगशाळेतल्या कामातून वाचलेला वेळ वापरायचे. त्यामुळे बसमधून घरी येताना, किंवा ट्रेनमध्ये खिडकीबाहेर बघत बघत यातील बरेच पोस्ट मी तयार केले. शक्यतो दर आठवड्यात काहीतरी नवीन लिहायचं असा स्थूल नियम स्वत:ला देऊन मी हे पोस्ट लिहिले. त्यामुळे वेळेच्या नियोजनाचे खूप महत्त्वाचे धडे मला हे लेख लिहिताना मिळाले.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायत्रीसारखी हुशार मैत्रीण माझे लेख तपासून द्यायला पुढे आली. कोल्हापूरबद्दल ऑस्ट्रेलियात बसून मी लिहिणार आणि अमेरिकेत राहणारी दुसरी कोल्हापूर-कन्या ते तपासणार या सोहळ्याचं खूप कौतुक वाटतं. सुट्टीच्या प्रत्येक पोस्टनिशी आमची मैत्री घट्ट होत गेली. गायासारखी मैत्रीण मिळवून दिल्याबद्दलदेखील सुट्टीचे खूप आभार मानावेसे वाटतात. ती उत्तम समीक्षक आहे, पण त्याआधी ती एक प्रामाणिक वाचकदेखील आहे. तिच्यासमोर जे येईल ते ती स्वत:च्या कुठल्याही मताचा चष्मा न लावता वाचते, त्यामुळे मला तिचं मत फार महत्त्वाचं वाटतं. आणि तिच्या दगदगीच्या आयुष्यातून तिनी नेहमी माझ्या लेखनासाठी वेळ काढला यासाठी मी तिची आभारी आहे. केवळ गायत्रीचाच नव्हे तर माझ्या सगळ्या जवळच्या सख्यांचा माझ्या या लेखनात अप्रत्यक्ष सहभाग आहे. चांगल्या मैत्रिणी असणं आणि त्यांचा आयुष्यात सतत स्नेह असणं किती महत्वाचं आहे, हेसुद्धा कदाचित उन्हाळ्याच्या सुट्टीनेच मला दाखवून दिलं.
गेल्या काही महिन्यांत मला हा ब्लॉग इथेच थांबवावा असं वाटत होतं. पण काही आठवणी मृगजळासारख्या तो निर्णय पुढे ढकलायला लावत होत्या. पण आता तो निर्णय पक्का झाला आहे. उन्हाळ्याची सुट्टी इथे संपवत आहे. याचा अर्थ आठवणी संपल्या असा नाही. पण आता आंतरजालावरच्या माझ्या या ओळखीतून बाहेर जाऊन खर्‍या जगातल्या गमतीजमती अनुभवायची इच्छा प्रबळ झाली आहे. तसंच काही पुस्तकं पुन्हा वाचायची आहेत, एखादी नवीन भाषा शिकायचाही बेत आहे. आणि मुख्य म्हणजे पी.एच.डी. संपवून एका खूप शिकवून जाणार्‍या प्रवासाचा शेवट करायचा आहे.
म्हणून सुट्टीची सांगता.
लोभ असावा!
सई

Saturday, September 18, 2010

नरूमामाचा गणपती

या वेळेचा पोस्ट इथे वाचा. मायबोली गणेशोत्सवात माझी ही दुर्वांची जुडी!

Tuesday, September 14, 2010

आई मोठी होत असताना..

मी बारा-तेरा वर्षांची असताना आईनी तिची ’वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’मधली नोकरी सोडायचा निर्णय घेतला. तो घेताना तिनी सगळ्यांचा सल्ला घेतला होता. अण्णा आजोबा, बाबा, तिचे व्यावसायिक भागीदार, माझे मामे आणि परिवारातील इतर मान्यवर सगळ्यांनीच तिला पाठिंबा दिला होता. पण एक दिवस तिने माझ्याकडे येऊन मला, "सई, मी सोडू ना नोकरी? तुला काय वाटतं?" असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी ती मला अगदी लहान मुलीसारखी वाटली होती. आणि एवढ्या सगळ्या सल्ल्यानंतरदेखील तिला माझा सल्ला महत्वाचा वाटतो यानी मला नवीन आत्मविश्वास आला होता. अखेर तिनी तिचा निर्णय अमलात आणला आणि १९९५ साली मार्क लॅब्सची स्थापना झाली. आई आणि बाबा दोघेही त्यात गुंतल्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक होती. सुरुवातीला आम्ही आमच्या घराच्या खाली एक दुकान गाळा घेतला. तिथे आईचं पहिलं ऑफिस थाटण्यात आलं. पहिलं वर्ष नक्की काय करायचं, लॅबसाठी कर्ज कुठून घ्यायचं या विचारात निघून गेलं. मग आई-बाबांचा कोल्हापूरचा बालमित्र, विनूकाका मदतीला आला आणि आम्हाला सिंहगड रोडवर जागा मिळाली. तिथे आमच्या लॅबची पहिली इमारत बांधण्यात आली. तेव्हा पाच खोल्यांची बैठी इमारतसुद्धा खूप मोठी वाटायची. आता पंधरा खोल्यांची तीन मजली इमारतसुद्धा लहान वाटते.
सुरुवातीला भांडवल गोळा करण्यासाठी आईनी 'सुक्रोस्कॅन', या साखरेचा रंग मोजायच्या अतिशय सोप्या सिस्टिमची कल्पना सत्यात उतरवली. या मशीनबरोबर कारखान्यांना त्यांच्या साखरेचा दर्जा तपासायला शिकवलं जायचं. हे करण्यासाठी आईला भारतातल्या सगळ्या भागांमध्ये जावं लागायचं. आधी महाराष्ट्रात त्याचा प्रचार केला. तेव्हा मीदेखील सुट्टी असेल तेव्हा आईबरोबर जायचे. कधी अजिंक्यतारा, कधी किसन-अहीर, कधी वारणानगर, सगळीकडे कृती ठरलेली असायची. आधी तासभर अधिकार्‍याची वाट बघायची, मग पुढे त्यांना माहिती द्यायची आणि या मशीननी तुमच्या साखरेचा दर्जा कसा सुधारता येईल याचं प्रात्यक्षिक. तेवढा वेळ मी कारखान्यात फेरफटका मारून यायचे. कधी एखादा चीफ केमिस्ट, "मॅडमच्या मुलीसाठी रस आण जाऊन पटकन" अशी आज्ञा द्यायचा. कधी कधी आई मला गाडीत बस असं सांगून जायची. तेव्हा मी (आमच्या यशोधनमध्ये) कारखान्याच्या मोठ्या गेटातून आत येणार्‍या, उसानी मढलेल्या बैलगाड्या बघत बसायचे. कधी कधी या भेटी आमच्या सुट्टीच्या मध्ये पेरल्या जायच्या. त्यामुळे कारखान्याजवळचा तो मळीचा वास आला की माझी चिडचिड सुरु व्हायची. :)
सुक्रोस्कॅनमुळे लॅबसाठी लागणारं भांडवल उभं राहू लागलं. आईनी केमिटो नावाच्या नाशिकच्या कंपनीशी मशीन बनवून द्यायचा करार केला. आणि त्यांना खास भारतीय साखरेसाठी लागणार्‍या सगळ्या सुविधा त्यात बसवण्याचं प्रशिक्षण दिलं. साखरेचा रंग तपासण्यासाठी लागणारी सगळी रसायनं आई त्या मशीनबरोबर बनवून द्यायची. थोडक्यात साखर कारखान्यांसाठी हे 'मॅगी' बनवण्यासारखं झालं होतं. साखरेचा रंग उसाच्या रसापासून साखरेच्या शुभ्र दाण्यापर्यंत कसा बदलतो यामागे खूप सारं रसायनशास्त्र आहे. भारतीय साखर परदेशी पाठवता यावी यासाठी साखरेचा रंग तपासावा लागतो. आणि एकदा साखर तयार झाली की तिचा रंग बदलता येत नाही. त्यामुळे साखर तयार होत असताना, वेगवेगळ्या टप्प्यांवर रंग मोजण्याची प्रथा आईने कारखान्यांमध्ये रुजवली. याला तिनी "कलर बॅलन्स स्टडी" असं नाव दिलं होतं! तो अभ्यास करायला वेगवेगळे कारखाने तिला आमंत्रण देऊ लागले. थोडेच दिवसात आईचा हा अभ्यास भारतातल्या इतर कारखान्यांपर्यंत जाऊन पोहोचला. साधारण या काळात भारतात कोका-कोला आणि पेप्सी हे परदेशी शीतपेयांचे उत्पादक दाखल झाले होते. आधी साखरेचा रंग मोजणं, तिच्यातील इतर भेसळयुक्त पदार्थांचा अभ्यास करणं गरजेचं मानलं जात नसे. कारण भारतात साखरेवर सरकारचे नियंत्रण होते. त्यामुळे कारखान्यांमध्ये कुठलीच स्पर्धा नव्हती. पण परदेशी उत्पादक भारतीय बाजारात उतरल्यामुळे साखर उत्पादनात एक नवी क्रांती झाली.
पण क्रांती होत असताना मात्र त्यात भाग घेणार्‍या लोकांची खूप दमछाक होते. तशीच आईचीसुद्धा झाली. त्या काळात आई कधी उत्तर प्रदेश, कधी बिहार, कधी कर्नाटक, कधी तमिळनाडू अशा सगळ्या कारखान्यांमध्ये जायची. अजून सगळीकडे विमानांनी जाण्याइतके पैसे नसल्यामुळे आई रेल्वेनी जायची. त्यात तिच्या चुकणार्‍या गाड्या पकडून देताना आमची खास त्रेधा तिरपीट व्हायची ते वेगळंच! पण कधी वेटिंग लिस्टवर नाव पुढे न सरकल्यामुळे, तर कधी काम वाढून वेळ निघून गेल्यामुळे आईला रात्री अपरात्री एकटीला जनरल डब्यातून परत यावं लागायचं. पण अगदी बिहारच्या खेडेगावातून जाताना देखील तिला नेहमी चांगलीच माणसं भेटली.
मग आईचा दौरा असला की कुसुमअज्जी आमच्याकडे येऊन राहायची. आणि आई कामावर गेली की तिच्या फोनची आम्ही दोघी वाट बघत बसायचो. पण या सगळ्या कष्टातून आमची लॅब मोठी होऊ लागली. मी शाळेतून बाहेर पडल्यावर कधी कधी आई मला तिच्याबरोबर घेऊन जायची. आणि कारखान्यात छोटी छोटी कामं मला करायला द्यायची. त्याबद्दल मला पैसे मिळायचे. त्यामुळे मी खूष असायचे. अकरावी बारावीच्या सुट्टीत मला रोज शंभर रुपये अशा बोलीवर तिनी नोकरीला ठेवलं होतं. तेव्हा पहिल्या दिवशी तिनी तिच्या स्टाफला मला प्रयोगशाळेतली भांडी घासायला द्या असा आदेश दिला होता. तेव्हा मी फक्त अंती मिळणार्‍या नोटेकडे डोळे लावून ते काम केलं होतं. :)
याच दरम्यान तिला सुक्रोस्कनच्या अभिनव कल्पनेसाठी पारखे पुरस्कार मिळाला. त्यानंतर खर्‍या अर्थाने आमची लॅब सुरु झाली. जागतिक स्तरावर काम करण्यासाठी म्हणून मार्कला आय.एस.ओ १७०२५ मान्यता मिळायला हवी होती. ती सगळ्यांनी मिळून मिळवली. आणि मग कोका-कोला आणि पेप्सी सारख्या उत्पादकांमधला आणि कारखान्यांमधला दुवा मार्क झाली. हळू हळू आमच्याकडचे कर्मचारी वाढू लागले. यातही आई नेहमी खेड्यातून येणार्‍या तरुणांना प्राधान्य देते. त्यांची राहायची व्यवस्था करायला मदत करते आणि त्यांना आय.एस.ओ प्रणालीनुसार प्रशिक्षण देते. आज तिच्याकडे जवळपास चाळीस लोक काम करतात. मार्क लॅब्सबरोबरच मार्क हेल्थ प्रॉडक्टस्‌ सुद्धा सुरु झालं. या उपक्रमातून कनक गूळ पुण्याच्या बाजारपेठेत आला. बाजारातला गूळ सोनेरी दिसावा म्हणून शेतकरी त्यात हायड्रॉस या रसायनाचा मारा करतात. म्हणून आईमाधल्या शास्त्रज्ञ गृहिणीने कनक गूळ तयार करायची कल्पना अमलात आणली. यातही कोल्हापुरातल्या काही शेतकर्‍यांना तो तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. हल्ली साप्ताहिक सकाळमध्ये पुरणपोळीच्या कृतीत, 'अर्धा किलो कनक गूळ' अशी जिन्नस यादीत सूचना असते. ते बघून आईचा खूप अभिमान वाटतो. कनक गुळाच्या प्रचारासाठीदेखील आईनी मला पगार दिला होता. तेव्हा मी अभियांत्रिकीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये होते. ग्राहक पेठ, वेगवेगळी महिला मंडळं, भिशा अशा ठिकाणी मी माझं पुणेरी काकूंच्या सगळ्या खडूस प्रश्नांसाठी तयार केलेलं भाषण घोकून जायचे. आणि बहुतेकवेळा माझ्या तोंडाची भरपूर वाफ दवडूनदेखील मनाजोगता खप व्हायचा नाही. मग आम्ही प्रचारानंतर पाणीपुरी खाऊन आमचं दु:ख विसरायचो.
आईच्या कर्माचार्‍यांमध्ये सत्तर टक्के महिला आहेत. कनक गुळापासून ते थेट लॅबपर्यंत सगळीकडे तरुण मुली काम करताना दिसतात. आणि एखाद्या मोठ्ठ्या परिवारासारख्या सगळ्या एकमेकींना मदत करतात. आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांचे वाढदिवस साजरे होतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळ्या मुलींना त्यांच्या मुलांसकट कुठेतरी सहलीला जायला मिळतं. महिला दिनानिमित्त मार्क मध्ये एखाद्या पाहुण्या यशस्विनीला बोलावण्यात येतं आणि सगळ्या मुलींना गुलाबाची फुलं देण्यात येतात. आमच्या अभियांत्रिकी गटातल्या चुणचुणीत मुलांनादेखील या दिवशी बक्षीस दिलं जातं. :) आईचं वर्ष दिवाळीनंतर भारत दौ्र्‍यात तर दिवाळी आधी आंतरराष्ट्रीय दौर्‍यात वाटलेलं असतं. इकुम्सा या साखर संशोधनाच्या जागतिक कमिटीवर ती भारताचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे साखरेसाठी लागणार्‍या नवनवीन मेथड्सवर ती सतत काम करत असते.
आईबद्दल बर्‍याच मासिकांतून लेख लिहून आले आहेत. पण हे सगळं करताना तिची होणारी घालमेल, तिची चिंता, तिची जिद्द, तिचा साधेपणा मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलून गेला. भूतकाळातील प्रसंग सांगताना नेहमी लोक त्याला वेगवेगळ्या झालरी लावतात. कुणी "पुरुष-प्रधान व्यवसायात पाय रोवून उभी राहिलेली महिला" म्हणतात तर कुणी "यशस्वी महिला उद्योजिका" म्हणतात. पण आई मोठी होताना मात्र, 'महिला', 'उद्योजिका', 'यशस्वी' हे कुठलेही शब्द तिच्या डोक्यात नव्हते. तिच्या समोर फक्त एकच ध्येय होतं. हाती घेतलेलं काम पूर्ण करणे. जगात कुठेही वावरताना, 'मला चांगली माणसंच भेटतील' असा आत्मविश्वास बाळगायची ताकद मला आईमुळेच मिळाली.
या महिन्यात माझ्या आईचा वाढदिवस असतो. तिला तिच्या या प्रवासात माझ्या खूप खूप शुभेच्छा. तिनी कुठलही काम आनंदाने करण्याच्या मला लावलेल्या सवयीचा मला आजही पावलोपावली उपयोग होतो आहे.
-------
आईबरोबरच माझ्या बाबाला आणि गायत्रीच्या आईला, म्हणजे उमामावशीलादेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा!! :)

Wednesday, August 25, 2010

फोना-फोनी

साधारण बारावं वर्ष ओलांडल्यानंतर आयुष्यात नवीन-नवीन घडामोडी सुरु होतात. त्यातलीच एक म्हणजे 'फोना-फोनी'. फोन माझ्या ’अल्लड बालिका’ अवस्थेतला फार महत्त्वाचा मित्र होता. आणि अर्थातच माझ्या आई-बाबांच्या ’सुजाण पालक’ अवस्थेतला मोठा शत्रू.
"एवढं काय फोनवर बोलायचं असतं जे शाळेत बोलता येत नाही?"
हा प्रश्न एखाद्या बोचर्‍या कॅक्टस सारखा माझ्या कानाच्या आणि फोनच्या मध्ये उगवायचा. आता या प्रश्नाची खरी खरी उत्तरं द्यायची झाली तर मला आई-बाबांना एक अख्खी रात्र जागवून माझ्या शाळेतल्या आयुष्यातले सगळे डावपेच समजावून सांगावे लागले असते. आणि तसं करताना माझ्या मैत्रिणींची बरीच गुपितं त्यांना सांगावी लागली असती. त्यामुळे "मी अभ्यासाचं बोलतीये", हे वाक्य ठरलेलं असायचं. आम्ही शाळेतून सायकलवरून एकत्र घरी यायचो. माझ्या घराच्या फाट्यावरून बर्‍याच जणांना वेगळ्या दिशेला जावं लागायचं. त्यामुळे तिथे एका कोपर्‍यावर आम्ही मैत्रिणी घोळका करून थांबायचो. येणार्‍या-जाणार्‍या सुजाण नागरिकांच्या कुजकट नजरा झेलत आम्हाला आमची शेवटची खलबतं करावी लागायची. पण घरी आल्या आल्या मी लगेच अमेयाला फोन लावायचे, किंवा तिचा तरी यायचा.
मग चहा आणि खारी खात असताना फोन वाजला की बाबा, "नक्की अमेयाचा असणार हा फोन. काय एवढं बोलायचं असतं गं? आत्ताच आलीस नं शाळेतून?" असं म्हणत म्हणत फोनकडे जायचा. आणि खरंच तो फोन अमेयाचा असायचा. मग हातात फोनचा रिसीवर धरून बाबा त्याचे मोठे डोळे गोल-गोल फिरवायचा. आपल्याला कशी एखाद्या गोष्टीची सवय होते: कामवाली बाई वेळेवर न येणे, किंवा एखाद्या मैत्रिणीची नेहमी उशिरा यायची सवय, किंवा आजोबांची मोठ्या आवाजात टी.व्ही नाहीतर रेडियो ऐकण्याची सवय, हे सगळं थोडे दिवसांनी दिसेनासं होतं. तशी माझी फोनवर बोलायची सवय कद्धीच दिसेनाशी झाली नाही. उलट दिवसेंदिवस आई-बाबा अजूनच कडक होऊ लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या फोनच्या बिलांनी भरलेल्या डोक्यात आम्हाला घरी येऊन लगेच फोन का करावे लागत असतील याचा कुठलाही अंदाज यायचा नाही. त्यांना ते अस्वाभाविक वाटायचं.
पण शाळेत पाच जणींच्या गटात दहा प्रकारे मैत्री होऊ शकते हे आम्ही शाळेतच शिकलो होतो. खरं सांगायचं तर गणितातला तो भाग मला कुणाचं कुणाशी भांडण आहे हे आधी माहिती असल्यामुळे फार सोपा गेला होता. पण खर्‍या आयुष्यात काही पाच मुलींचं कसं जमू शकेल ते बाईंच्या गणितांनी सोडवता यायचं नाही. त्यामुळे कुठल्याही दोन मुली कुठल्याही तीन मुलींच्या विरुद्ध असू शकायच्या. आणि कधी कधी एक विरुद्ध चार अशीही वेळ यायची. त्यामुळे या सगळ्या संभाव्यता लक्षात घेता घरी आल्या आल्या तातडीनी फोन करायला लागणं काही विशेष नव्हतं. त्यात इयत्ता वाढेल तशी गणितंदेखील वाढत गेली. हायस्कूलमध्ये गेल्यावर अचानक मोठे गट तुटून छोटे झाले. आणि मग अंतर्गत भांडणांच्या जोडीला आंतरगट भांडणंदेखील उभी राहिली. त्या कोलाहलात अचानक वर्गातील मुलांशी मैत्री झाल्यामुळे तर परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली. अगदी सुरवातीला आम्ही फक्त कोण बरोबर कोण चूक याचे न्यायनिवाडे करायला फोन वापरायचो. मग शेवटी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फोन करून चूक असलेल्या मुलीची कानउघाडणी करायचा बेत रचायचो. पण नंतर मात्र मुला-मुलींच्या मैत्रीबद्दल इतरांचं काय मत आहे यावर आई-बाबांचे बरेच रुपये खर्ची पडले. मग वर्गातल्या सुंदर मुली आणि त्यांच्यासाठी देवदास बनलेली मुलं याचं बघ्यांच्या दृष्टिकोनातून केलेलं विवेचन हा आमचा आवडता खेळ बनला.
मग कुणीतरी विश्वासानी अमेयाकडे सोडलेली मनातली गाठ ती मला विश्वासात घेऊन सांगायची. शाळेपासूनच माझ्याजवळ सगळे गाठी सोडायला यायचे. खरं तर शाळेतल्या या बॉलीवूड सिनेमा युगात माझी कधीच हिरॉईन झाली नाही. पण एकदमच एखादी मैत्रीण मला, "तुला एक गोष्ट सांगू? मी हे अजून कुणालाच सांगितलं नैये..पण.." असं काहीसं अदृश्य पदर हातात खेळवत म्हणू लागली की माझ्या पोटात गोळा यायचा. तसाच एखादा मित्र माझ्या एखाद्या मैत्रिणीवर भाळून कविता वगैरे करू लागायचा. त्यावर अभिप्राय द्यायची जबाबदारीदेखील माझ्यावरच यायची. मग जसे, "सई तो मला असं म्हणाला, मी काय करू?" असे फोन येऊ लागले तसेच मित्रांचे, "सई ती मला असं म्हणाली, याचा मुलींच्या भाषेत अर्थ काय?" असेही फोन येऊ लागले. त्यामुळे मी सायरा बानो झाले नसले तरी तिची घट्ट सलवार घालून सायकल वरून 'खेळायला' जाणारी हुशार मैत्रीण नक्कीच झाले होते. शाळेतल्या एका मुलीवर माझ्या एका मित्राच्या नावानी विनोदी कविता केल्याबद्दल माला मुख्याध्यापिकेच्या समोर उभं करण्यात आलं होतं. त्या कविता वाचून हसू लपवत मला रागावल्या होत्या. आणि त्याच भेटीत असले गुण उधळण्यापेक्षा मी संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावा असा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला होता.
पण आमच्या वर्गात अगदी शहाणी, अभ्यासू मुलंदेखील होती. त्यांच्यावर दादागिरी करण्यासाठी आम्ही आमच्या या टगेपणाला 'समाजात वावरायची हुशारी' असं नाव दिलं होतं. आणि त्यावर आमच्या गटात नेहमी जोरदार चर्चा व्हायची. पण खरं सांगायचं झालं तर मला अभ्यासू लोकांबद्दल मनापासून आदर होता. आणि मी स्वत: अभ्यासू नाही याचं मला थोडं दु:ख व्हायचं. पण अमेया लगेच माझ्या या शंकांचं माझ्यावर दरडावून निरसन करायची. आजही कधी कधी "आपण तेव्हा अभ्यास करायला हवा होता" अशा वाक्यावर आम्ही चुकून येतो. पण त्यानंतर लगेच डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसूदेखील येतं. तेव्हाची फोनवर झालेली चर्चा आठवली की आई-बाबांची खरंच दया येते. का म्हणून त्यांचे एवढे पैसे वाया गेले असतील? आणि तेव्हा देवदास आणि मीना कुमारी झालेली मुलं-मुली आज मस्त सौख्यभरे नांदत आहेत.
तरी माझ्या आई-बाबांच्या पिढीला सेलफोनला चिकटलेली मुलं बघावी लागली नाहीत. आणि फेसबुक, स्काईप असले राक्षसही 'आमच्या काळी' नव्हते. आजची पिढी खलबतं करायला स्काईप कॉन्फरन्स करू शकत असेल त्याचा मला जाम हेवा वाटतो. आमच्या वेळी हे असतं तर सगळी भांडणं एका टिचकीत सोडवता आली असती.
परवा रात्री माझ्या फोनचं बिल पाहून अचानक माझे डोळे पांढरे झाले. एवढे फोन आपण कुणाला केले? आणि आता हे बिल भरून काढण्यासाठी किती तास हमाली करावी लागणार हे शोधून काढताना लक्षात आलं की ते सगळे महागडे फोन आईला केले होते. आणि मग बिलाकडे बघून, "एवढं आपण काय बोललो? आणि आईशी एवढं काय बोलायचं असतं?" असा प्रश्न पडला. आणि दुसर्‍या क्षणी आईचं ते कॅक्टससारखं वाक्य आठवलं आणि खूप छान वाटलं. :)

Saturday, August 21, 2010

आमची यशोधन

मी लहान असताना कधीतरी शाळेतल्या एका अगाऊ पोरानी पुण्यातल्या श्रीमंतीचे स्तर समजावून सांगितले होते.
"ज्यांच्या आजोबांनी बंगला बांधलेला असतो ते गर्भश्रीमंत"
"ज्यांचे बाबा बंगला बांधतात ते खूप जास्ती श्रीमंत"
"ज्यांचे बाबा नवी चार चाकी गाडी घेतात ते खूप श्रीमंत"
"ज्यांचे बाबा सेकंड हॅन्ड चार चाकी गाडी घेतात ते नुसते श्रीमंत"

यात शेवटी "ज्यांचे बाबा गाडी, बंगला सगळं एकदम घेतात ते मराठी नसतात" असं टाकायला हवं होतं त्या पोराच्या बाबांनी. पण ही व्याख्या ऐकून माझ्या वर्गातल्या पोरांचं सामान्य ज्ञान माझ्यापेक्षा खूप जास्त आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. आम्ही बरीच वर्षं श्रीमंतीच्या या कुठल्याच श्रेणीत नव्हतो. माझ्या बाबाकडे कायनेटिक होंडा होती. त्यावरून आम्ही तिघं मजेत फिरायचो. लहान असताना मला मध्ये बसवून आई-बाबा लांब फिरायला न्यायचे. त्यात फिरण्याची मजा घेण्यापेक्षा आईचं निम्मं लक्ष माझे बूट पायातून निसटून पडणार तर नाहीत, याकडेच असायचं. ही गैरसोय टाळण्यासाठी मला "बुटाचा ड्रेस" आणण्यात आला. त्याला विजारीखाली चिकटवलेले बूट होते. बाहेर जातान मला कपड्यासहित त्या बुटाच्या सुटात कोंबण्यात यायचं. आणि एवढं बांधून ठेवल्यामुळे मी स्कुटरवर बसल्या बसल्या झोपून जायचे. त्यामुळे मग आईचं सगळं लक्ष मला "झोपू नकोस" असं दरडावण्यात जायचं.
पण त्या दशकात मराठी माणूस श्रीमंत झाल्याचं पहिलं लक्षण म्हणजे सेकंड हॅन्ड गाडी. मग तो होतकरू मराठी माणूस नवी गाडी घ्यायचा. पण पहिली गाडी मात्र नवी नसायची. अर्थात माझ्या मित्राच्या व्याख्येनुसार गर्भश्रीमंत लोक नवी फियाट घ्यायचे.

त्या लाटेवर स्वार होऊन माझ्या आई-बाबांनीसुद्धा सेकंड हॅन्ड चार चाकी घेतली. पण ती नक्की कितव्या हाती पडली होती हे मात्र गुपित होतं. असेना का! पण प्रश्न तोसुद्धा नव्हता. गाडी किती जुनी आहे यापेक्षा एक अत्यंत बोचरी गोष्ट माझ्या लगेच ध्यानात आली. त्या फियाटवर मागे "यशोधन" असं भगव्या रंगात ठसठशीत अक्षरांत लिहिलं होतं. आता गाडीच्या मागच्या काचेवर असं "यशोधन" का लिहावं? मला वाटलं बाबा ते नक्की काढून टाकेल. आहे काय त्यात? एक काच तर बदलायचीये.

पण गाडी कोल्हापुरात घेतली. त्यामुळे ती घरी आणताच ताजी आणि माझ्या माम्या तिची पूजा करायला आल्या. मग मागे ते लिहिलेलं बघून, "शिरीष हे बदलू नकोस बरंका. ज्या अर्थी असं लिहिलंय, त्या अर्थी नक्की या गाडीच्या पूर्वीच्या मालकाला काहीतरी खूप मोठा लाभ झाला असणार या गाडीमुळे",असं माझ्या तरुण होऊ घातलेल्या मनावर नांगर फिरवणारं मत व्यक्त करण्यात आलं. त्यामुळे पुण्याला येईपर्यंत तरी "यशोधन" तसंच राहणार हे नक्की झालं. मला ना असले शकून बिकून अजिबात आवडत नाहीत. एखादं घर पाहून, "या घरात मला अतृप्त आत्म्यांचा वास येतोय", किंवा "या घरात नक्की गुप्तधन असणार" असं म्हणणारे लोक फार अस्वस्थ करतात. कारण मग उगीच आपण चहा पीत असताना तो अतृप्त आत्मा आपल्या बशीतलं बिस्कीट चाटून पळून जातोय असं वाटायला लागतं. असू देत अतृप्त आत्मे. मला सांगू नका.

पण गाडीवर असं नाव लिहिलंय याचा मला सोडून कुणालाच त्रास होत नव्हता. स्नेहा सगळ्यांना, "काकी आमची यशोधन बघायला या ना!" म्हणून आमंत्रण देत सुटली. चिकूदादा आमच्याकडे शिकायला होता. तोही, "आत्या आपण पुण्याला यशोधनमधून जायचं?" असं विचारू लागला. त्यामुळे ते नाव हाणून पडायचा माझा बेत डळमळीत होऊ लागला. चार दिवस कोल्हापुरात वेगवेगळ्या देवांना जाऊन आल्यावर "यशोधन" आमच्यातलीच एक झाली. त्यामुळे बाबाला यशोधन नाव काढून टाक हे सांगणं म्हणजे मी किती दुष्ट आणि शिष्ट आहे याचा पुरावा देण्यासारखं झालं असतं. पुण्याला येईपर्यंत बाबासुद्धा, "आधी आपण यशोधनला सिंहगड दाखवूया", वगैरे बोलू लागला. त्यामुळे आपले आई-बाबा नुसत्या श्रीमंतांपासून खूप श्रीमंत होईपर्यंत काही खरं नाही हे माझ्या लक्षात आलं.

थोडेच दिवसात यशोधनने तिचे गुण दाखवायला सुरुवात केली. सिंहगडच्या चढावरच तिला पहिला घाम फुटला. मग आईनी गडावरचं मडक्यातलं दही खाऊन झाल्यावर प्यायला आणलेलं उकळलेलं पाणी तिला पाजण्यात आलं. मग प्रत्येक नव्या सफरीत यशोधन नवीन नाटक करू लागली. कधी कधी बाबा उत्साहानी मला शाळेत आणायला येतो म्हणाला की माझ्या पोटात गोळा यायचा. एकतर आमची गाडी उठून दिसायची. आणि एवढी यशोधन लिहिलेली गाडी बंद पडलेली बघायला लोकांना फार मौज वाटायची. ती दुसर्‍याची गाडी असती मलाही वाटली असती!

त्यानंतरच्या काही वर्षांत मोडकी गाडी नवरा-बायकोमध्ये तीव्र मतभेद घडवून आणू शकते याचं आमच्या घरात सातत्याने प्रात्यक्षिक होऊ लागलं. खरं तर नुसतं एका गाडीतून आधी न गेलेल्या ठिकाणी जाणं हेदेखील युद्धाचं कारण होऊ शकतं. त्यात माझी आई काही काही विनोदी प्रश्न विचारून त्या भांडणांमध्ये थोडा खुसखुशीतपणा आणायची.
"मागच्या वेळेस ही इमारत डावीकडे होती! आता उजवीकडे कशी आली?" -आई
"महापालिकेचा वेळ जात नव्हता. म्हणून मागच्या आठवड्यात त्यांनी ती उचलून उजवीकडे ठेवली. पेपरमध्ये नाही का वाचलंस?" - बाबा

एकदा मी आणि बाबा पुण्यातल्या कुठल्यातरी अडचणीच्या पेठेतून चाललो होतो तेव्हा एक सायकलवाला मागून येऊन, "काय राव! एवढी चार चाकी गाडी आणि किती हळू चालवताय!" म्हणून पुढे निघून गेला होता. तेव्हा बराच वेळ बाबाला काय झालं हे नीट समजलंच नव्हतं.

बाबाला गाडीत रेडियो लावून त्याबरोबर गायची सवय आहे. यावरून आमच्या गाडीत खूप मतभेद होतात. शेवटी नेहमी बाबा, "घर की मुर्गी दाल बराबर" हा मुहावरा वापरून गाणं बंद करतो.

मी आणि आईनी यशोधन झेंडे करायचं ठरवलं होतं. जिथे जिथे ती बंद पडेल तिथे तिथे यशोधन झेंडा रोवायचा. आमच्या असल्या कल्पना बाबाला फार दु:खी करायच्या. कारण बाबाचं यशोधनवर फार प्रेम होतं. गाडी बंद पडून धक्का मारायची वेळ आली की ज्या भागात गाडी बंद पडली आहे त्या भागाच्या लोकांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करता येतो. पुण्यात गाडी बंद पडली की बाबा बाहेर येऊन काय झालंय हे बघेपर्यंत आजूबाजूला चिक्कार रिकामटेकडे बघे असायचे. पण बाबांनी मदत करायला या अशा अर्थाचे हावभाव केल्याशिवाय कुणीही पुढे यायचं नाही. मदत करतानादेखील त्यांच्या चेहर्‍यावर, "कशाला एवढी गाडीतून फिरायची हौस मग!" असे भाव असायचे.
पण खेडेगावात मात्र गाडी बंद पडली आहे असं लक्षात आल्या आल्या लोक धावून यायचे. आणि आपल्या साथीदारांनाही बोलवायचे. त्यामुळे कधी कधी इतका मोठा धक्का मिळायचा की पहिलं फर्लांग यशोधन धक्क्यावरच चालायची. आणि तिच्या गतीमुळे तिच्यातून उतरलेल्या लोकांना चांगलाच व्यायाम घडायचा. कधी कधी धक्का देणारे लोक आम्हाला त्यांच्या घरात चहाला सुद्धा बोलवायचे. मग बाबा लगेच,

"बघा. गाडी बंद पडल्याची देखील जमेची बाजू आहे. नवीन लोक भेटतात! आपली जर नवी कोरी मारुती (त्या काळी मराठी माणूस मारुतीपलीकडे विचारच करू शकायचा नाही) असती तर आपण या खेड्यातून झुर्र्कन गेलो असतो आणि आपल्याला पाटील दादांना भेटताच आलं नसतं!"
पण आता मात्र मला ही गोष्ट पटते. एका शहरातून दुस-या शहरात झुर्र्कन जाऊच नये.

यथावकाश आम्ही मारुती घेतली. नंतर बदलत्या काळामुळे गाड्यासुद्धा बदलल्या. पण आता गाडी नुसती गाडीच असते. तिला 'यशोधन' असं नाव नसल्यामुळे तिच्याकडे प्रेमानी बघताच येत नाही. आणि कुठेही प्रवासाला जाताना "गाडी बंद पडली तर" हा विचारच होत नाही. यशोधनमुळे गाडी बंद पडली तर काय करायचं याचा खूप सराव झाला होता. त्यामुळे कधी झाडाखाली बसून पुस्तक वाचायचं, कधी जवळच्या कुल्फीवाल्याकडे जाऊन केशर-पिस्ता कुल्फी खायची, कधी गाडी बंद पडल्याचा भावनिक दबाव आणून आईकडून बर्फाचा गोळा उकळायचा, पेरुवाल्या अज्जींची मुलाखत घ्यायची, कुणाच्यातरी शेतात हुरडा खायचा, कासाराकडे बांगड्या भरायच्या, कोकरांशी खेळायचं असले कार्यक्रम करायला वेळच मिळत नाही. :)

आणि गाडी बंद पडल्याच्या या सगळ्या 'जमेच्या बाजू' आता, वेळ वाया घालवायला नको या सदरात येतात. त्यामुळे हल्ली बस उशिरा आली की तेवढा वेळ जास्त पुस्तक वाचायला मिळाल्याचा आनंद होतो. शेवटी सगळा वेळ 'सत्कारणी' लावायची काहीच गरज नसते!

Saturday, July 17, 2010

राजकारण

माझ्या लहानपणी, बाबा आणि त्याचे मित्र नेहमी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी भेटायचे. सारस बागेच्या कोपर्‍यावर कल्पना नावाचं एक हॉटेल आहे. तिथे बाबा, विजूकाका आणि त्यांची टोळी भेटायची. शनिवारी बाबाला सुट्टी असायची. मग तो मला त्याच्याबरोबर सगळीकडे घेऊन जायचा. पण या हॉटेलातल्या भेटी मला फारशा आवडायच्या नाहीत. कारण बाबाचे सगळे मित्र तिथे फक्त राजकारणावर चर्चा करायला जमायचे. पुरुषांना बायकांसारख्या चहाड्या करण्याचं सार्वजनिक स्वातंत्र्य मिळालं नसल्यामुळे, कदाचित त्यांनी सगळ्यांनी राजकारण हा विषय शोधून काढला असेल. पण राष्ट्रीय किंवा जागतिक राजकारणावरून भांडण्यापेक्षा, स्वत:च्या घरातल्या राजकारणावर भांडण करणं जास्त उपयुक्त आहे असं माझं लहानपणी ठाम मत बनलं. आता आई, अज्जी, मीनामामी, ताजी यांचे राजकारणाचे परीघ खूपच सीमित होते. पण त्या सीमित परिघातील प्रत्येक व्यक्ती मी स्वत:च्या डोळ्याने पाहिली असल्याने, घरगुती राजकारण मला लवकर समजू लागलं. पण कुठल्याशा हॉटेलात भेटून कोण डावं, कोण उजवं, कोणाचं सरकार निवडून येणार वगैरे वाद माझ्या बालबुद्धीच्या पलीकडचे होते. त्यामुळे कानावर व्ही.पी सिंग, मंडल आयोग, बोफोर्सच्या तोफा वगैरे शब्द पडू लागले की मी माझं सगळं लक्ष माझ्या साबुदाणा-वड्यात एकवटायचे. बाबा आणीबाणीच्या काळात कॉलेजमध्ये होता. तेव्हा इंदिरा गांधींविरुद्ध होणार्‍या सगळ्या भाषणांना तो आवर्जून जायचा. नंतरच्या जनता पार्टीच्या प्रचारातसुद्धा बाबानी भाग घेतला. त्याचं जनता पार्टीवरचं प्रेम फार कमी दिवस टिकलं.पण त्याला त्याच्या "आणीबाणी लढ्याची" कहाणी सांगायची फार हौस होती. अण्णाआजोबा जसे त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गोष्टी सांगायचे, तसाच बाबा आणीबाणीच्या गोष्टी सांगायचा. आजोबांना गोष्टी सांगायला अख्खा स्वातंत्र्यलढा मिळाला होता. पण माझ्यापर्यंत येईपर्यंत सगळेच संग्राम आटोक्यात आले होते. हे लढे आधीच बाबा आणि आजोबांनी लढून ठेवल्यामुळे, मला एकतर माझा स्वत:चा असा लढा शोधून काढणे, नाहीतर मिळालेली शांती गरम गरम साबुदाणा वड्याबरोबर उपभोगणे हे दोनच मार्ग होते. त्यातला मी कुठला निवडला हे उघडच आहे!
पण घरात मात्र आज्ज्या आणि आईच्या गोष्टी ऐकायला मला फार आवडायचं. बायकांचं राजकारण सांभाळण्यात खूप जास्त मुत्सद्दीपणा लागतो, कारण बायकांच्या राजकारणात कधीही उघड विरोधी पक्ष नसतो. राष्ट्रीय राजकारणासारख्याच इथेही ठराविक हेतूसाठी ठराविक युत्या असतात, पण हे सगळं घरातल्या घरात असल्याने सुरळीतपणे चालवणं जास्त अवघड असतं. आता एरवी ताजी आणि कुसुमअज्जी ठाम विरोधी पक्षात असायच्या, पण आजोबांची गार्‍हाणी सांगताना मात्र दोघींची पक्की युती व्हायची. दुपारच्या वेळी माम्या शेंगा फोडायला बसल्या की माझे सगळे मामे कुठे कमी पडतात याचं सखोल पृथक्करण व्हायचं. पण एखाद्या मामानी दिवाळीला त्याच्या बायकोला पैठणी घेऊन दिली की सगळी समीकरणं फिसकटायची, आणि आजोबांच्या विरुद्ध नेहमी मामा आणि मामी एक होत असत. तसंच, आजोबांना काही काही वेळेस एखादाच मामा खूप आवडू लागायचा. तेव्हा आजोबांचा लाडका म्हणून तो सगळ्यांच्या विरोधी पक्षात जायचा! पण आजोबांची आवड रोज बदलत असल्यामुळे कुणीही त्या पदावर चिरकाल टिकून राहिलं नाही.
घरातल्या स्त्रीवर्गाला माहेर आणि सासर हे दोन पक्ष मिळालेले असतात. आणि या दोन्ही पक्षांतील न्यायनिवाडा करायला नवर्‍याची मदत घेतली जाते. पण बिचार्‍या न्यायदेवतेला फक्त माहेरचे दुर्गुण आणि सासरचे सद्गुण या दोनच गोष्टींपुढे अंधत्व बहाल केलं जातं. मग त्यात जर एखादा हंबीरराव मोहिते असेल तर तो, "नसेल पटत तर तुला माघारी पाठवतो. मग तुझ्या लाडक्या भावाला तुझ्यासाठी दुसरा दादला बघाया सांग" म्हणतो. पण असे हंबीरराव, भारतातल्या वाघांसारखेच दुर्मिळ होत चालले आहेत. लहानपणी मला रुसून बसायची सवय होती. तेव्हा बाबा माझं असल्या खंबीर मोहिते-पाटलाशी लग्न व्हावं अशी देवाकडे प्रार्थना करायचा. त्यावर आई लगेच, "नको बाई. निदान तिला तरी तिचं सगळं ऐकणारा नवरा मिळू देत" असं खोडसाळ वाक्य टाकायची. मी शाळेत असताना, माझ्या आईचे व्यवसायातील भागीदार, डॉक्टर काका (डॉ. निंबाळकर) मला बारामतीकडची शाहिरी ऐकवायचे. लोकगीतांमध्ये "असावा नसावा" नावाचा एक पोवाडा आहे. त्यात नवरा कसा असावा याचं वर्णन आहे. ते मला जाम अवडलं होतं. त्यात शाहीर म्हणतात,
"मनानं खंबीर| दिसायला गंभीर| नावाचा हंबीर असावा||
गुलूगुलू बोलणार| कुलूकुलू करणार| बायकांत बसणारा नसावा||"
कोल्हापूरकडून पुण्याला येईल तशा बायकांच्या मुठी आवळल्या जायच्या. आणि कदाचित त्यामुळेच माझ्या आईला तिची मूठ कमी पडते आहे असा न्यूनगंड आला असावा. पण तशीच एक "असावी नसावी" सुद्धा रचना आहे त्यात बायको कशी असावी याचंही वर्णन शाहीर करतात,
कामाला दणगट| मजबूत मनगट| नारीला हिम्मत असावी||
दिखाऊ पुतळी| कुजकी सुतळी| कधी कुठेही नसावी||
त्यामुळे थोड्याफार फरकाने आई आणि बाबा दोघेही शाहिरांच्या कवितेत बसत होते. :)
नवरा मुठीत नसणे ही घरगुती राजकारणातील निश्चित पराभव-पावती आहे. काही काही बायकांना मात्र नवर्‍याबरोबर मुलगाही मुठीत ठेवायच्या गगनभरार्‍या घ्याव्याशा वाटतात. अशावेळी घोर अराजकता माजायची चिन्हं दिसू लागतात. आमच्या घरात ही भीषण परिस्थिती कधीच आली नाही, कारण आमच्या घरात सगळे अण्णाआजोबांच्या मुठीत असायचे.
ताजीला कुठेही परगावी जाण्यासाठी आजोबांची परवानगी मागावी लागायची. त्यामुळे तिला तिच्या खेळ्या फार दूरदृष्टीने ठरवाव्या लागायच्या. त्यासाठी आधी आजोबांचे काही गुन्हे माफ केल्याचा मोठेपणा मिळवावा लागायचा. मग त्यांनी काही गुन्हे केलेच नाहीत, तर तिला त्यांचा एखादा पूर्वीचा गुन्हा नीट संदर्भांसहित उकरून काढावा लागायचा. माम्या आणि सासवा विरोधी पार्टीत असल्या, तरी परकीय शक्तींच्या पुढे नेहमी आमचं कुटुंब एकसंघ असायचं. ताजीनी घरात सुनांच्या कितीही बारीक खोड्या शोधून काढल्या तरी कुठल्याही बाहेरच्या सासू-संमेलनात ताजी नेहमी माझ्या माम्यांचं कौतुकच करायची. घरात मात्र सत्ताधारी पक्षावर जशी टीकेची झोड होते तशी सगळ्या सत्ताधारी माणसांवर व्हायची. त्यात आजोबांचा नंबर पहिला. पण आजोबांचा घरगुती लोकशाहीवर अजिबात विश्वास नसल्याने त्यांना कधीही त्यांच्या कुटुंबाच्या अस्मितेचा वगैरे विचार करायची अडचण आली नाही.
मी अगदी लहान असताना, माझ्या बाबाची आई (नानीअज्जी) नेहमी नानाआजोबांना खूप हळू आवाजात काहीतरी सांगत असायची. मी कितीही कानाचं सूप करून ऐकायचा प्रयत्न केला तरी मला काहीही ऐकू यायचं नाही. पण ते दोघं, मी आजूबाजूला असताना हळू आवाजात बोलतात म्हणजे माझ्याबद्दल किंवा माझ्या आईबद्दल असावं, असा माझा अंदाज होता. मग एकदा ते आमच्या घरी राहायला आलेले असताना, ते खोलीत जायच्या आधीच मी कपाटात लपून बसले होते. पण एवढं लपूनही अज्जी त्याच फु्सफुस आवाजात बोलू लागली, आणि काहीही न समजता मला त्या कपाटात फुकट एक तास बसावं लागलं. तेव्हापासून मी हेरगिरी करणं बंद केलं. मोठी झाल्यावर या घरगुती राजकारणातून काहीही निष्पन्न होत नाही हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे या संस्थेत जर आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल, तर प्रत्येकानी आपल्या परिस्थितीशी तडजोड करायला शिकलं पाहिजे, हे एकच उत्तर मिळालं. त्यामुळे काही दिवस मी माझी नजर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे वळवली. पण त्यावर माझं मत व्यक्त करताना अजूनही मला माझ्या साबुदाणावड्याची आठवण होते. आणि घरी बायकोला भयानक घाबरणारे, पण कुठल्याशा हॉटेलात बिचार्‍या दिवंगत जवाहरलाल नेहरूंवर पोटातून चिडून, मुठी आपटणारे बाबाचे मित्र आठवतात.

Friday, July 2, 2010

उशीचा अभ्रा आणि भाजीची पिशवी

कुसुमअज्जीला भाजी आणायला जायची फार हौस होती. रोज सकाळी मंडई उघडण्याची ती अगदी आतुरतेनी वाट बघायची. मंडईत जाण्याच्या आजूबाजूला इतक्या गोष्टी असायच्या, की भाजी आणायला जाणे हा तिच्या दिवसातला फार मोठा उत्सव असायचा. मीनामामीला काय हवंय, नरुमामाला कुठली भाजी आवडते, आजोबांना काय खायची इच्छा झालीये, माझी फरमाईश या सगळ्याचा विचार करून ती भाजीला जायची. पण या सगळ्यापेक्षा मोठा मान भाजीच्या पिशवीचा असायचा. मला 'भाजीची पिशवी' हा शब्द लहानपणापासून चिडवतो आहे. कुठेही बाहेर निघालं, की अज्जी, "अगं पिशवी घेऊन जा!" असा सल्ला द्यायची. आणि पिशवी तरी कसली? तिच्या भाजीच्या असंख्य पिशव्यांपैकी एक. अज्जीची कुठलीच भाजीची पिशवी आयती विकत आणलेली नसायची. एखाद्याला जर माझ्या बालपणीच्या कपड्यांचा अभ्यास करायचा असेल (उत्सुक उमेदवार शून्य आहेत हे माहिती असून देखील हा उद्दामपणा), तर त्यानी अज्जीच्या भाजीच्या पिशव्या तपासाव्यात. माझ्या दुपट्यांपासून ते माझ्या चणिया-चोळीपर्यंत सगळ्याच्या पिशव्या तिच्या कपाटात सापडतील. आमच्या घरापलीकडे तिची खास मैत्रीण कलामावशी राहायची. तिच्याकडून पिशव्या, गोधड्या आणि उशांचे अभ्रे अज्जी शिवून घ्यायची. दर वर्षी माझे काही कपडे अज्जी हक्काने ठेवून घ्यायची. यातही तिची खास कृती असायची.
"हा फ्रॉक आता विटका दिसतोय. घालू नकोस"
"कुठे विटका दिसतोय? चांगला तर आहे की! मला आवडतो हा फ्रॉक!"
आठवड्याभरानी पुन्हा तोच संवाद. मग मला खरंच वाटू लागायचं. त्यानंतर आठवड्यानी अज्जी मला नवीन कपडे घेऊन द्यायची. ते घेतानाही, रंग, कापड वगैरे तिच्या पसंतीनी घ्यायची, आणि पुण्याला माझी बोळवण करताना माझे 'विटलेले' कपडे ठेवून घ्यायची. मग पुढच्या सुट्टीत त्या विटक्या कपड्यांची भाजीची पिशवी झालेली असायची. तिनी कधी तिची पिशवी घेऊन जायचा आग्रह केला आणि मी तिच्या पिशवीला नावं ठेवली की तिला मनापासून दु:ख व्हायचं.
"शी! मला नको तुझी ती गावठी पिशवी."
"गावठी म्हणतेस होय गं माझ्या पिशवीला! तुझ्या आईच्या जरीच्या साडीची आहे. त्या साडीला दोन हज्जार रुपये पडले होते!"
आज्जीचा, "किती रुपये पडले?" प्रश्न आई फार चलाखीनी हाताळायची. आईनी जर तिला किंमत दोन हजार रुपये सांगितली असेल, तर नक्कीच त्या साडीची किंमत साडे तीन हजार असणार! आणि मीही ती परंपरा छान चालवली आहे. :)

भाजीला अज्जी रोज वेगळी पिशवी न्यायची. त्यामुळे बाजारात ’फाशनेबल अज्जी’ म्हणून ती प्रसिद्ध असावी. आणि इतक्याही गावठी नसायच्या त्या पिशव्या. एखादीला जरीचे काठ असायचे. पिशवीच्या बंदाला तेच काठ सुबकरीत्या लावलेले असायचे. एखादी माझ्या चिकनच्या फ्रॉकची असायची. तिला आतून माझ्याच फ्रॉकचं अस्तर असायचं, आणि त्यातून अस्तर पुन्हा वापरल्याचा अभिमान ओसंडून वाहायचा. एखादी दोन वेगवेगळ्या साड्यांचे त्रिकोण जोडून बनवलेली असायची. एखाद्या पिशवीला आत छोटा कप्पा असायचा, ज्यात अज्जी सुटे पैसे ठेवायची. कधी कधी तिच्या माहेरच्या आवडत्या बायकांची ओटी भरताना अज्जी नारळ आणि तांदूळ पिशवीसकट द्यायची, आणि त्या पिशवीवर टिप्पणी होणं ती अत्यावश्यक समजायची. नाही झाली तर पुढल्या वेळी फक्त नारळ-तांदूळ मिळायचा.

ही सवय अनुवांशिक असावी. कारण एकीकडे अज्जीला नातीच्या कपड्यांच्या पिशव्या बनवायचं वेड तर दुसरीकडे आईला मुलीच्या कपड्यांचे अभ्रे बनवायचा नाद! त्यामुळे सुट्टीवरून पुण्याला परत येईपर्यंत माझ्या तिकडच्या तथाकथित विटलेल्या कपड्यांचे अभ्रे झालेले असायचे आणि माझ्याच खोलीतली उशी, माझाच एखादा फ्रॉक घालून टुम्म फुगलेली दिसायची! सगळ्यात विनोदी गोष्ट म्हणजे माझे कपडे घेताना आधीच त्यांचे अभ्रे नाहीतर पिशव्या कशा दिसतील याचा विचार व्हायचा. त्यामुळे कधी कधी आपण म्हणजे अज्जी आणि आईचं "पिशव्या आणि अभ्रे स्वस्तात पडायचं" कारण आहोत असं मला वाटू लागायचं. पण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा कल्पकतेने वापरण्यातही कौशल्य असतं. या बाबतीत कदाचित विकतचे अभ्रे स्वस्तात पडले असते, पण भारतीय नारी तिच्या भावनिक निर्णयांमुळे चिनी नारीच्या मागे पडली आहे. आईकडे माहेरून मिळालेली भांडी कशी जगातल्या सगळ्या भांड्यांपेक्षा सरस आहेत याची एकशे एक करणं असतील. अज्जीच्या कपाटातही आईनी दिलेल्या साड्यांसाठी वेगळा कप्पा होता. आणि प्रत्येक साडी नेसताना, ती कुणी दिली, तेव्हा काय झालं होतं, कशाबद्दल दिली याचा तपशील तयार असायचा. मला याची फार गंमत वाटायची.

पण या सवयीतला मला आवडणारा भाग म्हणजे माझ्यासाठी शिवलेल्या रजया! दर वर्षी आई आणि अज्जी त्यांच्या काही सुंदर साड्या 'बाद' करायच्या. कारणं वेगवेगळी असायची. कधी नुसताच कंटाळा, कधी एखाद्या लग्नात मन लावून जेवताना पडलेला तेलाचा डाग, तर कधी साडी दिलेल्या व्यक्तीची आठवण अजरामर करण्यासाठी. रजईवर जाणार्‍या साड्यांनी काहीतरी खास आठवण जागृत केलेली असायची. त्याशिवाय तो मान साड्यांना मिळायचा नाही. नाहीतर त्यांच्या पिशव्या किंवा अभ्रे बनायचे. पण एखादी सुंदर नारायणपेठ, किंवा एखादी मऊ मऊ कलकत्ता, खास आतल्या बाजूसाठी, नेहमी गोधडीसाठी राखून ठेवली जायची. काही काही गोधड्या आतून रंकाच्या तर बाहेरून राजाच्या दिसायच्या. पलंगावर ठेवताना मात्र रेशमी बाजू वर दिसायची. पण कडाक्याच्या थंडीत आत शिरताना मात्र उबदार, सुती बाजूच जास्त उपयोगी पडायची. कधी कधी अज्जी एखाद्या जुन्या, जीर्ण पटोला साडीचे काठ जपून ठेवायची. मग कलामावशीकडून एखाद्या सध्या सुती गोधडीवर ते काठ लावून घ्यायची. तशा गोधड्या, एखाद्या दासीनी राणी नसताना चोरून तिचे बाजूबंद घातल्यासारख्या दिसायच्या. दर वर्षी माझ्या वाढदिवसाला अज्जी मला नवीन गोधडी पाठवायची. आणि कधी कधी मी नाराजीने तिच्या स्वाधीन केलेल्या कपड्यांचे छोटे छोटे तुकडे तिच्यातून डोकवून मला हसवायचे. एखाद्या कपड्याची पिशवी किंवा अभ्रा न होता त्याला गोधडीचा मान मिळाला की मला फार आनंद व्हायचा.

यावर्षी येताना आईनी मला अज्जीच्या साड्यांची गोधडी दिली. ती मात्र खरंच माझ्या सगळ्या आठवणींचा अर्क आहे. ती पसरून कधी योगासनं करू लागले की माझ्या घर-सख्या त्या दृश्याकडे बघत राहतात. आणि एखाद्या दुर्मीळ सुट्टीच्या दिवशी जेव्हा, अज्जीच्या साड्यांची, आईनी बनवून घेतलेली गोधडी घेऊन मी पहुडते, आणि आमचा ऑस्ट्रेलीयन बोका माझ्या पोटावर बसून गुरगुरू लागतो, तेव्हा आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी एकदम एका ठिकाणी आल्यासारखं वाटतं!

Sunday, June 27, 2010

अभ्यास

माझा अभ्यास हा आमच्या घरात युद्धाचा विषय असायचा. सकाळी सकाळी बाबा पळून यायचा आणि मला उठवायचा. सात ते साडेआठ ही वेळ माझ्या अभ्यासाची असायची. तसं भाषा, इतिहास-भूगोल, सामान्य विज्ञान वगैरेंशी माझं खास वैर नव्हतं. पण गणिताचं पुस्तक सकाळी सकाळी दिसलं की मी एखाद्या घोडीसारखी बिथरायचे! गणित मला यायचं नाही. पण ते येत नाही म्हणून मला त्याची जाम भीती वाटायची. शाळेत गणितात पैकीच्या पैकी मार्कं मिळणार्‍या मुला-मुलींचा वेगळाच तोरा असायचा. मला भाषेत नेहमी छान मार्क असायचे, पण भाषेचं कौतुक भाषा शिकवणार्‍या बाईंनाच असायचं फक्त. गणित आलं पाहिजे कारण गणित आल्याने आयुष्य खूप सोपं होतं, असा एक मतप्रवाह शाळेतल्या बहुतेक मुलांच्या पालकांमध्ये असायचा.
बाबाला मला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळावेत असं फार वाटायचं. पण ते त्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नाही. निदान माझी गणिताबद्दलची भीती तरी जावी म्हणून 'हसत खेळत गणित’ सारखे खूप उपक्रम आमच्या घरात राबवण्यात आले. पण कशानेही माझ्या गणित-ग्रहणशक्तीत फरक पडला नाही. प्रत्येक इयत्तेसरशी माझं गणित अधिकच कच्चं होऊ लागलं. आणि त्याचबरोबर गणित किती महत्वाचं आहे याचे पुरावे आणखीनच बळकट होऊ लागले. आमच्या घरात दर वर्षी माझ्या गणितातील मठ्ठपणावरून बाबाच्या डोक्यात चिंता निर्माण होऊ लागल्या. आई मात्र शांत असायची. "सई, तू एकदा गणितात नापास होऊन बघ", असा सल्ला तिनी मला दिला होता. पण आई-बाबांच्या सुदैवाने ती वेळ माझ्या आयुष्यात खूप उशिरा आली. आणि आली तेही बरं झालं.
सातवीनंतर बाबानी माझा अभ्यास घेणं बंद केलं आणि मला गणिताची गोडी लागावी म्हणून मंगलामामीकडे अभ्यासाला पाठवण्यात येऊ लागलं. मंगला नारळीकर, म्हणजे मंगलामामी माझी सगळ्यात आवडती शिक्षिका आहे. तिच्याकडे मी सायकलवरून जायचे. पुणे युनिव्हर्सिटीचा तो शांत परिसर, आयुकातलं तिचं फुलांनी सजलेलं घर, तिच्या मोठ्या डायनिंग टेबलवर बसून पिवळ्या पिवळ्या कागदांवर लाल शाईनी सोडवलेली गणितं, हे सगळं माझ्या मनाच्या खाऊच्या कप्प्यात ठेवलंय मी! तिनी टाटा इनस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मधून गणितात पी. एच. डी मिळवली आहे. तिची गणित शिकवण्याची पद्धत इतकी सोपी असायची की तिच्याकडे असेपर्यंत मी अजून पहिली-दुसरीचंच गणित शिकते आहे असं मला वाटायचं. दहावीत माझा भूमितीचा अभ्यास खूप छान झाला होता, कारण मंगलामामी मला सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले प्रत्यक्ष चित्र काढून समजावून सांगितले होते. कधी कधी आम्ही काढलेल्या त्रिकोणांच्या मध्यगा (मिडीयन) वापरून, एकसारखे पानभर त्रिकोण मी काढायचे आणि तेरा वर्षांच्या मुलीचा गणिताचा तास हा पाच वर्षांच्या मुलांचा चित्रकलेचा तास बनायचा. एखादा कांदा सोलत जावा तशी ती गणितं सोडवत जायची. कुठलीही एक पद्धत घोड्यासारखी न रेटता, सगळ्या रस्त्यांनी त्याच उत्तराकडे एखाद्या शूर शिपायासारखी मला न्यायची. तिची ही सवय मी गणितात नाही वापरू शकले. पण गणिताच्या परिघाच्या बाहेर, खर्‍या खर्‍या आयुष्यात ही पद्धत जास्त उपयोगी आहे हे मला आता कळू लागलं आहे.
ती दोन वर्षं माझे गणितातले मार्कं अचानक शिड्या चढू लागले. मला मंगलामामी गणित शिकवते याचा वर्गातल्या मुलांना हेवादेखील वाटू लागला. पण गणितापेक्षा खूप मोठ्या गोष्टी मी तिच्याकडून शिकले. तिचा साधेपणा, एखादी गोष्ट येत नाही याकडे बघण्याचं निखळ कुतूहल, ती का येत नाही याचा त्रागा न करता, तिच्या आजूबाजूला साठलेली भीती, आणि लाज आधी कमी करायची पद्धत, हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. एका वेळी मंगलामामी साधारण पाच कामं करायची. माझ्याबरोबर तिच्या मोलकरणींच्या मुलांचाही अभ्यास एका बाजूला सुरु असायचा. मग कधी कधी तिची मोठी शिष्या म्हणून त्यांचा अभ्यास तपासायची जबाबदारी ती मला द्यायची. आम्ही सगळे आमचे आमचे अभ्यास करत असताना ती आमच्यासाठी केक बनवायची. तसंच तिचं फुलांचं वेड, जे मलाही वेड लावून गेलं. तिच्या टेबलवर नेहमी सोनटक्का, चाफा, फ्रेंच गुलाब, मोगरा, अनंत, आणि बाकी काहीच नसलं तर पारिजात तरी हमखास असायचा. आणि ती सुगंधी फुलं चहात टाकायची. मग मीपण घरी येऊन फुलांचा चहा करायचे.

तिच्या डोक्यात इतकी माहिती असूनदेखील, लिहिताना किंवा बोलताना अगदी सोपं, साधं आणि सुटसुटीत बोलायची.
तिला मी राजकारणावर वाद घालतानाही पाहिलं आहे. पण तिचा भर नेहमी मूळ अडचण काय आहे याकडेच असायचा. कुठल्याही वादामध्ये तिनी कधीही, कुठलाही एकाच "वाद" पकडून ठेवला नाही. आपण काहीतरी महान बोलतो आहे, आणि आपल्या बोलण्याने ही सगळी सभा खूप प्रभावित होणार आहे असा दर्प तिच्या कुठल्याच बोलण्यात नसायचा.
तिचा तास सुरु असताना कधीच मला माझ्या पुढच्या आयुष्याची भीती वाटायची नाही. आणि तिच्यासारखी गुरु मला तेव्हा भेटली यासाठी ’नियती’बाईंचे मानावे तितके आभार कमी आहेत. पुढे वाचन वाढल्यावर लक्षात येऊ लागलं, की सोपं लिहिणं, सोपं बोलणं आणि सगळ्यांना कळेल असं बोलणं खूप अवघड आहे. खास करून जेव्हा बोलणार्‍या किंवा लिहिणार्‍या माणसाचा व्यासंग वाचकांच्या मानाने खूप मोठा असतो, तेव्हा त्यांना कळेल असं बोलणं ही विषयाशी पूर्णपणे एकरूप झाल्याची पावतीच असते.
माझी गणिताची भीती अजूनही गेली नाही. पण त्याच्याशी लढता लढता मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा लोकांमध्ये अभ्यासाच्या पलीकडची हुशारी दिसू लागली. पुस्तकं वाचून शहाणे झालेले लोक खूप बघितले होते. पण प्रवास करून शहाण्या झालेल्या लोकांशी दोस्ती झाली तेव्हा, भारतात आपण कुठल्याच साच्यात बसलो नाही याचा खूप आनंद झाला. कधी कधी आपल्या बाळाचं आयुष्य सोपं व्हावं, त्याला आपल्यासारखे कष्टं करायला लागू नयेत म्हणून आपण नकळत त्यांच्या आजूबाजूला भिंती घालतो. पण भिंत घालण्यापेक्षा, येईल त्या दु:खाच्या लाटेवर स्वार व्हायला शिकताही आलं पाहिजे. आणि भिंत नसेल तर दु:खच आणि कष्टच वाट्याला येतील असं कुठे आहे? कदाचित असेही देश दिसतील जे आपल्या त्रिज्येच्या बाहेर होते. अशी लोकं भेटतील, ज्यांचा पेहेराव, आहार, रूप-रंग सगळंच आपल्या अगदी विरुद्ध असेल. पण तरीही त्यांच्या मनात आपल्यासारखेच प्रश्न असतील. आपल्यासारखीच सुख-दु:ख असतील. आणि अभ्यास करून, यशाच्या शिड्या चढणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच आपल्यासारखाच आणि आपल्या अगदी विरुद्ध विचार करणारी माणसं बघणंही महत्वाचं आहे. आणि मग मंगलामामी जशी गणितं सोडवायची तशीच कुठल्याही देशातून, वेशातून पाहिलेली माणसं एकाच माणुसकीचं उत्तर देतात!

Sunday, June 20, 2010

साधी माणसं

कोल्हापुरात खूप वर्षं जयश्री गडकर मर्लिन मन्‌रोच्या पदावर होती. अरूमामासमोर तिचा विषय काढला की एक तास तरी सत्कारणी लागायचा.
"सई, जयश्री गडकर काय होती म्हणून सांगू!"
खरं तर ती काय होती हे मला लहानपणापासून छान समजलं होतं. पण अरूमामाला हे सांगण्यात काही अर्थ नसायचा.
"तुमची ती रेखा, ती जयाप्रदा, ती माला शिना, ती श्रीदेवी, सगळ्या बाद आमच्या गडकरबाईपुढं".
कोल्हापुरातले लोक 'बाद' हा शब्द जितक्या तिरस्काराने वापरतात तितके महाराष्ट्रातले दुसरे कुठलेही मराठी भाषिक वापरत नसतील.
कोल्हापुरात उन्हाळ्यातल्या दुधापासून ते तरुण वयातल्या लेकापर्यंत सगळं 'बाद' होऊ शकतं.
पुण्यात, "अहो बापटांचा थोरला मुलगा म्हणे वाया गेला! बारावीत फक्त सत्तर टक्के मिळाल्यामुळे त्याला बी. एस. सी. ला जावं लागलं म्हणे!"
हे वाक्य लोक दबक्या आवाजात बोलतात. पण कोल्हापुरात मात्र याच प्रकारचा संवाद असा होऊ शकतो.
"ते पाटलाचं दोन नंबरचं पोरगं म्हायताय काय तुला?"
"व्हय म्हायत्याय की. ते कुस्ती तेन शिकायचं त्ये न्हवं?"
"व्हय. पार बाद झालं."
यानंतर जवळच्या कोपर्‍यात तंबाखूची पिचकारी, आणि नाट्यमय शांतता.
"म्हंजी? काय क्येलं त्यानं?"
"बामनाच्या पोरीला पळीवलं आन्‌ मग दोगांचंबी बा त्यास्नी घरात घेईनात."
"आ?"
"आता पतपेढीत कारकुनी करतंय. कुस्ती बिस्ती पार बंद झाली. तब्येतबी लई उतरली या झंगटापाई!"
तीन तासाच्या सिनेमावर पुणेकर सहा तास टीका करू शकतात, पण कोल्हापुरातले लोक मात्र
"बाद हाय पिच्चर" या तीनच शब्दांत सिनेमाचं काम तमाम करतात.
आई मोठी होत असतानाचा काळ मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ होता. साधी माणसं, मराठा तितुका मेळवावा, मोहित्यांची मंजुळा, सांगत्ये ऐका, मानिनी हे सगळे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्या काळी बनले. तमाशाला मोठा रंगमंच मिळाला आणि प्रतिष्ठाही मिळाली. आमच्या घरात चित्रपट-वेड रुजवणारी पहिली आणि एकमेव व्यक्ती म्हणजे ताजी. आई लहान असताना तिला काखोटीला मारून ताजी तिच्या मैत्रिणींबरोबर सिनेमाला जायची. त्या सगळ्या नेहमी आईच्या आणि तिच्या या प्रेमाची थट्टा करायच्या. पण आईला जशी गीता पाठ करायला लावणारी आणि शाळेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावणारी सख्खी आई मिळाली, तशीच तिला कडेवर घेऊन जयश्री गडकरचे सिनेमे बघायला नेणारी ताजीसुद्धा मिळाली. मराठी "चित्रपटसृष्टीत" आणि आमच्या घरात फक्त एका गल्लीचं अंतर होतं, कारण दहाव्या गल्लीत ताजीची जवळची मैत्रीण राहायची आणि तिचे यजमान म्हणजे माधव शिंदे. त्यामुळे कुठला सिनेमा कधी येणार याची ताजीला आधीच खबर मिळायची, आणि कुठली नटी कुठल्या नटावर भाळली आहे हेदेखील तिला फिल्मफेअर वगैरे न वाचताच कळायचं!
तसंच सूर्यकांत मांढरेंची बायको आमच्या ताजीची सख्खी मैत्रीण होती. त्यांचं त्रिकूट सगळीकडे प्रसिद्ध होतं. या गाढ मैत्रीचं फळ म्हणून की काय, आमच्या घरातल्या सगळ्या पोरांना ’धर्मकन्या’ नावाच्या सिनेमात काम करायला मिळालं. आई तेव्हा नऊ वर्षांची होती आणि तिचं अभिनयकौशल्य सगळ्यात सरस असल्यानं तिला चिंगीचं काम मिळालं. ’कुटुंबनियोजन न केल्यामुळे होणारी फरफट’ हा त्या सिनेमाचा विषय होता, आणि त्यामुळे मिळतील तितकी पोरं कमी अशी गत होती. मग कुसुमअज्जीच्या सगळ्या शंकांचं निरसन करून आईला सिनेमात घेतलं. त्यासाठी तिला एक जुनं परकर-पोलकं ठिगळं लावून घालायला लागायचं. ते नेमकं तिच्या मोठ्या मावशीनं तिला शिवलं होतं. एके दिवशी आपली लेक सिनेमात गेलीये याचं कौतुक करायच्या आनंदात कुसुमअज्जीनी तिच्या बहिणीला, "अगं तू दिलेलं परकर-पोलकं तिच्या रोलमध्ये बरोब्बर बसलं बघ."
असं सांगितल्यावर तिच्या बहिणीनी, "याचा अर्थ काय समजायचा मी?" असा निरुत्तर करणारा प्रश्न विचारला होता!
आईच्या सिनेमाच्या गोष्टी माझ्या लहानपणी मी हजारोवेळा ऐकल्या असतील. त्यातली नटी अनुपमा प्रत्यक्षात किती सुंदर होती, तिचे केस किती लांब होते, नरुमामाला कसं एकट्यालाच श्रीमंत मुलाचं काम मिळालं होतं हे सगळं सारखं सारखं ऐकायला मला फार आवडायचं. आई शाळेतून परस्पर शूटींगला जायची कारण अज्जीनी शाळा बुडवून सिनेमात काम करायला बंदी केली होती. त्यात आई, ती घरी येऊन पुन्हा अभ्यास करून कशी झोपायची हे कपोलकल्पित वाक्य टाकून द्यायची माझ्यावर दबाव आणायला. पण ते मी या कानांनी ऐकून त्या कानांनी सोडून द्यायचे.
त्या सिनेमात चंद्रकांत गोखल्यांनी आईच्या बाबांचं काम केलं होतं. योगायोगाने पुढे आम्ही त्यांच्याच बिल्डींगमध्ये राहायला गेलो. तेव्हा आई पन्नाशीला आली होती आणि ते जवळपास नौव्वद वर्षांचे होते. पण ते आईला चिंगी म्हणूनच हाक मारायचे. दारात येऊन, "चिंगी कुठाय आमची?" म्हणून विचारायचे.

मोठी होताना मला आईनी हे सगळे चित्रपट आवर्जून दाखवले. आणि ते मला खूप भावलेदेखील. मग दरवर्षी अरुमामाच्या मळ्यात गेल्यावर तो मला मराठी गाणी म्हणायला लावायचा. मी आणि आई कधी कधी त्याच्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांशेजारी बसून, "दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी, पाजिते रान सारं मायेची वयनी" म्हणायचो आणि अरूमामा अगदी भजन ऐकल्याच्या थाटात ते ऐकायचा.
जेव्हा जेव्हा आईचं "गोड गोजिरी लाज लाजरी" हे गाणं पाहते, तेव्हा मला उगीचच भरून येतं. असं सरळसोट बालपण मिळालेले लोक बघितले की आईच्या बालपणाचं खूप कौतुक वाटतं. आमच्या कोल्हापूरच्या घरात सगळ्यांकडे असतात तसे सबंध कुटुंबाचे सहलीवर काढलेले फोटो कुठेच दिसत नाहीत, किंवा एखाद्या खोलीत अज्जी-आजोबांच्या लग्नाचा फोटो सुद्धा दिसत नाही. पण त्या कुटुंबांनी मिळून जे जे काय केलं ते कुठल्याही चौकोनी कुटुंबांनी केलं नसतं. आणि कदाचित ते कुटुंब चौकोनी नाही म्हणूनच त्याला हवा तेव्हा हवा तसा आकार देता आला. कधी एकाच माणसाच्या स्वार्थासाठी तर कधी सगळ्यांच्या हितासाठी, तर कधी फक्त आनंदासाठी. आणि प्रत्येक प्रसंग काहीतरी नवीन शिकवून गेला. मी आणि माझी मामेभावंडं येईपर्यंत सगळी वादळं निवळली होती. पण तरीसुद्धा वरवर अगदी साध्या वाटणार्‍या या कुटुंबांनी किती असामान्य गोष्टी करून दाखवल्या आहेत हे पाहिलं की वाटतं, ’जे होतं ते चांगल्यासाठीच होतं’ हे वाक्य नुसतं बरं वाटावं म्हणून नसतील म्हणत!

Tuesday, June 15, 2010

टिकली

माझ्या आयुष्यातल्या पहिल्या काही आठवणींमध्ये ताजीचा कुंकू लावायचा कार्यक्रम आहे. मुडशिंगीच्या तिच्या खोलीत सकाळी दारातून तिरकं ऊन यायचं. आमचं घरही कौलारू होतं, आणि दर दहा-बारा कौलांमागे एकाला काच बसवलेली असायची. त्या काचेतूनही ऊन यायचं. त्या उन्हाच्या झोतात असंख्य धुळीचे कणही दिसायचे. पण त्या नव्या दिवसाच्या ताज्या उबेत आपल्या आयुष्यात धुळीचे कण आहेत याचं फारसं दु:खही नाही व्हायचं. त्या पहिल्या उन्हात, ताजी आरशात बघून मन लावून कुंकू लावायची. आधी मेण, मग कुंकू, मग मेणाच्या हद्दीपलिकडलं कुंकू पुसून बरोब्बर गोल करायची. कधी कधी वाटायचं, ते तिरकं ऊन तिच्या भुवयांमधूनच येतंय! त्यामुळे मला लहानपणी टिकलीचं फार आकर्षण होतं. स्नेहा रोज टिकली लावायची, म्हणून मी पण लावू लागले. तिच्याकडे वेगवेगळी रंगीत गंधं असलेली एक मोठी डबी होती. त्यात छोट्या छोट्या बाटल्या होत्या आणि त्या सगळ्यांना एकच मोठं झाकण होतं. आम्ही त्या गंधाच्या बाटल्यांचा खूप सदुपयोग आणि दुरुपयोग केला. कधी झोपलेल्या चिकूदादाला मिशा काढायला तर कधी बाहुलीचं लग्न लावायला. पण टिकली हा माझ्या बाल-आयुष्यात कधीच वादाचा विषय नव्हता. कधी कधी अज्जीबरोबर फुलं वेचायला जाताना मी अंघोळ करून, परकर-पोलकं घालून, टिकली लावून जायचे. पण पुण्याच्या शाळेची हवा लागताच माझ्या मनात टिकलीबद्दल बरेच प्रश्न येऊ लागले. शाळेतल्या मुली टिकलीवाल्या मुलींना थेट काकू पदावर ठेवायचा. त्यामुळे टिकली लावणार्‍या मुलींचा वेगळा गट असायचा. एखाद्या दिवशी मजा म्हणून शाळेत टिकली लावून गेलं की तो सगळा दिवस, "आज टिकली का लावलीस?" आणि त्यानंतर एकमेकींकडे बघून केलेल्या खुणा पाहण्यात जायचा. टिकली न लावायची सवय होईपर्यंत सुट्टी यायची आणि मग पुन्हा टिकलीवाल्या जगात जावं लागायचं. बरीच वर्षं कपाळावरच्या या पिटुकल्या ठिपक्याची नेमणूक आणि बरखास्ती फार गाजावाजा न करता चालू होती. पण मग तेरा-चौदा वर्षांची झाल्यावर अचानक काय झालं माहिती नाही. कुणी "सई टिकली लाव", असं सांगितलं की डोक्यात एकदम वीजच चमकायची. कपाळावरचा हा बिंदू कुठल्यातरी महान अस्तित्वाचा केंद्रबिंदू होऊन बसला होता!
'टिकली का लावायची?' या प्रश्नाची खूप उत्तरं मिळाली.
"आपण हिंदू आहोत सई."
"भारतीय संस्कृती आहे ती. जपायला हवी."
" मोकळं कपाळ अपशकुनी दिसतं."
"भरल्या घरात हातात बांगड्या असाव्यात आणि कपाळावर टिकली असावी!"
"तुझ्या भुवयांमध्ये देवानी जागा का सोडली असेल? टिकलीसाठीच!"
पण या कुठल्याच कारणानी टिकली माझ्या कपाळी टिकली नाही. मग काही वर्षं मला टिकली लावायचा, बांगड्या घालायचा आग्रह न करण्यात गेली. पण मग माझ्या मोकळ्या कपाळाकडे जराही लक्ष न देता माझ्या आजूबाजूच्या बायका टिकल्या लावत राहिल्या. कुणाचं कुंकू, कुणाची लांबुडकी डिंकवाली गडद लाल, कुणाची मोठ्ठी गोल, कुणाची पुरळवजा, कुणाची नवीन फॅशनेबल चांदणी, कुणाची पेशवेकालीन चंद्रकोर! आणि या टिकल्या माझ्याकडे बघून वेडावून दाखवतायत असं मला सारखं वाटू लागलं. मग सतरा-अठरा वर्षांची झाल्यावर मी हळूच पुन्हा टिकली लावू लागले. पण हे करताना आई-अज्जीच्या डोळ्यावर येणार नाही याची खात्री करावी लागायची. कारण माझ्या साध्या बदललेल्या मताला लगेच 'दुर्गा झाली गौरी' चा सूर यायचा. पण पुढे आयुष्यातले बाकीचे बिंदू जुळवण्यात टिकलीचा विसर पडला आणि तिचा तिटकारा आणि वेड दोन्ही संपुष्टात आले.
पण या टिकलीसारख्या आणखीही बर्‍याच गोष्टी होत्या ज्या लहानपणी उगीचच नाकारल्या गेल्या. आता त्याचं हसू येतं.
देव आहे की नाही हे ठरवण्यात माझं बरंच बालपण वाया गेलं. माझ्या मैत्रिणींच्या आया त्यांना बरोब्बर सहा वाजता 'शुभंकरोती' म्हणायला बोलवायच्या. पण माझे आई बाबा माझ्यावर असली काहीच वळण-प्रधान सक्ती करायचे नाहीत. आमच्याकडे देवाची पूजा व्हायची सकाळी तेवढंच. 'देवाचं करणे' या दोन शब्दांचा अर्थ मला अजून नीट कळला नाहीये. लहानपणी संस्कृत पाठांतर स्पर्धेत मी खूप स्तोत्रं म्हणायचे. पण तीच स्तोत्रं मी कधी देवासमोर बसून म्हटली नाहीत. देव माझ्या पुण्यातल्या आयुष्यात फार ढवळाढवळ करायचा नाही. त्यामुळे तो नसला तरी चालेल आणि नसेलही कदाचित असं मत होऊ लागलं होतं. पण ताजीची गौर बघितली की तिच्या गौरीपुरता तरी देव असावा असं वाटायचं. तिचा उत्साह, तिची गडबड, सुनांना सारख्या सारख्या दिलेल्या आज्ञा, साड्या, फराळ हे सगळं बघून मला आपली आई पण अशीच हवी होती असं वाटायचं. पण त्याचबरोबर, दोन मुखवट्यांसाठी केलेला हा खटाटोप पाहून, "हे नक्की कुणासाठी चाललंय?" असा प्रश्नही पडायचा. पण गौरी-गणपतीच्या वेळी कोल्हापुरात मला फार मजा यायची. त्यामुळे देव नसला तरी देवासाठी केलेल्या सगळ्या गोष्टी मला प्रिय होत्या. पुढे मोठी झाल्यावर कुसुमअज्जीची शांत भक्ती मला बघायला मिळाली. तिचा शेगावच्या गजानन महाराजांवर फार विश्वास होता. कुठल्याही संकटातून ते तिला बाहेर काढू शकतात असं तिचं अगदी प्रामाणिक मत होतं. कधी अडचण आली की एखाद्या कोपर्‍यात ती शांतपणे त्यांची पोथी वाचत बसायची, आणि कदाचित अडचण आणि अडचणीतून मार्ग सापडण्यापर्यंतच्या वेळात शांतपणे, धीर न खचू देता केलेलं ते पोथीवाचन अज्जीमध्ये ती निस्सीम भक्ती सोडून जायचं. पण मार्ग मात्र तो न खचलेला धीरच शोधून द्यायचा.
माझे पी.एच. डीचे गाईड नास्तिक आहेत. ’देव नाही’ हे सिद्ध करायला त्यांनी इतकी पुस्तकं वाचलीयेत की देवसुद्धा गालातल्या गालात हसत असेल! लहानपणी प्रत्येक पुणे-कोल्हापूर प्रवास मनात एक छोटंसं परिवर्तन घडवून आणायचा. मग हळूहळू लोकांच्या देवाकडे बघण्यापेक्षा त्यांच्या भक्तीकडे बघणं सोपं वाटू लागलं. एखादा मन लावून काम करणारा शास्त्रज्ञ, एखादी प्रामाणिक भाजीवाली, एखादा पुस्तकांत आकंठ बुडालेला तत्वज्ञ, आणि एखादा अनवाणी, झेंडा आणि झोळी घेऊन चालणारा वारकरी, हे सगळे एकाच पंथातले वाटू लागले.
आणि मग आपण ज्या बुडबुड्यात वावरतो आहोत, त्या जगातल्या माणसांच्या भक्तीवर उगीच आधुनिक शास्त्राचे वार करू नयेत हे कळू लागलं. तसंच जेव्हा आधुनिक शास्त्राच्या बुडबुड्यात वावर असेल तेव्हा तिथल्या माणसांना निरागस भक्तीचा महिमा सांगण्यातही काही अर्थ नसतो, हेदेखील कळू लागलं. कारण हे दोन्ही एकाच देवाकडे नेणारे न जुळणारे रस्ते आहेत.
त्यामुळे दरवर्षी आंबाबाईच्या देवळात जाताना मी हौशीनी टिकली लावून जाते!

Monday, June 7, 2010

एकला चोलो रे!

"तुला एकटीला कंटाळा नाही येत घरी?"
या प्रश्नाची लहानपणी मला सवय झाली होती. आणि मी अगदी दोन वर्षांची असल्यापासून त्याचं उत्तर ठाम ’नाही’ असं होतं. घरात किंवा घराच्या आजूबाजूला एकटं असण्यासारखं दुसरं सुख जगात नाही. एकटीने करायच्या सगळ्या गोष्टी मला प्रिय होत्या. मग तो नाचाचा सराव असो किंवा मांजरीच्या पिलाशी खेळणे असो. मला तिथे दुस-या कुणाचाही सहभाग आवडायचा नाही. माझ्या या वृत्तीला घाबरून आई-बाबांनी माझं नाव "बालभवन" या खेळ-गृहात घातलं. तिथे म्हणे प्रवेश मिळायला खूप वेळ वाट बघावी लागायची. मला तो प्रवेश मिळाल्यावर आईला खूप आनंद झाला होता. पण तिथे जायला लागल्यापासून आठवड्याभरातच मला तिथे अज्जिबात जाऊ नये असं वाटू लागलं. मग विमलमावशी मला सोडायला जायला तयार होताच मी पलंगाखाली जाऊन बसायचे आणि बालभवन मधून परत यायच्या वेळेपर्यंत बाहेरच यायचे नाही. थोडे दिवसांनी मी त्या अडचणीच्या जागेत माझ्या बाहुल्या, भातुकली अशा सगळ्या वस्तू नेऊन ठेवल्या. शाळेत मला जी काय सामूहिक कृत्यं करावी लागायची ती माझ्या दृष्टीने माझ्यासाठी पुरेशी होती. घरी येऊन पुन्हा सामूहिक खेळात भाग वगैरे घ्यावा लागला की मला जाम रडू यायचं. पण मी "एकुलती एक" आहे हे माझ्या आई-बाबांच्या मनावर समाजाने पुन्हा पुन्हा बिंबवल्यामुळे त्यांना अशा गोष्टी कराव्या लागत असतील कदाचित.
सगळ्यात आवडती एकटीने करायची गोष्ट म्हणजे गाणी ऐकणे. बाबांनी मला रवींद्रनाथ टागोरांच्या गाण्यांच्या कॅसेट्स आणल्या होत्या. घरी कुणी नसताना मी नेहमी बंगाली गाणी ऐकायचे. त्यातलं 'आमी चीनी गो चीनी' माझं सगळ्यात लाडकं गाणं! दुपारी शाळेतून घरी आले की मला ओट्यावर चढून चहा करायची फार हौस होती. बाबाचं बघून मी छोट्या किसणीने आलंसुद्धा घालायचे माझ्या चहात. मग आई-बाबांच्या खोलीच्या खिडकीत बसून मला चहा आणि खारी खाता यायची मन लावून. तसंच मला बाहेरच्या पेरूच्या झाडाचा पाला खायलासुद्धा फार आवडायचं! पेरूची पानं पेरुसारखीच लागतात!
आमच्या उद्योग बंगल्याच्या मागच्या बाजूला एक घसरगुंडीसारखं नारळाचं झाड होतं. त्या झाडावर चढायलाही मला फार आवडायचं.
माझ्याकडे थ्री लिटील पिग्स नावाचं गोष्टीचं पुस्तक होतं. त्यात तीन अतिशय गोड डुकराची पिल्लं घर सोडून जातात. त्यांचा हेतू घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहणे हा असतो. पण निघताना सामान भरायला दप्तर न घेता ती पिल्लं बोचकी घेतात. आणि प्रत्येक बोचक्याला एक लांब काठी लावलेली असते. ते बघून मीदेखील घर सोडून जायचं ठरवलं होतं. मग आई बाबा नसतील तेव्हा मी एका रुमालात माझ्या बांगड्या, पेन्सिली, सर्दी झाली तर व्हिक्स, अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवून बोचकं करायचे. आणि ते एका लांब काठीला लावून घराभोवती फिरायचे. एकदा विमलमावशी गिरणीत गेली होती. ती संधी साधून गेटवर चढून मी सरळ रस्त्यांनी माझं बोचकं घेऊन चालू लागले. कोप-यावर मला विमलमावशी भेटली. तिनी मला काही बोलायच्या आधी मीच, "अगं विमलमावशी, एकटी कुठे चालली आहेस? हरवशील!" असं वाक्य टाकून दिलं. त्यावरून अगदी परवापर्यंत घरात माझी थट्टा व्हायची!
एकटेपणातली अजून एक आवडती गोष्ट म्हणजे कलिंगड खाणे. कलिंगड खाण्यासाठी मी मला नको असलेल्या सगळ्या गोष्टी आधी संपवायचे. आणि आपण घरी एकटे असणार आहोत आणि आपल्याबरोबर आईनी चिरून ठेवलेलं कलिंगड आहे ही भावना फार सुंदर असायची. मग ती कलिंगडाची चंद्रकोर घेऊन मी पेरूच्या झाडाखाली जाऊन बसायचे. आणि बिया गालात साठवून ठेवायचे. मग शेवटी बियांचा फवारा हवेत उडवायचे. आंबा, कलिंगड, अननस असली फळं घरात खाणं म्हणजे त्यातली निम्मी मजा हिरावून घेण्यासारखं आहे. आंबा घरात बसून खाताना सारखा आईचा पहारा असायचा. भिंतीला हात लावायचा नाही, कपड्यांना हात लावायचा नाही, पलंगाच्या जवळ जायचं नाही, या आणि अशा अनेक अटी असायच्या. त्यामुळे बागेत बसून एकटीने असल्या गोष्टी करायला फार मजा यायची.
आमच्या घराबाहेर एक मोठा हौद होता. त्या हौदात पाय सोडून बसायला मला फार आवडायचं.
गच्चीत बसून साबणाचे फुगे उडवायलाही मला आवडायचं. ही गोष्ट मी स्नेहाबरोबरसुद्धा करायचे. पण एकटीने करण्यात वेगळीच मजा होती. हवेत फुग्यांचा घोळका सोडून त्याच्याकडे तो दिसेनासा होईपर्यंत बघायला मला खूप आवडायचं. त्यातले काही फुगे पाणी जास्त झाल्यामुळे लठ्ठ मुलांसारखे आधीच शर्यत हरायचे. काही मोठे होऊन इंद्रधनुषी बनायचे आणि हवेत नाहीसे व्हायचे अचानक! काही काही फुगे जुळे असायचे. आणि त्यांच्याकडे बघायला मला फार मजा वाटायची. मी नेहमी सारस बागेतून हट्ट करून फुगेवाल्याची ती साबणाची डबी विकत घ्यायचे. पण त्या तारेतून फुगेवाल्यासारखे फुगे कधीच निघायचे नाहीत माझ्याच्यानी. बाबा मात्र मस्त फुगे काढायचा त्यातून. मग त्यानी खोलीभर पसरलेले फुगे मी पकडायचा प्रयत्न करायचे.
मोठी होताना माझा हा एकटेपणा माझ्या मैत्रिणींनाही जाणवायचा. एखाद्या दिवशी मधल्या सुट्टीत बाहेर भटकण्यापेक्षा मला उत्सुकतेच्या शिखरावर नेणारं पुस्तक संपवावसं वाटायचं. मग सगळ्या मैत्रिणींना मी विचित्र आहे असं वाटायचं. पण दिवसातले काही तास एकटेपणात घालवले की उगीचच कुठूनतरी एक अदृश्य शक्ती मिळते. साहस, कष्ट, नियमितपणा, काटकसर, संयम असल्या प्रसिद्ध गुरूंच्या मानाने एकटेपणा फारच उपेक्षित आहे. पण काहीही न बोलता, कुणाशीही चर्चा न करता, पुन्हा पुन्हा तोच विचार वेगळ्या नजरेतून बघण्याची दिव्य शक्ती फक्त एकटेपणाच देऊ शकतो. त्याला आपला मित्र बनवलं की मनातली भीती, शंका, द्वेष हे सगळे नको असलेले शत्रू पळून जातात. आपल्यात दडलेल्या कवीशी, समीक्षकाची आपलीच ओळख होते. पण असा आनंदी एकटेपणा लगेच शिष्टपणा करू लागतो, महाग होतो! आणि एकटेपणाची भीती गेल्यानेच की काय कोण जाणे, एकटेपणापासून दूर नेणारे प्रेमळ सखे सोयरे भेटतात!

Saturday, May 29, 2010

जगात काय चाललंय..

लहानपणी नेहमी लवकर उठायला लागल्यामुळे काही गोष्टी डोक्यात पक्क्या बसल्या आहेत. सकाळी सकाळी बाबा रेडियो सुरु करायचा. रेडियोचं आणि माझ्या आई-बाबांचं, इतकंच नव्हे तर अज्जी-आजोबांचं नातंही खूप खोल होतं. त्यांच्या लहानपणी टी.व्ही. नसल्यामुळे त्यांचं या बोलणाऱ्या खोक्याशी सख्य होतं. बाबा सकाळी सकाळी बी.बी.सी. रेडियो ऐकतो. त्याचं बी.बी.सी.वर फार फार प्रेम आहे. पण लहान असताना मला, रेडियोवर गप्पा मारणा-या माणसांच्या गप्पा ऐकण्याचं हे वेड अजिबात समजायचं नाही. सकाळी सकाळी बाबा आपला मस्त कानाला त्याचा छोटा ट्रान्सिस्टर लावून चालू लागायचा. मग त्यात गप्पा मारणा-या लोकांचं बोलणं लक्ष देऊन ऐकायचा. अशावेळी मला नेहमी आपल्या ऐवजी बाबाला शाळेत पाठवावं असं वाटायचं. त्याला दुसरं काही लाव म्हटलं की लगेच तो, "सई, जगात काय चाललंय ते कळायला नको का?", असा सवाल उपस्थित करायचा. मला तेव्हा खरंच जगात काय चाललं आहे यानी फरक पडायचा नाही, आणि अशी जगाच्या पावलावर पाऊल ठेवायची खुमखुमीदेखील नव्हती. देवानी चांगली रेडियो शोधून काढायची बुद्धी दिली आहे तर त्याचा पूर्ण फायदाही घेता आला पाहिजे, आणि रेडियोचा एकमेव फायदा म्हणजे हिंदी सिनेमाची गाणी ऐकणे, असं माझं त्या काळी ठाम मत होतं. सकाळी चांगला तासभर रेडियो ऐकून झाल्यावर बाबा घरी येऊन तासभर पेपरही वाचायचा. त्यातही तो वेगवेगळे पेपर विकत घ्यायचा. त्यामुळे बाबाचं जगावर फार प्रेम आहे हे मला लहानपणीच समजलं. मग आई-बाबा ऑफिसला जायला तयार होत असताना गाणी लागायची. पण नेमका तेव्हा माझा अभ्यास सुरु असायचा. त्यामुळे मला बाबाचा अजूनच राग यायचा. कोल्हापुरातल्या घरात रेडियो हा भोंग्याचं काम करायचा. सकाळी सकाळी आजोबा अभंग वगैरे जोरात लावून सगळ्या बच्चे कंपनीला उठवायचे. मी त्या घरात कायमची राहिले असते तर मी नक्की नास्तिक झाले असते. पण आजोबांच्या मारून-मुटकून ऐकायला लावलेल्या अभंगांपेक्षा बाबाची बी.बी.सी. खूप चांगली होती. कोल्हापुरात रेडियो सामुदायिक आहे. पण तरीही तो लहान मुलांच्या हाताबाहेर होता. त्यामुळे मला आणि स्नेहाला खुर्चीवर चढून त्याच्या कळा दाबाव्या लागत. तेवढ्यात कुणी मोठी व्यक्ती आली की बळंच आम्हाला ओरडून जात असे. मामी दुपारचे बायकांचे कार्यक्रम चवीनी ऐकायची. नंतर टी.व्ही. आल्यावर, दुपारी मामी टी.व्ही. समोर वही घेऊन बसायची. पाककृती लिहून घ्यायला. तशा रेडियोवरसुद्धा असायच्या. आणि "मैत्रिणींना" लिहून घेता यावं, म्हणून रेडीयोतली काकू थांबून थांबून बोलायची. तेव्हा मला स्नेहाचा फार हेवा वाटायचा. आपल्यालाही अशी घरी बसून पाककृती लिहून घेणारी आई हवी होती असं नेहमी वाटायचं. मी जेव्हा आईला तसं सांगायचे तेव्हा तिला मनापासून हसू यायचं. पण आपली आई कधीच अशा पाककृती लिहीत नाही, तरी ती इतका छान स्वयंपाक करते याचा अभिमानही वाटायचा. नरूमामा नेहमी सफाई करताना गाणी ऐकायचा. रात्री झोपायच्या आधी "भूले बिसरे गीत" ऐकायची त्याची नेहमीची सवय होती. त्यामुळे नरूमामा माझा खूप लाडका होता. त्याच्या खोलीत त्याचा वेगळा रेडियो होता. रात्री झोपायच्या आधी आम्ही नरूमामाच्या खोलीत खूप वेळ लोळायचो. कधी तिथेच झोपायचो. मग नरूमामा मला अज्जीच्या खोलीत आणून ठेवायचा. रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये "आपकी फरमाईश" लागायचं. त्यात लोकांना आवडणारी गाणी लागायची. आणि ती गाणी लावा असं सांगायला लोक रेडियोला पत्र लिहायचे. आणि प्रत्येक गाण्याआधी लांब यादी असायची. "इस गीत को सुनना चाहते हैं, भिलवाडा, राजस्थान से, चुन्नी, बिट्टू और उनके मम्मी-पापा".त्या कार्यक्रमात जितका भारताचा भूगोल समजायचा तितका शाळेतही समजला नाही. भारताच्या छोट्या छोट्या गावांमधून, छोटी छोटी माणसं आपल्या आवडीचं गाणं ऐकायला पत्र पाठवायची. आणि कदाचित फक्त रेडियोवर आपलं नाव घोषित व्हावं हे एकच प्रसिद्धीचं स्वप्नं उराशी असेल त्यांच्या. त्या माणसांचं मला खूप कौतुक वाटायचं. आणि बाबाच्या "जगात" अशी माणसं देखील आहेत हे ऐकून मला खूप मजा वाटायची. आणि असं कुठे लिहिलं आहे की "जगात काय चाललंय" हे फक्त पेपरमधून आणि रेडियोवरच्या, जगाची खूप काळजी असलेल्या, एकमेकांना दोष देणा-या, सूर्य कधी नष्ट होईल हे शोधून काढणा-या माणसांच्या गप्पांमधून कळतं! जगात काय चाललंय याची काहीही फिकीर नसलेले लोक जे करतात, तेसुद्धा जगातच चाललेलं असतं ना? पण मोठे होऊ तसं जगात काय चाललंय, आणि त्यावर आपलं काय म्हणणं आहे, याला उगीचच महत्व येतं. आणि मग आपल्यातलेच काही त्यांना काय वाटतं हे रेडियोवर जाऊन सांगतात. मग त्यांच्याशी सहमत नसलेले श्रोते, सहमत असलेल्या श्रोत्यांशी कॉफी पिता-पिता भांडतात. मोठ्यांच्या जगात रडारड न करता भांडायला "जगात काय चाललंय" हे माहिती असणं गरजेचं असतं. पण आजकाल जगाची बरीच माहिती गोळा करूनही माझं लहानपणीचं मत बदलेलं नाही. फरक फक्त एवढाच की "जगात काय चाललंय" हे सारखं सारखं माहिती करून स्वत:ची जगातली जागा शाबूत ठेवणा-या जमातीने माझा बळी घेतलाय.

Thursday, May 20, 2010

बिनतात्पर्याच्या गोष्टी



लहानपणी नेहमी मला एक चिंता भेडसावायची. आई किंवा बाबा या दोघांपैकी कुणी एक "बिन-तात्पर्याच्या गोष्टीत शिरलं तर?". आता ही गोष्ट म्हणजे काय हा प्रश्न पडणे साहजिक आहे. तर कुठल्याही मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात अशा गोष्टी ऐकायला मिळतात. या गोष्टीचा नेमका हेतू नेहमी धूसर असतो. पण गोष्ट म्हणून तिचा दिलखुलास असा आस्वाद काही केल्या घेता येत नाही. हेतू स्पष्ट नसला तरी ती गोष्ट कुठेतरी टोचत राहते, आणि हे आख्यान बंद झालं तर आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक फरक पडेल असंही वाटत राहतं मनाच्या एका कोप-यात. लहानपणी आई किंवा बाबांबरोबर एकटं बाहेर जाताना मला नेहमी या गोष्टींची भीती वाटत राहायची; आणि बँकेत खूप मोठी रांग दिसली की लगेच बाबा असल्या गोष्टी सुरु करायचा.
"सई, मी लहान असताना मला माझ्या बाबांबरोबर असं भटकता नाही यायचं. आम्ही नाना आजोबांना घाबरायचो. तुझ्यासारखं टाकली ढांग स्कूटरवर आणि गेलो बाबाबरोबर बाहेर असं नव्हतं आमच्या वेळेस."
आता, यात चूक कुणाची? मी जर जन्माला आल्यापासून तुमच्या ताब्यात आहे तर मला घाबरवणं सर्वस्वी तुमच्या हातात होतं. होतं की नाही? मग त्यावर विचार करून अमलात आणायला हवं होतं ना!
" सई, आम्ही लहान असताना आई-वडलांबरोबर कध्धीच सिनेमाला गेलो नाही तुझ्यासारखे. मी दर महिन्याची रद्दी विकायचो आणि त्यातून जे पैसे येतील त्यात त्या काळी बाल्कनीचं तिकीट मिळायचं. आत्तासारखे मल्टीप्लेक्स सुद्धा नव्हते त्या काळी".
रद्दी विकून सिनेमा पाहिल्याची गोष्ट बाबा आंबेडकरांनी रस्त्यातल्या दिव्याखाली बसून अभ्यास केल्याच्या गोष्टीसारखा सांगायचा. सिनेमाच पहिला ना शेवटी? आणि हल्ली तिकिटांवर करमणुकीचे कर लावतात त्यात आमची काय चूक? आणि मल्टीप्लेक्स निघाले यात आजच्या नवीन पिढीचा काय दोष? या गोष्टीमुळे आधी माझ्या बालमनात करुणरसाचे स्राव होत असत. पण नंतर माझ्या अतिशय मोंड पण तल्लख बुद्धिमत्तेने त्याच्यावर मात केली.
"आम्हाला तुमच्यासारख्या रिक्षा करता यायच्या नाहीत उठसूठ. आम्ही सगळीकडे चालत जायचो. त्यामुळे आम्हाला वाचलेल्या पैशातून खासबागेत मिसळ खाता यायची."
या गोष्टीच्या विणीतही खूप सारी भोकं राहिली आहेत. एक तर मला बाबाच्या कॉलेजची सगळी टोळी माहित आहे. त्यातला एकही चेहरा मिसळ खाण्यासाठी पायपीट करणा-या सालस चेह-यांपैकी नाही. आईच्या मैत्रिणी तर महा "चमको" आहेत. त्यामुळे यातलं कुणीही श्रावण बाळ नाही हे मला अगदी चार वर्षाची असल्यापासून माहिती होतं. आणि "चैन" करण्यासाठी केलेले "त्याग" हे "शिक्षणासाठी" केलेल्या त्यागांपुढे फार छोटे वाटतात. अज्जी-आजोबांचे शिक्षणविषयक त्याग अजूनही नित्यनेमाने ऐकावे लागत असल्यामुळे आई-बाबांचे चैनविषयक त्याग कृत्रिम वाटायचे.
बाबाच्या गोष्टी थोडा विचार करून सोडून देता यायच्या, कारण बाबाला मनापासून त्यानी फार त्याग वगैरे केलेत असं वाटत नसावं. मुलांना असलं काहीतरी अधून मधून सांगायचं असतं असं त्याला आईनी सांगितलं असेल कदाचित. आईच्या गोष्टी मात्र हृदयद्रावक असायच्या. पण त्या दुस-या टोकाच्या असल्यामुळे अती झालं आणि हसू आलं अशी गत व्हायची.
कधी मी लाल भोपळ्याची भाजी बघून नाक मुरडलं की आई लगेच तिची नेहमीची करुण कहाणी उपसायची.
"सई, किंमत नाहीये तुला. लाल भोपळ्यात बीटा कॅरोटीन असतं. असं पोषण मला तुझ्याएवढी असताना मिळायचं नाही. आमच्या घरात ताई आणि आईच्या भांडणात कुणाचं माझ्याकडे लक्षच नसायचं."
आता मला मान्य आहे की हे अडचणीचं होतं. पण ही आयुष्यातली अडचण लाल भोपळ्याची भाजी खपवायला का वापरावी? आणि माझ्या बाबांना दोन बायका नाहीत म्हणून माझं आयुष्य सोपं आहे ही गोष्ट माझ्या हाताबाहेर होती. माझं आयुष्य सगळीकडून किती सोपं आहे हे ऐकून माझ्या आयुष्यातल्या ज्या काही अवघड गोष्टी होत्या त्यांनाही ग्रहण लागायचं. आपल्याला आजोबांसारखं कावडीतून पाणी आणायला लागत नाही, बाबासारखी रद्दी विकावी लागत नाही, आईसारख्या दोन आया आणि त्यांची भांडणं बघावी लागत नाहीत; त्यामुळे आपण आहे त्या उत्तम परिस्थितीत त्यांच्यापेक्षा खूप पुढे गेलं पाहिजे!
आईची अजून एक आवडती गोष्ट म्हणजे तिची पी. एच. डी.
ती पी. एच. डी. करत असतानाच मी झाले. त्यामुळे तिला मी व्हायच्या अगदी दोन आठवडे आधीपर्यंत लॅबोरेटरीत जावं लागत असे. मग तो प्रवासही ती चालत करायची. सकाळी सहा वाजता निघायची वगैरे वगैरे सांगायला तिला फार आवडायचं. माझ्या पी. एच. डी.त मी काटकसर (थोडीफार) सोडल्यास काही महान दिव्यं केली नाहीत. त्यामुळे तिथेही मला मैलोनमैल चालत गेल्याचं कौतुक सांगता येत नाही. एकूण तात्पर्य काढायचंच झालं तर ते असं की माझं आयुष्य फुलासारखं मजेत चालू आहे आणि माझ्याकडे अशा कुठल्याच करुणरसपूर्ण गोष्टी नाहीत. फुलासारखं गेलंय हे तर मी नक्कीच मान्य करीन, पण या गोष्टींमधून काही "बोध" मी घेतला असेल तर तो हा की माझ्या मुलांना मी कधीही अशा बिनतात्पर्याच्या गोष्टी सांगणार नाही. :)

Saturday, May 8, 2010

मन: स्ताप टाळण्याचे सोप्पे उपाय

अण्णाआजोबांची कित्येक सुभाषितं त्यांच्या अतिरेकामुळे मला तोंडपाठ झाली, पण कुसुमअज्जीचं एकच वाक्य मला आयुष्यभरासाठी पुरेल.
ती नेहमी म्हणायची, "सई, जगात असं काही नाही ज्याच्यामुळे आपल्याला मन:स्ताप किंवा पश्चा:ताप व्हावा." गंमत म्हणजे हे वाक्य तिला माझ्या बालचिंतांसाठी वापरावं लागत असे.
पण तिचं शांत, कुठल्याशा अदृश्य देवाशी एकरूप झालेलं रूप पाहिलं की खरंच वाटायचं, "कसली चिंता? अशी अज्जी आहे आपल्याला मग देव आपल्याबरोबरच असणार."
अज्जी मात्र मन:स्ताप होऊ नये म्हणून खूप विनोदी प्रकार करायची. ती म.ल.ग. हायस्कूलची मुख्याध्यापिका होती. पण तरीही शाळेतून कित्येक वेळा ती भिजत भिजत घरी यायची - कारण तिला छत्री बसमध्ये विसरून मन:स्ताप होईल याची काळजी वाटायची. घड्याळ तिनी कधीच घातलं नाही, कारण ते हरवून पुन्हा मन:स्ताप व्हायचा. पण ती कधीही कुठेही उशीरा पोहोचली नाही. आजकाल आपल्याकडे किती घड्याळं असतात. एक हातावर (भरमसाठ किमतीचं), एक मोबाईल फोनमध्ये, एक लॅपटॉपमध्ये आणि तरीही माझ्या सगळ्या जवळच्या मैत्रिणी मला टांगून ठेवतात तासंतास!
कुठे जायचं असलं की अज्जी सकाळपासून तयारी करायची. तिला दिवसभरात जेवढा वेळ मिळेल तो न सांडता वापरायची कला अवगत होती. रात्री जागून अभ्यास करणे, मग सकाळी वाट्टेल तेव्हा उठणे या गोष्टी तिला फारशा आवडायच्या नाहीत. त्यामुळे तिच्या नेहमीच्या गांधीवादामुळे मला दिवस नीट वापरून रात्री लवकर झोपायची सवय लागली. या सवयीमुळे माझी समाजात जोरदार थट्टा होते ते वेगळं.
ट्रेन किंवा बस चुकणे हीसुद्धा अज्जी-आजोबांची मन:स्ताप टाळायची जागा होती. त्यामुळे कधी कधी ते ट्रेनच्या वेळेच्या आधी दोन-दोन तास स्टेशनवर जाऊन बसायचे. यावरून आमच्या घरात नेहमी युद्ध व्हायचं. बाबा त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार, "स्टेशन झाडायला जायचं का?" वगैरे सुरू करायचा, आणि मग आजोबांचं आणि त्याचं जोरदार भांडण व्हायचं. माझे आई-बाबा दोघेही कदाचित "दुसरी पिढी" असल्यामुळे बंडखोर होते. पण आई-बाबांच्या चुकलेल्या बशी आणि विमानं मोजली तर अज्जी-आजोबांचं काहीही चूक नाही हे लगेच लक्षात येतं. मलासुद्धा विमानाच्या वेळेच्या भरपूर आधी विमानतळावर जायला आवडतं. त्यामुळे मलासुद्धा आई-बाबांशी भांडूनच निघावं लागतं. माझ्या मनात भलत्याच शंका येतात ते वेगळंच.

आपल्या बॅगेचं वजन नियमापेक्षा जास्त झालं तर? हा माझा अतिशय फालतू पण कधीही न शमणारा प्रश्न असतो.
मग बाबा बॅग घेऊन वजनकाट्यावर उभा राहतो. बॅगेचं आणि बाबाचं एकत्र वजन नव्वद किलो भरतं, पण बाबाचं ठाम मत त्याचं वजन पासष्ठ आहे असं असतं. त्यामुळे माझी बॅग पाच किलोनी जड आहे ही भयावह परिस्थिती निर्माण होते. मग आई येते आणि बाबाला बॅगेशिवाय काट्यावर उभा करते. तेव्हा माझी बॅग पाच किलो हलकी आहे असं सिद्ध होतं. त्या आनंदात आई दोन किलो कनक गूळ आणि किलोभर गरम मसाला मागवून घेते. शेवटी विमानतळावर जायच्या आधी आम्ही माझी बॅग आईच्या ऑफिसमधल्या गुळाच्या काट्यावर वजन करून आणतो. ते केल्यावर आई-बाबा, "झाला का आत्मा शांत अज्जीबाई?" असे टोमणे मारत मला परत आणतात. परत आल्यावर काहीही नवीन टूम काढायची नाही असं वचन देऊनसुद्धा आई ऐनवेळेस काहीतरी नवीन बॅगेत टाकतेच. त्यामुळे जाताना पुन्हा वजनाचा प्रश्न माझ्या डोक्यात उड्या मारू लागतो. अशावेळेस मला अज्जीची खूप आठवण येते. ती असती तर, "नको गं वसू तिला त्रास देऊस. परदेशी ती चाललीये ना? मग तिला आराम वाटेल अशाच वस्तू तिला घेऊन जाऊदेत!" असं नक्की म्हणाली असती. विमानतळावर किती आधी जायचं यावर सल्ला द्यायला तर आमच्या घरात इतके लोक आहेत की तो प्रश्न मी जायच्या दिवशी सकाळीच प्रस्तुत करते. पुढे खूप संघर्षानंतर आई-बाबा आणि माझ्या वेळेचा मध्य गाठला जातो.

या परिस्थितीतून गेल्यावर माझ्या लक्षात येऊ लागलं की अज्जीला खरं काय म्हणायचं होतं.
"जे टाळण्यासारखे मन:स्ताप आहेत ते आधी टाळायला शिकावं. आणि जे अटळ आहेत, त्यांच्यापासून अलिप्त व्हावं."
अज्जीच्या आयुष्यातले जवळपास सगळे टाळता येणारे मन:स्ताप तिने खुबीने टाळले. पण तरीही तिच्या वाट्याला अनेक अटळ चिंता आणि मन:स्तापही आले. तिच्या तरुणपणी तिला ज्या गोष्टींचे ताप झाले असतील त्या आता कुठे मला दिसू लागल्या आहेत. पण त्या चिंतांनी तिला जसं एखाद्या पहाटेच्या संथ समुद्रासारखं शांत बनवलं तसं मलाही व्हायला आवडेल.
तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये कधी कधी माझी आई तिला, "आई तू हे लग्न का केलंस?" असं कधी दु:खाने तर कधी कुठल्याश्या अंतिम कुतूहलाने विचारायची. पण माझ्या आज्जीचं उत्तर कधीच बदललं नाही.
"अगं, तुझ्यासारखी मुलगी झाली मला. इतकी कर्तृत्ववान, कुशल, जगात मान मिळालेली. यापुढे सगळे ताप शून्य आहेत."
आणि आपण इथपर्यंत का आलो? हा प्रश्न नेहमी मागे वळूनच सोडवायचा असतो.
अज्जीची निग्रहाने शांत राहायची सवय सगळ्यांनाच खूप काही शिकवून गेली, आणि कुठलेही प्रश्न उभे न करणा-या उर्मिलेसारखी ती आमच्या घराच्या रामायणात तिची अशी एक अटळ जागा बनवून गेली.

Wednesday, April 14, 2010

शेवईचा दिवस

"शेवई" बिचारी आजकालच्या आधुनिक स्वयंपाकघरात माझ्या आईच्या आज्जेसासूच्या नथीसारखी झाली आहे. येतही असेल कदाचित अधूनमधून; पण ती सुद्धा चापाच्या नथीसारखी, ग्राहक पेठेतून! मला मात्र आईनी आजारपणात बनवलेली साजूक तुपातली खीर अजूनही लक्षात आहे. शेवईची खीरच बरी वाटते. तसे शेवईच्या पुनर्वसनाचे खूप प्रयत्न मराठी गृहिणींनी केले आहेत - जसा "शेवईचा उपमा". पुस्तक लिहिणा-या काकू नेहमी शेवईचा उपमा जास्त कल्पकतेनी लिहितात.
"हवे असल्यास भाजलेले शेंगदाणे घालावेत (ऐपत असेल तर काजूही घालावेत). एका काचेच्या बशीत उपमा वाढावा. त्यावर लिंबू पिळून, खोबरं-कोथिंबीर भुरभुरावी. गरम गरम उपमा खायला द्यावा".
यातला शेवटचा भाग मला जाम खटकतो. खायला का म्हणून द्यावा! कुणाला द्यावा? तिथे काकूंनी थोडी कल्पकता वापरली असती तर चाललं असतं. एवढा कष्टानी केलेला शेवईचा उपमा गरम गरम असताना आधी स्वत: खावा. मग दुस-यांना द्यायच्या भानगडीत पडावे.
माझ्या मते प्रत्येक पदार्थ कसा खावा हे सुद्धा लिहायला हवं.
जशी कांदा भजी नेहमी पाऊस बघत खावी, किंवा साबुदाण्याची खिचडी वरून साखर भुरभुरून गच्चीत बसून खावी. पुरणाच्या पोळीत किती तूप घातलंय हे बघू नये. जर तळलेला पदार्थ खायची हिम्मत होत नसेल तर तो करूच नये. उगीच त्याला भाजून त्याचा दारुण पराभव करू नये.
पुढे नव्वदाव्या दशकातल्या नवोदित विवाहितांनी शेवईचं लग्न उत्तर भारतीय पदार्थांशी लावलं. शेवई-पनीर अपेटायझर वगैरे. मग शेवईनी सीमोल्लंघन केलं. आणि सीमेपलीकडच्या थोड्या आडव्या बांध्याच्या चिनी बहिणीची जागा घेतली. अल्फा गृहिणी ’शेवई मांचुरीयन’ करू लागल्या. पण खिरीपलीकडे मला शेवईचं कुठलही वेषांतर आवडत नाही.
कोल्हापुरात शेवई करायचा दिवस असायचा. "हल्लीच्या धकाधकीच्या जगात" हा प्रकार लोकांना अशक्य वाटेल पण साधारण सोळाच वर्षांपूर्वी हे अगदी मजेत घडायचं. सगळ्या शेजारणी मिळून शेवईचा दिवस ठरवायच्या. त्या दिवशी यच्चयावत कारटी गोळा केली जायची. कुणाचा पुतण्या, कुणाची नात, नातीची मैत्रीण सगळ्या मुलांना मदतीला घेतलं जायचं. आणि अनुभवी अज्ज्या पुढाकार घ्यायच्या. आमची ताजी अर्थातच शेवई-मंडळाच्या कार्यकारी समितीत असायची. कुणाची बेळगावहून आलेली सासू असायची. तिला ताजी लगेच, "वैनी तुमच्याकडं कशी पद्धत असते?" असं विचारून सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू करायची.
शेवई करायला एक लांब पाट लागतो. त्यावर बारीक रेषा असतात. त्या रेषांच्या मापाची शेवई होते. पाट मोठ्या पत्र्याच्या डब्यावर जमिनीला साधारण पंचेचाळीस अंशांच्या कोनात टेकवला जातो. डब्यावर अनुभवी सासू नाहीतर आज्जी बसून शेवई वळते तर डब्याखाली नवीन सून नाहीतर उपद्रवी कारटी ( दोघी एकाच वर्गात मोडतात) बसून ताटात शेवई गोळा करते. ताटावर शेवईच्या रांगोळ्या भरल्या की ताट उन्हात वळवायला ठेवतात. मग एखादी मोठ्या डोळ्याची मावशी सगळ्या पोरांना त्या शेवईपसून डोळे वटारून लांब ठेवते (तिच्या मते).
यातही, "पोरं खानार ओ. ज्यास्त कराया पायजे. तुमी किती बी भीती घाला त्यास्नी पन खात्यातच किनी बगा." हा अर्थशास्त्राचा नियम गृहीत धरला जायचा.
"तरी बगा, दोन पोरांत मिळून तरी येक ताट हुनार की".
मग आमच्यासाठी आधीच ताटं करून ठेवलियेत हे कळल्यामुळे आम्ही लगेच "साथी हाथ बटाना" सुरू करायचो.
जशी ओल्या साबुदाण्याच्या पापड्या खायला मजा यायची, तशी शेवई खायला काही यायची नाही. त्यामुळे दोन पोरांमागे एक ताट हे गणित अचूक होतं. साबुदाण्याच्या पापड्यांना कुठलंही गणित लावता यायचं नाही. त्यांचं कावळ्यांपासून आणि पोरांपासून प्राणपणाने रक्षण करणे हे एकंच उत्तर होतं.
पण का करत असाव्यात शेवया? त्या काही पैसे वाचावेत किंवा घरच्या शेवया श्रेष्ठ म्हणून नाही करायच्या. शेवई करताना किती मैत्रिणी एकत्र यायच्या! त्यात सासवांना "सगळ्याच सुना नाठाळ असतात" हे सत्य उमगायचं तर सुनांना "सगळ्याच सासवा खाष्ट असतात" याचा साक्षात्कार व्हायचा. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी दुसरीच्या कानात हळूच काहीतरी सांगायची. आणि दोघी ओठावर पदर ठेवून खिदळायच्या. असंख्य कानडी आणि मराठी पाककृतींची अदलाबदल व्हायची. आणि आमच्याकडं याला हा शब्द वापरतात या वाक्याखाली कर्नाटकातून उडी मारून बरेच शब्द कोल्हापुरात दाखल व्हायचे. त्यात वर फोडणीसुद्धा असायची. कुठल्यातरी शूर सुनेची यशोगाथा. त्यावर सगळ्या सासवांची मुरडलेली नाकं आणि सुनांचे विजयी चेहरे. मग ताट वाळत ठेवायच्या मिषानी काही सुना बाहेर जायचा आणि "बरं झालं वैनी ईषय काढला तुम्ही. आमच्या मामींना कुनीतरी ऐकवायाच पायजे." अशा सून संघटनांच्या मूक आरोळ्या यायच्या.
आपापल्या नव-यांची सामुदायिक थट्टादेखील व्हायची।
शेवई-दिवसाची संध्याकाळ नेहमी पुन्हा भेटायच्या वचनानी व्हायची. आजकालच्या भिश्या, पार्ट्या तेव्हा नव्हत्या. पण घरातली कंटाळवाणी कामं करायला मैत्रिणी नेहमी एकत्र जमायच्या, आणि ही प्रथा जगभरातल्या सगळ्या महिला पाळत आल्यात. माझी आई कधीच या गटात बसली नसती. पण ती जेव्हा कामवाल्या मावशींना भाजी निवडू लागते तेव्हा मला तिच्यातली ही सुप्त शेवई करणारी मामी दिसते आणि मग ती मला दाखवल्याबद्दल माझी आई मला अजून जास्त आवडते!
----------------

संपादन आणि तपासणीसाठी गायत्रीचे आभार.

Saturday, April 10, 2010

विसरभोळा बाबा

बाबा कधीही एकदाच घराच्या बाहेर पडत नाही. निदान तीन वेळा तरी परत आत येतो. आधी पाकीट विसरतो, मग घराची किल्ली, मग गाडीची किल्ली आणि शेवटी उगीच "काहीतरी विसरलंय" असं वाटलं म्हणून. एवढ्या खेपा घालून तो एकदाचा रवाना झाला की दहा मिनिटात घरात त्याचा फोन खणखणू लागतो. मी शाळेत असताना मला न्यायला रिक्षावाले काका यायचे. शनिवारी बाबाला सुट्टी असायची आणि माझी अर्धा दिवस शाळा असायची. मग बाबा मोठ्या प्रेमानी माझ्याबरोबर माझं दप्तर घेऊन रिक्षावाल्या काकांसाठी थांबायचा. रिक्षा आली की मी मागे बसायचे आणि बाबा माझं दप्तर घेऊन काकांना द्यायला जायचा. खूप वेळा त्यांच्याशी भलत्याच गप्पा मारायचा आणि शेवटी दप्तर द्यायलाच विसरायचा. मग शाळेत गेल्यावर अचानक काकांना माझं दप्तर बाबांनी दिलंच नाही हे लक्षात यायचं. मला त्याची सवय झाली होती. मी क्षणाचाही विलंब न लावता लोकांकडे वहीतल्या पानांची भीक मागू लागायचे. कुणी मला पेन्सिल द्यायचं, कुणी खोड रबर आणि वर्गात दप्तर न घेता आलेल्या शूर मुलीचा दिवस बघण्यात सगळे आनंदानी रमायचे. मग घरी येऊन वहीत त्या पत्रावळ्या उतरवायचे. त्यातही बाबा जमेची बाजू शोधायचा. "बघ! आता तुझी उजळणी पण झाली दप्तर विसरल्यामुळे".
"विसराळूपणाचे फायदे" यावर माझा बाबा प्रबंध लिहू शकेल. पण मला त्याची ही गोष्ट मनापासून आवडते. त्याच्या गाडी पासून घरापर्यंतच्या प्रत्येक खेपेला तो "व्यायाम" झाला असं म्हणतो. आई आणि बाबामध्ये मात्र हा विसराळूपणा राहू सारखा उभा असतो. माझ्या लहानपणी बॅग रिक्षात विसरणे, तिकीट घरी विसरणे, बिल भरायला विसरणे, चेक टाकायला विसरणे वगैरे गोष्टींनी आई बाबांच्या आयुष्याला चांगलीच फोडणी दिली होती. आम्ही गोव्याला गेलो तेव्हा माझे कपडे असलेली
बॅग बाबा रिक्षात विसरला होता. त्यामुळे मला खूप नवीन कपडे मिळाले होते एकदम. अशावेळेस मला बाबाच्या विसराळूपणाचा खूप आधार वाटतो.
मी पण काही कमी विसराळू नाहीये. पण तरी बाबा आणि आईचा मध्य आहे.
एकदा बाबाच्या नातेवाइकांच्यापैकी कुणाचतरी लग्न होतं. बाबांनी "हे लोक माझ्यासाठी किती महत्वाचे आहेत" यावर खूप मोठं प्रवचन दिलं होतं आईला. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या वेळी आई पैठणी वगैरे नेसून तयार झाली. कार्यालयात मात्र शुकशुकाट होता. आईला वाटलं नेहमीप्रमाणे चुकीचं नाव वाचलं असेल बाबांनी. आणि बाबा पत्रिका पण घरी विसरला होता. मग गाडी परत घरी आली तेव्हा लक्षात आलं की लग्न आधीच्या आठवड्यात होतं. मग "महत्वाच्या" लोकांची माफी मागायला बाबाला आईनी फोन करायला लावला.
लहानपणी माझ्या शाळेची फी भरायला काहीतरी "चलन" नावाची भानगड असायची. मला नेहमी बाबा ते भरायला विसरला आणि बाईंनी सगळ्या वर्गासमोर आठवण केली तर काय होईल याची काळजी वाटायची. मग बाबाचा राग पत्करून, "बाबा तू माझं चलन भरलास का?" असं विचारावं लागायचं.
बाबाला गाण्याची फार आवड आहे. रविवारी सकाळी बाथरूममध्ये तो तासभर गातो. आणि कधीही कुणीही "गा" असं म्हणालं की लगेच बाबा तयार असतो. पण त्याला गाण्याच्या ओळी लक्षात राहत नाहीत. त्यामुळे मधेच तो अचानक गुणगुणू लागतो. मी आणि आई अशावेळेस गालातल्या गालात हसायचो. त्यामुळे बाबाला प्रचंड राग यायचा. मग त्यांनी वही घातली. त्यात तो सगळी गाणी लिहून ठेवायचा!
बाबाला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं. त्यामुळे त्याची थट्टा करताना आम्ही नेहमी "तो डॉक्टर झाला असता तर" अशी गोष्ट तयार करतो.
पेशंटचा पोट शिवून झाल्यावर अचानक बाबाच्या लक्षात येणार की एक सुरी कमी आहे. मग तो सगळ्या मदतनिसांना जमिनीवर रांगायला लावणार. सुरी सापडत नाही म्हटल्यावर सर्वानुमते पेशंट परत उघडायचा असं ठरणार. मग पेशंट उघडल्यावर तिथे काहीच दिसणार नाही. मग पुन्हा त्याला शिवून चिंतीत बाबा सहज खिशात हात घालणार आणि तिथून त्याची हरवलेली सुरी बाहेर येणार. अशा रितीने प्रत्येक पेशंटला दोन दोन वेळा शिवल्यामुळे बाबाची खूप छान उजळणी होणार आणि त्याला सर्वोत्कृष्ठ शिवणकामाचे बक्षीस मिळणार!
पण त्याच्या
विसराळूपणाचे खरंच फायदे आहेत. जसा तो वस्तू विसरतो, तसा रागही विसरतो. आणि त्याला भूतकाळातल्या सगळ्या सुंदर गोष्टीच आठवतात. त्या मात्र तो कधीच विसरत नाही. माझं लहानपण, आम्ही मिळून केलेली धम्माल, कॉलेजमधली छोटीशी, सारखी हसणारी आई आणि मी माझ्या घोग-या आवाजात गायलेली बंगाली गाणी. त्याला नेहमीच छान छान गोष्टी आठवतात. आणि तो विसरल्यामुळे आम्हीसुद्धा नको असलेल्या आठवणी विसरून जातो.

Monday, April 5, 2010

संध्याकाळचा समुद्र

आमच्या कोल्हापूरच्या घरात खाली सुहासमामा राहायचा खूप वर्षं. "सुहास फाटक" आमच्या बाकीच्या "झांजीबारापेक्षा" खूप वेगळा होता. :)
आधी तो आणि त्याची आई (म्हणजे फाटक आजी) राहायचे. मग सुहासमामाचं लग्न झालं आणि वर्षामामी आली. मग थोडेच वर्षांत मानसी आणि अवधूत पण आले. सुहासमामाचं देवगडजवळ घर आहे. तिथे त्याची हापूस आंब्याची बाग आहे. त्याला कोकणात सगळे "वाडी" म्हणतात. आम्हांला उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी देवगड हापूस मिळायचा. त्यामुळे सुट्टीची मजा खूप वाढायची. पण एकदा मात्र हापूस आंब्याला आमच्याकडे बोलावण्यापेक्षा आम्ही हापूस आंब्याकडे जावं असं ठरलं! मग नरूमामानी गाडी केली आणि आम्ही सगळे कोकण दौ-यावर निघालो. लहानपणी अशी "गाडी करून" जायची काही वेगळीच मजा असायची. आम्ही सगळी भावंडं जीपच्या मागच्या जागेत बसायचो आणि जाता-जाता ट्रकवाल्यांना वेडावून दाखवायचो. कोल्हापुरातून कोकणात जाताना आंबा घाट ओलांडावा लागतो. त्या घाटात अचानक सृष्टी तिचं रूप बदलते. पायाखालची जमीन लाल होते आणि करवंदाच्या जाळ्या खुणावू लागतात. त्या जाळ्यांमधून मधेच एखादी गोड अनवाणी मुलगी टोपली घेऊन बाहेर येते. तिच्या टोपलीत काळी कुळकुळीत करवंदं असतात. आम्ही नेहमी करवंदं खायचो. त्यात आत लाल असेल तो कोंबडा आणि पांढरं असेल तर कोंबडी! नरूमामाला फोटो काढायची फार हौस आहे. त्यामुळे तो घाटात नेहमी "मोक्याच्या" ठिकाणी गाडी थांबवायचा. त्याचा एकूण आविर्भाव पट्टीच्या फोटोग्राफरसारखा असतो नेहमी. त्यामुळे सगळ्यांना उगीच आपण याच्यासमोर अगदीच "ह्या" आहोत असं वाटायला लागतं. त्याच्या फोटोत नेहमी वेगळ्या वेगळ्या वेशातला सूर्य असतो , कधी संध्याकाळचा थकलेला तर कधी सकाळचा, उकडलेल्या अंड्यासारखा!! आम्ही धबधब्यात आकंठ बुडायचो पण नरूमामा मात्र सगळा वेळ कधी झाडावरून, कधी झाडाखालून, सूर्य उजवीकडे ठेवून, मग डावीकडे ठेवून त्याचे फोटो काढायचा.
घाट संपल्या संपल्या एकदम हवेचं वजन वाढलंय असं वाटायला लागतं आणि कोकणाचा श्वास जाणवू लागतो. देवगडचं घर खूप सुंदर आहे. छोट्याश्या दारातून आत गेलं की मोठ्ठं अंगण आहे. त्या अंगणाच्या मध्यभागी दगडी पडवी आहे. आत गेल्या गेल्या झोपाळा आहे. तिथून आत गेलं की जेवायची खोली आणि अगदी शेवटी स्वयंपाकघर. झोपाळ्याच्या खोलीतून वर जायला जिना आहे. तिथे अजून खोल्या आहेत, आणि सगळ्या खोल्या सारवलेल्या आहेत. मला सारवलेली घरं फार आवडतात. त्यातल्या माणसांबरोबर घरही श्वास घेत आहे असं नेहमी वाटतं मला. सारवलेल्या जमिनीचा पायाला होणारा स्पर्श, हिरवळीचा स्पर्श आणि समुद्र किना-याचा स्पर्श हे मला एकाच वर्णन न करता येणा-या कुळातले वाटतात. कोकणातल्या उन्हाळ्यामुळे आधी हैराण व्हायला होतं. पण कोकणातला उन्हाळा कुठलीच पळवाट ठेवत नाही. त्यामुळे एकदा त्याला सामोरं गेलं आणि "हे आहे असं आहे" हे कबूल केलं की कोकणाची खरी मजा घेता येते. घराभोवती ना वारा ना पावसाची चाहूल. सगळं एखाद्या सुंदर चित्रासारखं स्तब्ध आणि शांत! याची लवकरच सवय झाली आम्हाला. आणि मग त्या निरव शांततेत आम्ही आमचा दंगा मिसळू लागलो. सकाळी सकाळी आम्हाला सुहासमामानी वाडीवर नेलं. वाडीवरच्या त्या नागमोडी वाटा चालताना तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की या वाटा आपल्याला इतक्या दूरवर घेऊन जातील. मधेच नारळी-पोफळीच्या झाडांमध्ये लपलेला एखादा साधा पूल यायचा. आणि त्या हिरवळीच्या शालीत उष्म्याचा थोडा विसर पडायचा. पण कोकणातला उकाडा मिठी मारणारा आहे. देशावरच्या उकाड्याची औपचारिकता तिथे दिसत नाही. त्यामुळे कसाही असला तरी उकाडादेखील आपलासा वाटायला लागतो.

आम्ही घामाघूम होऊन परत येऊ तोवर घरी गरम गरम पोहे तयार असायचे. मग सगळे मिळून गप्पा मारत मारत बाहेरच नाश्ता करायचो. मला फाटक आजींचा स्वयंपाक फार आवडायचा. कोल्हापूरच्या लसणीच्या फोडणीच्या आमटीला शह द्यायला त्यांची चिंच-गूळ घातलेली आमटी नेहमी तयार असायची. खूप वर्षं दोन्ही प्रकार खाल्ल्यावर माझं चिंच-गुळाच्या आमटीवर कायमचं आणि मनापासून प्रेम बसलं. आणि त्यांची बोलायची पद्धत पण मला फार आवडायची. त्यांच्या बोलण्याला चाल असायची. आणि शेवटचा शब्द नेहमी वाक्याची शेपूट एखाद्या गुबगुबीत उशीवर सोडून जायचा.
"मी म्हटलन् तिला असं करू नकोस बाई. पण ऐकताच नाही हो तर काऽऽय करणार?"
त्यांचे हेल इतके गोड असायचे की मी आणि स्नेहा त्यांची तासंतास नक्कल करायचो!
आणि फाटक आजी कुसुमअज्जी आणि मीनामामी दोघींच्याही खास होत्या. त्यामुळे दोन्ही बाजूंची मतं त्या नि:पक्षपातीपणे ऐकायच्या.
कोकणातल्या घराभोवती आम्हाला आमच्या आयुष्यातला पहिला विंचू दिसला होता! दगडाखाली दडलेला, लालचुटूक आणि तिरका तिरका चालणारा!
दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही सगळा दिवस झाडावर चढण्यात, झोपाळा बांधण्यात आणि लपाछपी खेळण्यात घालवायचो. संध्याकाळी समुद्र किना-यावर जायचो.
संध्याकाळचा समुद्र हीसुद्धा माझ्या मनातलीच एक जागा असावी. तसे समुद्र सगळीकडे सारखेच असावेत पण प्रत्येक समुद्र तरीही वेगळा वाटतो. आणि प्रत्येक समुद्राचं त्याच्या किना-याशी नातंही वेगळं असतं. कोकणातल्या त्या विरळ किना-यावर आम्ही सगळ्यांनी मिळून वाळूचा किल्ला बांधला. पण जशी संध्याकाळ स्थिरावू लागली तसा समुद्र जिवंत होऊ लागला. ते दृश्य हवसंही वाटतं आणि नकोसंही. कधी कधी संध्याकाळच्या समुद्रासमोर उगीचच आपण कुणीच नाहीयोत असं वाटतं. कधी त्या "कुणीनाहीपणाची" भीती वाटते तर कधी त्याचाच खूप आधार वाटतो. कदाचित तेव्हा मला असं बोट ठेवता येत नसावं. त्यामुळे मी अचानक बोलेनाशी व्हायचे. मग मला अज्जीची नाहीतर आईची आठवण येते आहे असं म्हणून लोक माझी समजूत काढायचे. :) पण लहानपणापासूनच एखादी जागा, एखादी संध्याकाळ, एखादा आठवणीतला सुगंध, एखादं गाणं आपल्याला अचानक इतक्या दूर कसं काय घेऊन जाऊ शकतं, याचं मला खूप अप्रूप वाटायचं.
मग रात्री आम्ही सगळे अंगणात मोठ्या सतरंजीवर झोपायचो. निरभ्र आकाशातल्या चांदण्या बघत. कोकणातल्या भुतांच्या गोष्टी फार प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आमच्यातली एखादी ताई कुठलीतरी बाई विहिरीपाशी तिचं डोकं बाजूला काढून ठेऊन स्वत:च्याच वेण्या घालत होती वगैरे गोष्टी सांगायची. पण दिवसभराच्या दंग्यामुळे घाबरायचाही उत्साह नसायचा. मग आकाशातल्या प्रत्येक नवीन चांदणीबरोबर आमच्यातलं एक-एक भूत झोपून जायचं! पण बाहेर झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग यायची आणि रात्री एका कोप-यात बघितलेल्या चांदण्या पहाटे चालून पुढे गेलेल्या असायच्या.चंद्रसुद्धा त्याची रात्रपाळी संपवून घरी चाललेला दिसायचा. पण संध्याकाळच्या समुद्राला सामोरं जाण्यापेक्षा रात्रीच्या आकाशाखाली झोपणं जास्त आवडायचं मला. :)

Monday, March 29, 2010

आनंद आणि अश्रू

एकदा शाळेत मराठीच्या तासाला आम्हांला "आई म्हणोनी कोणी" ही कविता शिकवायला घेतली होती बाईंनी. माझं खरं तर कवितेवर भारी प्रेम. लहानपणापासूनच मी कविता करायचे आणि वाचायचे. त्यात अज्जीचा खूप मोठा हात होता हे सांगायला नकोच! त्यामुळे रसग्रहण मला फार फार आवडायचं. आमच्या मराठीच्या इनामदार बाईसुद्धा खूप मनापासून शिकवायच्या. त्या तासाची मी खूप आतुरतेनी वाट बघायचे नेहमी. पण त्या दिवशी त्यांनी ती कविता शिकवायला घेतली आणि झालं! सगळ्या मुली पाच मिनिटांत मुसमुसून रडू लागल्या. पहिलं कडवं होईपर्यंत रंगानी "जरा उजव्या" असलेल्या सगळ्या मुलींची नाकं लाल झाली होती. मला वाटलं मला जरा उशीरा रडू येईल पण कुठलं काय! मला रडूच येईना. मग दुसरं कडवं सुरु झालं. त्यात "आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी" ही ओळ आली. त्या ओळीवर खिशातून रुमाल बाहेर येऊ लागले. आपल्या वर्गभगिनी किती हळव्या आहेत हे बघून वर्गबंधूंचा आदर वाढू लागला. त्यामुळे भगिनीमंडळाची रडायची मोहीम आणखीनच बळावली. मला फार वाईट वाटू लागलं मनातून. आपण निर्दयी आहोत का? आपल्याला का बरं रडू येईना? इनामदार बाई शांतपणे रसग्रहण करत होत्या. त्या रडायला लागू नयेत एवढी एकच माफक अपेक्षा मी उराशी बाळगून होते. मग पुढे गेलो "ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी". या ओळीला मात्र मला कवीचा राग येऊ लागला. बिचारा देव. आपल्याला काय माहीत त्याला आई आहे की नाही. आणि नसली तरी त्याला असं भिकारी का म्हणावं? पण या तर्कापुढे आजूबाजूची डझनभर नाकं आणि दोन डझन डोळे भारी ठरले. मग मी मनात असले दुष्ट विचार करण्यापेक्षा एकदा शेवटचं रडू येतंय का ते पाहायचा प्रयत्न केला. मनातल्या मनात आई खरंच घरी नाही आणि मी आणि बाबा स्वयंपाक करतोय असं चित्रं उभं केलं. पण त्या चित्रातही आई आली, "शिरीष बाजूला हो. तू फार पसारा करतोस स्वयंपाकघरात" असं म्हणत. मग मी भावनांच्या मागे न लागता शारीरिक माध्यमांनी रडू येतंय का ते पहायचा प्रयत्न केला. डोळ्यांची उघडझाक केली. पण रडू येईच ना! हे होईपर्यंत नुकत्याच "भिकारी" झालेल्या देवालासुद्धा माझी दया आली नाही आणि इनामदार बाईसुद्धा रडू लागल्या. हे फारच झालं!
माझा नेहमीचा गोंधळ आहे. जेव्हा फार गंभीर परिस्थिती उद्भवते तेव्हा मला खूप हसायलाच येतं. हे मी आईकडून घेतलं असावं. आईलापण असं कुठेही हसू येतं. एकदा नुकतंच लग्न झालेलं असताना बाबा आईला त्याच्या नातेवाईकांकडे घेउन गेला होता. तेव्हा तिथे कुणीतरी "अक्कुर्डी" हा शब्द उच्चारला म्हणे. तर माझ्या आईला त्यावर इतकं हसू आलं की बाबाची फजिती झाली. मग त्याला "त्रास" नको म्हणून आई त्यांच्या बाल्कनीत जाउन एकटीच हसत बसली. अशा खूप प्रसंगांमध्ये मी आणि आईनी बाबाला अवघडायला लावलं आहे.
त्यामुळे आपल्याला काही केल्या रडू येत नाही याचं मला हसू येऊ लागलं. तेवढ्यात तासाची घंटा झाली आणि माझी त्या अतिअवघड प्रसंगातून सुटका झाली. त्यादिवशी मी मनाशी पक्कं ठरवलं, लोकांना रडू येईल असं काही लिहायचं नाही. कारण ज्यांना रडू येत नाही त्यांची उगीच पंचाईत होते. योगायोगाने अज्जी तेव्हा पुण्यातच होती. मी घरी येऊन तिला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ती गोड हसून म्हणाली, "अगं एवढंच ना! नाही आलं रडू तर नाही! याचा अर्थ काय तुझं आईवर कमी प्रेम आहे असं नाही काही वेडाबाई. माझी आई मी खूप लहान असतानाच गेली. पण म्हणून काही मला असं वाटलं नाही. आणि माझ्या आईची मला अजूनही आठवण येते. आणि लोकांना रडवणं खूप सोप्पं असतं लाडूबाई. लोकांना हसवायला शिकलीस तर खरी मजा आहे".
आणि हे अज्जीचं म्हणणं मला सोळा आणे पटतं! अज्जी कधी कधी मला "राजहंस माझा निजला" आणि "चिंचेवर चंदू चढला" एका पाठोपाठ एक वाचून दाखवायची. पण राजहंस वाचून झालेलं दु:ख अत्र्यांच्या कवितेने लगेच हलकं व्हायचं. ती आणि ताजी नेहमी परिस्थितीमधला विनोदच शोधायच्या. अज्जी तिच्या साहित्यिक दृष्टीने तर ताजी तिच्या खट्याळ निरागस स्वभावाने. ताजीचा आवडता खेळ म्हणजे ती गेल्यावर कोण कोण कसं कसं रडेल याची नक्कल करून दाखवणे. आजोबांना हा खेळ "अभद्र" वाटायचा. आणि मुलांसमोर मरणाबद्दल बोलू नये असं त्यांना वाटायचं. पण आम्हाला मृत्यूपेक्षा नक्कल करण्यातच रस असायचा.
"आमचा न-या कसा रडेल?" नरूमामाला ताजी लाडानी न-या म्हणायची.
"न-या हळवा आहे पण रडताना देखील भांग विस्कटणार नाही याची काळजी घेईल तो". मग नरू मामा रडतोय आणि हळूच केसांवरून हात फिरवतोय त्याची नक्कल करून दाखवायची. लगेच मुलांमध्ये हशा पिकायचा. :)
"हिराक्का कशी रडेल?"
"ग्येली गं ऽऽ माझी ताईऽऽऽ!" असं दारातूनच ओरडत येणार ती.
"आता कुनाच्या पम्पावर पानी भरू गऽऽऽऽ बाईऽऽऽऽ!!"
हिराक्कासारखी गुडघा मानेत खुपसून बसायची. आणि तिच्या या मरण-काव्यावर आम्ही खूप हसायचो!
"ताजी कुसुम अज्जी कशी रडेल?" - मी (मी नेहमीच अवघड प्रश्न विचारायचे)
"बाई होय! बाई अशा हळू हळू चालत येतील" मग अज्जीच्या पायाचा आवाज न करता चालायच्या सवयीची नक्कल करायची.
"फार चांगल्या होत्या हो ताई! वसूवर आणि सईवर फार जीव होता त्यांचा." अज्जीची मान तिरकी करून बोलायची लकब बरोब्बर टिपायची आणि मग पदर नाकाला लावून कोप-यात उभी राहायची अगदी कुसुम अज्जीसारखी. आणि तिचं नेहमीचं कोल्हापुरी वळण सोडून बामणी बोलायची. यावर बच्चे कंपनी फार खूष व्हायची.
एकदा नरूमामाच्या मित्रांसमोर अशी नक्कल करताना त्यातला एक मित्रं खरच रडायला लागला होता. त्याला ताजीनी जाउन घट्ट मिठी मारली होती.
माझ्या बालपणीच्या या गोष्टी कदाचित नेहमीच्या जगात थोड्या विचित्र वाटतील पण मला भावतो तो त्यामागचा निखळ निरागस उद्देश. ताजी जेव्हा खरंच गेली तेव्हा तिच्या सुतकात आम्ही मुडशिंगीच्या घरात पत्रावळ्या लावत बसायचो. आणि सगळ्यांना तिच्या या नकला आठवायच्या. तेव्हा आम्ही मुली मोठ्या झालो होतो. आणि त्यावेळी मला या सगळ्या विनोदामागचा क्रूर विरोधाभास जाणवला. पण तिची आठवण काढताना त्या सुतकात देखील आम्ही खिदळलो होतो. आणि मग पुन्हा एकमेकींना मिठी मारून रडलो होतो.
मग परीक्षा जवळ आली तेव्हा तोंडी परीक्षेसाठी मी तीच कविता घोकू लागले. इनामदार बाईनी चालपण लावून दिली होती. एका रविवारी मी ती कविता घोकत असताना माझी आई खोलीत आली. आणि माझी ती कविता म्हणण्याची आत्मीयता बघून, माझी चाल ऐकून आणि परीक्षेपुढे मी चारी मुंड्या चीत झालेली बघून की काय आईला हसू जाम आवरेना. आणि प्रत्येक कडव्यानिशी तिचं नेहमीचं खो खो हास्यकारंजं सुरू झालं. आपली आईसुद्धा ही कविता ऐकून हसते आहे हे पाहून माझ्या जीवात जीव आला. :)

Sunday, March 21, 2010

प्रवास

आमच्या ताईअज्जीला प्रवासाची भारी आवड! ती एक आणि सिनेमाची दुसरी. पण कुठेही जायचं म्हटलं की ताजी एका पायावर तयार असायची. मुडशिंगीहून अंकलखोपला जायचं म्हटलं तरी तिचे डोळे चमकायचे. तिच्याबरोबर प्रवासाला जाण्यात खूप मजा असायची, कारण तिथे पोहोचायच्या आधी ती सगळ्याचं वर्णन करायची. कुठल्यातरी गोष्टीच्या पुस्तकाची पानं भराभरा उलटल्यासारखं सगळं वातावरण डोळ्यासमोर उभं करायची.

"सई, आपल्या अंकलखोपला नदी आहे बरंका! आपण गेल्या गेल्या नावाडी आहे का ते बघूया हं. म्हणजे नदीच्या त्या कडेला जाता येईल."
लगेच माझ्या डोक्यात नाव, नावाडी, मग तो गाणं म्हणेल का नुसताच मठ्ठपणे बसून राहील ह्या सगळ्या गोष्टी चमकायच्या. मग कधी कधी कौलावर माकडं येतात हे पण सांगून मला नवीन खेळ द्यायची.
पुण्याला आली की ताजी आणि बाबा एका गटात सामील व्हायचे. बाबापण भटका आहे. त्याला भटकणार्‍यांची संगत मिळाली की तोही खूष असतो. मग आमच्या कायनेटिकवरून बाबा आणि ताजी भरपूर भटकायचे. सातार्‍यापर्यंतच्या परिघात जे जे म्हणून नातेवाईक आहेत त्यांना ताजी कायनेटिकवरून भेटायला जायची. कधी कधी मलाही मध्ये बसवून घेऊन जायची. गाडीवरही आपण कुणाकडे चाललोय, ती माणसं कशासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांचं आणि माझं नक्की नातं काय आहे वगैरे वगैरे गोष्टी माझ्या डोक्यातल्या संगणकाला भरवत जायची. तिच्या त्या प्रस्तावनेमुळे माझी उत्सुकता नेहमी टिकून राहायची. आई-बाबा कुठे जाताना आधी मला, "जास्त प्रश्न विचारायचे नाहीत" अशी ताकीद करून न्यायचे. तरीही तिकडे जाईपर्यंत मी प्रश्न विचारून त्यांची डोकी रिकामी करायचे.
"बाबा आपण चाललोय तिकडे कुत्रा आहे?"
"नाही"
"मग मांजर?"
"नाही"
" ते आपल्याला काय खायला देणार?"
"मला माहीत नाही पिल्लू. पण तू काही मागू नकोस"
"नाही मागणार. पण तरी ते देतीलच ना? आपण पाहुणे आहोत!"
"हो देतील"
"ते उप्पीट नाही ना देणार? दिलं तर मला खावं लागेल का?"
" हो अर्थातच"
"शी बाबा. उप्पीट असेल तर मी थोडंच खाणार हं!"
"त्यांनी मला चहा दिला तर तू त्यांना 'हिला चहा देऊ नका' असा सांगणार का?"
"तू प्रश्न बंद केलेस तरच नाही सांगणार"
"त्यांना माझ्याएवढी मुलगी आहे का?"
"नाही त्यांना दोन मुलं आहेत. एक तुझ्याएवढा आहे"
"शी बाबा. मग मी कुणाशी खेळणार?"
"तुझे एवढे प्रश्न संपण्याइतका वेळ आपण तिथे थांबणार नाहीयोत. त्यामुळे बस कर आता."

मग मी हिरमुसली होऊन उरलेला वेळ गाल फुगवून घालवायचे. ताजी मला प्रश्न विचारायची संधीच द्यायची नाही. त्यामुळे मला तिच्याबरोबर जायला खूप मजा यायची. ताजीची लहान बहीण लीलाअज्जी पुण्याजवळ नीरेला राहायला होती. एकदा मी, ताजी आणि बाबा गाडीवरून तिच्याकडे गेलो. तिच्या घराच्या आजूबाजूला खूप शेळ्या होत्या. त्या दिवशी मी एक कोकरू उचलून घरात आणलं होतं. त्यानी घाबरून घरात उच्छाद मांडला! तो नंतर लीलाअज्जीला निस्तरावा लागला होता. पण अजूनही मला भेटले की ते सगळे त्या दिवसाची आठवण काढतात. ताजीला मात्र माझं त्या दिवशी खूप कौतुक वाटलं होतं. आई असती तर यल्लम्मासारखे मोठ्ठे डोळे करून भीती घातली असती मला!
एकदा मी, ताजी आणि अण्णाआजोबा रेल्वेनी शिर्डीला गेलो होतो. आजोबांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून पहिल्या वर्गाचा मोफत पास आहे रेल्वेचा. त्याचा त्यांना फार अभिमान आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापूर प्रवासदेखील ते रेल्वेनीच करतात. त्यांच्या पासमध्ये दोन लोकांना जायला मिळतं पण मी छोटी असल्याने मलादेखील जाता आलं! आजोबा ताजीच्या मानानी फारच अरसिक. आम्ही गेलो त्या रात्री देवळात कीर्तन होतं. ताजीला ते ऐकायची फार इच्छा होती. पण आजोबांनी, "रात्रीचं कसलं कीर्तन करतात! दहा ही काय कीर्तन करायची वेळ आहे का? गप झोपा खोलीत!" म्हणून धमकी दिली.मग आम्ही दोघी "गप झोपलो". जसा जसा आजोबांच्या घोरण्याचा आवाज वाढू लागला तशी ताजी उठली. मला पण उठवलं. मग आम्ही चपला हातात घेऊन खोली बाहेर आलो. ताजीनी हे आधीच ठरवलं असणार कारण माझा स्वेटर आणि मोजे तिनी तिच्या पिशवीत टाकले होते. मग बाहेर आल्यावर तिनी सरळ खोलीला कडी घातली! मला आजोबांना कोंडल्याचा काय आनंद झाला होता! बाहेर आल्यावर आम्ही भर भर चपला घातल्या. मला आधी मोजे घालून वर चपला घालाव्या लागल्या! देवळाजवळ गेल्यावर दोघींनाही हसू काही केल्या आवरत नव्हतं! त्या रात्री साडे बारापर्यंत आम्ही कीर्तन ऐकलं! आणि परत खोलीत जाऊन होतो तशा झोपलो! सकाळी आजोबांना काही कळलं सुद्धा नाही. दोन दिवसांनी आजोबांचा मूड पाहून ताजीनी त्यांना आमची गम्मत सांगितली. तेव्हा आजोबादेखील खो खो हसले होते!!
खूप वेळा, "कसला जळला मेला यांचा पास! एखादा असता तर दोन्ही बायकांना आलटून पालटून काश्मीर, कन्या कुमारी, माथेरान दाखवलं असतं" म्हणून ताजी रेकोर्ड सुरु करायची. त्यातलं मला दोन बायकांना आलटून पालटून हे खूप भारी वाटायचं!! ताजीचा स्वभावच तसा होता पण.
तिला परदेशी जाण्याचे फार अप्रूप होते. आई अमेरिकेला गेली तेव्हा ताजी मला सांभाळायला आली होती. मग आईचा फोन आला की तिला मी लहान असताना विचारायचे तसेच प्रश्न ताजी विचारायची.
"होय गं वसू (माझ्या आईचे नाव वसुधा आहे) तिकडं रस्ते आपल्यासारखेच असतात?"
"तिकडच्या बायका काय घालतात गं? साडी नसतीलच घालत.!"
आई परत आली तेव्हा तिला माझ्याजोडीला ताजीही प्रश्न विचारून हैराण करायला होती. तिच्या अमेरिकन मैत्रिणीचा फोटो बघून
"काय गं बाई! पुरुषाला उचलून घेईल की गं ही!" असं म्हणून तोंडाला पदर लावून खूप वेळ हसली होती. मुलगी पाच फुटापेक्षा जरा उंच असली की ताजीच्या भाषेत लगेच ती पुरुषी व्हायची!
मी पंधरा वर्षाची असताना अमेरिकेला गेले. खरं तर मी सुट्टीला गेले होते. तरीही ताजीला माझा खूप अभिमान होता.
"एकटी अमेरिकेला गेली माझी नात!" म्हणून येईल त्याला ती सांगायची.
" सईनी हा गुण मात्र माझ्याकडून घेतलाय" असं ती सगळ्यांना सांगायची. आणि खरंच आहे ते. प्रवासाबद्दल माझ्या मनात पहिलं कुतूहल ताजीनीच रुजवलं. कुसुमअज्जीचे प्रवास पुस्तकांतून असायचे. तिला भटकणं फारसं आवडायचं नाही, आणि माझ्यातही कुठेतरी प्रवासाबद्दल तो कंटाळा आहे. पण माझं नशीब नेहमी मला त्यातून खेचून आणतं, आणि प्रत्येक प्रवासात मला माझ्यातली ताजी दिसते.
कुठलाही नवीन देश, नवीन वेश दिसला की मला उगीचच ताजी यावर काय म्हणाली असती याची कल्पना करावीशी वाटते. तिचं ते निरागस पण तितकंच उत्सुक रूप आठवलं की नेहमी ती जिथे आहे तिथे तिला माझा प्रवास दिसू दे अशी प्रार्थना करावीशी वाटते. मग विमानात बसताना ते हवेत झेप घेताना नेहमी आपल्याशेजारी ताजी असती तर काय बहार आली असती असा विचार येतो. तिनं मात्र बैलगाडीपासून ते रेल्वेपर्यंत सगळ्या प्रवासात मला पुढल्या प्रवासाची झलक दाखवत नेलं. तिला एकदातरी विमानातून कुठेतरी दूर नेता आलं असतं तर तिच्याच भाषेत, फिटांफीट झाली असती!

Saturday, March 13, 2010

सुनीताताई

मी दहा वर्षांची असताना सुनीताताई माझ्या आयुष्यात आली. मी दुसरीत असताना आम्ही कोथरूडमध्ये राहायला गेलो. आमच्या पलीकडच्या बिल्डींगमध्ये नरूमामाच्या मॅनेजरचा मुलगा आणि त्याचे काही मित्र राहायला होते. घरात काही खास बेत केला की आई नेहमी मला अजितदादा आणि सुनीलदादासाठी डबा देऊन यायला लावायची. मग एक दिवस अजितदादाचं लग्न ठरलं आणि त्याच्या होणा-या बायकोचा फोटो घेऊन नरूमामा आला. आमचा नरूमामा या बाबतीत नेहमी पुढे असतो. मुलगी बघण्यापर्यंतचे कार्यक्रम त्यांनी त्याच्या मॅनेजर साहेबांसाठी केले. त्या फोटोतून सुनीताताईनी माझ्या आयुष्यात पहिला प्रवेश केला. एका मोठ्याश्या बंगल्याच्या बाहेर, एका गाडीशेजारी, साधा सलवार-कुडता घालून उभी होती त्या फोटोत ती. दाताला नवीन पद्धतीचे कुंपण घातलेली! लग्नाआधी काही दिवस ते कुंपण काढण्यात आलं असावं. माझ्या आयुष्यात दादा लोक बरेच होते. चिकूदादा आमच्याकडेच राहायला होता. अजितदादा, त्याचे मित्र, चिकूदादाचे मित्र, कॉलनीतल्या मैत्रिणींचे मोठे भाऊ असे खूप उमेदवार दादा होते. पण आपल्यापेक्षा चांगली दहा वर्षांनी मोठी, आपल्यासारखेच आई-बाबा असलेली, आपल्याच शाळेत शिकलेली ताई मात्र मला अजून भेटली नव्हती. तशी माझी चुलत बहीण गंधालीताई होती. पण ती पुण्यात नसायची. त्यामुळे आमच्या भेटी नेहमी गट्टी होऊन पुढे जाईतो संपून जायच्या. गंधालीताई लांब नखं वाढवायची. निघताना नेहमी तिला मी, "तुझा नख तुटलं की मला पोष्टानी पाठव" म्हणून सांगून यायचे.
सुनीताताईचं लग्न झालं तेव्हा तिला नुकतं विसावं वर्ष लागलं होतं. घरातल्या सासरच्या माणसांसमोर तिचं (नसलेलं) पाक-कलानैपुण्य दाखवताना तिची जाम तारेवरची कसरत चालली होती. माझ्या आईच्या हे लक्षात आलं असावं. त्यामुळे ती नेहमी सुनीताताईची चौकशी करत असे येता जाता. तसं तिचं घर खालच्या मजल्यावर होतं. त्याला लागून एक छोटी बाग होती. तिच्या पलीकडे आमचं कुंपण होतं. त्यामुळे रोज ऑफिसमधून येताना आईच्या आणि सुनीताताईच्या कुंपणावरून गप्पा रंगायच्या. थोडे दिवसांनी सासरची मंडळी कोल्हापूरला निघून गेली आणि सुनीताताईला रीतसर स्वयंपाक शिकायला उसंत मिळाली. मग काय विचारता? कधी पावभाजी, कधी दहीवडे, कधी पिझ्झा!! आईचं आणि सुनीताताईचं मेतकूट जमलंच पण माझी आणि तिचीही खास मैत्री झाली.

रोज शाळेतून घरी येताना मी कुंपणातून सुनीताताईला हाक मारायचे. ती माझी वाटच बघत असायची.
"सई, इकडे ये आधी. चहा पिऊन जा!".
मग परत माझी वरात तिच्याकडे वळायची. तिच्या घरी जाता यावं म्हणून चिकूनी आणि मी कुंपणाला आमच्या आकाराचं भोक केलं होतं. त्यातून जाता-येता कित्येकवेळा मला तारेनी बोचकारलं जायचं. पण वळसा घालून मोठ्या माणसांसारखं जायला काही मजा वाटायची नाही. आई येईपर्यंत कधी कधी मी सुनीताताईकडेच थांबायचे. ती खूप वेगळी होती. आत्तापर्यंत "लग्न झालं" की बायका आपोआप साड्या नेसायला लागतात, मोठी कुंकवं लावतात, सारख्या रागवू लागतात असं वाटायचं. पण सुनीताताई माझ्यासारखेच पण मोठ्या मुलींच्या मापाचे कपडे घालायची आणि दुपारी घर आवरून फेमिना वाचत बसायची. तिच्याकडे नेहमी छान छान मुलींची मासिकं असायची. पुढे मी पंधरा सोळा वर्षांची झाल्यावर सुनीताताईनी मला पहिलं "मिल्स अँड बून्स" वाचायला दिलं. ते मला आवडलं नाही ही गोष्ट निराळी. :) पण कुठल्याही तारुण्यसुलभ गोष्टीची तिच्याकडे चौकशी करायला मला भय वाटायचं नाही, आणि तिलाही कुणालातरी दीक्षा दिल्याचा बहुमान मिळायचा. माझे कपडे सुनीताताईला आवडावेत असं मला वाटायचं. म्हणजे कदाचित मला ते ज्यांना आवडायला हवेत त्यांनाही आवडतील असं वाटायचं. :) वर्गातल्या एखाद्या मुलाबद्दल मी खूप बोलू लागले की सुनीताताई मला खूप गोड चिडवू लागायची. तिचं चिडवणं वर्गातल्या मैत्रिणींच्या चिडवण्यापेक्षा मला जास्त आवडायचं!
तिनीच मला भुवया कोरण्यात काही "वाईट" नाही हे सांगितलं. आणि पहिल्यांदा भुवया कोरायला मला तिच्या ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेली. माझ्या शाळेच्या निरोप समारंभासाठी सुनीताताईनी तिची साडी मला नेसवून दिली. काय भडक दिसेल, काय सुंदर दिसेल या सगळ्याचे निर्णय मी तिच्यावर सोपवले होते. त्या काळात ती माझ्या मुलीकडून युवतीकडे होणा-या प्रवासातली महत्वाची हमसफर झाली होती. या सगळ्याच्या मध्ये तिला आकाश झाला. जेव्हा तिला बाळ होणार हे कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मग तिचे डोहाळे पुरवायला आई जे काही बनवायची ते मी तत्परतेने न सांडता तिला नेऊन द्यायचे. आकाश झाल्यावर मला अचानक ताईपदावर बढती मिळाली. मग त्याची अंघोळ, त्याचं जेवण, त्याचा दंगा सगळं सांभाळण्यात मी सुनीताताईची मदतनीस झाले. ती भेटून सहा वर्षं झाली नसतील तोवर आमची मैत्री वेगळ्याच पातळीवर जाऊन बसली. अचानक तिच्या टेबलवर बसून अर्धा तास एक कप चहा गार करून पिणारी सई तिच्या मनातल्या शंका, अडचणी, राग या सगळ्याची सोबतीण बनू लागली. कॉलेजमध्ये गेल्यावर सुनीताताई अजूनच जिगरी बनली. मग मैत्रीला सृष्ट रूप आलं. ती मला "दम बिर्याणी", "चिकू शेक", "मेदू वडा" असे पदार्थ करायचे धडे देऊ लागली. मैत्रिणींमध्ये "सुनीताताई" चं काय म्हणणं आहे, यावर आमची भांडणं सुटू लागली.
पुढे मी वीस वर्षांची झाल्यावर आम्ही पुन्हा घर बदललं आणि सुनीताताई देखील दुसरीकडे राहायला गेली. मग भेटीगाठी कमी झाल्या पण ज्या व्हायच्या त्या खूप सुंदर असायच्या. आकाशसुद्धा आमच्याच शाळेत जाऊ लगला. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या सुनीताताईची जागा मी त्याच्या आयुष्यात भरू लागले. :) पण अशा सगळ्या छान छान गोष्टींना सोनेरी पंख नसतात. एक दिवस अचानक सुनीताताईला खूप डोकेदुखी सुरू झाली. सगळ्या तपासण्या झाल्यावर तिला कॅन्सर आहे असं निष्पन्न झालं. त्यानंतर जवळपास सात वर्षं तिची झुंज सुरू होती. दर सहा महिन्यांनी तिचा कॅन्सर शरीरातल्या नवीन भागाकडे त्याचा मोर्चा वळवायचा. मग पुन्हा हॉस्पिटल, नवीन किमोथेरपी, नवीन आहार, नवीन आशा! खूप वेळा खचून ती माझ्या आईला फोन करीत असे. किंवा थोडा हुरूप आला की आई-बाबांशी गप्पा मारायला अजितदादा आणि सुनीताताई दोघे यायचे. माझा वाढदिवस ती कधीच विसरली नाही. मीच कधी कधी त्या दिवशी घरी नसायचे. मग परत आल्यावर मला आणलेली फुलं आणि खाऊ मिळायचा. मी ऑस्ट्रेलियाला येताना तिनी माझ्यासाठी वैष्णवदेवीचा प्रसाद आणला होता. तेव्हा सुद्धा ती आजारीच होती. माझ्या आयुष्यात त्या काळात चाललेल्या जलद घटनांमुळे मला तिच्यासाठी तितकं थांबता आलं नाही. याची खंत नेहमीच वाटत राहील. पण ज्या असंख्य गोष्टी हातातून ओढीच्या अभावामुळे गळून गेल्या त्यात सुनीताताई नक्कीच नव्हती. माझ्या आईचा तिला सतत पाठिंबा असायचा. तिला पुस्तकं देणं, तिच्या आहारात काय बदल करता येईल यावर संशोधन करणं हे सगळं माझ्या आईनी तिच्यासाठी अगदी प्रेमानी केलं. मागच्या वर्षीच्या सुट्टीत मी निघायच्या दोन दिवस आधी सकाळी आई खूप अस्वस्थ वाटली. खूप खोदून विचारल्यावर सुनीताताई पुन्हा हॉस्पिटल मध्ये आहे हे तिनी मला सांगितलं. कॅन्सरचा शेवटचा वार तिच्या डोळ्यावर झाला. शेवटचा प्रयत्न म्हणून तिचा डोळा काढून टाकायचं ठरलं. तशा स्थितीत मी तिला बघायला जाऊ नये म्हणून तिनी आईला मी गेल्यावर यायला सांगितलं होतं. हे कळल्यावर मी आईबरोबर लगेच तिला भेटायला गेले. त्या दिवशीसुद्धा ती नेहमीसारखीच बडबडत होती. त्या वीस मिनिटात सुद्धा आम्ही जिवाभावाच्या गप्पा मारल्या. आपण कदाचित परत भेटणार नाही हे दोघींनाही माहीत असूनही त्या दुष्ट सत्याला आम्ही केरसुणीसारखं कोप-यात बसवून ठेवलं. निघताना तिचा हात हातात घेऊन मी तिला, "ही बघ तुझी आयुष्य रेषा! खूप मोठी आहे गं! नको काळजी करूस", असं सांगितलं होतं. मी इथे आल्यावर अवघ्या वीस दिवसात ती गेली. पण तिचं आयुष्य आमच्या सगळ्यांमध्ये वाटून गेली. आता ते मोठं आयुष्य आम्ही सगळे मिळून जगू. तिच्यासाठी.