Saturday, November 14, 2009

अंकली ते सांगली

उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी कधी आम्ही ताजीच्या बहिणीकडे अंकलीला जायचो. अंकली सांगलीजवळचं छोटंसं गाव आहे. ताजीची बहीण सुमती (सुमा) अज्जी तिथे राहते. तिचं घर, शेत, वीटभट्टी सगळं तिथेच आहे. अंकलीला जाणे म्हणजे आमच्या सुट्टीचा खास भाग असायचा. तिची मुलं, सुना, नातवंडं आणि तिचा चित्रविचित्र प्राणीसंग्रह या सगळ्याचं आम्हांला फार कौतुक होतं. तिचं घरही खूप मजेदार आहे. एका अरूंद पण लांब जागेवर तिचं घर एखाद्या बोगद्यासारखं उभं आहे. दारातून आत गेल्यावर लांबच लांब बोळ आणि त्याच्या एका बाजूला क्रमाने देवघर, बैठकीची खोली, स्वयंपाकघर, न्हाणी अशा खोल्या आहेत. न्हाणीघराच्या दाराशी वर जायचा जिना आहे. तिथे तशाच एकापाठोपाठ एक आणि तीन खोल्या आहेत!

तो बोळसुद्धा जादूच्या गोष्टीतल्या चेटकीणीच्या घरासारखा आहे. कुठल्या खोलीतून कुठला प्राणी बाहेर येईल सांगता येत नाही. तिच्या दारातच पोपटाचा पिंजरा आहे. त्यातला पोपट मुलखाचा शिष्ट. पुण्यात तो पोपट असता तर चितळे आडनावाच्या पोपटिणीच्या पोटीच जन्माला आला असता. कुणी त्याच्याशी बोलायला आलं की सदैव डोळे पांढरे करून, "मला तुमच्याशी बोलण्यात काहीही रस नाही. उगीच इकडे उभे राहून स्वत:चा आणि माझा वेळ वाया घालवू नका", अशा अर्थाचा भाव त्याच्या चेह-यावर असायचा! तिच्या स्वयंपाकघरात चूल होती. तशी बर्शनची शेगडी पण होती, पण सुमा अज्जी जुन्या वळणाची असल्यामुळे ती नेहमी चुलीवरच भाकरी करायची. चुलीवरच्या भाकरीचा सावळा गावरान ठसका गॅसच्या शेगडीवरच्या ऎश्वर्या राय भाकरीला कुठून येणार? तिच्या चुलीशेजारी तिचं एक-कानी मांजर होतं. त्याला चुलीशेजारी बसायची फार हौस होती. एकदा आपण चुलीच्या किती जवळ आहोत याचा अंदाज चुकल्यामुळे त्याला एका कानाला मुकावं लागलं. पण सुमा अज्जी म्हणूनच की काय त्याचे जास्त लाड करायची. तिच्या घरी दिगू नावाचा कुत्रा होता. तो म्हणे दर गुरुवारी उपास करायचा. त्याला जेवायला दिलं तरी जेवायचा नाही. याची शहानिशा करून बघायसाठी मी गुरुवारपर्यंत तिथे रहायचा हट्ट केला होता.
तिला भाकरी करताना बघायला मला फार आवडायचं. तिच्या हातात निदान दोन डझन बांगड्या नेहमीच असायच्या. भाकरी थापताना त्यांचा हलका आवाज व्हायचा. आणि त्या बांगड्यांच्या कुंपणापलीकडे तिचं गोंडस, गोंदलेलं मनगट भाकरीच्या तालावरच नाच करायचं. खेड्यातल्या बायकांचे हात काय काय गोंदण-गोष्टी सांगतात! कुणाचं सालस तुळशी वृंदावन तर कुणाचा दिमाखात मागे वळून बघणारा मोर! आणि ते मऊ गव्हाळ, गोंदलेले हात लपवायला कासभर हिरव्या बांगड्या. मला सगळ्यांची गोंदणं बघायचा नादच होता. अगदी परवा मेल्बर्नमधल्या एका ऑस्ट्रेलियन काकूंच्या हातावर निळा गोंदलेला मोर पाहिला आणि या सगळ्याची आठवण आली.

काहीजणी त्यांच्या नव-याचं नाव गोंदून घेत असत. हे कळल्यावर इकडल्या ब-याच मुली , "ईन्डियन विमेन आर सो सप्रेस्ड!" असे उद्गार काढतात. पण स्वत:च्या नव-याचं नाव हातावर निरागस अभिमानाने लिहिणारी भारतीय नारी मात्र "सप्रेस्ड" आणि साधारणपणे दिसणार नाही अशा ठिकाणी फुलपाखरू काढणारी, आणि मग ते दाखवणारी पाश्चात्य महिला मात्र स्वतंत्र! हल्ली तर पुरुष लोकही त्यांच्या बायकांची नाव गोंदून घेऊ लागलेत! इकडे रस्त्यातल्या दर दुस-या व्यक्तीच्या हातावर गोंदण असतं. त्याला "टॅटू" म्हणतात! पण महानोरांनी बघितलेला तो "गोंदलेला हात मऊ टापटीपीचा" फक्त भारतातच बघायला मिळतो.
आणि सुमा अज्जी कुसुम अज्जीला फार प्रेमाने वागवायची. कुठेही न जाणारी कुसुम अज्जी अंकलीला यायला मात्र नेहमी तयार असायची. एरवी मुख्याध्यापिकेसारखी वागणारी अज्जी सुमा अज्जीच्या स्वयंपाकघरात चुलीशेजारी जमिनीवरच बसून तिच्याबरोबर चहा प्यायची. मला या नात्यांचं खूप अप्रूप वाटतं. माझ्या अज्ज्यांनी किती प्रकारच्या भावनांना प्रेमाचे लगाम लावले होते याचे हिशेब लागता लागणार नाहीत. आणि नात्यांमधले काही त्याग थंड आगीसारखे एकसारखे अहंकाराचे भस्म बनवत असतात. त्यापलीकडे गेलं की सगळंच चैतन्यमयी होऊन जातं. ताजी आणि कुसुम अज्जीची ही बाजू सहसा समोर यायची नाही.

सुमा आज्जीचा मळा मुडशिगीच्या मळ्यापेक्षा खूप जास्त मजेदार होता. तिच्याकडे ससे होते, गायी होत्या वर राखण करायला शिकारी कुत्रा सुद्धा होता. सश्याची पिलं हातात घ्यायला आम्हाला फार आवडायचं. आणि मळ्यातल्या कुणालाच सशांबद्दल आमच्याइतकी आपुलकी नव्हती. त्यांचे लाल-लाल डोळे, आणि गुबगुबीत पाठी फार सुंदर दिसायच्या. मळ्यातून घरी यायला बैलगाडी असायची. यापेक्षा अजून जास्त मजा काय असू शकते?
स्नेहाचं आजोळ सांगलीला आहे. एकदा सुमाअज्जी आणि तिच्या यजमानांबरोबर आम्ही (मी, मीनामामी आणि स्नेहानी) अंकली ते सांगली प्रवास बैलगाडीने केला होता. सकाळी सकाळी सुमाअज्जीने टोपलीत भाकरी, कोरडी मुगाची उसळ, कांदा, ठेचा असा नाश्ता भरून घेतला. मग बाप्पांनी बैलगाडीत आमचं सामान नीट लावलं. मग गाडीच्या चाकांमधल्या घुंगरांच्या तालावर आमची वरात सांगलीला निघाली. नेहमीपेक्षा खूप जास्त वेळ लागला असला तरी तो प्रवास मी कधीही विसरणार नाही. तसं खास काहीच नव्हतं, पण सगळंच खास होतं. रोजच्या दगदगीत, पळापळीत, जुळवाजुळवीत मला अधूनमधून नेहमी तो प्रवास आठवतो. आणि मग "हे मिळव ते मिळव" करणा-या मनाला त्याची जागा बरोबर दाखवली जाते. तसं जगात काहीच नसतं की जे मिळाल्यावर आपण कायमचे खूष होऊ, पण अशा किती गोष्टी आहेत ज्या इतक्या साध्या असून इतकी वर्षं खूष करतात.
एखाद्या थंडगार झाडाखाली बसून खाल्लेली फटफटीत मुगाची उसळ, मेथीची भाजी आणि त्याबरोबर मुठीने फोडून वाटलेला कांदा. मग त्यानंतर तिथेच काढलेली एक डुलकी! या सगळ्यापुढे आपण कोण आहोत, कुणाचे आहोत, कुठे चाललो आहोत आणि का चाललो आहोत, हे सगळे प्रश्न दुय्यम आहेत. पण हे कळायला या सगळ्यापासून दूर जावं लागतं. रविन्द्रनाथ म्हणतात तसं, "सगळ्यात दूरचा प्रवासच आपल्याला स्वत:च्या सगळ्यात जवळ नेतो आणि प्रत्येक प्रवासी खूप अनोळखी दारे वाजवूनच स्वत:च्या आतल्या दाराकडे येऊ शकतो". पण माझ्यामधल्या खूप सा-या प्रवासांचा उदयास्त या अंकली ते सांगली प्रवासात झाला!

Thursday, November 5, 2009

मुद्दा सोडू नका!!

सगळ्या मुडशिंगीकरांना एक सवय आहे. काही खास सांगायचं असेल तर तिथपर्यंत
सरळ रस्त्यानी न जाता जोरदार नागमोडी वळणं घेत जातात. याचा मला
लहानपणापासूनच खूप राग यायचा. या सवयीचे जनक अर्थातच समस्त
मुडशिंगीकरांचे जनक वसंतराव आहेत हे सांगायला नको. पण नंतरच्या पिढीतला
मुद्दा लांबवण्यात पहिला नंबर आरूमामाचा असेल. तो कुठल्याही घरगुती
कहाणीची एकता कपूर सिरीयल करून टाकतो.
"कसं असतंय सई" अशी सुरवात तो करतो. या "कसं असतंय"चा सूर कोल्हापुरात
राहणारे लोकंच नीट वाचू शकतील.
"कसं असतंय" किंवा "त्याचं काय असतंय" याच्यापुढे कोल्हापुरी लोक नेहमी
कुठलंतरी वैश्विक सत्य सांगतात.
त्यामुळे आरूमामाच्या, "कसं असतंय सई" पुढे नेहमी घरातल्या स्त्रीगटाच्या
मानसशास्राचा सखोल अभ्यास करून काढलेला निष्कर्ष असतो. यात नेहमी मधूमामी
(राजामामाची बायको) ताजीला तिच्या बाजूला करून सुरेखामामीविरूद्ध कट करते
याचं विनोदी वर्णन असायचं. त्यात मूळ कटाचा विषय सोडून तो खूप वेळ इकडे-
तिकडे फिरायचा. मग मध्येच मी, "बरं कळलं पुढे काय झालं ते सांग आता" ,असं
म्हणल्यावर तो, "थांब गं !घाई करून माझा मोसम तोडू नकोस", असं म्हणायचा.
'मोसम' तोडणे हा "मोशन तोडणे"चा अपभ्रंश आहे. ट्रकवाले मध्येच गियर
बदलावा लागल्यामुळे कमी झालेल्या वेगाला "मोसम तोडणे" असं म्हणतात. आरूमामा
रोज संध्याकाळी त्याच्या मित्रांच्या गटात प्रवचनकाराची भूमिका
बजावायचा. अर्धा-पाऊण तासच त्याच्याबरोबर घालवायला लागल्यामुळे त्या
सगळ्यांमध्ये तो लोकप्रिय होता!
तसाच नरूमामासुद्धा एखाद्या गोष्टीचं कौतुक करायला लागला की बोलायचा
थांबतच नाही. त्याचं "माझ्याबद्दल" काय मत आहे हे मला पूर्ण ऐकवतसुद्धा
नाही. कारण त्याचं सगळं कौतुक जर खरं मानलं तर मी आत्ता जे काय करते आहे
ते करायला लागणं ही नियतीने माझी केलेली क्रूर चेष्टा आहे असं एखाद्याला वाटेल.
राजामामात आरूमामाचा वर्णनप्रभूपणा नाही किंवा नरूमामाचं मुद्दा सोडून
मार्केटींगसुद्धा नाही. राजामामा फटकळपणात पुढे आहे. कुणाला तो काय बोलेल
याचा काही नेम नाही. आणि माझे सगळे मामा आणि आजोबा फोनवर इतक्या जोरात
बोलतात की फोनशिवायसुद्धा त्यांचं बोलणं पलिकडच्या माणसाला ऐकू येईल.
आईसुद्धा काही खास बातमी असेल की तिला मागे-पुढे मीठ-मसाला लावते. पण
आईला मात्र मी "आई मुद्दा काय आहे? लवकर सांग" असं अगदी न संकोचता
सांगायचे. मग ती कधी कधी तसं केल्याबद्दल रुसून बसायची आणि सांगायचीच
नाही. मग तिची समजूत काढून थोडा मीठ-मसाला सहन करून बातमी काढून घ्यायला
लागायची.
पण सगळ्यात अतिरेकी वर्णन आजोबा करायचे. त्यांचा हस्तसामुद्रिक आणि
कुंडलीशास्त्राचा अभ्यास आहे. त्यामुळे बरेच लोक त्यांच्याकडे भविष्य
सांगून घ्यायला यायचे. पण मोठी होताना मला "ज्योतिष" हा आजोबांचा पिसारा
आहे हे लगेच लक्षात आलं. कुणीही भविष्यासाठी आलं की त्याला त्याचं भविष्य
सोडून सगळं आजोबा सांगायचे. कधी कधी मी "मी गणितात नापास नाही नं होणार?"
वगैरे जुजबी शंका घेऊन त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनी जायचे. मग ते ,
"बघतो हां, माझा पानाचा डबा आण आधी", असा हुकूम सोडायचे. मग अडकित्त्याने
सुपारी कातरत, "त्याचं काय आहे सई..." सुरू व्हायचं.
झालं, ते वाक्य आल्यावर पुढील तीन तासांचा बळी जायचा. हात बघताना ते
नेमक्या वेळेस अशी काही उत्कंठा जागृत करत असत की अगदी मराठी मालिकांच्या
जाहिरातींआधी, "थोड्याच वेळात" च्या चित्रफितीसुद्धा लाजून लाल होतील.
"हे बघ सई, हा गुरूचा उंचवटा बरंका! तुझ्या हातावर या उंचवट्यावर फुली
आहे. आणि हस्तसामुद्रिकांत कुठेही फुली असणे हे फार मोठ्या कुयोगाचे
लक्षण आहे.." तेवढ्यात त्यांच्या तोंडातली सुपारी तंबाखू त्यांना बोलणं
अशक्य करायची. मग ते मोरीकडे जाऊन येईपर्यंत माझ्या हातावरची ती फुली
माझ्या गणिताच्या पेपरावरचा गोळा बनायची.
परत आल्यावर, "हा मी काय म्हणत होतो, फुली इस द वर्स्ट साईन एनीव्हेयर
ऑन द पाम, एक्सेप्ट..." असं म्हणल्यावर त्यांचे डोळे लकाकायचे. क्षणभर
नाट्यमय शांतता आणि, "एक्सेप्ट गुरूचा उंचवटा! इथे फुली म्हणजे राजयोग
बरंका!"
यामुळे माझा जीव भांड्यात पडायचा.मी आजपर्यंत एकदाही माझं "भविष्य"
त्यांच्याकडून ऐकलं नाहीये. पण मी खूपवेळा तासंतास त्यांच्यासमोर
भविष्यासाठी बसलेली आहे. या भविष्याच्या पिसा-याकडे आकर्षित होऊन कित्येक
अजाण लोक त्यांच्या अध्यात्मावरच्या भाषणांचे गिनीपिग झालेत.
ब-याच वेळेस माझ्या अंगठ्याचा ते पाच मिनिटं अभ्यास करायचे. मग सगळ्या
प्रकारच्या अंगठ्यांचे वैशिष्ठ्य सांगायचे. त्यात शेवटी उद्दाम, क्रूर,
जुलमी, उर्मट, हट्टी आणि अप्पलपोटी माणसाचा अंगठा आणि माझा अंगठा सारखा
आहे असं मला सांगायचे. त्यापुढे लगेच हातावरच्या रेषा कर्तृत्ववान
माणसाला कशा बदलता येतात यावर अर्ध्या तासाचं भाष्य व्हायचं आणि त्यानंतर
मी माझा अंगठा कसा बदलू शकेन यावर सूचना!!
आजोबांची नेहमी माझ्याबद्दल एकच तक्रार असायची. मी त्यांना हवी तितकी
विनम्र नव्हते. आणि माझा "मुद्दा सोडू नका" हा मुद्दा त्यांना उर्मटपणा
वाटत असे. कदाचित असेलही तसं. पण आजोबांचं मुद्दा सोडणंही तितकच भीतीदायक
असायचं. एकतर त्यांचा व्यासंग दांडगा. त्यामुळे त्यांची नागमोडी वळणं
उपनिषदांमध्ये जायची. कधी बिचारी संस्कृत भाषाही कमी पडली तर ते अब्राहम
लिंकन, शॉ, चर्चिल या गो-या लोकांनाही मदतीला बोलवायचे. त्यामुळे दोन
तासांच्या अंती मी, "आजोबा आपण माझं भविष्य बघत होतो" अशी आठवण करून
द्यायचे.
चौदा पंधरा वर्षांची झाल्यावर त्यांच्या नकळत मी त्यांची सगळी भविष्याची
पुस्तकं वाचली. मग पुण्याला येऊन मी माझ्याजवळच्या खाऊच्या पैशातून आणि
आई-बाबांच्या भत्त्यातून "नवमांश रहस्य", "सुलभ ज्योतिषशास्त्र" वगैरे
पुस्तकं आणून कुडमुडी ज्योतिषीण झाले. पुढे खूप वर्षं नरूमामा त्याच्या
भविष्योत्सुक मित्रांना आधी माझ्याकडे आणत असे! मग मी त्यांना "काय
प्रश्न आहे तुमचा?" असा एकच प्रश्न विचारून त्याचं एकच उत्तर द्यायचे.
यात मला माझ्या "मुद्दा सोडू नका" आर्जवापासून मोक्ष मिळाला.
पण आता मोठी झाल्यावर समजू लागलं आहे की काही नागमोडी वळणंच मूळ मुद्दा
सुंदर बनवतात. जर सगळेच मुद्दा धरून बोलू लागले तर जगातलं खूप सारं काव्य
कमी होईल. आणि असे खूप मुद्दे असतात जे उत्सुकतेच्या हिरव्या द-यांतून,
विनोदांच्या खळखळणा-या धबधब्यांतून आणि हसून हसून डोळ्यांतून येणा-या
ओलाव्यातूनच जास्त लोभसवाणे वाटतात. त्यामुळे माझ्या नकळत मला गोष्टी
सांगायचे धडे दिल्याबद्दल या सगळ्यांचे मन:पूर्वक आभार!!

Thursday, October 29, 2009

कुसूम आणि मालती

कुसुमअज्जी आणि ताईअज्जी दोघी ब-याच बाबतीत सारख्या होत्या पण तो सारखेपणा कधी जाणवलाच नाही. कारण दोघींचे तीच गोष्ट करायचे मार्ग अगदी वेगळे असायचे. ताजी जितकी बोलकी होती तितकी कुसुमअज्जी शांत. दोघींनाही फुलांचं फार वेड होतं. पण ताजीचं बागकाम म्हणजे निम्मं गप्पाकाम असायचं. तिची बाग सकाळी हीराक्काच्या मिशरीबरोबर खुलायची. मग दुपारी आमचा धोंडीराम गवळी आला की त्याच्याकडून कोल्हापुरातल्या बातम्या काढत तिचे वेल मांडवावर चढायचे. संध्याकाळी रॉकेलसाठी आलेल्या बायकांच्या चुगल्यांच्या जोडीनं तिचा अंगणातला सडा व्हायचा. कोणाचा नवरा पिऊन येतो, गावातल्या कुठल्या अल्लड बालिकेचं कुठल्या होतकरू सुकुमाराशी सूत जुळतंय, पाटलाच्या बायकोच्या अंगावरचे किती दागिने खरे आहेत वगैरे खास बातम्या मिळवत तिची बाग उमलायची. त्यात तिच्या बागेत विविध नातेवाईकांकडून आणलेली कलमं असायची. अगदी कुसुमअज्जीच्या माहेरच्यांकडूनही तिनी गुलाब, अनंत, मोगरा, ब्रम्हकमळ वगैरेंची रोपं आणली होती.
कुसुमअज्जीचं बागकाम म्हणजे तिची ध्यान करण्याची पद्धत होती. तिच्याही बागेत सुंदर गुलाब, मोगरा, चाफा, शेवंती असायचे. पण कुणालाही न दिसेल अशा गच्चीच्या एका शांत कोप-यात तिची बाग होती. तिथे ती मन लावून बागकाम करायची. कधी नरूमामाला मदतीला घ्यायची. ती धापा टाकत कुंड्या उकरत असताना तिच्या चेह-यावर एक वेगळीच शांतता असायची. त्यामुळे तिला मदत करायला जावं की नाही असा प्रश्न पडायचा.
ताजी आणि कुसुमअज्जी दोघीही कमालीच्या नीटनेटक्या होत्या. त्यांच्या खोल्यांकडे बघून अण्णाआजोबांच्या निवडीचा हेवा वाटायचा. पण यातही दोघींचे मार्ग वेगळे होते. कुसुमअज्जीच्या नीटनेटकेपणात गांधीजींची अहिंसा होती आणि हिटलरचा आग्रह होता! पुण्यात आई भुंग्यासारखी सारखी मागे लागायची. "सई, अभ्यासाचं कपाट आवरलंस का?"
"ऊठ आत्ता आवर!", अशा वाक्यांमध्ये माझी स्वच्छता चालायची. पण कुसुमअज्जी असं काहीही म्हणायची नाही. सकाळी उठल्यावर माऊची विचारपूस करायला पाच मिनिटं बाहेर जाऊन येईतो माझी रजई घडी घालून ठेवलेली असायची. अंघोळीहून आल्यावर मामीच्या आमटीच्या वासाने कधी पंचा जमिनीवर टाकून स्वयंपाकघरात गेले तर परत आल्यावर पंचा मच्छरदाणीच्या दांडीवर वाळत घातलेला असायचा. त्याची चारही टोकं कुठल्याशा आक्रमक भावनेने एकमेकांना बरोब्बर जुळवलेली असायची. टेबलावर चहा पिताना कपाचा ठसा उठला की अज्जी हातानी तो लगेच पुसायची. तिच्या या अगतिकतेचा मला विलक्षण संताप यायचा. मग तिनं माझं कुठलंही काम करू नये या तिरीमिरीत मीच माझी सगळी कामं तिच्याआधी उरकायचे. तिचा हा गांधीवाद माझ्या आईच्या दटावणीपेक्षा खूप प्रभावी ठरला!
ताजीसुद्धा खूप निटनेटकी होती. पण ती मात्र एकसारखी बोलायची. बाहेरून आलं की आमचे पाय तपासायची. कधी मुडशिंगीत चिंचा-आवळे काढून परत आलो की माझ्याकडे बघून, "काय हे सई! काय अवतार केलायस बघ बरं! एक वेणी सोडलेली तर एक तशीच! काय म्हणतील लोक तुला बघितल्यावर. तूच अरशात बघून ये", असं ऐकवायची.

तिच्या खोलीत मळक्या पायानी गेलो की ती सरळ बाहेर घालवायची.
दोघींनाही साड्या सुंदर घडी घालायची कला अवगत होती. पण ताजीचं घडी घालणं दुपारच्या मालिका बघण्यात, सुनांबरोबर गप्पा मारण्यात असायचं. कुसुम अज्जी मात्र तिच्या खोलीत मन लावून साड्या आवरायची. जणू काही ती देवपूजाच आहे अशा भावनेनं!
बोलणं आणि न बोलणं या एकाच गोष्टीमुळे दोघी खूप वेगळ्या वाटायच्या. ताजीला बोलायला ओळख, वेळ, जात, भाषा, धर्म हे कुठलेही नियम लागू नव्हते. रेल्वे प्रवासात कित्येकवेळा अर्धवट हिंदीत ताजी गुजराथी बायकांशी बोलायची. ओळखी काढायची तिला फार हौस होती. ती एक आणि दुसरी लग्न जमवायची. माझ्या आईच्या कित्येक "कु." मैत्रिणींची लग्न माझ्या बाबाच्या मित्रांशी जमवायचा ताजीने प्रयत्न केला. तिच्या तरुणपणी काही लोकांना घरातून पळून जाऊन लग्न करायलाही ताजीनी मदत केली होती. तरी नशीब तिचा वर जायचा नंबर लवकर लागला नाहीतर आत्तापर्यंत माझं तिनी वीसएकवेळा लग्न ठरवलं असतं. कुसुम अज्जी मात्र या बाबतीत ढ होती. संध्याकाळी ती झोपाळ्यावर बसायची. तेव्हा तिला प्रश्न विचारून त्रास दिला तर ती, "शांत बस जरावेळ. वा-याचा आवाज कसा येतो ते बघ", असं सांगायची. ताजी पण संध्याकाळी झोपाळ्यावर बसायची. पण ती मात्र सगळ्या गावाला घेऊन बसायची.

मला नक्की खात्री आहे की ताजी स्वर्गात गेल्या गेल्या तिथे खूप बदल झाले असणार. सगळ्यात आधी तिनं नारदाला आणि कार्तिकेयाला लग्न करायला भरीस पाडलं असणार.
"मी काय म्हणते नारदमुनी, असं किती दिवस खाली-वर करणार तुम्ही? इकडच्या तिकडं काड्या लावण्यापेक्षा एखादी इंद्राची अप्सरा धरा की! एवढ्या बायका अन् एकटा इंद्र बरं नाही दिसत!"
कार्तिकेयाला लग्नाचा सल्ला देण्याचं धाडस ताजीच करू शकली असेल.
"काय हे कार्तिकस्वामी! तुमचा मोरसुद्धा तुमचा डोळा चुकवून रोज नवीन लांडोर फिरवतोय! निदान तुम्ही लग्न केलंत तर त्याला तरी चोरी होणार नाही! आणि बायकांचा राग वगैरे तुमच्या मनात आहे हो! एकदा संसारात पडलात की सगळं आवडायला लागेल. अगदी बायकोसकट! तुमचा भाऊ बघा कसा दोन दोन बायका घेऊन बसतो! आमच्या ह्यांनी पण दोन केल्या! काही वाईट होत नाही!"

एखाद्यावेळी शंकर नुकताच तांडव करून शांत झाला असताना त्याच्या खोलीत जाऊन त्यालाही शिस्त लावेल.
"काय हे महादेवा! बघ जरा काय अवतार केलायंस! जटा पिंजारल्यास कशा ते तूच बघ. आणि तुझा डमरू एकीकडं, गळ्यातली रूद्राक्षं बघ कशी खोलीभर सांडलीत! गंगेचं पाणी झालंय कसं बघ सगळीकडं. कुणी भेटायला आलं तुला तर घसरेल की नाही तूच सांग. तुझा नागोबा पण पलंगाखाली घाबरून बसलाय. इतका राग बरा नव्हे. आमचे हे पण असेच दंगा करायचे. आता मी पण वर आले आणि कुसुमताईपण नुकत्याच आल्यात. कोण आता त्यांचा दंगा सहन करणार? पार्वती आहे म्हणून तुझे हे असले लाड चाललेत!"
त्याच्या जटांकडे बघून , "आणि काय रे? तुमच्याकडं खोबरेल तेल मिळत नाही? काय अवतार केलायंस केसांचा! उद्या तेल घेऊन येईन. मग तुझ्या डोकीत कडकडीत तेल घालून तुला न्हायला घालीन", असं सुद्धा म्हणाली असेल.
कुसुमअज्जी मात्र एखाद्या इंद्रधनुषी ढगाच्या टोकावर बसून ग्रेस किंवा महानोर वाचत असेल नक्की!

Sunday, October 25, 2009

भातुकली


आई, मला एक पुरी दे ना गं लाटायला!"
"सई, पायात येऊ नकोस माझ्या, पाहुणे येतील आता, त्यात तुझी लुडबूड नको आणि!"
"पण मी एकच पुरी लाटीन! तुझी शप्पथ!!"
"नंतर. एक दिवस सगळा स्वयंपाक तुला देईन. तेव्हा सगळं तूच कर."
"कधी?"
"लवकरच."

आणि माझी आई वचनाची पक्की आहे हे तिनी मला मी पाच वर्षाची असतानाच दाखवून दिलं! एका मे महिन्यात स्नेहा पुण्याला आली होती. तेव्हा माझ्या आईनी माझ्या सगळ्या मैत्रिणींना आमच्या घरी "खरी खरी भातुकली" खेळायला यायचं आमंत्रण दिलं! माझी शाळेतली घट्ट मैत्रीण पूजा, माझ्या नाचाच्या क्लासमधली सखी आसावरी, आईच्या मैत्रिणींच्या मुली, माझी मावस-चुलत बहीण लीलावती आणि माझी लाडकी स्नेहा अशी पलटण जमा झाली. आई-बाबा दोघेही या खेळात मॅनेजरची भूमिका सांभाळत होते. आणि ताजी तिच्या नेहमीच्या मजेदार थाटात पर्यवेक्षिकेचं काम करत होती. बाबाला सकाळी सकाळी भाजी आणायला फुले मंडईत पाठवण्यात आले. आमच्या उद्योग बंगल्याच्या बैठकीच्या खोलीत भातुकली कार्यक्रम ठेवला होता. मग दोन-तीन स्टोव्ह, आणि गॅसची शेगडी बाहेरच्या खोलीत जमिनीवरच मांडली आमची उंची लक्षात घेऊन. आगीचं काम मात्र सगळं आईकडे आणि विमलमावशीकडे होतं. त्या बोलीवरच माझी भातुकली सुरू झाली होती. आणि सगळ्या मुलींना सुती कपडे घालून यायचा आदेश होता. मुलींच्या आयांना आमंत्रण नव्हतं कारण मग आम्हांला काहीच करायला मिळालं नसतं. तसंच मुलींच्या बाबांनाही आमंत्रण नव्हतं कारण मग आम्हाला काहीच खायला मिळालं नसतं! मग नऊच्या आसपास मुली येऊ लागल्या. आम्हाला मधेच भूक लागू नये म्हणून सगळ्यांना आल्या आल्या पोहे खायला मिळाले.
पुरी, बटाट्याची सुकी भाजी, मटकीचा रस्सा, काकडीची कोशिंबीर आणि श्रीखंड असा बेत होता. मग सगळ्या मुलींना आधी बटाटे उकडायचं काम मिळालं. जशी जशी गर्दी वाढली तशी कामं पण वाटून देण्यात आली. मी आणि आसावरीने बटाट्यांच्या भवितव्याची जबाबदारी उचलली. स्नेहाला आणि मला वेगळ्या वेगळ्या गटात मुद्दाम टाकण्यात आलं होतं. बाबा श्रीखंड गटात सामील झाला. बाबाला डायबेटिस आहे. त्यामुळे तो नेहमी श्रीखंड गटाकडेच आकर्षित होतो. गेल्या काही वर्षांत बाबानी "ईक्वल श्रीखंड" या अभूतपूर्व डायबेटिक श्रीखंडाचा शोध लावून ते बनवण्यात प्राविण्य मिळवलं आहे! आई आणि विमल मावशी पुरी गटाचं नेतृत्व करत होत्या. स्नेहाला (अर्थातच) कणीक मळायचं काम मिळालं होतं. तिच्या पाचवीला बहुधा कणीक पुजली गेली असावी चुकून. वयाच्या पाचव्या वर्षी ही कामं करायला मिळणं म्हणजे मला आणि माझ्या मैत्रिणींना, "अजिं म्यां ब्रम्ह पाहिले" सारखं होतं. बटाटे कुकरमध्ये उकडतात, त्यांना गार व्हायला बराच वेळ लागतो, आणि गार न झालेला बटाटा सोलायचा प्रयत्न केला तर हाताला चांगला चटका बसतो, अशा खूप गोष्टी त्या दिवशी आम्हांला समजल्या. फोडणी कशी घालतात याचं आमच्या डोळ्यादेखत झालेलं प्रात्यक्षिक बघून नेहमी आम्हांला ऐकू येणा-या चुरचुरीत आवाजाचं रूप बघायला मिळालं! त्यात आईतली शास्त्रज्ञ या सगळ्या गोष्टी जमेल तितक्या सोप्या करून सांगत होती. आणि या भातुकलीत फक्त मुलीच सामील झाल्या नव्हत्या. चिकूदादा बाबाबरोबर आधुनिक पुरूषांचं प्रतिनिधित्व करत होता! त्याने पुरी गटात मौल्यवान भर टाकली आणि तळून झालेल्या पु-या पंगतीपर्यंत न खाता आमच्या भातुकलीला मोलाचे सहाय्यही केले!
मग काही मुली हळूबाईपणा करू लागल्या की आई त्यांना, "चला आटपा, बारा वाजता पंगत बसणार आहे. उशीर केलात तर तुमचा पदार्थ वाढला नाही जाणार!" असं म्हणून स्पर्धा सुरू करायची. मग खोलीतल्या एका कोप-यात आमचे बटाटे चरचरीत तेलाच्या आणि खरपूस कांद्याच्या फोडणीत पडले. त्याचवेळी खोलीच्या दुस-या टोकाला विमलमावशीच्या देखरेखीखाली मटकीचा रस्साही उदयाला आला. खोलीभर पसरलेल्या घमघमाटामुळे पोरींच्या पोटात कावळे ओरडू लागले. त्या उत्तेजनानीच की काय पुरी गटाचे हात पोळपाटावर गर गर फिरू लागले. पुरी गटाने वाटीचा साचा बनवून मोठ्या पोळीच्या पु-या केल्या होत्या. आणि आई आणि ताजी एकावेळी एका पोळीपासून तयार झालेल्या सगळ्या पु-या तळत होत्या. कोशिंबीर गट त्यांचे काम संपवून इकडे तिकडे नाक खुपसू लागला त्यामुळे त्या गटातल्या मुलींना इतर गटात विलीन करण्यात आले. खोलीच्या मधोमध बाबा आणि त्याचा पूर्ण गट हाऽऽ पसारा मांडून बसला होता. त्यामुळे आई सारखी, "हातासरशी पसारा आवरा" असा संदेश खास त्या गटाच्या पसा-याकडे बघून देत होती. त्याचा बाबावर काहीही परिणाम होत नव्हता. हे असं आमच्याकडे त्यानंतरची सगळी वर्षं चालत आलेलं आहे. श्रीखंड गटानी मात्र काम चोख केलं होतं. चक्का आणि साखर मिसळून तयार होती. त्यात भिजवलेले पिस्ते, काजू, बदाम आणि दुधात केशर घालून तयार केलेला रंग जाऊ लागला होता. सगळ्या गटांची चोरटी नजर श्रीखंड गटाकडे जात होती. सबंध खोलीच्या प्रत्येक कोप-यात आमचे पदार्थ नावारूपाला येत होते. त्यामुळे मिळून केलेल्या या जेवणाकडे सगळ्या मुलींचे डोळे लागले होते.

मग साडेअकराच्या आसपास पसारा आवरायची सूचना झाली. आम्ही भरभर आमच्या भाजीवर "भुरभुरायला" लागणारं खोबरं-कोथिंबीर मिश्रण तयार केलं. मग दोन मुलींनी केरसुणी घेऊन खोली झाडली, दोघींनी फरशी पुसली, उरलेल्या काहींनी ताटं, वाट्या, पेले, चमचे मांडले. खोलीच्या चारही भिंतींना लागून सतरंज्या घालण्यात आल्या आणि सगळ्या मुलींनी त्यांच्या भातुकलीचा आस्वाद घेतला. सगळ्यांचेच पदार्थ छान झाले होते. आणि का कोण जाणे आमचा स्वयंपाक अगदी आईच्या स्वयंपाकासारखा लागत होता!
मनसोक्त श्रीखंड-पुरी खाऊन परत बाबानी आणलेलं कॅन्डी आईस्क्रीमही आम्ही खाल्लं! दुपारी पोटोबा भरल्यावर आमचं फोटोसेशनसुद्धा झालं! बाबानी पाठवलेला हा एक फोटो सुद्धा माझ्याकडे आहे! त्यात सगळ्यांचे ओठ आईस्क्रीममुळे केशरी झाले आहेत! आसावरीच्या गो-या रूपावर तो रंग खूप गोड दिसत होता!

लहानपणी मी साधारण पाच वर्षाची झाल्यावर आईकडच्या मावश्या आणि बाबाकडच्या खाष्ट आत्या नेहमी, "सई मोठी झाली. आता अजून एक भावंड 'झालं पाहिजे'" असा सल्ला द्यायच्या. त्यावर बाबा, "नाही! आम्हांला एकच पुरे आहे." असं सांगायचा. त्यानंतर त्यांचे चेहरे बघायला मला आणि बाबालाही खूप मजा यायची. आई-बाबाच्या या "एकच मुलगी" प्रयोगावर खूप टीका झाली होती. कदाचित त्यामुळेच आई-बाबानी माझ्या लहानपणात मला इतर लोकांबरोबर मिळून करण्यासारखं खूप काही आहे हे सांगायचा इतका प्रयत्न केला!
माझ्या शिशुगटाच्या प्रवेशाच्या मुलाखतीत मला, "तुझ्या घरी कोण कोण असतं?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी, "चित्रे आजोबा, दौलत मामा, विमलमावशी, तिचा मुलगा योगेश, चित्रे अज्जी, संध्या ताई" आशी लांबलचक यादी दिली होती. त्यात आई बाबांचं नाव अगदी शेवटी आलं होतं! माझ्या आईला अजून त्या गोष्टीचं वाईट वाटतं! पण भावंड नसल्यामुळे लहानपणापासूनच सगळ्यांशी मैत्री करायची सवय मला लागली. पुढे शाळेत गेल्यावर मला माझ्यासारख्याच खूप "एकुलत्या एक मुली" भेटल्या. आणि त्यांच्यातच मला माझ्या नसलेल्या सगळ्या बहिणी मिळाल्या.
पण आई बाबाच्या या खेळकर उपक्रमामुळे मला त्या दोघांमध्ये माझे सगळ्यात जवळचे मित्र मिळाले!

Monday, October 19, 2009

चुरमुरे

कोल्हापुरातल्या काही गोष्टी फक्त कोल्हापुरातच बघायला मिळतात. जसं की कोल्हापूरच्या रिक्षा! पुण्यातला रिक्षावाला स्वत:च्या वाहनाकडे अत्यंत अलिप्तपणे बघतो. रिक्षा म्हणजे सकाळी सीटवर (स्वत:च्या पृष्ठभागाला पुरेल एवढं) फडकं मारून बसायचं साधन. मग त्यातून (शक्यतो लोकांना फसवून) जितका पैसा मिळवता येईल तितका मिळवायचा आणि संध्याकाळी तिला खोलीबाहेर ठेवून सरकारमान्य देशीच्या दुकानात जायचं!
कोल्हापुरातले रिक्षावाले सगळे ”देव’-गणावर जन्माला आलेले सत्पुरूष आहेत. बसमधून उतरल्या उतरल्या कोल्हापुरातल्या रिक्षेत चढण्यात जी मजा आहे ती मुंबई, लंडन किंवा अगदी ब्रिसबेनमधल्या टॅक्सीतसुद्धा नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे कोल्हापूरचे रिक्षावाले त्यांच्या वाहनाला त्यांच्या बायकोच्या सुंदर सवतीचा दर्जा देतात. पुण्यातला रिक्षावाला (ज्याला माझ्या आजोबांनी ’भामटा’ ही पदवी बहाल केली आहे), तुम्ही रिक्षेत बसलात की नाही ते सुद्धा न बघता फुर्र्रकन रिक्षा पुढे नेतो. कोल्हापूरचे रिक्षावाले आधी, "या या बसा" म्हणतात. त्यांच्या रिक्षा महालासारख्या सजवलेल्या असतात. सकाळच्या वेळी सुरेश वाडकरची ’ओंकार स्वरूपा’ची कॅसेट लावतात, शेजारीच उदबत्ती लावायची सोय असते. कोल्हापूरचे रिक्षावाले कधीही पुण्यातल्या रिक्षावाल्यांसारखे स्टॅन्डवर रिकाम्या वेळात "संध्यानंद" वाचताना दिसत नाहीत. वेळ मिळेल तेव्हा त्यांची रिक्षा चमकवत असतात. आणि त्यांच्या बोलण्यात विलक्षण आपुलकी असते. पुणेरी रिक्षेवाल्यांसारखे वळण सांगायला उशीर झाला तर लगेच अंगावर खेकसत नाहीत तर, "चालायचंच ताई! पुढून हाय की अजून एक टर्नं!" म्हणतात!

कुणाला वाटेल ही कथा, "बाई माझ्या माहेरचाऽऽऽ वैद्य" च्या चालीवर चालली आहे पण ज्या पुण्यातल्या रिक्षा-पीडित बापुडवाण्या व्यक्तीला याची खात्री करून घ्यायची असेल त्यानी लगेच कोल्हापूरच्या एशियाडमध्ये बसावं!
तशीच अजून एक खास कोल्हापूरची गोष्ट म्हणजे चुरमुरे. यावर काही पुण्यात राहणारे लोक, "शी! त्यात काय एवढं विशेष" असं नाक उडवून म्हणतील लगेच पण ज्यानी कोल्हापुरी चुरमु-यांची नजाकत पाहिलीच नाहीये तो त्याच्या अज्ञानात सुखी राहो! राजारामपुरीतल्या तिस-या की चौथ्या गल्लीच्या कोप-यावर एक चुरमु-याचे दुकान आहे. तिथे इतक्या प्रकारचे आणि इतके खमंग चुरमुरे मिळतात की तिथे गेल्यावर "याचसाठी माझा जन्म झाला असेल" असं म्हणावसं वाटतं. चुरमुरेमामा साधारण सात-आठ प्रकारच्या चुरमु-यांच्या पोत्यांच्या वर्तुळामध्ये बसलेले असायचे. चुरमु-यांशेजारीच खारवलेले आणि झणझणीत तिखट लावलेले दाणे असायचे. त्याबरोबरच वेगवेगळ्या चटक-मटक डाळीसुद्धा असायच्या. मी व अज्जी नेहमी खास चुरमुरे आणायला जायचो. मग परत येताना मी रस्त्यातच पुडा फोडून खायला सुरवात करायचे.
दुपारी कुणीच आमच्या भुकेला दाद देईनासं झालं की मी व स्नेहा चुरमु-यांमध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचो आणि गॅलरीच्या फटींमधून पाय खाली सोडून चुरमुरे खायचो. चुरमु-याचा लाडू आमच्या काही आवडत्या विरंगुळा खाद्यांपैकी होता.
पण या सुंदर चुरमु-यांमुळे किती पदार्थ खुलतात! कोल्हापुरी भडंग या चुरमु-यांमुळेच बहरते. पुण्यातल्या मारवाड्याकडे मिळणा-या प्लॅस्टीकच्या पिशवीतल्या चुरमु-यांची भडंग खाताना नेहमी मला सानेकाकूंनी अचानक गळ्यात मोहनमाळेऐवची घसघशीत कोल्हापुरी साज घातला आहे असं वाटतं. राजाभाऊच्या भेळेचा आत्मा याच चुरमु-यांमध्ये आहे.
कोल्हापूरची भेळही तिथल्या रिक्षावाल्यांसारखीच प्रामाणिक आहे. मामीचा हात भडंग बनवण्यात सरावलेला आहे. ती झोपेतही भडंग बनवू शकेल. तो कार्यक्रम बघायला आम्हाला फार आवडायचं. मोठ्या कढईत आधी तेल तापायचं मग त्यावर चरचरीत लसणीची फोडणी बसायची. आणि त्यात ते खमंग गोजिरवाणे चुरमुरे जायचे. आणि इतक्या घाऊक प्रमाणामध्ये हा प्रकार व्हायचा की दोन मोठाल्या डब्यांमध्ये ती भरली जायची. झाकणाखाली वर्तमानपत्र असायचं त्यामुळे पिठाच्या डब्यांमधून भडंग दुपारी नीट शोधून काढता यायची. मामा बॅंकेतून घरी आला की मोठ्या परातीत भडंग ओतायचा. मग मामी त्याला बारीक कांदा, कोथिंबीर चिरून द्यायची. हे सगळं भडंगेमध्ये घालून त्यावर मामा लिंबू पिळायचा. मग, "हं पोरिन्नो! करा सुरू" म्हणायचा. मामाबरोबर भडंग खायला खूप मजा यायची. परातीतून ताटलीत काढत काढत नंतर आमचे चमचे परातीतच डुबक्या मारू लागायचे. हा सोहळा बघून अज्जीला नेहमी भरून येत असे. मला त्यात एवढं भरून वगैरे येण्यासारखं काय आहे! साधी भडंगच तर खातोय! असं नेहमी वाटायचं. पण तशी भडंग बनवायला मामीचे हात, मामाचा उत्साह, गरम चहाची साथ, उन्हाळी संध्याकाळचा उ:श्वास आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोल्हापुरचे चुरमुरे लागतात हे लक्षात आल्यावर मात्र अज्जीच्या भावना समजतात!!

Thursday, October 15, 2009

आईमधला बाबा आणि बाबामधली आई

गेले दोन दिवस मी अाजारी आहे. आजारपणात साधारणपणे आईची आठवण येते सगळ्यांना, पण मला मात्र बाबाची आठवण येते. बाबानी माझी बरीच आजारपणं काढली आहेत. दवाखान्यात नेणे, अौषध देणे, अाल्याचा चहा करून देणे हे सगळे 'आई गुण' माझ्या बाबामध्ये आहेत!
आजाराच्या बाबतीत मी लहानपणापासूनच दुर्दैवी आहे. म्हणजे मी सारखी आजारग्रस्त असते असं नाही. पण मला नेमक्या वेळी आजारी पडता यायचे नाही. शाळा सुरू झाली की मी ठणठणीत असायचे. पण सुट्टीत मला नेहमी काहीतरी व्हायचं. शाळेतून सुट्टी मिळण्यासाठी सर्दी ही एकच व्याधी मला लाभली होती. माझ्या सर्दीचा कधी ब्रॉन्कायटीस झाला नाही ,निदान शाळेत असताना तरी. किंवा सर्दी एकदम तिस-या टप्प्यावर जाऊन दोन महिने सक्त आराम असं भाग्य पण मला लाभलं नाही. आमच्या शाळेतल्या कित्येक सदैव शेंबड्या पोरांना टॉन्सिलायटीस झाला होता. त्यांना शस्त्रक्रिया करावी लागे. आणि त्यानंतर म्हणे पथ्य म्हणून त्यांना आईस्क्रीम खायला देत असत. ही सगळी शेंबडी मुलं मी माझ्या कट्टर शत्रूंमध्ये सामील केली. दोन महिने शाळा नाही या एकाच कारणानी त्यांचा मत्सर वाटणे योग्य आहे. पण त्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून त्यांच्या पुत्र/पुत्रीव्रता आया माझ्या घरी रोज संध्याकाळी त्यांच्या वह्या पूर्ण करायला येत असत. ते बघून मला माझ्या आईला, "शिका जरा!" असं म्हणावसं वाटत असे. शाळेच्या बाबतीत माझा बाबा माझी आई होता. माझ्या आईने माझ्या शाळेचं तोंड खूप कमी वेळा पाहिलं. मी पहिली-दुसरीत असताना शाळेत खूप प्रसिद्ध होते. कारण मी खूप छान नाच करायचे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये नेहमी माझा खास एकटीचा नाच असायचा किंवा एखाद्या मोठ्या नाचातला महत्वाचा भाग मला मिळायचा. मी अभ्यासातसुद्धा काही वाईट नव्हते. त्यामुळे मुलामुलींच्या आयांमध्ये माझ्याबद्दल नेहमी चर्चा होत असे. त्यात एकदा कुठल्यातरी रिकामटेकड्या आईने, "सईला आई नाहीये", अशी अफवा उठवली होती. कारण सरळ आहे! रोज शाळा सुटली की बाहेर गेटात लूना, कायनेटिक, एम-एटी घेऊन आलेल्या आयांच्या घोळक्यात माझा बाबा उभा असे! पालकसभेत परत बायकांत पुरूष लांबोडा असलेला माझा बाबाच असायचा. माझ्या शाळेतल्या प्रगतीपुस्तकावर सहीसुद्धा बाबाचीच असायची. एवढंच नाही तर माझा बाबा माझ्या शाळेतल्या बाईंना ,"मुलांचा अभ्यास कसा घ्यावा", यावर फुकट सल्ला पण द्यायचा. जेव्हा माझ्या आईला ही अफवा समजली तेव्हा माझ्या शाळा-आयुष्याबद्दल सहिष्णुता दाखवायला एक दिवस ती सुट्टी घेऊन मला घ्यायला आली.
बाबा माझ्या अभ्यासावर खूप बारीक लक्ष ठेवायचा. मी परीक्षा देऊन आले की मला तो सगळी प्रश्नपत्रिका मी कशी कशी सोडवली ते विचारायचा. "हं इथे काय केलंस? याचं उत्तर काय आलं?" असले भयावह प्रश्न विचारायचा. खरं तर मला पेपर सगळा तसाचा तसा आठवायचा पण मी उगीच विसराळूपणाचा आव आणून त्याला निम्मी उत्तरं द्यायचेच नाही. पण माझ्या एकूण वागण्याचा अभ्यास करून आणि मी दिलेल्या उत्तरांवरून तो आधीच मला किती मार्क मिळतील ते शोधून काढायचा! मला मूळ परीक्षेपेक्षा ही सत्त्वपरीक्षा जास्त भीतीदायक वाटायची! विशेषत: वार्षिक परीक्षेनंतर या असल्या उलटतपासण्या मला बिलकुल आवडायच्या नाहीत. पण ह्या सगळ्यातून गेलं की बाबातला बाबा पुन्हा समोर यायचा आणि मला बर्फाचा गोळा खायला घेऊन जायचा.
आईनी बाबासारखा माझा अभ्यास घ्यावा ही माझी लहानपणीची इच्छा होती. पण रसायनशास्त्रात पी.एच.डी असलेल्या माझ्या आईने कधीही माझ्या केमिस्ट्रीच्या पुस्तकाला हात सुद्धा लावला नाही. तिनी मला नंतर स्वयंपाकघरात केमिस्ट्रीचे धडे दिले. जसं की, "अळूची भाजी करताना आधी अळूचा पी.एच. नियंत्रित करणे गरजेचे आहे! म्हणून त्यात ताक किंवा चिंच घालायची." कोबी, ढोबळी मिरची, वांगी असल्या भाज्यांमध्ये बदाबदा पाणी घालून त्याची चव बिघडवणा-या बायका आईला अजिबात आवडत नाहीत. आमच्या घरातले स्वयंपाकघर ही आईची घरातली लॅबोरेटरी आहे. तिथे बनणा-या प्रत्येक पदार्थाला जसं बनवलं आहे त्यासाठी ठराविक कारणे असतात. उगीच कुणी सांगितलं म्हणून केसकर मॅडम तसंच्या तसं करीत नाहीत! तसंच स्वयंपाक करणे म्हणजे फक्त चांगले पदार्थ बनवणे नव्हे तर 'प्रयोग' संपल्यावर ओटा किती साफ आहे यावरसुद्धा माझे मार्क अवलंबून असायचे. पहिल्या काही धड्यांमध्ये मला आईने स्वयंपाकातील मूळ क्रिया (अभियांत्रिकी शब्दात युनिट ऑपरेशनस्) शिकवल्या. त्यानंतर मला स्वयंपाकघरात मुक्त विहार दिला. त्यामुळे पहिल्या काही वर्षांत बिचा-या बाबाला माझे असे अनेक स्वैर प्रयोग खावे लागले. मग कधी कधी आई ऑफिसात असताना मी घरी रूचिरा उघडायचे. एक दिवस यात मठ्ठा करायची रेसिपी मी उघडली. त्यात, "ताकाला आलं लावा" असं वाक्य होतं. आता ताकाला आलं कसं लावणार? आलं काय रंग आहे जो ताकाच्या गालावर लावता येईल? मग मी आईला फोन करून ही समस्या विचारली. तेव्हा हसून हसून तिची पुरेवाट झाली.तसंच पिठात मोहन घालणे म्हणजे काय हेसुद्धा मला कोडं होतं. हा कोण मोहन? आणि त्याला बिचा-याला पिठात का घालावं कुणी? पण मोहन म्हणजे गरम तेल हे कळल्यावर मला असले शब्द वापरून मला कोड्यात टाकणा-या रूचिरावालीचा खूप राग आला होता. त्यामुळे मी आई हे एकच दैवत मानलं आणि सगळा स्वयंपाक तिच्याकडूनच शिकले. आता तिच्यासारखीच मीही एखादी गोष्ट आवडली की ती स्वत:च करायचा प्रयत्न करते. पण यातही खूप संशोधन आहे जे करायला मला मजा येते!

अजूनही फोनवर नेहमी तिचा स्वयंपाकासाठीच सल्ला घेतला जातो. फोन ठेवताना मात्र नेहमी, "सई तू रसायनशास्रात पी.एच.डी करते आहेस हे लक्षात आहे ना?" असा टोमणावजा प्रश्न ती विचारते.
आईमधली ही शिक्षिका जेव्हा मला दिसली तेव्हा मला त्या लूनावाल्या काळजी करणा-या आयांपेक्षा ती खूप जास्त आवडली. पण माझी आणि आईची स्वयंपाकघरातली गट्टी जमल्यावर काही वर्षं बाबाला त्याच्या तेथील अस्तित्त्वास मुकावं लागलं. पण अजूनही बाबानी सकाळच्या चहाचा आणि गुबगुबीत ऑमलेटचा मान सोडला नाहीये!
आईमधले खूप गुण मला 'बाबा गुण' वाटायचे. जसं की ती कधीही मला खोटी आशा दाखवायची नाही. मायेपोटी मला कधीही खोटं सांगायची नाही. शाळेतून बाहेर पडल्यावर माझ्या लक्षात आलं की इतर मैत्रिणींपेक्षा माझं वजन जास्त होतं. त्यामुळे त्यांना जसे कपडे घालता यायचे तसे मला यायचे नाहीत. याचा मला खूप त्रास झाला, पण आईने मला अगदी परखडपणे यातून बाहेर यायचा मार्ग सांगितला. तिच्या भाषेत "लाकडाच्या जाडजूड ओंडक्यापासूनच सुंदर शिल्प तयार होतं. त्यामुळे तू शिल्प कुठे आहेस आणि ओंडका कुठे हे तुझे तूच शोधून काढ!". आईचा हा सल्ला मानून मी सोळा -सतराव्या वर्षीच व्यायाम करायला सुरवात केली. त्याबरोबरच रोजचा आहार माझ्या प्रकृतीप्रमाणे बदलावा लागला. मग 'नाइलाजाने' का होईना, मी बाहेर जाऊन तेलकट पदार्थ खाणं बंद केलं. तसंच घरीसुद्धा फळं, भाज्या आणि वेगवेगळ्या कोशिंबीरी करायला शिकले! हे सगळं संतुलन साधून मला शिल्प बनायला चांगली दहा वर्ष लागली! पण दहा वर्षांनी मला माझ्यातल्या शिल्पापेक्षा माझ्या आईतल्या शिल्पकाराची जास्त जाणीव होते!
बाबानी मला शिस्त लावली. जो माझ्या मते 'आई गुण' आहे. सकाळी सहा वाजता उठणे, नियमित नाचाच्या क्लासला जाणे, नियमित अभ्यास करणे, हिशोब ठेवणे (जे मी कधीही नीट केले नाही) या सगळ्या गोष्टींमध्ये मला बाबामधली आई दिसली. आईने मला प्रयोग करायला शिकवले, नापास व्हायला शिकवले आणि नेहमी मी ख-या जगात कुठे आहे याची जाणीव करून दिली. यात मला आईतला बाबा दिसला.
पण आई आणि बाबा या जरी दोन वेगळ्या व्यक्ती असल्या तरी या दोन वृत्तीदेखील आहेत. आणि माझ्या आई-बाबांमध्ये या दोन्ही वृत्ती रसायनशास्त्रात दोन्ही बाजूला बाण काढून दाखवलेल्या संतुलनाप्रमाणे आहेत!
त्यामुळे ही गोष्ट आईतल्या बाबासाठी आणि बाबातल्या आईसाठी!

Tuesday, October 13, 2009

खुळी मायडी

मी पाच वर्षांची असताना पुण्यात हाकामारीची अफवा आली होती. ती म्हणे मुलांना पळवून न्यायची. सगळ्या मुलांनी त्यांच्या घराच्या दारावर फुल्या काढल्या होत्या. त्या फुल्यांना हाकामारी घाबरायची. ती कुठल्यातरी ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात हाक मारायची, आणि आपण कोण आहे बघायला बाहेर गेलो की पोत्यात घालून पळवून न्यायची. शहाण्या आई-बाबांप्रमाणे माझ्या आई-बाबांनी मला "हाकामारी वगैरे काही नसतं" असं सांगितलं होतं, त्यामुळे मी तशी निश्चिंत होते.
त्याच सुट्टीत कोल्हापूरला गेल्यावर मात्र "खुळी मायडी" हे नाव हाकामारीसारखंच स्नेहा घेऊ लागली. खुळी मायडी अख्ख्या कोल्हापुरात कुठेही असायची. तीसुद्धा लहान मुलांना पकडून त्यांना भीक मागायला लावायची. पण अशा खूप गोष्टी प्रचारात होत्या. तिला म्हणे लहानपणी आई-बाबांनी टाकून दिलं होतं. त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला व तिला आई-बाबांजवळ राहणा-या मुलांचा खूप मत्सर वाटू लागला. मनाच्या एका कोप-यात ही थाप आहे हे मला माहीत होतं. पण परगावाहून आलेल्या पाहुणीने यजमान मुलांच्या कुठल्याही मताला विरोध करायचा नसतो असा एक अलिखित नियम आहे. मीसुद्धा स्नेहाला पुण्यात जे काही सांगायचे त्यावर ती विश्वास ठेवायची.
मग आमच्या दुपारी 'मायडी दिसली तर काय करायचं' याच्या तयारीत जायच्या. खरं तर मायडी दिसल्यावर क्षणाचाही उशीर न लावता जमेल तितक्या जोरात पळून जाणे हा एकच मार्ग उपयोगी होता. पण का कोण जाणे तो आमचा अगदी शेवटचा मार्ग होता. खिशात तिखटाच्या पुड्या ठेवणे आणि ती जवळ आली की तिच्या डोळ्यात तिखट फेकणे हा आमचा सगळ्यात आवडता मार्ग होता. पण बाहेर जाताना काही केल्या मामी आम्हाला तिखट द्यायची नाही. त्यामुळे मायडीच्या डोळ्यात तिखट फेकायची आमची मनिषा अपूर्ण राहिली.
'घरात चोर आला तर काय करायचं' हा सुद्धा आमचा आवडता खेळ होता. त्यात तर काहीही उपाय होते. चोराला बसा म्हणायचं आणि तो बसायच्या आधी खुर्चीवर तापलेला तवा ठेवायचा. याही खेळात फोडणीच्या डब्यातल्या ब-याच गोष्टींचा वापर होत असे.
स्नेहानी मायडीला पाहिलं होतं. त्यामुळे ती नेहमी तिचं वर्णन करायची. ती म्हणे खूप जाड होती आणि तिला पूर्ण टक्कल होतं. लहान मुली घालतात तसे कपडे ती घालायची आणि तिच्याकडे नेहमी एक पोतडीसारखी पिशवी असायची. यातच ती मुलं लपवायची. मला हीसुद्धा थाप आहे याची पूर्ण खात्री होती. लहान मुलं नेहमी दुस-यावर छाप पडावी म्हणून थापा मारतात. मीसुद्धा अशीच थापाडी होते. त्यामुळे स्नेहाच्या मायडीबद्दलच्या रम्य कथा मी भक्तिभावाने ऐकायचे. रात्री अज्जीच्या कुशीत झोपताना तिला स्नेहा कशी मला घाबरवायचा प्रयत्न करते आहे पण मी कशी शूर आहे याचे दाखले द्यायचे. अज्जी त्यावर, "हूं आता झोप" यापलीकडे काही बोलायची नाही.
मग एक दिवस आम्ही मामाबरोबर पहिल्या गल्लीच्या बागेत भेळ खायला गेलो होतो. भेळ खायच्या आधी नेहमी मामा पाणीपुरीची भवानी देत असे. तर हातात पाण्याची बशी घेऊन रस्त्याकडे बघत आमचा पाणीपुरी कार्यक्रम चालला होता. तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरची चालणारी माणसं अचानक पांगली. त्यांच्या मध्यभागी फ्रीलचा फ्रॉक घातलेली संपूर्ण टक्कल असलेली, आणि खांद्यावर झोळी अडकवलेली बाई आम्हाला दिसली. सगळ्यांकडे बघून ती हातवारे करून जोरजोरात हसत होती. थोड्यावेळानी गर्दी कमी झाली आणि लोक तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले. माझी मात्र त्या दिवशी बोबडी वळली होती. त्या रात्री आणि नंतरच्या ब-याच रात्री मला झोपताना नेहमी मायडी आठवायची. आणि जर कोल्हापुरातली मायडी खरी आहे तर पुण्यातली हाकामारी सुद्धा असणार यावर माझा पूर्ण विश्वास बसला. त्यानंतर मीसुद्धा यासारख्या सगळ्या अफवांवर मनापासून विश्वास ठेवू लागले!

Friday, October 2, 2009

संध्याकाळ

खूप दिवसांपासून तुम्हांला सगळ्यांना मला मुडशिंगीला न्यायचंय. पण तिकडच्या रस्त्यावर माझे विचार गेले की त्यांना वाटेत ब-याच इतर आठवणी भेटतात. त्यामुळे पुढे जायच्या ऐवजी त्यांच्याच गोष्टी तयार होतात. तसं करत बसलो तर मुडशिंगीला पोहोचायला फार उशीर होईल.

मुडशिंगी, म्हणजे गडमुडशिंगी आमच्या कोल्हापूरच्या घरापासून बरोब्बर सात किलोमीटर दूर आहे. पण तिकडे गेल्यावर आपण दुस-याच कुठल्यातरी जगात आलोय असं वाटतं! तशा मुडशिंगीला जायच्या खूप पद्धती होत्या. नरूमामाच्या स्कूटरवरून जाण्यात आम्हांला सगळ्यात जास्त मजा यायची. मी व स्नेहा दोघी त्यावर मावायचो. पण मीनामामी असेल तर बसनी जावं लागायचं. मग आधी ती तयार व्हायची. कारण तिकडे बाकीच्या दोन माम्या होत्या ना! मग मीनामामी छान साडी नेसायची. पावडर-कुंकू (हा शब्द खास कोल्हापुरातच वापरतात) करून मी, स्नेहा व मामी निघायचो. त्यात अज्जीच्या सूचना सुरू असायच्या, "मुल्लींनो, मळ्याकडं गेलात तर विहिरीपाशी जाऊ नका बरंका!".
कमला कॉलेजच्या समोरच्या बस स्टॉपवर आमची बस यायची. त्या स्टॉपच्या पाठीमागे एक खूप जुना बंगला होता दगडी. मग मी आणि स्नेहा त्या बंगल्यात कशी भुतं राहात असणार याच्या कथा रचायचो फावल्या वेळात. लहानपणी आपली गोष्ट दुस-यापेक्षा जास्त चमत्कारिक असावी यासाठी काहीही गोष्टी बनवायची हौस होती मला. त्यामुळे माझ्या भुताच्या गोष्टी फार विनोदी असायच्या. माझी भुतं रात्री लहान मुलांसाठी आईस्क्रीम विकायची!

मग थोडावेळ वाट बघितली की के.एम.टी यायची. मी पुण्याच्या पी.एम.टी चं अजून दर्शन घेतलं नाही, पण कोल्हापुरात मात्र मी नेहमी बसनी प्रवास करायचे. बसमध्ये चढलं की ही बस मुडशिंगीला जाणार यात काही वादच उरायचा नाही. कारण बसमध्ये सगळे, "काय मीनावैनी!" म्हणून ख्यालीखुशाली विचारायला लागायचे.
"वसुची व्हय?"
"होय."
"चांगली गुटगुटीत झाली की आता!" (’गुटगुटीत’ पासून ते ’अंगानी जरा ज्यास्त’ पर्यंतचा प्रवास मी बरेच मूग गिळून केला होता.)
"ताईस्नी भेटायला चालला व्हंय?"
"होय. म्हंटलं मुलींना जरा घेऊन जावं."
मग अख्खा रस्ता घडघडण-या बसमधून बाहेर बघण्यात जायचा. दहा मिनिटांतच गडमुडशिंगी पंचायतीची कमान यायची. त्यातून आत गेलं की आधी हिराक्काचं घर दिसायचं. तिच्या घराला लागूनच आमचं कुंपण होतं. तिचं घर छोटंसं तर आमच्या घराला मात्र चांगलं मोठ्ठ दगडी फाटक आहे. त्यावर आजोबांचं नाव दगडावरच्या रेषेसारखं लिहिलं आहे!
घराच्या शेजारीच बस थांबते. उतरल्या उतरल्या सगळे, "वसूची काय?" असा प्रश्न विचारायचे. घराच्या अंगणापलीकडे राजामामाचं रेशनचं दुकान आहे. तिथे सगळ्या गावातल्या बायका रॉकेलच्या रांगेत उभ्या असायच्या. आम्हांला बघून त्यांना फार आनंद व्हायचा!
ताजीला आम्ही येणार हे माहीत असायचं. मग ती अंगणातच कुणाशीतरी गप्पा मारत उभी असायची. आमच्याकडे जेव्हा फोन नव्हता तेव्हा मामी गवळ्याबरोबर निरोप पाठवायची. मग ताजीला बघितल्यावर मी व स्नेहा पळत जाऊन तिला घट्ट मिठी मारायचो. हिराक्का कुंपणापलीकडून, "सई आली व्हय?" अशी लगेच पृच्छा करायची. ती ताईशी नेहमी कानडीत बोलायची. ताजीच्या माहेरी सगळे कानडी बोलतात. मग मी ताजीला मधे मधे , " अत्ता ती काय म्हणाली?" असे प्रश्न विचारायचे. आमच्या अंगणात पाण्याचा पंप होता. तिथे ताजीच्या "खास" मैत्रिणी धुणं धुवायला यायच्या. हिराक्का तिची खास होती. मग तिचं धुणं चालू असताना माझी एकसारखी बडबड चालू असायची. कुणी खेळायला नसेल, तर मी स्वत:शी बोलायचे! त्यामुळे हिराक्काचं, "वसुची पोरगी लईऽऽऽऽ बडबडती" हे वाक्य अजरामर झालं होतं.
मुडशिंगीच्या घरातसुद्धा झोपाळा आहे. अंगण, पडवी, मग तीन खोल्या, झोपाळ्याची खोली, स्वैयंपाकघर, देवघर, मागे हौद आणि मग परसात छोटीशी बाग! त्या बागेतूनच हिराक्का आणि ताजीच्या गप्पा रंगत असत. बागेच्या एका कोप-यात चूल होती. त्यावर अंघोळीचं पाणी तापायचं. त्या पाण्याला इतका सुंदर सरणाचा वास यायचा की मला साबण लावायला सुद्धा आवडायचे नाही. ताजीच्या खोलीत दोन पलंग होते. तिच्या खोलीला बाहेर उघडणारं एक वेगळं दार होतं. त्या दारात तिनी सुंदर वेल चढवला होता. पावसाळ्यात त्या वेलावर चांदण्यांसारखी फुलं यायची आणि पावसाच्या त्या थंड श्वासामध्ये मिसळून त्यांचा सुगंध संपूर्ण घरात दरवळायचा. कुसुमअज्जीसुद्धा ताजीच्या या वेलावर भाळली होती. पण त्या दोघींच्यात मात्र कधी रुक्मिणी आणि सत्यभामेचा प्रश्न उद्भवला नाही. कारण कदाचित त्यांचं कृष्णापेक्षा पारिजातकावरच जास्त प्रेम होतं!
अरूमामा म्हणजे माझा थोरला मामा. त्याची बायको सुरेखामामी. तिच्या हातची गरम भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी मिळायची! तिच्या भाकरी जादुई असतात. इतकी पातळ आणि गोल भाकरी मी अजून कुठेच बघितली नाहीये. मुडशिंगीत मी सगळ्या भुकेच्या वेळांना दही, ठेचा आणि भाकरी खाते. राजामामाची बायको मधूमामी मला हवा तेव्हा, हवा तेवढा चहा करून द्यायची. दुपारी सगळे झोपले की मी व स्नेहा राजामामाच्या दुकानात जायचो. मग तो सांगेल तशी साखर, गहू मोजून लोकांच्या पिशव्यांमध्ये घालायचो. त्याबद्दल तो लगेच आम्हाला पगार द्यायचा. मी पोत्यांतले कच्चे गहू खायचे. कच्चा गहू थोड्या वेळानी चुईंगम सारखा होतो.
मग उन्हं उतरली की अरूमामा चहा प्यायचा आणि मग आम्हांला मळ्याकडं घेऊन जायचा. ताजी त्याला आम्हांला तिन्हीसांजेच्या आत घरी आणायची सूचना करायची लगेच. त्यावेळी म्हणे दृष्ट, बाधा अशा गोष्टी प्रबळ होतात. त्यावर माझा विश्वास नाही. पण कधी कधी त्या संध्याकाळच्या वेळी उगीच उदास वाटतं हे मला अनुभवानी कळू लागलं!
मामाच्या मळ्यात नेहमी ऊस असायचा. मग ऊस काढून मळा दमला की हरबरा लावायचा. कधी गुलाब असायचे तर कधी वांगी. कधी खास तिखट मिरची. हल्ली हल्ली मामानी केळीची बाग केली आहे. तिथे दुपारी जाऊन झोपण्यात जे सुख आहे ते दुस-या कुठल्याही गोष्टीत नाही. मळ्याच्या मध्यभागी एक छोटी खोली आहे आणि त्याला जोडून गोठा आहे. मामा खूप वेळा त्या खोलीत ताणून देतो. पलिकडच्या खोलीत एक जोडपं राहतं. त्यांच्या छोट्या मुली इकडे तिकडे उड्या मारत असतात.

त्या खोलीला लागूनच आमची सुप्रसिद्ध विहीर आहे. त्या विहिरीवर एका मोठ्या चिंचेच्या झाडानी स्वत:चं अंग टाकलं आहे. त्याच्या फांद्यांवर सुग्रणींची खूप बि-हाडं आहेत. ती बघायला मला फार आवडायचं. कधी कधी मामा माझ्यासाठी पिलं उडून गेलेलं घरटं आणायचा. ते मी पुण्याला घेऊन यायचे. माझ्या वर्गातल्या कुणीच तसं घरटं बघितलेलं नसायचं. पण त्या झाडाच्या चिंचा मात्र आमच्या नशिबात नव्हत्या. पण आम्ही चिंचेची पानं खायचो मग!
कधी कधी मजा म्हणून मामा मला शेतात वांगी तोडायला पाठवायचा. मग सगळ्या बायका माझ्याकडे अगदी कौतुकाने बाघायच्या. मला वेगळी टोपली मिळायची आणि मी त्यांच्यासारखीच वांगी तोडायचे! मग मी तोडलेली वांगी आम्ही घरी घेऊन यायचो. लगेच सुरेखा मामी त्याचा रस्सा नाहीतर भात करायची.
मी खूप लहान असताना राजामामाकडे गाई होत्या. तो धार काढू लागला की मी तिकडे बघायला जायचे. तेव्हा तो माझ्या तोँडावर दुधाची पिचकारी उडवायचा!
खूप लहान असताना उठल्यावर ताजी दिसली नाही की मला खूप घाबरायला व्हायचं. मग मी धावत मागच्या बागेत जायचे. तिथे ती झाडलोट करत असायची. मला बघितल्यावर, "उठलीस? चहा देऊ?" असं विचारायची. मग चहा, खारी खाऊन तिनी तापवलेल्या पाण्यानी अंघोळ करायचे. ताजीला मुलींना नाहायला घालायला फार आवडायचं. ती आमच्या केसांत तेल घालायची, कानात तेल घालायची आणि मग गरम पाण्यानी खूप छान अंघोळ घालायची. पुढे "मोठ्या" झाल्यावरचे सगळे सोपस्कार तिनी एकटीने पाळले आमच्या बाबतीत. आम्हाला साड्या घेऊन दिल्या, न्हाऊ घातलं, पुरणाचे कडबू केले!
मुडशिंगीतली अजून एक आवडती गोष्ट म्हणजे कासाराकडे जायचं. मामीबरोबर बांगड्या भरायला जायला खूप मजा यायची. कासाराच्या दुकानात बांगड्यांच्या भिंती असायच्या. त्यातल्या हव्या त्या बांगड्या निवडून आम्ही भरून घ्यायचो. मग लाल चुटुक बांगड्या घालून आम्ही दिवेलागणीला घरी यायचो. बांगड्यांचा आवाज व्हावा म्हणून उगीचच हात हलवत रहायचो. सातनंतर मात्र अरूमामाचे सगळे मित्र जमायचे अंगणात. राजकारणावर चर्चा करायचे! कुणी त्यात मामाकडे शेतीविषयक सल्ला मागायला यायचं. पण मुडशिंगीत सात नंतरचा वेळ मला खूप अस्वस्थ करायचा. खेडेगावातल्या संध्याकाळी फार एकाकी असतात. त्या मनापासून आवडायला मनाला थोडं हळू करावं लागतं. रस्त्यावरचा प्रकाश, छोटी छोटी थकलेली घरं, कुणाचातरी पिऊन घरी आलेला दादला, घराघरांतून येणारा भाकरीचा आणि तिखटाच्या फोडणीचा वास, त्यात सातपासूनच मिसळलेला रातकिड्यांचा आवाज. हे सगळं शहरापेक्षा खूप खरं असतं. शहरात संध्याकाळ नेहमी सातच्या मालिकांमध्ये आणि मुबलक विजेच्या दिमाखात झाकोळलेली असायची. त्यामुळे थकलेला दिवस त्याचं जग रात्रीच्या स्वाधीन करून जाताना कुणाला दिसायचाच नाही. ती वेळ फार फार नाजूक असते. कधी कधी माझ्या सहा वर्षाच्या मनातसुद्धा कुठल्यातरी अनामिक भीतीचा सूर खेड्यातली ती संध्याकाळ लावून जायची. त्यामुळे मी सातनंतर ताजीच्या मांडीवर डोकं ठेवून तिला गोष्टी सांगायला लावायचे. पण अशा कित्येक संध्याकाळी गेल्यानंतरही तिन्हीसांजेचे ते काजळ डोळे अजूनही तितकेच भुलवतात!

Thursday, October 1, 2009

सायकल

एका सुट्टीत स्नेहाकडे नवीन सायकल आली होती! तिची उंची वाढवायचा हा उपक्रम होता. स्नेहा मोठी असल्यामुळे तेव्हा ती माझ्यापेक्षा तशी उंच होती. पण मग खेळायला गेल्यावर मीही तिची सायकल चालवू लागले. माझ्याकडे पुण्यात छोटी दोन चाकी सायकल होती. मला बाबानी माझ्या पाचव्या वाढदिवसाला ती घेऊन दिली होती. बाबानी मला खूप लहानपणी सायकल चालवायला शिकवली. आधी मी बाजूला दोन "आधार-चाकं" लावून सायकल फिरवायचे. त्या न पडणा-या सायकलीवर मला खूप सुरक्षित वाटायचं. पण दोन-तीन महिन्यांतच बाबानी ती चाकं काढून फेकून दिली माळ्यावर. त्यामुळे मला ख-या ख-या दोन चाकी सायकलीचा सामना करावा लागला. मग मी तिच्यापासून दूर पळू लागले. "आज सायकल चालवलीस का?" असं विचारल्यावर गुळमुळीत उत्तर देऊन पळ काढू लागले. माझी मांजराच्या पिलांना परडीत घालून सायकलीवरून फिरवायची स्वप्नं पण नष्ट झाली या अरिष्टामुळे.
मग बाबानी त्याचा "कोच" अवतार धारण केला! बाबा खूप चिकाटीचा शिक्षक आहे. कितीही मंद विद्यार्थी असला तरी तो तितक्याच उत्साहानी शिकवतो. त्यात तो स्वत: सैनिक स्कूलमध्ये शिकलेला असल्यामुळे त्याला खेळांची आणि व्यायामाची फार आवड आहे. मग त्याने ठरवले की रोज सकाळी पळायला जाताना तो मला घेऊन जाणार. सकाळी सकाळी माझं पांघरूण खसकन ओढून मला थंड फरशीवर तो उभी करायचा. मग एक डोळा बंद आणि एक उघडा अशा अवस्थेत मी सायकलवर चढायचे. बाबाला खुलं मैदान वगैरे मिळमिळीत उपाय अजिबात आवडायचे नाहीत. मी सायकलला घाबरते, पडायला घाबरते म्हणून त्याने भर टिळक रस्त्यात मला सायकल शिकवायचा चंग बांधला. माझ्या सायकलीला मागे धरून तो माझ्याबरोबर पळायचा. बाबानी मागे धरले आहे या विश्वासामुळे मी एका आठवड्यातच रोज लवकर उठू लागले. आमची वरात टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परत येताना बाजीराव रस्त्यावरून जायची. सकाळची रहदारी तितकी भीतीदायक नसायची. पण आम्ही जात असताना शाळेतली पोरं, त्यांच्या आया, रिक्षावाले, दूधवाले आमच्याकडे बघून खूप गोड हसायचे. मग एखादं चालायला जाणारं जोडपं दिसायचं. त्यातली बायको तिच्या ढेरपोट्या नव-याला बाबाकडे बघून कोपरखळी मारायची. मला त्यावेळी बाबाचा खूप अभिमान वाटायचा!
पण पहिला आठवडा गेल्यावर मला "जेव्हा बाबा हात सोडेल" त्या दिवसाची जाम भीती वाटू लागली. एक दिवस घराच्या मागच्या शांत गल्लीत मी बाबाशी कुठल्यातरी गहन विषयावर चर्चा करीत असताना त्याला विचारलेल्या प्रश्नाचं तो उत्तरच देईना, म्हणून सहज मागे कटाक्ष टाकला तर बाबा दूर गल्लीच्या कोप-यावरच होता! त्यानी कधी हात सोडला मला कळलंच नाही. पण त्यानी हात सोडलाय हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी सरळ गोखल्यांच्या तारेच्या कंपाऊन्डमध्ये जाऊन धडकले. पायात तार बोचली आणि गुढगाही सोलवटला. मग मात्र मला बाबाचा खूप राग आला. घरी येऊन आईला कधी एकदा, "मला आज बाबानी पाडलं" असं सांगते असं झालं. पण आईला ते कळल्यावर ती खूप छान हसली. का कोण जाणे माझं पडणं खूप महत्वाचं होतं!
मग कोल्हापूरची स्नेहाची उंच सायकल मी तिच्यापेक्षा छान चालवू लागले. आम्ही दुपारी सायकल बाहेर काढायचो. आणि भर दुपारच्या उन्हात अगदी एस.टी स्टॅन्डपर्यंत जायचो. स्नेहा रहदारीला घाबरायची पण मी तोपर्यंत खूप शूर झाले होते. कधी आम्ही डबलसीट जायचो तर कधी एक एक करून त्याच रस्त्यावर कोण आधी येतं याची शर्यत लावायचो. कधी गल्लीत अनवाणी खेळत असताना अचानक सायकल सफर करावीशी वाटायची. मग वर जाऊन चप्पल घालून यायचादेखील धीर नसायचा. तसेच सायकलवर चढायचो आणि भटकायला जायचो.
सायकलवरून पडायची भीती गेल्यावर तिचा खरा आनंद मिळू लागला. मग मांजरीचं पिल्लू, कुत्र्याचं पिल्लू अशी सगळी प्राणी मंडळी माझ्या सायकलवरून जा- ये करू लागली. आणि पडायची भीती खूप वेळा पडूनच गेली! पण अजूनही पहिल्यांदा पडल्याची आठवण मनात ताजी आहे.
बाबानी मला पडायला शिकवल्याचा मला पुढे खूप उपयोग झाला. अजूनही होतोय. पण सगळ्या धडपडीमधून नेहमी काहीतरी खूप सुंदर मिळतं हे आता पक्कं डोक्यात बसलं आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी पडताना येणारा पोटातला गोळा लगेच जाणार आहे याची खात्री वाटते!

Thursday, September 24, 2009

पाळीव प्राणी

लहानपणी मला एक फार मजेदार सवय होती. कुठल्याही प्राण्याचं पिल्लू दिसलं की लगेच मी ते पाळायची स्वप्नं बघायचे.
अशी मनातल्या मनात मी खूप पिल्लं पाळली होती. बाबाबरोबर पेशवे बागेत गेलं की, "ए बाबा आपण वाघाचं पिल्लू पाळूया ना!" अशी मागणी व्हायची. मग बाबा मला आधी समजावायचा प्रयत्न करायचा. पण माझा एकूण उत्साह बघता, "हो पाळूया हं. आईला विचारू आधी", अशी समजूत घालायचा. केरळमधल्या जंगलात मला हत्तींचा कळप दिसला. लगेच मला हत्तीचं पिल्लू पाळायचे डोहाळे लागले. सोलापुरात गाढवाचं पिल्लू बघूनसुद्धा मी "कित्ती गोड!" म्हणायचे. तसंच काही दिवस मला आपल्या घरात जिराफाचं पिल्लू असावं असंही वाटत होतं!
माझ्या कल्पनेतील 'पाळीव' प्राणी बघून मी वास्तवात फक्त रस्त्यातली कुत्र्याची आणि मांजराची पिल्लं घरी आणू शकते ही माझ्या जन्मदात्यांसाठी खूपच चांगली बातमी होती. रोज संध्याकाळी मी आणलेली पिल्लं विमलमावशीचा नवरा (दौलतमामा) पोत्यात घालून सोडून यायचा. मग सकाळी उठल्यावर माझा पुन्हा प्राणीशोध सुरू व्हायचा.
पण प्राण्यांशी खेळण्यात जी मजा यायची ती मला दुस-या कुठल्याही गोष्टीत सापडली नाही. मांजरीच्या पिल्लासमोर दो-याला बांधलेली बांगडी नाचवायला मला फार आवडायचं. मांजराची पिल्लं तासंतास त्याच गोष्टीशी खेळतात. सुरुवातीला पंज्याने बांगडीला डिवचतात. मग जसजसा खेळ अवघड होत जाईल तसतसे त्यांचे प्रयत्नही बळावतात. कधी कधी माऊचं पिल्लू दोन्ही पंज्यांनी बांगडी पकडायला जायचं आणि तिच्यात अडकून बसायचं. मग अपमान झाल्यासारखं दूर जाऊन बांगडीकडे दुर्लक्ष करायचं. पण डोळ्याच्या कोप-यातून नेहमी तिच्यावर नजर ठेवून असायचं. मग बांगडी जरा सुस्तावली (म्हणजे बांगडीच्या सूत्रधाराला खेळ वाढवायची हुक्की आली) की पिल्लू दबा धरून बांगडीवर चाल करून यायचं. मला ही चाल फार म्हणजे फार आवडायची. त्यात मांजराची गती एखाद्या नर्तिकेसारखी किंवा एखाद्या चढत्या तानेसारखी वाढायची. आणि कधी कधी ते दर्शन मला दिल्याबद्दल मी ती बांगडी सोडून द्यायचे. त्या पिल्लाचा फार हेवा वाटायचा. किती एकाग्र चित्ताने त्या बांगडीचा पाठलाग करायचं ते! इतकी शक्ती, इतकी आशा - ती पण एका फडतूस दो-याला टांगलेल्या बांगडीसाठी! पण त्याची कीव पण यायची. ’काय वेडं बाळ आहे!’ असंही वाटायचं.
नंतर मोठी झाल्यावर असाच एक खेळ खेळताना लक्षात आलं की देवपण आपल्या प्रत्येकाला अशीच एक बांगडी देत असतो, आणि आपल्या एखाद्या अशाच डौलदार चालीसाठी आपल्यावर ती बांगडी आनंदाने भिरकावीत असतो!
जसं मांजराच्या बाळाच्या थिरथिरेपणाचं मला कौतुक वाटायचं तसंच मला राजामामाच्या गोठ्यातल्या गाईच्या संथपणाचंही कौतुक वाटायचं. खूप वर्षं मला गाईलाच का देवाचा दर्जा देतात हा प्रश्न पडला होता. अज्जीने दूध, दही, ताक, लोणी, तूप व त्यातून फुटणा-या चवदार पदार्थांच्या फांद्या मला खूपवेळा समजावल्या होत्या. तसंच बागेतले सुगंधी गुलाब शेणखतामुळे तितके खुलतात हेसुद्धा सांगितले होते. पण मग हे सगळं आऊच्या म्हशीमुळे पण होऊ शकेल असं मला वाटायचं. त्यामुळे माझी गाडी गाय आणि म्हैस या एका फाट्यावर येऊन अडकायची.पण मग अशाच एका निरभ्र दुपारी मामाच्या मळातल्या बोधिवृक्षाखाली मला उलगडा झाला. मामाची गाय तासंतास रवंथ करायची. आपल्यालाही अशी नंतर चावायची सोय असती तर रोज रात्री आईपासून सुटका तरी झाली असती असं मला नेहमी वाटायचं. तिच्या शेपटीवरच्या माश्यांना जमेल तितका वेळ ती तिथे राहू द्यायची. मग शेपटीच्या अगदी हलक्या झटक्याने त्यांना उडवायची. कधी कधी मांडीवरची कातडी दुधावरच्या सायीसारखी हलवून माशा उडवायची. मिळेल तो चारा कुठल्याशा अध्यात्मिक तंद्रीत रवंथ करणारी ती गरीब गाय कुठे आणि आऊच्या नाकी नऊ आणणारी तिची नाठाळ म्हैस कुठे!
आऊच्या म्हशीच्या पायात मोठा ओंडका होता. आऊच्या घराची तटबंदी तोडून कित्येक वेळा तिची म्हैस गाव भटकायला जात असे. बिचारी आऊ मग ज्याला त्याला, "माझी म्हस दिसली का?" म्हणून विचारत जात असे.
त्यामुळे लवकरच मला गाईचा महिमा लक्षात आला!
तसंच पोपटाशी बोलायला मला फार आवडायचं. आमच्या उद्योग बंगल्यात घरमालकांचा पोपट होता. त्याच्याशी बोलण्यात मी मांजराच्या पिल्लाइतकीच चिकाटी दाखवायचे. तो पहिला अर्धा तास कितीही शीळ वाजवली तरी किर्र्र् अशा अंगावर शहारे आणणा-या आवाजाखेरीज काही बोलायचा नाही. पण मग धीर न सोडता शीळ वाजवत राहिलं की अचानक तो तश्शीच शीळ वाजवायचा. त्याच्यामुळे मी खूप लहान वयात छान शीळ वाजवायला शिकले.
एकदा बागेत खेळत असताना मला गुलाबांच्या झुडपांत कबुतराचं एक छोटं पिल्लू जखमी होऊन पडलेलं मिळालं. मग त्यानंतरचे तीन दिवस त्याला कापसात गुंडाळून चमच्यानी भाताची पेज पाजण्यात गेले. आई बाबा पण माझ्या मदतीला आले. पण तिस-या दिवशी पिल्लाने धीर सोडला. त्यानंतर खूप प्राणी आले आणि गेले, पण ते पिल्लू मात्र मला फार लळा लावून गेलं.
अजूनही मी व बाबा बाहेर गेलो आणि रस्त्यात एखादं गाढवाचं किंवा मांजराचं पिल्लू दिसलं की बाबाच "कित्ती गोड!" असं ओरडतो! जर लहानपणी माझे सगळे प्राणीहट्ट पूर्ण केले असते तर आज बाबाला सगळी पेशवे बाग सांभाळायला लागली असती!

Wednesday, September 23, 2009

मदत

मोठ्या माणसांना एक क्रूर सवय असते. लहान मुलं मजेत खेळताना दिसली की त्यांना काम सांगायचं.
मी व स्नेहा अशा कितीतरी प्रसंगांतून पळ काढायचो. पण या कामांतही काही सोपी कामं आम्ही फक्त कौतुक व्हावं या एकाच हेतूने आनंदाने करायचो. त्यात अज्जीची जवळपास सगळी कामं असायची. अज्जी नेहमी साधी कामं सांगायची. कुठेतरी पळत जात असेन तेव्हा तिची, "ए साय", अशी गोड हाक यायची. मग तिच्या खोलीत गेलं की ती सुई-दोरा घेऊन बसलेली दिसायची. "मला एवढा दोरा ओवून दे गं" असं मऊ बोलायची. त्याला नाही म्हणताच यायचं नाही. उलट दोन तीन वेळा दोरा ओवता आला असता तर अजून बरं झालं असतं असं वाटायचं. मग मी अगदी एका क्षणात दोरा ओवून द्यायचे. त्यावर, "तुझे डोळे नुसतेच सुंदर नाहीत, तर किती उपयोगी आहेत!" असं ती सांगायची.
आणखी एक अज्जी-काम म्हणजे झाडांना पाणी घालणे. हे काम मी स्वत:हून करायचे नाही, पण ते सांगितल्यावर करायला ’नाही’सुद्धा म्हणायचे नाही. उन्हाळ्यात सकाळपासून तापलेल्या गच्चीवर पाण्याचा पाईप घेऊन जायला खूप मजा यायची. मग गरम गच्चीवर पहिल्यांदा पाणी ओतलं की सिमेंटचा वास यायचा. मग कुंड्यांमध्ये पाणी घालताना मातीचा! तहानलेली माती सगळं पाणी शोषून घ्यायची. ते पहायला मला फार आवडायचं. गुलाबाच्या फुलांवर पाणी शिंपडून त्यांना तजेलदार बनवायलाही मला खूप आवडायचं.
आजोबांची कामं पण सोपी असायची. ते सकाळी उठल्यापासून खूप वेळा त्यांची जागा बदलत असत. सकाळी झोपाळ्यावर, मग दहाच्या सुमाराला समोरच्या गॅलरीत, दुपारी जेवायला स्वयंपाकघरात, मग संध्याकाळी गच्चीवर. त्यांच्यामागून त्यांचा उकळलेल्या पाण्याचा तांब्या घेऊन जायचं काम आम्हाला मिळायचं. ते करायला काही वाटायचं नाही. ’कधी आजोबा व्याख्यानाला निघाले की त्यांचे बूट आणून द्यायचे’ हेही काम मला खूप आवडायचं. त्यांच्या सुपारीच्या डब्याची ने-आणसुद्धा मी करायचे. मग कधी खूष होऊन ते मला सुपारी अडकित्त्याने कातरून द्यायचे. ते बघायला मला फार आवडायचं. ते नसताना खूप वेळा मी मला अडकित्ता वापरता येतो का ते बघायचे.
पण मीनामामीची कामं मला अजिबात म्हणजे अजिबात आवडायची नाहीत. कारण ती तिला नको असलेली किचकट कामं आमच्या गळ्यात घालते अशी माझी थोड्याच दिवसांत खात्री झाली होती. त्यामुळे तिच्यासमोर मी नेहमी मरगळलेला चेहरा ठेवायचा प्रयत्न करायचे. मी व स्नेहा जरा खुशीत दिसलो की, "काय हासताय गं मुल्लींनो! इकडे या" असा हुकूम व्हायचा!

मग गेलं की , "स्नेहा कणीक मळ आणि सई लसूण सोल" असा आदेश व्हायचा लगेचच!
स्नेहा मला कधीच कणीक मळू द्यायची नाही. त्यामुळे मला नेहमी लसूण सोलायचं काम मिळायचं. आणि हे काम नक्की म्हणजे नक्की मामीच्या "नको" यादीत असणार. हल्ली कशा "ग्रीन हाऊस ढब्बू मिरच्या" असतात तसं तेव्हा नसायचं. त्यामुळे बहुदुधी-आखूडशिंगी लसूण नसायचा. एका लसणाच्या गड्ड्यात तीसएक पाकळ्या असायच्या. त्या पण अगदी चिंगळ्या. त्यांच्यावरची साल गेली की नाही हे कळायला पण काळ लागायचा. परत सोललेली सालं पण जपून ठेवायला लागायची कारण वा-यानी ती उडाली की मग मामीचा पारा चढायचा. मग एका हाताने लसूण सोलायचा आणि दुस-या हाताने सालींचं रक्षण करायचं. नंतर हाताला वास यायचा ते वेगळंच. मी ब-याच वेळेस पाव लसूण सालींमध्ये मिसळून सरळ कच-यात टाकायचे. पण यातही डोकं वापरावं लागायचं. अर्धा लसूण फेकला तर मामीला कळेल!
तसंच चित्रहार बघायला बसलं की "शेंगा फोडायचा" कर भरावा लागत असे. पण यातसुद्धा ’सोललेले दाणे खायचे नाहीत’ ही अट असायची. कोवळे मटार सोलायचे पण खायचे नाहीत! असल्या बोच-या कामांना माझा विरोध होता.
मीनामामी सकाळी उठून खूप वेळ पाणी उकळायची. पंचेचाळीस मिनिटं तिची घागर शेगडीवर असायची. माझ्या बाबानी या अकारण पाणी उकळण्याच्या सवयीचा बिमोड करण्यासाठी तिला खूप समजावायचा प्रयत्न केला. पण ती तासभर पाणी उकळायचीच. कधी कधी तिनी उकळलेल्या पाण्याच्या वाफेचे ढग बनून पाऊसही पडून जायचा पण तिचे पाणी उकळणे थांबायचे नाही. हे पाणी गार झाल्यावर फिल्टरमध्ये घालायची जबाबदारी कधी कधी आमच्यावर यायची. तीही मला आवडायची नाही. कारण त्यासाठी मला ओट्यावर चढावे लागे. एवढ्या उकळेल्या पाण्याला परत फिल्टरमध्ये घालून आम्ही बहुधा पेल्यातून पाण्याचा आत्मा पीत असू!

नरूमामा स्कूटर धुवायला आमची मदत घ्यायचा. तो अंगणात आणि नळ गॅलरीत. त्यामुळे 'योग्य वेळी' पाणी सोडणे आणि बंद करणे हे काम आमचे असायचे. मग नरूमामा लाडका असल्याने ते मी मुद्दाम अयोग्य वेळी करायचे आणि त्याला भिजवायचे.
मे महिन्याच्या सुट्टीत हा आमचा उपयोग सिद्ध करायचा मला फार कंटाळा यायचा. कुणी सारखी कामं लावली की "अभ्यास असता तर निदान कारण तरी मिळालं असतं" असं सारखं वाटायचं. पण शाळा सुरू झाल्यावर मात्र रोज लसूण सोलायची पण तयारी असायची. पण आता रोज लसूण सोलताना मीनामामीची आठवण येते. इकडच्या मिरच्या आणि लसूण सोलायला आणि चिरायला सोपे असले तरी कोल्हापुरी मिरचीच्या ठेच्याची सर त्याला कुठली!

Thursday, September 17, 2009

अज्जीचे कपाट

लहानपणीच्या काही उद्योगांपैकी एक म्हणजे कपाटं उघडणे आणि उचकटणे! बाकीची लहान मुलं हे करतात की नाही मला माहीत नाही, पण मी मात्र कपाटोत्सुक असायचे. प्रत्येकाचं कपाट वेगळी गोष्ट सांगायचं. अर्थात हा उद्योग मी घरात एकटी असतानाच करायचे. आईचं कपाट तिच्यासारखंच असायचं. नीट-नेटकं पण काही काही कप्प्यांमध्ये खूप सा-या गमती असलेलं. ती खूप वर्षं चेह-यावर फक्त "वसंत-मालती" का असल्याच कुठल्यातरी नावाचं क्रीम लावायची. त्याच्या न उघडलेल्या बाटल्या तिच्या कपाटात सापडायच्या. माझ्यापासून लपवून ठेवलेली सौंदर्यप्रसाधने मिळायची. तिचे आणि बाबाचे मी कोल्हापूरला असताना केलेल्या सुट्टीचे फोटो मिळायचे. जे बघून संध्याकाळी मी "ब्रूटस तू सुद्धा?" च्या थाटात तिची वाट बघायचे! खालच्या कप्प्यात वेलची, केशर, पिस्ते, अक्रोड असला सुका-मेवा असायचा जो माझ्यापासून आणि कामवाल्या बाईपासून लपवायला तिथे ठेवला जाई. तिचं कपाट उघडताच मंद अत्तराचा वास यायचा. तो वास घेतला की मला आपण आईजवळ आहोत असं वाटायचं.
बाबाचं कपाट उघडताना जरा भितीच वाटायची. आईच्या धाकानी "आवरलेलं" त्याचं कपाट उचकटताना मात्र काही काळजी वाटायची नाही. त्याच्या कपाटात नेहमी सिगारेटचं एक पाकीट असायचं. पहिल्यांदा जेव्हा आपला बाबा सिगारेट ओढतो हे लक्षात आलं तेव्हा मला त्याचा खूप अभिमान वाटला होता. का कोण जाणे! त्याच्या कपाटातही माझ्यापासून लपवलेल्या अनेक गोष्टी असत. छोटा टेपरेकॉर्डर. मी तो खूप वेळा बाहेर काढून वाजवून परत होता तसा आत ठेवायचे. बाबाच्या कपाटाची खालची फळी जरा कमकुवत झाली होती. त्याचं खरं कारण मी त्या फळीवर चढून अजून काय काय आहे ते तासंतास बघायचे हे होतं. त्याच्या कपाटात अनेक 'या गोष्टींचं काय करायचं?' या यादीतल्या गोष्टी असायच्या. त्यामुळे ते उचकटायला मजा यायची.
पण सगळ्यात मजेदार कपाट अर्थातच अज्जीचं होतं. तिच्या कपाटात इतक्या मजेशीर गोष्टी होत्या की तिनी नेमून दिलेला "उचकटायचा तास" सोडून सुद्धा तिच्या नकळत खूप वेळा मी त्या कपाटात जायचे. खालच्या कुलूपवाल्या कप्प्यात तिचे व तिच्या आईचे दागिने होते. ते बघायला मला व स्नेहाला खूप आवडायचे. तिच्या आईच्या वेणीत माळण्यासाठी सोन्याचं पाणी असलेली चांदीच्या फुलांची माळ होती. ती फक्त स्नेहाच्या वेणीत शोभून दिसायची. मग तिचे पैंजण,बांगड्या, बिलवर, गोठ, जोंधळी पोत एवढंच काय पण नथसुद्धा मी माझ्या नकट्या नाकात लटकवून बघायचे. त्यानंतरच्या वरच्या कप्प्यात फोटो अल्बम होते. आईच्या लग्नाचा अल्बम बघायला पण मला आणि स्नेहाला खूप आवडायचं. मग, "बाबा किती जाड होता नै?", "अज्जी अण्णा आजोबांचे केस काळे होते की ते कलप लावायचे?" असले भोचक प्रश्न पण विचारले जायचे. त्यावर अज्जी सुद्धा खुसखुशीत उत्तरे द्यायची.
त्यानंतरचा कप्पा आमच्या डोक्यावर होता त्यामुळे तिथे अज्जी सगळ्या दुर्मिळ आणि सुंदर वस्तू ठेवायची. तिच्याकडे जुन्या काळचा एकच रूपाया मावेल असा क्रोशाने विणलेला बटवा होता. त्यातून तो रूपाया बाहेर काढायची सुद्धा एकच छुपी पद्धत होती. एका बाजूला जुन्या काळातला बिस्किटांचा लोखंडी डबा होता. त्यात अज्जी मण्यांच्या माळा ठेवायची. तसाच एक डबा तिच्या शिवणकामाच्या साहित्याचा सुद्धा होता. तो थोडी मोठी झाल्यावर तिने मला दिला. त्यात मी मला आलेली पत्रं ठेवायचे. अजूनही पुण्यात तो उघडला की मला माझं सगळं शाळापण आठवतं. शाळेतली माझी घट्ट मैत्रीण अमेया मला एकाच वर्गात असूनही पत्र लिहायची. ती पत्र आम्ही वह्यांच्या कव्हर मधून लपवून एकमेकींना द्यायचो आमची गुपितं लिहून! ती सगळी पत्र त्या डब्यात आहेत! आता मजा वाटते वाचायला!
सगळ्यात वर, जिथे आम्हाला काही केल्या जाता येणार नाही (अज्जीच्या मते) तिथे "जंगल" होतं. पुठ्ठयाच्या पुस्तकात शेकडो तुकडे जोडून तयार केलेलं जंगल. ते अज्जीच्या भावाने तिला परदेशातून आणलं होतं. पण ते पुस्तक उघडल्यावर सगळं जंगल तयार उभं रहायचं. त्यात जिराफ, माकड, गेंडा, वाघ, पक्षी, हरिण सगळं सगळं होतं. ते जंगल बघण्यात आमची बरीचशी दुपार जायची. त्याच कप्प्यात एक बाहुलीचं पुस्तक होतं. त्यात बाहुलीचा चेहरा आणि पाय तसेच रहायचे पण पानं उलटताना प्रत्येक पान तिचा नवीन पोषाख असायचा. पलिकडल्या पानावर तो पोषाख घालून ती कुठे चालली आहे त्याचं वर्णन पण असायचं. तिच्याकडे अज्जीला भेटायला जायचा वेगळा पोषाख होता. ते वाचून मला नेहमी हसू यायचं, "काय वेडी आहे! अज्जीकडे जायला कशाला हवेत वेगळे कपडे?" हा प्रश्न मला नेहमी पडायचा!
त्याच कप्प्यात मात्र्योष्का बाहुलीसुद्धा होती. एकात एक ठेवलेल्या रशियन बाहुल्या. त्या मला फार म्हणजे फार आवडायच्या. त्या उघडताना देखिल लाकडाचा आवाज यायचा, जो अज्जीला अजिबात आवडायचा नाही कारण त्याने म्हणे तिच्या अंगावर शहारे यायचे. पण मला तो आणि भिंतीवर नखं घासल्यावर येणारा आवाज तेव्हा फार आवडायचा.
तसंच अज्जीने नंतर एक पुस्तकांचं कपाट केलं. त्यात देनिसच्या गोष्टी या नावाचं रशियन पुस्तक मला सापडलं. ते पुस्तक माझ्या आयुष्यात आलं नसतं तर माझं चित्र पूर्ण झालच नसतं. देनिस आणि त्याचा मित्र मिष्का यांच्या गोष्टी ऐकून आणि वाचून मी व अज्जी खूप हसायचो!
अज्जीच्या कपाटातला सगळ्यात निषिद्ध पदार्थ म्हणजे सुपारी. मला येता जाता सुपारीचे बकाणे भरायला फार आवडायचे. त्यामुळे अज्जी तिचा सुपारीचा डबा रोज लपवून ठेवायची. नेहमी सगळ्यात वरच्या कप्प्यात! पण मी आणि स्नेहानी त्यावरही मात केली होती. अज्जी शेजारी पाजारी असेल तेव्हा मी आधी कपाटाशेजारच्या टेबलवर चढायचे. मग तिथून थोडीशी उडी मारून तिस-या कप्प्यावर चढायचे. मग स्नेहा खाली स्टूल बनून थांबायची आणि मी लोंबकाळून एका हातानी सुपारीचा डबा घट्ट धरायचे. मग खाली पडायचे. सुपारी खाऊन हा सगळा प्रकार पुन्हा करायचो आणि डबा वर ठेवायचो.
मी तोतरी होईन अशी भिती दाखवण्यात आली. पण चहा पिऊन मी अजुनही काळीकुट्ट झाले नव्हते त्यामुळे मोठ्यांच्या थापांमध्ये मी तोतरेपणा समाविष्ट केला होता!
अजुनही खूप गमती-जमती होत्या अज्जीच्या कपाटात. कधी कधी माऊ तिच्या कपाटातच पिल्लं द्यायची. अज्जीला याचा खूप मन:स्ताप व्हायचा. पण आम्हाला मात्र त्याच्याइतका दुसरा आनंद कधी व्हायचा नाही!
अज्जीचं कपाट उघडताना आम्ही नकळत खूप कपाटं उघडली. त्याचा उलगडा अजून होतोय. पण कपाटं उघडण्याची जागा आता कामाने, वाचनाने, लेखनाने आणि विचारांनी घेतली आहे. मनातलं एक कपाट उघडलं की अज्जीच्या कपाटासारखी लाखो सुरस आणि चमत्कारिक कपाटं उघडली जातात!

लेख तपासल्याबद्दल गायत्रीचे आभार (आधीच्या सगळ्या लेखांसाठीसुद्धा!)

Sunday, September 13, 2009

उद्योग बंगला

"नेहमी नेहमी काय कोल्हापूर? पुण्याबद्दल लिही की काहीतरी!"- इति आई! पण पुण्यातल्या छान आठवणी लिहायल्या घेतल्या तर अजून एक उन्हाळ्याची सुट्टी तयार होईल! पुण्यातलं माझं लहानपण फार वेगळं होतं. आम्ही शुक्रवार पेठेत एका मोठ्या बंगल्याच्या तळमजल्यावर भाडेकरू म्हणून राहात होतो खूप वर्ष. त्या बंगल्याचं नाव "उद्योग" होतं. त्यामुळे ते नाव पुढे नेत मी उद्योगी झाले. त्या घराच्या आजूबाजूला छान बगीचा होता, अंगण होतं आणि अंगणात छोटासा हौद होता. माझी आई त्या हौदावर डाळी वाळत घालायची. एकदा कुठल्याशा बालिश खेळात मी तिने वाळत ठेवलेली सगळी डाळ हौदात सारली होती. तसं मी का केलं असेल याचं कारण मला आजही माहीत नाही. पण अशा अनेक उद्योगांनी मी आईला हैराण करत असे! एका अशाच निरागस रविवारी दुपारी मी सर्फचा अख्खा पुडा डोक्यावर ओतला आणि नळाखाली उभी राहिले. जेव्हा फेस सीमेपार गेला तेव्हा मात्र घाबरून आईला झोपेतून उठवायला तिच्या खोलीत माझ्या आकाराचा फेसाचा ढग गेला. बाहुल्यांचे केस कापायची मला फार आवड होती. पण माझ्यासारखे त्यांचे केस परत उगवत नाहीत हे कळेपर्यंत ब-याच बाहुल्यांचे बळी गेले!
उद्योग बंगल्यात फक्त मीच उद्योजिका होते. माझी आई अजून उद्योजिका झाली नव्हती. त्यामुळे नुकती लग्न झालेली, कोल्हापुरातून पुण्याला आलेली माझी आई खूप खूप साधी होती. तशी ती अजूनही तशीच आहे. पण तेव्हा ती सगळे रविवार माझ्यासाठी कपडे शिवण्यात घालवायची. त्यात तिची सगळी कला-कुसर दिसायची. कॅम्पमध्ये जाऊन ती सुंदर लेस, तलम कापड, छान छान बटणं घेऊन यायची आणि मग सगळी दुपार तिच्या छोट्या मशीनवर माझ्यासाठी कपडे शिवायची. कापड उरलं तर माझ्या बाहुलीलाही तसेच कपडे शिवायची. माझ्या वर्गातल्या सगळया मुलींमध्ये सगळ्यात सुंदर आणि कल्पक कपडे माझे असायचे.
आई सोमवारी ऑफिसला जाऊ लागली की मी रडून तिच्यासमोर लोटांगण घालायचे. रविवारचा अख्खा दिवस तिच्या आजूबाजूला बागडत घालवल्यावर सोमवार मला अगदीच रूक्ष वाटायचा. मग मी रविवारी संध्याकाळी तिला म्हणायचे,"आई तू उद्या जाऊ नकोस कामाला. उद्याच्या दिवस आपण गरीब-गरीब राहू." तशी आई खुदकन हसायची. पण सोमवारी माझ्या या प्रतिभावंत वाक्याचा काही उपयोग व्हायचा नाही.
आमच्या पुण्याच्या घरात पण झोपाळा होता. त्यावर मी व बाबा बसून खूप गाणी म्हणायचो. बाबा पण माझ्याबरोबर गाणं शिकायला यायचा. त्यामुळे तो माझ्याकडून कधी कधी झोपाळ्यावर "रियाज" करून घेत असे. कधी कधी रविवारी आई चिकन बनवायची. मग सकाळपासून मी तिच्या आजूबाजूला मांजरीसारखी घुटमळायचे.
"चिकन झालं?"
हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून तिला भंडावून सोडायचे.
पण रविवारचा सगळ्यात सुंदर उपक्रम म्हणजे सकाळी सकाळी पर्वतीवर जाणे. मी, आई आणि बाबा लवकर उठून पर्वती चढायचो. तिथे वरती पारिजातकाचं झाड होतं. त्याची फुलं वेचून ती नंदीवर वाहायला मला फार आवडत असे. खूप लवकर गेलं की तो सडा अजून कुणीच पाहिला नसायचा. त्यामुळे तशा पारिजातकाची फुलं वेचण्यात वेगळीच मजा असे. बाबा खूप वेळा पर्वती चढायचा. मग मी आणि आई त्याची वाट बघत बसायचो. त्याचं झालं की मिळून खाली यायचो. मग पॅटीस आणि क्रीमरोल घ्यायचो. तसं बघायला गेलं तर ही अगदी साधी रविवार सकाळ आहे. पण आता उगीचच ती साधी सकाळसुद्धा खूप महत्वाची वाटते! आई तेव्हा जशी होती तशी ती आता नाही, बाबा पण नाही आणि मी ही! त्यामुळेच कदाचित त्या सकाळी आता खूप मौल्यवान वाटतात!
आमच्या शेजारी चित्रे आजोबा-आजी रहायचे. मी त्यांच्या घरात हळू हळू शिरकाव केला आणि नंतर त्यांच्यातलीच एक झाले. चित्रे आजोबा माझे सवंगडी होते. त्यांच्यामुळे मला कधीच मित्र-मैत्रिणींची कमी भासली नाही. ते माझ्याबरोबर भातुकलीपासून रंगपंचमीपर्यंत सगळे खेळ खेळायचे. त्यांच्या बिचा-या चार केसांच्या वेण्या घातल्याचेही माझ्या लक्षात आहे! त्यांच्या घरी जेवायला मला खूप आवडायचे. आईला मात्र या गोष्टीचा फार संकोच वाटायचा. त्यामुळे सकाळी ती माझ्या नकळत भाजी-पोळी त्यांच्याकडे ठेवायची, त्या नको म्हणत असतानासुद्धा. पण जेवायला बसलं की मला माझ्या आईचा स्वैपाक लगेच ओळखू यायचा. त्यामुळे बरेच दिवस माझ्या आईला "माझ्या पोरीला माझा स्वैपाक आवडत नाही" या गोष्टीचा खूप त्रास झाला. एरवी अन्नपूर्णेनंतर पहिलं नाव तिचं घेतलं जातं. त्यामुळे हा आघात तिने तसा अध्यात्मिकतेने घेतला असावा.
आमच्या घरासमोर व्हरांडा होता. त्याला लागून तीन पाय-या होत्या. संध्याकाळी सहा वाजता मी व चित्रे बाबा त्या पाय-यांवर आईची वाट बघायचो. मग कोप-यावर आईची एका बाजूला झुकलेली मान दिसायची. मी लगेच गेटकडे धाव घ्यायचे. मला आईवर माकडासारखी उडी मारताना बघून रोज चित्रे बाबांच्या डोळ्यात तस्सच हासू येत असे. आई घरी आली की चित्रे बाबा हळूच त्यांच्या घरी परत जायचे. मला मात्र आई आल्याच्या आनंदात ते कधीच जाणवले नाही.
आशी किती माणसं हळूच आली आणि हळूच गेलीही! कधी कायमची तर कधी मोठ्या माणसांच्या भांडाभांडीत. कधी गाव बदलला, तर कधी देश. कधी माझ्याच जुन्या कपड्यांमध्ये मी मावेनाशी झाले. पण जाणारी प्रत्येक व्यक्ती एक खण करून जाते. आणि मग एक दिवस अचानक आपल्या हातात खूप रंगीबेरंगी खणाच्या बांगड्या आहेत असं लक्षात येतं!
अशीच ही एक बांगडी, पुण्याची!

Thursday, September 3, 2009

कुसूम अज्जी

आजपर्यंत कुसुम अज्जी खूप वेळा उन्हाळ्याच्या सुट्टीवर डोकावली आहे. पण आज मात्र तिच्यासाठी खास ही जागा. काही काही माणसांचं आपल्या आयुष्यातील अस्तित्व मोठं होताना नेहमी आठवतं. ती माणसं त्या वेळेस, त्या ठिकाणी नसती तर कदाचित आपण जसे आहोत तसे झाले नसतो. आणि त्या माणसांबरोबरच ती वेळही महत्वाची असते. तसंच माझं बालपण होतं. अज्जीचा अज्जीपणा मी जितका अनुभवला तितका कदाचित माझ्या आईनेही तिच्या या आईचा "आईपणा" अनुभवला नसेल. तसं तिचं नाव घेतलं की काय काय आठवतं. तिचे हात आठवतात. तिची बोटं लांब आणि कमालीची लवचिक होती. त्या हातानी ती दिलरूबा वाजवायची. त्याच्या राकट तारेवरून तिची बोटं फिरताना दिसली की आम्हाला फार मजा वाटायची. दुपारच्या वेळात खूपवेळा मी व स्नेहा तिचा दिलरूबा वाजवायचो. कुणाला हे वाद्य माहित पण नसेल. त्याला व्हॉयलिनसारखी एक लांब काठी होती. जिच्यावर हरणाच्या शेपटीचे केस लावले होते. तिला आम्ही गारगोट्यांनी साफ करायचो.
तिचे हात रोज सकाळी ताक करायचे. तिला ताक करायला फार आवडायचे. आणि ते आग्रहाने सगळ्यांना द्यायला त्याहूनही जास्त. ताकातलं लोणी काढून काढूनच कदाचित तिचे हात इतके मऊ झाले असावेत. मी भोकाड पसरून रडू लागले की, "रडू नकोस", म्हणून माझे ती त्या साय हातांनी डोळे पुसायची. मला ती लाडानी "साय" म्हणायची. मुलीची मुलगी म्हणजे दुधावरची साय, आणि माझं नावही सई!
तिनी मला जितक्या गोष्टी सांगितल्या, तितक्या बाबानी पण नसतील सांगितल्या. इसापनिती, पंचतंत्र, अरेबियन नाईट्स, रविंद्रनाथ टागोर या सगळ्यांची माझ्याशी ओळख कुसुम अज्जीने करून दिली. अज्जीची "राईचरण" मला अजुनही तशीच्या तशी आठवते. ती रविंद्रनाथांनी लिहिली आहे हे कळायलाही बरेच दिवस लागले. कुसुमाग्रज, भा.रा.तांबे, बालकवी, सुरेश भट आणि मोठी झाल्यानंतर आरती प्रभू या सगळ्यांशी माझा परिचय अज्जीने करून दिला. पण तिचा हा गुण चोरगुण होता. कारण मला या सगळ्या कविता कशा आवडायला लागल्या हे मला तिच्यापासून फार दूर गेल्यावर समजलं. तिनी हळूच जे माध्यमाचं काम केलं ते कदाचित तिला स्वत:ला सु्द्धा जाणवलं नसावं. कोल्हापुरातल्या तिच्या उबदार खोलीत पहाटे डोळे उघडताच ती योगासने करताना दिसायची. मग मी पण दात न घासताच तिच्या पावलावर पाऊल ठेवून आसने करू लागायचे. ती प्राणायाम करताना मात्र तिची नक्कल करू लागले की तिला मनापासून हसू येत असे. तिच्या मागून तिच्या मांजरीसारखीच मी सगळीकडे जायचे. मग एका मोठ्या कपात ती मला लवंग घातलेला चहा द्यायची. सकाळी तसा चहा प्यायला मला अजूनही आवडते.
अज्जी खूप विद्वान होती. नेहमी तिला तिच्यासारख्या लोकांची संगत मिळाली नाही. पण मग ती तिच्या खोलीत, तिच्या विश्वात खूप रमायची. वाचन करायची, तिच्या दूर देशातल्या भावंडांना पत्र लिहायची. त्यांच्या मुलांची खुशाली विचारायची. तिला तिच्या माहेरच्या लोकांचा फार लोभ होता. तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना कधी कधी तिचे डोळे पाणावायचे. मग मला उगीच अज्जीला ह्या गोष्टी सांगायला लावल्या असं वाटायचं. पण तसं म्हणताच, "नाही गं वेडाबाई, तुला नाही सांगणार ह्या गोष्टी तर कुणाला सांगणार मी?", असं म्हणून डोळे पुसायची. तिचे सगळे भाऊ अमेरिका, रशिया, इंग्लंडला जाऊन आले होते. त्यांची पत्र तिनी कपाटात जपून ठेवली होती. कधी कधी मला ती जुनी पत्र दाखवत असे. त्यातल्या मजकुरापेक्षा त्यातील कलाकृती बघण्यासारखी असायची. दादा मामा (अज्जीचे थोरले भाऊ) नेहमी काहीतरी गंमत करून पत्र पाठवायचे. कधी कागद गोल कापून त्यावर पत्र लिहायचे, कधी पूर्ण पत्र एक मोठी कविता असे! मला हे बघायला फार आवडायचे. पण त्या पत्रांमधून अज्जीचे आयुष्यभराचे शल्य पण परदेशी जात असे. ते मला आजकालच जाणवू लागले होते.
मला व स्नेहाला रोज दुपारी अज्जी साड्या नेसवून द्यायची. सहावारी साडी वरून दुमडून आमच्या छोट्याशा देहावर छान बसवून द्यायची. मग आमची भातुकली रंगली की अज्जी निवांतपणे झोपायची. एकदा तर बाहुला बाहुलीचं लग्न सुद्धा लावलं होतं. माझा बाहुला (पम्पकिन) आणि स्नेहाची बाहुली (रत्नावली) अशी जोडी होती. माझा बाहुला लठ्ठ आणि नकटा होता पण स्नेहाची बाहुली मात्र खूप देखणी होती. मग कुठेतरी समतोल साधावा म्हणून माझा बाहुला डॉक्टर आहे असं जाहीर करण्यात आलं. लग्नाची तारीख ठरली. त्या दिवशी आम्ही दोघी अज्जीबरोबर मंडईत गेलो. शेवंतीची खूप फुलं आणली व त्यांचे गजरे केले. मग नवरा-नवरीच्या डोक्याचे माप घेऊन त्यांच्यासाठी फुलांच्या मुंडावळ्यासुद्धा केल्या. अज्जीकडे तिच्या कुठल्याशा भाचीच्या लग्नातल्या मुंडावळ्या होत्या. त्या ही तिनी आमच्यासाठी तिच्या कपाटातल्या चोरकप्प्यातून बाहेर काढल्या. आदल्या दिवशी मला व स्नेहाला मंगलाष्टकं शिकवली. ती आम्ही घोकून पाठ केली. मग लग्नादिवशी बाहुलीला व आम्हाला अज्जीनेच साड्या नेसवून दिल्या! पम्पकिनला फेटा बांधण्यात आला. अंतरपाटावर मी व स्नेहानी स्वस्तिक काढले. मग सगळ्या शेजा-यांच्या साक्षीने आमचे, "लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकसुरा" सुरू झाले.
सुट्टी संपल्यावर मात्र सासूच्या नात्याने तिची बाहुली पुण्याला घेऊन जायचा बेत केल्यावर स्नेहाताईंनी माझ्याशी कडाक्याचं भांडण केलं!
अज्जीचा हा रसिकपणा तिच्या आयुष्यातील घडामोडी बघता फार आश्चर्यकारक होता. आईच्या लहानपणीची "दुसरी बायको" म्हणून त्रासलेली अज्जी माझ्या लहानपणी मात्र खूप शांत आणि रसिक झाली. सकाळी ती परडीभरून फुलं वेचायची. मग बाजारात जायची. कोवळे दोडके, नाजूक भेंडी, अळू, ताजा मुळा अशा त-हेत-हेच्या भाज्या आणायची. मग ताक करायची. दुपारी माझ्यासाठी खूप वेळ खमंग बेसन भाजून लाडू करायची. नेहमी आम्हांला अंबाबाईच्या देवळात घेऊन जायची. परत येताना आमचे सगळे बालहट्ट पूर्ण करायची. तिच्या आयुष्यातील हा नियमितपणासुद्धा कदाचित तिच्या रसिकतेचे कारण असावा. तिला मी कधीच दु:खी पाहिले नाही. तशी तिची कुणाकडून फारशी अपेक्षाही नसे. तिच्या खोलीतले तिचे आयुष्य ती नेमाने आणि आनंदाने जगायची.
कधी कधी गॅलरीत मी व अज्जी संगीत शारदा वाचायचो. त्यातलं "म्हातारा इतुका" मला फार आवडत असे. ती आईच्याच शाळेत मुख्याध्यापिका होती. त्यामुळे तिच्या व आईच्या मजेदार गोष्टी सुद्धा ती खूपवेळा सांगायची. एकदा आईने वर्गातल्या दोन मुलींच्या वेण्या एकमेकींना घट्ट बांधून ठेवल्या. त्या कुणालाच सोडवता येईनात. तेव्हा आईला सगळ्या वर्गासमोर छान धम्मकलाडू मिळाला होता. ती गोष्ट अज्जीकडून ऐकायला मला फार आवडायचे.
तिला फुलांचं फार वेड होतं. तिच्या खोलीत एका उथळ बशीत कधी जाई, कधी सोनचाफा तर कधी बकुळीची माळ ठेवलेली असायची. मला देखील नकळत ही सवय लागली. मी सुद्धा माझ्या खोलीत अशी फुलं ठेवते.
अज्जीने खूप गरीब विद्यार्थ्यांना मदत केली. त्यांच्या शाळेचा, पुस्तकांचा खर्च अज्जी कुठलाही गाजावाजा न करता करीत असे. कित्येकवेळा आमच्या गवळ्याच्या मुलाच्या शाळेचे पैसे हळूच त्याला देताना मी अज्जीला बघितले आहे. कामवाल्या बाईला स्वत: चहा करून देणे, त्यांना पैशाची मदत करणे, वेळ प्रसंगी त्यांना मुलीला शाळेत घालण्यासाठी खडसावणे हे सगळे उपदव्याप स्नुषारोष पत्करून अज्जी करीत असे.
पण हे सगळं करूनही तिच्यात एक सुप्त विरक्ती होती. वैराग्य होतं. जे मला मोठी होताना कळू लागलं. तिचा कशावरही हक्क नव्हता. असेलही कदाचित. पण तो तिनी स्वत:हून सोडला होता. जे होईल त्यातून शांतपणे जायचा तिचा निग्रह होतो. तो तिनी शेवटपर्यंत कायम ठेवला. तिच्या शेवटच्या काही दिवसांत ती माझ्या आई-बाबांकडे होती. शेवटी शेवटी ती माझ्या आईला "आई" आणि बाबाला "बाबा" म्हणू लागली. लहानपणी आई माझ्यासमोर "हट्ट करायचा.." असं म्हणाली की मी ते वाक्य "नाही ssssss", म्हणून पूर्ण करायचे. तसंच अज्जीला तिच्या शेवटच्या दिवसांत आईने अशी खूप वाक्य पूर्ण करायला शिकवले. तिच्या सेवेसाठी खूप बायका ठेवल्या, तिच्या सगळ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण केल्या. आईस्क्रीम, पापड, मिरचीचा ठेचा, मोदक, शास्त्रीय संगीत, काव्य, नवीन कपडे असल्या सगळ्या छोट्या गोष्टींतून तिचं बालपण पुन्हा जागं झालं. आणि जशी माझी अज्जी थोडी लहान झाली तसे आई-बाबा अचानक मोठे झाले!
काल तिनी शेवटचा घास घेतला आणि या जगाचा सांगून निरोप घेतला. पण याला मरण म्हणता येणार नाही. "उन्हाळ्याच्या सुट्टीची" कल्पना मला अज्जीच्या आजारपणाने दिली. तिला तिच्या काही आठवणी गोष्टींमधून सांगायचा हा कार्यक्रम होता! पण ती जाताना मला इतक्या आठवणी देऊन गेली की आता तिच्या आठवणींसाठी ही जागाही अपुरी पडेल.
आमच्या घरात नेहमी अज्जीच्या लग्नाबद्दल खूप मतं व्यक्त केली जातात. कुणाच्या दु:खाचं तर कुणाच्या अपयशाचं ते कारण ठरतं. या सगळ्या व्यर्थ कोलाहलापासून तिची कायमची सुटका झाली. या लग्नानी ताजीला त्यागाची मूर्ती बनवले. कुसुम अज्जीच्या माहेरच्यांनीसुद्धा ताजीच्या या त्यागाचा खूप गौरव केला. आजोबांना लक्ष्मी मिळाली, सखी मिळाली, लेखनिक मिळाली, मानसिक आधार मिळाला, विद्वान श्रोता मिळाला. त्यांचा अभिमान, दुराभिमान जपणारी अर्धांगिनी मिळाली. पण अज्जीला मात्र या लग्नामुळे मोक्ष मिळाला. आयुष्यातल्या लहान लहान गोष्टीच आपल्याला मोठे आनंद देऊ शकतात याचे जिवंत प्रतीक अज्जी बनली. राग, अश्रू,पश्चाताप या सगळ्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण मला अज्जीने न बोलता दिली. तिच्या माझ्या आयुष्यातील या भूमिकेसाठी मी तिची आजन्म ऋणी राहीन.

Tuesday, August 25, 2009

अण्णा आजोबा

लहानपणी बरीच वर्षं "घरातला बागुलबुवा" म्हणून अण्णा आजोबांचा वापर होत असे.मोठ्यांना उपद्व्याप होईल अशी कुठलीही गोष्ट करायचा बेत केला की " अण्णा रागवतील" ही सबब सांगून अज्जी आणि मामी आम्हाला कटवत असत. पण अण्णा आजोबांचा अभ्यास करायला मला फार आवडायचे. रोज सकाळी चार वाजता उठून आजोबा वाचन आणि लिखाण करीत असत. "कुसूम" अशी खणखणीत हाक पहाटे चार वाजता आमच्या कानावर पडत असे. मग अज्जी खूप केविलवाण्या आवाजात, "आले हो. हाक मारू नका एवढ्यानी, मुलं झोपलीत"!" असं म्हणायची. 
मग मुलांनी सुद्धा कसं चार वाजता उठलं पाहिजे यावर ते त्याहीपेक्षा जोरात भाषण द्यायचे. पाच-सहा वाजता त्यांची "न्याहरी" असायची. त्यात आदल्या दिवशीची भाकरी, बारीक (अज्जीने उठून चिरलेला) कांदा,  झणझणीत तिखट किंवा ठेचा, दही आणि शेंगदाणे असायचे. सकाळी पाच वाजता असला शेतकरी आहार फक्त अण्णाच घेऊ शकतात. पण का कोण जाणे, त्यांना जेवताना बघून नेहमी मला पण जेवायची इच्छा होत असे. मग पुन्हा त्यांचा अभ्यास सुरू व्हायचा. त्या वेळात अज्जी एखादी डुलकी काढायची की परत तिला समन्स यायचे. अज्जीने आजन्म आजोबांची लेखनिक म्हणून काम केलं. त्यांचा गीतेचा फार मोठा अभ्यास होता. गीता, गीताई, कठोपनिषद, ईशावास्य उपनिषद, पातंजलीची योगसूत्रं या सगळ्यांचा आजोबांनी खूप अभ्यास केला. अज्जी मात्र खाली मान घालून त्यांची प्रत्येक ओळ लिहून द्यायची. आजोबांची "हौस" अज्जीला मात्र सक्तीची होती. 
मग आम्ही उठलो की अचानक अण्णांमधला प्रवचनकार जागा होत असे. आम्हाला पकडून गीता सांगायची त्यांना फार हौस होती. पण अज्जीइतके आम्ही सोशीक नव्हतो. घरातल्या अनेक दारांमधून आम्ही त्यांना चुकवून पळ काढायचो. अज्जी सुद्धा आम्हांला यात मदत करीत असे. ते खोलीत यायच्या आधी, "पळा आता अण्णा येणारेत", अशी दबक्या आवाजात आठवण करून द्यायची. मग लगेच आम्ही पळ काढायचो. पण या सगळ्यांतून कधी कधी पकडले पण जायचो. मग लगेच त्यांचे डोळे चमकायचे. कधी कधी मी पळून जायचे नाही. तसे चमकलेल्या डोळ्यांचे आजोबा अचानक लहान मुलासारखे दिसायचे. त्यांना काहीतरी नवीन गम्मत कळाली आहे असा भाव त्यांच्या चेह-यावर असायचा. तो बघायला मला कधी कधी फार आवडत असे. 
"सई, तुला मी आता गीताईतला एक श्लोक सांगणार बरंका!" म्हणून माझ्या दंडाला धरून मला खुर्चीत बसवत असत.
मग, "इंद्रिये वर्तता स्वैर, राग द्वेष उभे तिथे, वश होवू नये त्याते, ते मार्गातिल चोरची।" अशी सुरवात व्हायची. त्यानंतर रोजच्या आयुष्यातली बरीच उदाहरणे देऊन त्यांचे प्रवचन रंगायचे. कधी कधी मी पेंगू लागायचे. मग "झोपू नकोस. झोप ही सुद्धा इंद्रियांची माया आहे" असं सांगून मला जागं करायचे. 
पण त्यांचं निरूपण ऐकून तासभर झाला नसेल तोवर त्यांच्या खोलीतून "हरामखोर!! चाबकानं फोडीन त्याला!" अशी गर्जना ऐकू येत असे! त्यांचा राग मात्र त्यांच्या गीतेवर मात करून गेला! त्यांचा राग सगळ्या गल्लीभर प्रसिद्ध होता. पलिकडचे परीट, समोरची आऊ, शेजारचे वाटवे या सगळ्यांना त्यांच्या रागाची सवय झाली होती. त्यामुळे मामी बाहेर पडली की, "काय वैनी! आज पारा जरा जास्तच वर गेलता न्हवं!" म्हणून पृच्छा होत असे. मामी पण, "काय सांगू आता! नेहमीचंच झालंय" अशा अर्थाची मान हलवत असे!
पुढे जेव्हा मी स्वत:चं असं वाचन करू लागले तेव्हा ते मला "सत्व, रज आणि तम या प्रवृत्तींचा मानवी मनाशी कसा संबंध आहे" हे शिकवायचे. मग मी दंगा करू लागले की मी तमरसाने कशी भरलेली आहे हे मला पटवून द्यायचे. त्यांना हात पाहून भविष्य सांगता येतं. त्यामुळे मी कधी कधी, "मला दहावीला किती मार्क मिळतील?" असले फालतू प्रश्न विचारायच्या मोहात पडायचे. मग, "भवसागर दुस्तर आहे", किंवा त्याच प्रकारच्या भयानक वाक्यानी सुरवात करून ते भविष्य न सांगताच पुन्हा उपदेश वाहिनी सुरू करायचे! 
त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं असेल तर ते त्यांचं वाचन! रिटायर झाल्यानंतरही शाळा-कॉलेज मधल्या तरूण मुलांसारखं वाचन ते करायचे. त्यांच्या एकाही मुलाला किंवा नातवंडाला त्यांच्यासारखं वाचन जमलं नाही. प्रत्येक पुस्तकात त्यांच्या हस्ताक्षरातल्या छान टिपा असतात. त्यांच्याकडून एखादं पुस्तक घेतलं की त्या पुस्तकाबरोबर अजून खूप पुस्तकांची त्यांच्या टिपांमधून झलक मिळते. त्यांच्या खोलीत त्यांचं "वाचनालय" आहे.त्यांच्या प्रत्येक पुस्तकाला वर्तमानपत्राचे छान कव्हर असते. मग पुस्तक अगदीच जुनं असेल तर त्याला आतमध्ये "दवा-पट्टी" केलेली असते. पुस्तकांची पानं अगदी एखाद्या घायाळ पक्षिणीचे पंख गोंजारावेत तसे ते गोंजारतात. जगात त्यांचं पूर्ण कोपरहित प्रेम जर कुणावर असेल तर ते त्यांच्या पुस्तकांवर आहे!
बाबाबरोबर राजकारणावर चर्चा करता करता त्यांनी कित्येकवेळा त्याच्याशी जोरदार भांडण केले आहे. कुणीतरी आपल्याशी सहमत नाही हे एक कारण त्यांच्या रागासाठी पुरे असायचं. मग समोरचा माणूस आपला खूप मोठा अपमान करत आहे असं त्यांना वाटू लागे. कोल्हापूरच्या घरातली मोठ्या माणसांची भांडणं फार मजेदार असायची. सगळ्या मुलांनी आजोबांचे बाकी कुठलेही गुण घेतले नाहीत पण त्यांची भांडण करण्याची कला मात्र सगळ्यांना मिळाली. प्रत्येकानी ती त्याच्या स्वभावाप्रमाणे बदलली देखील! ताट भिरकावणे हा आमच्या घरातला आवडता निषेध. आजोबांनी इतरवेळी कितीही "अन्न हे पूर्णब्रम्ह" वगैरे  शिकवणी दिली तरी संतापाच्या आवेगात नेहमी त्यांच्या हातून हे पाप घडायचे. मग आम्ही आ वासून त्या रूद्रावताराकडे बघत असू. दुसरा आवडता निषेध म्हणजे वाद टिपेला गेला की भोवळ येणे. हे नेमकं त्या वेळेला कसं घडायचं हे मला आजपर्यंत कळलं नाही.मला फक्त गणिताच्या पेपराच्या आधी चक्कर यायची. आणि त्यावर माझा काहीही ताबा नसायचा. 
 एका प्रसिद्ध (मुडशिंगीकर संप्रदायात) भांडणामध्ये तर कुणीतरी कुणाच्यातरी डोक्यावर पाण्यानी भरलेली घागर रिकामी केली होती म्हणे! खूप वर्षं मला सगळे लोक चिडले की असेच वागतात असं वाटायचं. 
या सगळ्या घडामोडींमध्ये अज्जी मात्र शांतपणे एखाद्या कोप-यात उभी असे. तिला मी कधी रडताना पाहिलं नाही की कधी चिडताना. "सई जगात अशी कुठलीही गोष्ट नाही जिचा आपल्याला मन:स्ताप व्हावा", हे एकच वाक्य तिनी मला उपदेशपर दिलं. आजोबांच्या गीतेतील "सुख दु:खे समेकृत्वा लाभालाभौ जयाजयौ" ह्या वाक्याचे मानवी प्रतिबिंब अज्जी झाली. 
पण आजोबांच्या उपदेशांमुळे रोजच्या आयुष्यातील ब-याच अडचणींवर छान मात करता येते. त्यांच्या पुस्तकांमधून वाचलेले बरेच काही सहज जसेच्या तसे जिभेवर येते. आजकाल आजोबा खूप हळवे झाले आहेत. पूर्वी रागानी लकाकणारे त्यांचे डोळे आता सारखे पाणावतात. पण त्यांची ती नाजूक, स्वच्छ, नीट-नेटकी मूर्ती डोळ्यासमोर आली की त्यांच्या अश्रूंच्या पलिकडची विद्वत्ता दिसू लागते!

Monday, August 10, 2009

स्पर्धा

लहानपणी मला स्पर्धा अज्जिबात आवडायची नाही. पुण्यात शाळा सोडून कुठे कुणाशी माझी कधीच तुलना होत नसे. त्यामुळे आपण सगळ्याच बाबतीत "लई भारी" आहोत असा माझा सोयिस्कर गैरसमज होत असे. कोल्हापुरात मात्र चिकू दादा, महेश दादा, अभिजित दादा, स्नेहा, मनिषा आणि गल्लीतली समस्त वानरसेना यांपुढे माझी "शान" म्हणजे अगदीच पुणेरी आळूचं फतफतं असायची. शाळेतल्या केविलवाण्या पी.टी. च्या क्लासमध्ये मला जोरात धावता येत नाही, लंगडी घालता येत नाही, दोरीच्या उड्या मारता येत नाहीत हे कुणाला नीट कळायचे नाही. पण कोल्हापुरात मात्र सगळा दिवस करायला काहीच नाही आणि "बुद्धिजीवी" वगैरे म्हणायची सोय नसल्यावर मला गुमान खेळावे लागे. त्यात नेहमी माझा दणदणीत पराजय होत असे. अज्जीच्या कौतुकामुळे आगीत तेल ओतले जाई आणि सगळी मामे भावंडं कधीकधी माझी कशी जिरते ते बघत असत. अर्थात त्यामुळे माझ्या मनावर विपरीत परिणाम वगैरे बिलकुल झाला नाही. लंगडी घालताना जरी दोन मिनिटांत माझा जीव घशात आला तरी भांडताना मात्र माझी राणी लक्ष्मीबाई होत असे! कधी कधी  गल्लीतली सगळी पोरं "डब्बा ऐसपैस" का असलाच अपभ्रंश असलेला खेळ खेळायची. त्यात नेहमी माझ्यावर राज्य यायचं. म्हणजे कुणी कट कारस्थान न करताच. मला खेळताच यायचं नाही नीट. त्यात नेहमी राज्य आल्याने माझा आत्मविश्वास कमी व्हायचा आणि मग त्यामुळे माझे सगळे बेत फिसकटायचे. मग अगदी चार-पाच वर्षाची असताना मला असा "राज्य" वाला दिवस आला की आईची खूप आठवण यायची. तसं झालं की मी गॅलरीत जाऊन मुळूमुळू रडायचे. 
दुसरी मला अगदी न आवडणारी स्पर्धा म्हणजे "न बोलण्याची". अज्जी नेहमी माझ्यात आणि स्नेहात ही स्पर्धा लावायची. कुणी "बोलू नकोस" असं सांगितलं की मला अजूनच बोलायची इच्छा होत असे. त्यामुळे यातही मी नेहमी हरायचे. "पालक" खायच्या स्पर्धेत मात्र सगळे हरायचे. त्यामुळे मी खूष असायचे. दूध सगळ्ळयात आधी संपवणे हा एक नवीन मनस्ताप असायचा. पुण्यात "दूध" प्यायचे उंच स्टूल होते. त्यावरून मला खाली उतरता यायचे नाही. म्हणून ग्लास संपेपर्यंत मला त्यावर चढवले जाई. पण नंतर माझा धीर बळावला आणि मी तीन तास सलग एकही थेंब दूध न पिता तिथे बसून रहायचे. मग आई-बाबा कंटाळून मला खाली आणायचे व चहा द्यायचे. त्यामुळे दूध न पिण्याची स्पर्धा असती तर मी नक्की जिंकले असते. पण लहानपणी मोठ्या माणसांना आपलं मूल कशात जिंकू शकेल हे कळायला वेळ लागतो बहुतेक. 
का माहित नाही पण मला ज्या गोष्टी नीट यायच्या त्याची कधीच स्पर्धा लागायची नाही. जसं की मी पावसाळ्यात दगडाखालचे गांडुळांचे पुंजके खूप सहज शोधून काढायचे. मला लांबून दगड पाहूनच त्याखाली गांडुळ संकुल असेल की नाही ते सांगता यायचे. पण याचं कुणाला काही विशेष कौतुक नव्हतं. त्या गांडुळांची नंतर मी छान चटणी पण करायचे !
चिखलाची भांडी करायची कला सुद्धा मला अवगत होती. तसेच मला कामवाल्या बाई बरोबर भांडी घासायला पण खूप आवडायचे. पण का कोण जाणे याच्या स्पर्धा कधीच नसायच्या. कैरी खायची स्पर्धा असती तर मी नक्की पहिली आले असते. शेंगदाण्यात गूळ घालून त्याचा लाडू करण्यात पण माझा हात कुणी धरला नसता. पण हे सगळं मोठ्यांना त्यांच्या वयामुळे सुचायचं नाही. 
लोणचं नळाखाली धुवून खायची स्पर्धा असती तर मी त्यात मेडल वगैरे मिळवलं असतं. मी कितीही वेळ आंब्याचं लोणचं खाऊ शकायचे. पाण्याखाली धूवून ते अजुनच छान लागायचं. एकच गोष्ट खूप वेळा ऐकायची स्पर्धा असती तर त्यातही मी जिंकले असते. एकदा कुणीतरी कोकणातल्या पाहुण्यांनी त्यांच्या सतरंजीखाली सकाळी मेलेला साप सापडला ही गोष्ट आईला सांगितली. तेव्हा मी तिथे होते. त्यानंतर मी शंभरवेळा सापाऐवेजी  ससा, उंदीर, माकड, बेडूक असे प्राणी बदलून तीच गोष्ट आईला सांगायला लावली. शेवटी एक दिवस "आता सतरंजीखाली सकाळी मेलेला उंट सापडला" असं सांग, या सूचनेनंतर आईने मला कोपरापासून नमस्कार केला.
पण माझ्या या गुणांना फारसा वाव मिळाला नाही. शाळेत मी सगळ्या वक्तृत्व स्पर्धा जिंकायचे. पण त्याची नंतर सवय झाली. सहा महिन्यांपूर्वी पाच किलोमीटर पळायची शर्यत मी पंचवीस मिनिटांत पूर्ण केली. तेव्हा मला माझ्या सगळ्या सवंगड्यांची आठवण आली. पण आता कुणीच पळत नाही!!

Monday, July 20, 2009

चिंटू

मला लहानपणापासूनच घरात जुने जुने कपडे घालायची सवय आहे. जुन्या कपड्यांना काही वेगळीच ऊब असते. नव्याला त्याची सर नाही.एखाद्या जुन्या कुडत्यात शरीराचं शरीरपण नाहीसं होतं. मग आपले हात, आपलं पोट, सगळं त्या कुडत्यात विलीन होतं. कुडता व आपण एकमेकांना छान ओळखू लागतो. त्यामुळे जुने कपडे घालून घरात बसून रहायला मला अजुनही खूप आवडते. मग त्याला कुठेतरी एखादं भोक पडलंय, त्याचा रंग फिका झालाय, त्याची मूळ बटणं जाऊन तिथे मिळतील ती, जमतील तशी लावलेली बटणं आहेत हे सगळेच मुद्दे गौण असतात. आईला मात्र माझ्या या सवयीचा अतिशय तिटकारा होता. नव्हे, अजूनही आहे. ती घरी असेल तेव्हा मी शाळेला गेल्या गेल्या माझे न आवडणारे जुने कपडे ती नेस्तनाबूत करायची. मग घरी परत आल्यावर कपाटात ते कपडे मिळाले नाहीत की मी जोरदार भोंगा पसरायचे. या वेळी भारतातून परत येताना मी माझे काही खास जुने कपडे आणले आहेत. परंतु  इथेही माझ्या कुडत्यांना पडलेल्या भोकांना डिवचून त्यांना फाडणारी घर-सखी मला मिळाली आहे. त्यामुळे नशीब कुठेही आपली पाठ सोडत नाही यावर माझा हळू हळू विश्वास बसू लागला आहे. 
लहानपणी माझा असाच एक जिवाचा बाहुला होता. त्याचं नाव चिंटू होतं. लहानपणी "प्रतिभावंत" असण्याचं खूळ अजून डोक्यात पुरतं बसलं नव्हतं त्यामुळे "चिंटू" हे सर्वसामान्य नाव माझ्या सामान्य बाहुल्याला पुरेसं होतं. मला चिंटू फार म्हणजे फार आवडायचा. कितीही सुंदर बाहुल्या मिळाल्या तरी चिंटूची जागा कुणीही भरली नव्हती. स्नेहा पुण्याला आली की मी व ती चिंटूबरोबर खूप खेळ खेळायचो. अगदी मी बाळ असताना सुद्धा मला चटईवर चिंटूसोबत ठेवलं की मी तासंतास छान रमायचे असं अज्जी सांगते. त्यामुळे मी पाच सहा वर्षाची होईतो चिंटूची पार रया गेली होती. त्याच्या बेंबीतून खूप कापूस बाहेर आला होता. त्यामुळे वर गोबरा चिंटू खाली मात्र कुपोषित झाला होता. त्याच्या नाकाच्या जागी नुसताच नाकाचा टण्णू बाकी होता. रंग पार गेला होता. पण कसाही असला तरी मला चिंटू फार प्रिय होता. त्याला काखेत घेऊन मी घरभर फिरायचे. आई कधी कधी त्याला लपवून ठेवायची. पण मी तिचीच मुलगी असल्यामुळे एक-दोन दिवसांत काहीही कांगावा न करता त्याला शोधून काढायचे. मला खात्री होती की मला न सांगता आई त्याला फेकणार नाही. लहानपणी मोठ्यांवर कधी विश्वास ठेवायचा आणि कधी नाही याचे नियम असतात. चिंटूच्या बाबतीत माझं मत घेण्यात येईल असा माझा अंदाज होता. 
मग दोन-चार दिवसाच्या अंतरावर चिंटू नेहमीच गायब होऊ लागला. एका रविवारी सकाळी मी व्हरांड्यात चिंटूला घेऊन बसले असताना आई माझ्याकडे खूप "तयारी" ने आली. "हे बघ पिल्लू हा बाहुला आता जुना झालाय. आपण तुला यापेक्षा सुंदर नवा बाहुला आणू", अशी प्रस्तावना ऐकताच मी रणांगणावर उडी घेतली. मग आईनेसुद्धा तिचा ठेवणीतला हिसका बाहेर काढला आणि सरळ चिंटूला माझ्याकडून हिसकावून घेतले. कोल्हापूरकरांना "बालमानसिकता" वगैरे शहरी प्रकार झेपत नाहीत. सर्दी किंवा दर्दी दोन्हीसाठी झणझणीत तांबडा रस्सा हे एकच औषध कोल्हापूरकर देतात. त्या नियमानुसार आईने बळाचा वापर करून चिंटूला हिसकावलं. तिनी पुढचा विचार नीटसा केला नसावा कारण मी तिच्यावर उड्या मारू लागताच तिने त्याला जोरात कुंपणापलीकडे भिरकावलं. आता एरवी, "रस्त्यात सालं टाकू नकोस" असा भुंगा लावणारी आई खुशाल बाहुल्या भिरकावू लागली आहे हे बघून मला दु:खातही हुरूप आला. पण चिंटू थेट एका अनभिज्ञ भंगारवाल्याच्या गाडीवर पडला. अचानक आभाळातून पडलेल्या बाहुल्याकडे पाहून तो ही भांबावला. मग त्या राकट भंगारवाल्यालाही पाझर फुटला. "बाई, तुमच्या मुलीची बाहुली" म्हणून तो चिंटूला घेऊन परत आला. बहुतेक तेव्हापासूनच माझा देवावर विश्र्वास बसला असेल. आईला पण "कर्म नेतं पण देव देतो" वगैरे नेहमीची वाक्य आठवली असावीत कारण तिने मला तो गुमान परत घेऊ दिला. 
त्यानंतर कधीतरी आईची चिंटूला नाहीसे करण्याची इच्छा पूर्ण झाली. पण त्या प्रसंगाने मला नंतर "अचानक" गायब झालेल्या कितीतरी जुन्या कपड्यांचे दु:ख माफ करायला शिकवले. काही काही वस्तू आपण काहीही न करता आपल्याजवळ सुखरूप राहतात. जुनी पुस्तकं, जुनी पत्रं, जुन्या वह्या उघडायला मला फार आवडते. त्यात कुठेतरी घाईत कागदाच्या अभावामुळे लिहिलेला नंबर, दुमडलेलं पान, दडपे पोहे खात खात वाचत असताना पडलेला कांदा आणि त्याचं कोरडं रुपांतर हे सगळं सगळं मला आवडतं. जुन्या वस्तू जुन्या आठवणींसारख्याच असतात. नव्या मिळाल्या म्हणून त्यांची किंमत कधीच कमी होत नाही.
Proofreading: Gayatri 

Tuesday, July 7, 2009

दात-पडकी म्हातारी

एका सुट्टीत स्नेहानी नेहमीप्रमाणे हासून माझे स्वागत केले तेव्हा तिचा पुढचा एक दात गायब झाला होता. यानंतर काही वर्षं सगळे दात पडून नवे दात येतात हे आयुष्यातलं "सत्य" मला स्नेहानी सांगितलं. अशी खूप सत्यं स्नेहानी मला पहिल्यांदा सांगितली. माझे आई-बाबा बहुधा, "अजून एका वर्षानी सांगू" म्हणून ज्या गोष्टी मला सांगायचे नाहीत त्या सगळ्या मला स्नेहामुळे कळाल्या. मग त्या सुट्टीत स्नेहाचे दात कसे पडतात याचा अभ्यास करणे माझा आवडता खेळ बनला. ती सुद्धा तिच्या हलणा-या दाताला गोल फिरवून सगळ्यांची करमणूक करीत असे. माझ्या वर्गात अजून कुणाचाच दात पडला नव्हता. त्यामुळे परत जाताना आपण खूप मोठं गुपीत घेऊन परत चाललोय याचा मला फार अभिमान वाटला होता. तसंच "ताई अज्जी आजोबांची पहिली बायको आणि कुसुम अज्जी दुसरी" हे जगाला माहित असलेलं गुपीतसुद्धा मला स्नेहानीच सांगितलं. तोपर्यंत घरात दोन अज्ज्या का आहेत याचा फारसा विचार मी केलाच नव्हता. मग मी एक दिवस जाऊन ताजीला विचारलं,"काय ग ताजी? तू आजोबांची पहिली बायको आहेस? मग तू असताना आजोबांनी दुसरं लग्न का केलं?"त्यावर खूप गोड हसून ताजीनी उत्तर दिलं,"अगं मला मुलगी हवी होती. म्हणून दुसरं लग्न केलं! तुझी आई झाली मग! आणि तू पण!"या गोष्टीमुळे खूप वर्षं मला "मुलगी होणे" खूप महत्वाचे आहे असं वाटायचं. आपण आईला झालो त्यामुळे बाबाला दुसरं लग्न नाही करावं लागलं याचा पण आनंद होई. पण मोठी झाल्यावर मात्र असला भोचक प्रश्न विचारल्याची खूप लाज वाटली.पण ताजीच्या आईवरच्या प्रेमाकडे बघून तिनी सांगितलेली गोष्ट मला अजूनही खरी वाटते.आजोबांकडे बंदूक आहे हे "गुपीत" सुद्धा स्नेहाताईंनीच मला सांगितलं. मग आमच्या मुडशिंगीच्या घरी एक दिवस ती बंदूक स्वत:च्या डोळ्यानी बघितल्यावर माझा विश्वास बसला.आजोबांकडे चाबूक पण होता! असल्या शिकारी वस्तू गोळा करायची त्यांना फार हौस होती. त्यांची बंदूक मात्र आयुष्यभर बोलू शकली नाही. मळ्यात माकडांचा सुळसुळाट झाला की आरूमामा तिकडे हवेत दोन-तीन गोळ्या झाडायचा. तेवढाच काय तो तिचा उपयोग. बाकी नुस्ताच धाक!तसंच नरूमामा कुसुमअज्जीचा मुलगा नसून ताजीचा मुलगा आहे हे सुद्धा मला स्नेहानीच सांगितलं. मांजराचं पिल्लू गॅलरीतून खाली पडलं तरी चार पायावरच पडतं आणि त्याचा पाय वगैरे मोडत नाही हे सुद्धा मला स्नेहानी सांगितलं. त्यानंतर "अचानक" आमच्या देखत माऊचं एक पिल्लू गॅलरीतून खाली पडलं. त्या एका क्षणात या घटनेबद्दल देव आपल्याला काय शिक्षा करेल याचा विचार डोक्यात येऊन गेला. पण पिल्लू सुखरूप खाली पोहोचलं आणि खाली पडल्यावर वर बघून जोरात फिसकारलं. त्या सुट्टीत मात्र स्नेहाचे एका मागून एक असे सगळे दात हलायला लागले. रोज सकाळी आम्ही पडणा-या दाताची विचारपूस करीत असू. सुट्टी संपेपर्यंत तिचा पुढचा एक दात परत उगवला होता. पण तो पत्त्यांमधल्या "किलवर" सारखा दिसत होता. असे किलवर सारखे दिसणारे दात आपल्यालाही येतील याची मला मनापासून भिती वाटत होती. एक दिवस आम्ही गॅलरीत पोळीची सुरळी चहात बुडवून खात होतो. तेव्हा स्नेहाचा एक हलणारा दात पोळीतच राहिला! त्यानंतर दोन दिवस मला हसण्यापासून थांबवायचे खूप प्रयत्न झाले. शेवटी आजोबांबरोबर रेल्वेतून आठ तासाचा प्रवास करावा लागेल ही धमकी मिळाल्यावर मी घाबरून हसायची थांबले!आई-बाबांनी माझे व स्नेहाचे पडक्या दाताचे खूप फोटो काढलेत. तरी सुद्धा तो पोळीत अडकलेला पडका दात आठवला की डोक्यात बसवलेल्या व्हिडियो कॅमेर्‍याचा खूप अभिमान वाटतो!
Proofreading: Gayatri :)

Tuesday, June 30, 2009

सिनेमा-सिनेमा


माझ्या आणि स्नेहाच्या स्नेहात सिनेमांचा खूप मोठा वाटा होता. मी चार वर्षाची असताना माधुरी दीक्षित नावाचं दैवत आमच्या आयुष्यात आलं. मग सुट्टीनंतरचे दहा महिने आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे आमचा सिनेमा व्यासंग वाढवत असू. त्यातही माधुरी आम्हाला खूप आवडायची. तिचे नाच बारकाईने पाहून तसेच्या तसे करायचा आम्ही प्रयत्न करायचो. मला पुण्यात तितके सिनेमे बघायला मिळायचे नाहीत. कारण माझा आठवडा नाचाचे क्लास, गाण्याचा क्लास, अभ्यास आणि बाबाबरोबर पेशवे बागेत जाणे यात संपून जायचा. पण स्नेहा मात्र चित्रहार, छायागीत वगैरे मधून तिचं शिक्षण चालू ठेवायची. 
सुट्टीला जायच्या आधी मी बघितलेल्या सिनेमांची यादी डोक्यात करून ठेवायचे. भेटल्या भेटल्या आधी माझी बॅग उघडली जायची. मग मी काय काय कपडे नेले आहेत व त्यातले कुठले कुठले "अदला-बदलीत" ठेवायचे याचे महत्वाचे निर्णय आम्ही आधी घ्यायचो. मग स्नेहा पण मला तिनी घेतलेले नवीन कपडे दाखवायची. मी तिचे कपडे घालावेत असं तिला फार वाटत असे. बाहेर जाताना नेहमी आधी तिचे कपडे दाखवायची. मग मी सुद्धा लाडोबासारखी काय हवं ते छान घालायचे. स्नेहाकडे नेहमी "साजन" ड्रेस, "राम-लखन" ड्रेस वगैरे बॉलिवूड प्रेरित कपडे असायचे. माझी आई मी सात आठ वर्षाची होईतो माझे सगळे कपडे शिवायची. तिच्याकडे असली फिल्मी मागणी केली की तिचा पारा चढायचा. म्हणून स्नेहाचे फिल्मी कपडे मला फार आवडायचे. मग ड्रेस घातला की त्याला मॅचिंग रीबीन, बांगड्या, टिकली सगळं स्नेहाकडे असायचं! 
त्यानंतर मात्र मला अगदी न आवडणारा प्रकार सुरू व्हायचा. सिनेमाची स्टोरी! मला सिनेमे बघायला आवडायचं पण सिनेमा पाहून आल्यावर त्याची गोष्ट कुणाला सांगायला मला अज्जीबात आवडायचे नाही. पण स्नेहाचा हा आवडता छंद होता. कधी कधी तिनी न पाहिलेला सिनेमा मी पाहिला असेल तरी मी ते तिच्यापासून लपवून ठेवायचे. तसंच मला न पाहिलेल्या सिनेमाची गोष्ट ऐकायलाही आवडत नाही. पण हे सगळं स्नेहाला जाम आवडायचं. खूप दिवसांनी भेटल्यावर करायच्या पहिल्या काही कामांमध्ये तिला मला तिनी पाहिलेल्या सिनेमांच्या स्टोर्‍या सांगायला आवडायचे. 
तिची तीन तासाच्या सिनेमाची स्टोरी सहा तास चालायची. आधी सिनेमा पहायचं कसं ठरलं यापासून सुरूवात व्हायची.
"अगं सयडे तुला माहितच आहे की पप्पांची सगळी कामं कशी असतात! तिकिटच घेऊन आले! मग मी आणि आई अक्षरश: दहा मिनिटात तयार झालो. वाटेत किल्लेदार काकी भेटल्या. त्यांच्याशी बोलत बसले गं पप्पा त्यामुळं जाहिराती चुकल्या."
मग प्रत्येक शॉट, त्यात हिरॉईनचे कपडे,केशभूषा, दागिने सगळ्यासकट तिची स्टोरी असायची. त्यातही काही खास नवीन अदा वगैरे असल्या तर ती स्वत: करून दाखवायची. एखादं गाणं खूप प्रसिद्ध झालं असेल तर सिनेमाच्या ज्या भागात ते आहे तिथे त्याचा नाच पण करून दाखवायची कॅसेट लावून. त्यामुळे मला सिनेमापेक्षा जास्त करमणूक फुकटात मिळायची. 
मी काही पूर्ण पाच सहा तास तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही. तिचा खूप महत्वाचा सीन चालू असताना नेहमी माझ्या डोक्यात, "अज्जीने बेसनाचे लाडू कुठल्या डब्यात ठेवले असतील?" वगैरे प्रश्न यायचे. तिला जरा जरी कुणकूण लागली की माझं लक्ष उडालंय तर ती लगेच "अत्ता मी काय सांगितलं सांग पाहू" असं खडसावायची. मग मी सफाईदारपणे आधीच्या तीस सेकंदांतल्या सगळ्या ओळी म्हणून दाखवायचे. मला स्नेहामुळे कानानी ऐकणे व डोक्यानी वेगळाच विचार करणे ही अतिशय उपयोगी सवय लागली. अजूनही माझ्या "भवितव्याबद्दलच्या" माझ्या गाईडच्या कल्पना ऐकताना मी सोयिस्करपणे वेगळा विचार करते. :)
दुसरा आवडता फिल्मी विरंगुळा म्हणजे माधुरीच्या गाण्यावर नाच बसवणे. मला सिनेमातला नाच तसाच्या तसा करायला आवडायचे नाही. कारण मग मधे मधे जेव्हा हीरो हिरॉईन हिमालयात वगैरे नाच न करता जातात तेव्हा आमच्याकडे करायला काहीच नसायचं. आणि त्यात आमच्या डोक्यानी काही बसवलं की ते खूप विनोदी दिसायचं. त्यामुळे मी सगळा नाच स्वत:च बसवायचे. यावरून बरेचदा माझं आणि स्नेहाचं भांडण व्हायचं. पण वाटाघाटीतून काहीतरी तोडगा निघायचा. कधी कधी आम्ही दिवसभर नाच बसवायचो. मग शनिवारी नरूमामा लवकर आला की अज्जी,मीना मामी, मामा सगळ्यांना नाच करून दाखवायचो. 
मधेच कधीतरी स्नेहाला "आपल्याला सईसारखं भरतनाट्यम् येत नाही" याची अचानक जाणीव व्हायची. मग मी तिला शिकवायचे. पण नाच करण्यापेक्षा दंगाच जास्त व्हायचा. सुट्टीला जाताना आई नेहमी माझ्याबरोबर भरतनाट्यमचा सराव करायची वही वगैरे पाठवायची. पण ते दोन महिने मी कुठलेही नियम न पाळता नाचायचे. तो नाच मला सगळ्यात जास्त आनंद देऊन गेला. :)
सुट्टी संपताना आम्हाला दोघींनाही वाईट वाटत असे. आता परत शाळा या विचारानी तर वाईट वाटायचंच पण रोज नाच बसवायला मिळणार नाही याचंही दु:ख होत असे. मला शाळा कधीच मनापासून आवडली नाही. शाळेतल्या माझ्या (दंगेखोर) मैत्रिणी नेहमी मला,"शाळा कशी काय आवडू शकत नाही तुला?" असा टोमणावजा प्रश्न विचारायच्या. पण शाळेतले ते "गट", सगळ्यात हुषार कोण, सगळ्यात प्रसिद्ध कोण आणि थोडं मोठं झाल्यावर सगळ्यात सुंदर कोण याचे निकष मला अजिबात पटायचे नाहीत.आणि का कोण जाणे शाळेत खूप मैत्रिणी असूनही मला शाळा भूमितीच्या पुस्तकासारखीच निरस वाटायची.  आणि मग मार्च महिन्याअखेरी कुठल्यातरी मराठी कवितेची शेवटची उजळणी करताना माझे कान कविता ऐकायचे आणि मन मात्र वर्गाच्या खिडकीतून अडीचशे किलोमीटर ओलांडून कोल्हापूरला जायचं. जिथे माझी सर्वात सुंदर जिवाची सखी  तिच्या शाळेच्या बाकावर मला सांगायच्या सिनेमा स्टोर्‍यांची यादी बनवत बसलेली असे!

Saturday, June 27, 2009

नरू मामा

माझ्या इतर दोन मामांच्या भाषेत नरूमामा "माझा लाडका" मामा आहे. लहानपणापासून हा समज मला दूर करायची इच्छा होती पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. नरूमामा तीन भावांत मधला. के.डी.सी.सी बॅंकेत तो नक्की कुठल्या हुद्द्यावर आहे हे मला आजपर्यंत कळले नाही पण दिसायला मात्र तो "मॅनेजर" आहे. पु.ल नाथा कामतला जसं "अल्लाघरचा मोर" म्हणतात तसा नरूमामा "अल्लाघरचा मॅनेजर" आहे. ताजीचा नीटनेटकेपणाचा गुण जर कुणी शंभर टक्के घेतला असेल तर तो नरूमामानी. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे, स्वच्छ, सुबकरित्या मांडलेल्या असतात. घराची साफ-सफाई, झाडलोट, रंगरंगोटी अगदी प्रेमानी करणारा गृहस्थ म्हणजे नरूमामा. 
नरूमामा आणि माझा बाबा एकमेकांना "पावणं" या नावानी हाक मारतात. दोघे "गुणांमध्ये" अगदी विरूद्ध. त्यामुळे नरूमामा नेहमी माझ्या बाबाला "कसला कारभार पावणं तुमचा" म्हणून चिडवत असे. बाबाला एकही गोष्ट वेळेवर सापडत नाही. त्यात बर्‍याच वेळेस बाबाच्या वस्तू मोडायच्या. आणि या ना त्या कारणाने त्या दुरुस्त होत नसत. मग नरूमामानी त्याला "मोडका बाजार" असं नाव पाडलं. दर वेळी या नावाचा उल्लेख झाला की बाबा संतापाचा गोळीबार सुरू करत असे. मग नरूमामा माझ्याकडे बघून डोऴे मारत "चुकलं पावणं! परत नाही म्हणणार तुमच्या वस्तूंना मोडका बाजार!" अशी मिस्किल माफी मागायचा. 
नरूमामाचा आवडता पोषाख म्हणजे सफारी! कधी कधी तो त्याच्या साहेबाचा साहेब वाटायचा. परत केस फिक्क पांढरे त्यामुळे मी दहा वर्षाची असतानाच त्याला "नात काय तुमची?" असे प्रश्न विचारण्यात यायचे. त्यावरही तो बिचारा "तरी बरं अजून मीना मुलगी का म्हणून विचारत नाहीत" अशी समजूत घालून घ्यायचा. पण सकाळी दूध आणायला जाताना तो लुंगीवर सफारी शर्ट घालून जायचा. तेव्हा मात्र माझा बाबा त्याला " काय पावणं कसला अवतार तुमचा" म्हणून चिडवायचा. 
त्याला मार्केटिंग करायची खूप हौस आहे. आईने तिच्या "उमेदीच्या" काळात नरूमामाला साखर कारखान्यांत मार्केटिंगची जबाबदारी दिली होती. तेव्हा तो आई पोहोचायच्या आधी तिथे जाऊन आईचे "वलय" तयार करायचा. त्यात तो अज्जीच्या कौतुक वर्षावाला सुद्धा शह द्यायचा. पट्टीच्या गायकाचा सूर लागावा तसा त्याचा लागायचा आणि मग मशीन खपवायला तो आईला हिमालयाच्या उंचीवर नेऊन ठेवायचा. त्यानी प्रस्थापित केलेली "जागतिक पातळी" गाठायला आईला पुढे दहा वर्ष लागली. तो जाऊन आलेल्या ठिकाणी जाताना आईला परीक्षेला गेल्यासारखे वाटायचे. माझ्याही बाबतीत काहीही "खपवायचे" नसतानासुद्धा तो असाच सुटतो. मग बाहेर आल्यावर "काय हे नरूमामा! आसं नाहीये, तसं आहे" असं सांगायचा प्रयत्न केला की "काय कळतंय त्यांना! आपण दाबून सांगायचं!" असं उत्तर मिळायचं. 
नरूमामाबरोबर बाहेर जायचं म्हणजे दर दहा फुटांवर त्याला "मित्र" भेटणार. मग "काय म्हंतायसा नरूभाऊ" म्हणून प्रत्येक ठिकाणी चर्चा होणार! सगळ्यांची कामं करून देण्यात नरूमामा पुढे. अगदी स्वत: केलं नाही तरी त्यांना योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम तरी नरू मामा नक्कीच करत असे. 

त्याचा अजून एक अतिशय निरागस गुण म्हणजे देवाची पूजा करणे. मूर्तिपूजा व्यर्थ आहे असं म्हणणार्‍यांनी नरूमामाचा देव्हारा बघावा. रोज सकाळी लवकर उठून स्वत:च्या बागेतली फुलं काढून नरूमामा पूजा करतो. टपोरी जास्वंदी, तजेलदार मोगरा, सुगंधी गुलाब, रसरशीत झेंडू असली सगळी फुलं नरूमामाचे देव उपभोगतात. त्याची गावातली काही खास आवडीची दुकानं आहेत जिथून तो तर्‍हेतर्‍हेच्या उदबत्त्या आणतो. त्यातही त्याची अदलाबदल चालू असते. आजकालच्या जगात देवासमोर लावायच्या उदबत्तीबद्दल कोण इतका विचार करतो? पण नरूमामाची भक्ती सुद्धा रसिक आहे. दर गुरुवारी नरूमामा उपास करतो (एकवेळ जेवून) आणि रात्री मामी मोठ्या प्रमाणावर साबुदाण्याची खिचडी करते. त्यामुळे सगळ्या घराचाच गुरुवार असतो! लहान असताना मामा मला व स्नेहाला स्कूटरवर बसवून साईबाबाच्या देवळात न्यायचा दर गुरूवारी. मग पुजार्‍यांना "ही माझी भाची बरका! पुण्याची! खूप हुषार आहे" शी ओळख करून द्यायचा. मग नारळ-पेढे पुजारी माझ्या हातात द्यायचे! फार आनंद व्हायचा मला तेव्हा!
कुठल्याही कामाचा ताबा घ्यायला नरूमामाला फार आवडते. त्यामुळे कधीकधी स्वयंपाकघरातसुद्धा त्याची हुकुमशाही सुरू होते. हा गुण (?) मात्र अजोबांचा आहे. मी पुण्याला परत येताना नरूमामा नेहमी आईसाठी तिखट भडंग पाठवत असे. तेव्हा मीनामामीला "मदत" करण्याच्या निमित्ताने तो स्वयंपाकघरात यायचा आणि अंती तिला मदतनीस करून टाकायचा. ती बिचारी काही सूचना द्यायला गेली की तिला स्वयंपाकातला काहीच अनुभव नसल्यासारखी वागणूक मिळायची. 
कधी कधी मोदक करायलाही तो पुढे यायचा आणि मामीला "तुला काय कळतंय त्यातलं?" असा सवाल करायचा. 
घरात गणेशोत्सव साजरा करण्यात नरूमामा पुढे असायचा. कुंभार गल्लीतून आम्ही नरूमामानी "खास" पसंत केलेली मूर्ती आणायचो. आदल्या रात्री सगळे मिळून मखर, पताका, दिवे अशी सजावट करायचो. मग गणपती आले की सगळे भाडेकरू आधी आमच्या आरतीला यायचे. गल्लीत कुणाचाच गणपती आमच्यासारखा नसायचा. त्यात कुणाचं पिल्लू असेल आरतीला तर त्याला आरती धरायचा मान मिळायचा. 
नरूमामाला लहान मुलांशी दोस्ती करायची फार आवड. सगळ्या भाडेकरूंच्या मुलांना स्कूटरवरून चक्कर मारायला न्यायचा. त्यांची कौतुकं करायचा. त्यामुळे आपापली घरं केल्यानंतरही सगळेजण त्याला भेटायला यायचे. त्याची कामं करून द्यायचे. 
घरात मात्र अजोबांशी त्याचं कधीच नीट जमलं नाही. तसं अजोबांशी कुणाचंच नीट जमत नाही. त्यामुळे त्याचा घरातला चेहरा आणि अकराव्या गल्लीच्या कोपर्‍यावरचा चेहरा यात खूप फरक असायचा. गल्लीच्या कोपर्‍यावर गेला की नरूमामाचं स्वत: बनवलेलं, मित्रमंडळींचं जग सुरू व्हायचं. त्यामुळे त्याच्या चेहर्‍यावर नेहमी हास्य असे. घरातही स्वत:च्या खोलीत त्याला रफीची गाणी ऐकायला फार आवडायचे. कधी कधी रंगात आला की स्वत: सुद्धा गात असे! 
तो नेहमी खोलीत अंघोळीनंतर गात गात यायचा. त्याचे त्यावेळी कुठेही लक्ष नसायचे. त्यामुळे एकदा चुकून त्याचा पाय एका माऊवर पडला होता. त्या माऊला (अर्थातच) स्वर्गवास झाला. त्याचे प्रायश्चित्तसुद्धा त्याने काशीला जाऊन केले!!
असा सरळ, रसिक, धार्मिक, प्रेमळ आणि कुशल मामा कुणाचा लाडका होणार नाही? त्यातही माझं स्वत:चं असं काही म्हणणं नाही! पण नरूमामाकडे बघून जाणवतं की रोजचं आयुष्य समाधानाने आणि रसिकतेने जगता येणे हे जगापुढे "यशस्वी" होण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे!

ले.त.गा.आ